Wednesday, 28 September 2016

पेंडकुळ, नांगरखडी आणि पेवा

गणपतीनिमित्त  कोकणात गेले असताना अनेक वनस्पती वारंवार समोर येत राहिल्या म्हणून त्यांच्यासंबंधी लिहावेसे वाटले. कोकणामध्ये  पावसाळ्यात जिकडेतिकडे विपुल प्रमाणात दिसणाऱ्या वनस्पती म्हणजे  हरणं(पिवळ्या रंगाची नाजूक फुले असलेली वनस्पती), तेरडा, पेवा, नांगरखडी. त्याचबरोबर पेंडकुळ हे तर बारमाही फुलणारे कोकणातले झुडूप. 
त्यापैकी सर्वात आधी पेंडकुळ, नांगरखडी आणि पेवा यांच्याविषयी.

पेंडकुळ

कोकणात ज्याला पेंडकुळ म्हणतात ते आहे  Ixora coccinea. मराठी नाव आहे बकोरा, ही वनस्पती shrub (झुडूप) या प्रकारात मोडते.अगदी लहानखुरे. कोकणात रानावनात इतर झाडझाडोऱ्यात छोटे झुडूप बनून ते वाढते. लांबट गर्द हिरवी चमकदार पाने असतात. या छोट्याश्या  झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चांदणीसारखी नाजूक तांबडी फुले, आणि चमकदार लालभडक फळे. या लाल फुलांफळांमुळेच ते गच्च झाडीत देखील ते चटकन ओळखता येते. लालभडक रंगामुळेच याला इंग्रजीत 'फ्लेम ऑफ द वूड्स', 'जंगल फ्लेम' म्हणत असावेत. इंग्रजीत 'जंगल जिरॅनियम' असेही याचे नाव आहे. या झाडाची पाने पेरावर समोरासमोर दोन असून  त्यांना सामायिक उपपर्णे असतात. झाडाला बारमहा फुले येतात.
पेंडकुळाचे फुल अतिशय सुंदर. फांदीच्या टोकाशी फुलांचा गुच्छ असतो. लांबसडक दांडीला चार निमुळत्या टोकाच्या नाजूक पाकळ्या असतात. पेंडकुळाचे पाच पाकळ्यांचे फुल सुद्धा असते म्हणे पण ते अतिशय दुर्मिळ असते अशी  गावातल्या लोकांची समजूत आहे. असे फुल मिळणे अत्यंत भाग्याचे समजले जाते. बहुतेक या या फुलविषयीच्या मिथचा प्रकार आहे. लहानपणी, मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर आम्ही कधीकधी शेजारच्या गुरे चारणाऱ्या मुलांबरोबर फिरायला जाऊ तेव्हा ती मुले या फुलांचे गुच्छ दिसले की हमखास पाच पाकळ्यावाले फुल शोधत, आणि आम्हालाही शोधायला लावत.

पेंडकुळाचे फळ (फोटो सौजन्य :विकिपीडिया)
फळे देखील दिसायला अतिशय सुंदर. खायला करवंदांइतकी मजेदार, रसाळ नसली तरी  खाण्यालायक असतात. ही फळे कुठले वन्य प्राणी, पक्षी खातात त्याचे मात्र निरीक्षण करता आले नाही. 

कोकणात फक्त लाल रंगाच्या फुलांचे झाड आढळते. आणि विशेषतः रानझाड म्हणूनच ते ओळखले जाते, पण याच्या पानांच्या, फुलांच्या आणि फळाच्या सौन्दर्यामुळे ते शहराल्या उद्यानात, (आणि  परदेशातही) बागेत शोभेचे झाड म्हणून लावतात. या बागेतील जातींच्या फुलांचा रंग पिवळा, नारिंगी, गुलाबी देखील असतो. कोकणात मात्र ते रानातच उपेक्षितपणे वाढते. गावाकडे पेंडकुळाचे मूळ औषधात वापरतात. मला आठवते , लहान असताना आमच्या या गावातील घराशेजारी दाजी तोंडवळकर म्हणून एक वृद्ध गृहस्थ राहत होते, त्यांना वाडीतील सगळे 'डाक्टर' म्हणत. खरोखरीच त्यांना जंगलातील औषधी वनस्पतींचे सूक्ष्म ज्ञान होते. ते या पेंडकुळाची, सातविणीची, कुड्याची पाळंमूळं शोधून आणीत असत. माणसांच्या साध्या आजारांबरोबरच गाईगुरांच्या आजारावर देखील उपकारक ठरणाऱ्या वनस्पतींची त्यांना माहिती होती. त्यांच्याकडून ती माहिती कुणीच घेऊन जतन केली नाही याची आता खंत वाटते. आज ते असते तर या  पेंडकुळाच्या औषधी गुणांबद्धल त्यांनी नक्कीच सांगितले असते. 

पेंडकुळ बहुदा आशिया खंडात, भारत, श्रीलंका आणि प्रशांत महासागरातील Pohnpei, Kosrae या काही बेटांवर आढळते. इथल्या लोकांचे या वनस्पतीविषयी काही समज आहेत. Pohnpei मध्ये या वनस्पतीच्या काठ्या पारंपरिक  नृत्यात वापरल्या जातात. Kosrae मध्ये या वनस्पतीवर  एखादा  पक्षी बसला असेल तर त्याची शिकार करणे निषध्द मानतात. 
नांगरखडी
'नांगरखडी' ही पावसाळ्यामध्ये रानातील  झाडाझुडपांवर वाढणारी वेल.  पोपटी रंगाची पाने आणि  जर्द पिवळ्या,  नारिंगी आणि लाल रंगात विभागलेली फुले. फुलांच्या पाकळ्या झळाळत्या ज्वाळांच्या आकाराच्या. त्यामुळे ही फुले वैचित्र्यपूर्ण असूनही अतिशय आकर्षक दिसतात. हिच्या सौन्दर्यावर भाळून काही लोकांनी,विशेषतः परदेशात आपल्या बागबगिच्यात हिला स्थान दिले आहे. कोकणात हिला 'नांगरखडी' म्हणतात. का हे सांगणे  तसे कठीणच आहे. बहुदा नौकेच्या नांगरासारखी तिची फुले असल्याने तिला 'नांगरखडी' हे नाव पडले असावे. तिची इतर भारतीय नावं देखील मजेशीर आहेत. मराठीत तिला 'कळलावी' असे म्हणतात. यामागचे कारण तिच्यातला औषधी गुण हे आहे. हिच्या कांद्यात गर्भाशयास वेणा  आणणारे द्रव्य असते त्यामुळे तिला 'कळलावी' असे नाव मिळाले आहे. हिंदीमध्ये तिला 'करीहारी' म्हणतात. 
या वेलीचा कांदा भुईत शिल्लक राहतो. पावसाळ्यातच फक्त त्याला खोडे, पालवी , फुले येतात. नंतर हा विस्तार झडून जातो. पुन्हा पावसाळ्यात सगळा विस्तार उत्पन्न होतो. सहा पाकळ्यांचे फुल आपले तोंड खाली वळवून फुलते. या सुंदर फुलावरून आणि खाली तोंड करून राहण्यावरून या वेलीला 'विलोमकल्लारी' असेही नाव पडले आहे. 'कल्लार' म्हणजे तांबडे कमळ आणि 'विलोम' म्हणजे उलटे. फुलाची टोके तांबडी- नारिंगी, मध्ये पिवळी आणि तळाला हिरवी. असे झळाळते आकर्षक रंग या फुलाला लाभले आहेत. हि फुले चार दिवस टिकतात. 
परदेशात हिची लागवड बागेत करतात, हिला Gloriosa Lily, Fire lily, Flame lily अशी इंग्रजी नावे आहेत. हिच्यावर भारतात सत्तरच्या दशकात पोस्टाचे तिकीटही निघाले होते. 


'पेव' किंवा कोकणातला 'पेवा' हे आणखी एक पावसाळ्यात सर्वत्र भरघोस उगवणारे छोटेसे झाड. शास्त्रीय नाव 'Cheilocostus speciosus' आणि इंग्रजीत त्याला 'Crepe Ginger' असे म्हणतात. पण आल्याच्या झाडांपेक्षा याच्या पानांची रचना वेगळी असते.

पेवा
भारत आणि दक्षिण आशिया खंडातील  देशात हे झाड आढळते. कोकणात त्याच्या विपुलतेमूळे त्याचे सौन्दर्यदेखील बरेचसे दुर्लक्षिले गेले आहे. विशेषतः पावसाच्या पाण्याने निथळून गेल्यानंतर जेव्हा या झाडाच्या लांबलचक पानांवर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्याचे चमकणारे सौन्दर्य विलोभनीय असते. पाने जाडसर आणि लांब असतात, एकेकट्याच फांद्या असतात आणि फांद्यांचा रंग लाल-तपकिरी असतो. फांद्याच्या टोकाला गडद-लाल-तपकिरी  अश्या एकमेकांना जोडलेल्या अनेक देठातून पांढऱ्या तलम रंगाची मोठी फुले येतात. ही फुलेही अतिशय सुंदर दिसतात. छोटा शिंजीर (Crimson Backed Sunbird) या फुलांच्या  देठातील मध खाण्यासाठी येतो. इतरही प्रकारचे सनबर्ड्स या झाडाच्या फुलांवर आपली हजेरी लावतात. आमच्या घरच्या पाठीमागेच भरपूर पेवा उगवल्याने मला खिडकीतूनच अनेक पक्ष्यांचे या फुलावर येणे बघता आले. हे सूर्यपक्षी फुलांच्या आत चोच खुपसताना दिसले नाहीत तर ते लाल-तपकिरी देठातच आपली सुईसारखी चोच खुपसून मध चाखतात. हे छोटेसे झाड देखील औषधी असून त्याचा ताप, पोटातील कृमी, अस्थमा, ब्रॉन्कायटिस इ. आजारांच्या औषधात प्राचीन आयुर्वेदात वापर केला गेला आहे. 

Tuesday, 27 September 2016

निसर्गोत्सव

'निसर्गोत्सव' हे दुर्गा भागवतांचे अतिशय छोटे आणि छान पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक ९६ सालातील आहे. यातील काही लेख नंतर 'भावमुद्रा' या पुस्तकात समाविष्ट केले गेलेले आहेत. दुर्गा भागवत म्हणजे अशा लेखिका ज्यांच्या लेखणीतून सरस्वतीने साक्षात स्वतःच शाई बनून शब्दरुपी पाझरावे. इतकं सहज, सोपं आणि सुंदर ललित लेखन मराठीत क्वचितच कुठे आढळेल. म्हणून त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे शब्दानंद अनुभवणं. हे पुस्तकही तसंच आहे. याच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात कि 'या पुस्तकाचे नाव मी दिलेले नाही. माझ्या संपादकांनीच ते मुक्रर केले आहे. संपादक माझे वाचक आहेत आणि साहित्य निर्मितीत वाचकाचाही सहभाग असतो असे मानणारी मी आहे.'

दुर्गा भागवतांच्या बहुतेक लेखांत निसर्ग असतोच, किंबहुना निसर्गाला साथीला घेऊनच त्या लेखन करतात. प्रत्येक गोष्ट इतक्या रसिकतेने अनुभवणे आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणचे संदर्भ देऊन वेगवेगळ्या गोष्टींशी त्याचा संबंध दाखवणे ही  त्यांच्या लेखनाची खासियत आहे. त्यामुळे त्यांचे लेखन ललित असूनही अनेक स्तरांना स्पर्शून जाते. त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन तर समृद्ध आहेच पण त्या स्वतःच्या अनुभवांविषयी देखील तितक्याच समर्थपणे लिहितात. 'वाळूतील पाउले' या लेखाबद्धल आपला सानेगुरुजींबद्धलचा अनुभव त्या प्रस्तावनेत लिहितात. साने गुरुजींनी त्यांना त्यांच्या 'साधना' अंकासाठी लेख लिहिण्यावर वारंवार सुचवले होते. पण तसा लेख त्या काही लिहू शकल्या नव्हत्या. मग एके दिवशी मात्र त्यांना असा भास होऊ लागला की साने गुरुजी लेखासाठी धरणे धरून बसले आहेत आणि त्यामुळे  त्या लिहू लागल्या. लेख रात्रंदिवस बसून लिहीत होत्या. लेख साने गुरुजींना पाठवूनच त्या स्वस्थ बसल्या. गुरुजींचे लेख  पोचल्याचे पत्रही आले. त्यात गुरुजींनी 'वाळूतील पाउले' ऐवजी 'काळाची पाउले' असे लिहिले होते. ते पत्र ज्या दिवशी दुर्गाबाईंकडे पोचले त्याच्या  दुसऱ्या दिवशीच साने गुरुजींनी आत्महत्या केली. असा विलक्षण योगायोग असलेला अनुभव त्या सांगतात. तसेच आणखी एका 'वात्सल्याचा अविष्कार' या लेखाबद्धलही त्या लिहितात. हा लेख प्रस्तुत पुस्तकात नाही. स्वतःचे पिल्लू गमावलेले एक माकडाचे जोडपे पोर मिळवण्यासाठी (मग ते कुठल्याही प्राण्याचे असो) कसे धडपड करते, या स्वतः बघितलेल्या अनुभवावर त्यांनी हा लेख लिहिला आहे. लेखातले माकडाचे जोडपे मांजराचे पिल्लू घेऊन त्याला वाढवू लागले. ते पिल्लूही जेव्हा मरून गेले तेव्हा दुर्गाबाईंच्या घरातीलच त्यांच्या आत्याची तान्ही मुलगी पळवण्याचाही त्या जोडप्याचा बेत होता. पण घरातल्या खंड्या कुत्र्यामुळे तो बेत सफल झाला नाही. 'श्रावणातल्या दुपारी' या लेखाविषयी त्या लिहितात की अळंबी(भूछत्र) त्यांनी लेख लिहिताना खाल्ली नव्हती, पण लेख जेव्हा या पुस्तकातून प्रकाशित होत आहे तेव्हा मात्र त्यांनी अळंबीची चव चाखली होती. ज्या काश्मीरच्या हॉटेलमध्ये त्यांनी अळंबीचा आस्वाद घेतला त्याबद्धल त्या आपला अनुभव सांगतात. 

शेवटी त्या म्हणतात 'इतक्या वर्षांपूर्वीचे हे लेख आहेत. त्यात निसर्गाला धरून  येणाऱ्या सांस्कृतिक जीवनाचेही दर्शन आहे. निसर्ग म्हणजे प्रकृती. जे असते ते. किंवा मूळ स्वरूप आणि संस्कृती म्हणजे उपयोगाच्या दृष्टीने घडवलेली कर्मसृष्टी. त्यामुळे हे लेख वाचल्यावर संपादकांनी केलेली निवड मला स्वीकारार्ह वाटते.'

'वाळूतील पाउले' या लेखात संध्याकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर भेटलेल्या तांदूळमणी वेचणाऱ्या एका गरीब लहान मुलीवर त्या लिहितात. तिच्या विषयी, तांदुळमण्याविषयी लिहितानाही सभोवतालचा निसर्ग त्यांच्या नजरेतून सुटत नाही. थंडीच्या मोसमातील संध्याकाळच्या वेळचा समुद्रकिनारा त्यांना आल्हाददायक वाटत नाही. त्या लिहितात 'संध्याकाळच्या वेळी विशेषतः कृष्णपक्षात पाण्याचा शेजार नेहमीच भयाण वाटतो, मग आता तर क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भरलेला समुद्र पातळ काळोखातून जसा काही हिसकाळून निघत होता. लाटांचा तोच आवाज रात्रीच्या हुंकाराप्रमाणे वाटत होता. सारी पंचमहाभूते जणू काही सृष्टीपासून अलग होऊन दूर दूर आपल्या स्वतःच्या प्रेरणेने वावरत होती. स्वतःची भाषा बोलत होती. मानवाविरुद्ध कट करत होती. नेहमीच्या परिचयाचे ते स्थळ, पण किती वेगळे, अनोळखी वाटत होते.' निसर्गाच्या या अवस्थेत त्यांना खूप उदास वाटतं त्यातूनच त्या वाळू तुडवत चालल्या होत्या. चालत चालत त्या अश्या ठिकाणी आल्या जिथे मुलं खेळत होती. तिथे शंख, शिंपले आणि तांदुळमण्यांची पखरण पडली होती. तांदूळमणी म्हणजे नक्की काय हे मला माहित नाही. कदाचित ते मी बघितले आहेत पण यांनाच तांदुळमणी म्हणतात हे मला माहित नाही. या तांदुळमण्यांविषयी त्या लिहितात 'लहानपणी कितीतरी तास तांदुळमणी वेचण्यात आम्ही घालवत असू, बाहुलीचे दागिने करायला तांदुळमण्यांसारखे मणी नाहीत. किती नाजूक, किती पांढरे!  वाळूत बसले की नकळत माझे हात तांदुळमणी टिपू लागतात आणि आजूबाजूचा विसर पडतो.' तिथे वाळूत बसून लहान मूल होऊन त्या तांदुळमणी वेचू लागल्या, तेव्हा त्यांच्याजवळ एक सावळी, किडकिडीत, आठनऊ वर्षांची मुलगी येऊन त्यांच्याशी जुनी ओळख असल्यासारखी बोलू लागली. आपली कहाणी त्यांना सांगू लागली. लहानपणी आईवडिलांचं छत्र हरवल्याने तिच्या बोलण्यात प्रौढपणाची झाक होती. चुलत्यांच्या घरी त्यांचा मुलगा सांभाळत ती राहत होती. शाळा नाही. अपुरं अन्न. गाल बसलेले. ओठ सुकलेले. वेणीफणी कित्येक दिवसात न झालेल्या अश्या त्या मुलीचे डोळे मात्र चमकदार होते. खूप दुःखे पचवून समंजस झालेले होते. तांदुळमण्यांचीच काय ती दौलत तिच्यापाशी होती. ती तिने लेखिकेला देऊ केली. तिने आपली गोष्ट लेखिकेला सांगितली. तिला आणि त्या छोट्या मुलाला पुरीभाजी, गंडेरी , पेपरमिंट असं बरंच काही लेखिकेने खाऊ घातलं. 'उद्या तुमच्या भाचीला पण आणा, पुष्कळ तांदुळमणी देईन तुम्हाला' असं सांगून ती मुलगी कडेवरच्या मुलाला घेऊन निघून गेली. त्यानंतर मात्र अनेकदा संध्याकाळी चौपाटीवर शोधून सुद्धा ती मुलं कधीही सापडली नाहीत. जास्त खाल्लं म्हणून त्यांचं काही बरंवाईट तर झालं असावं की लोकांकडून घेऊन खाल्लं म्हणून शिक्षा झाली असावी अशी विचित्र हुरहूर दुर्गा भागवतांच्या मनाला मात्र कायमची लागून राहिली.

'श्रावणातल्या दुपारी' हाही एक सुंदर लेख. निसर्गाचे, निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक साध्या साध्या गोष्टीचे तरल पण निर्विकार वर्णन करणारा रिपोर्ताज. या लेखातला प्रत्येक शब्द निसर्ग साक्षात समोर मांडणारा. ध्वनी, प्रकाश यांची बदलते रुपे. पावसामुळे, वाऱ्यामुळे, उन्हामुळे निसर्गात होणारे सूक्ष्म बदल. झाडे, पाखरे यांच्या हालचाली यांचे अतिशय सुंदर अवलोकन या लेखात आहे. 'केळीच्या मधल्या कोंबाची सुरळी सोडली तर बाकीची पाने वाऱ्यापावसाने फाटून फाटून त्यांच्या चिरफळ्या उडाल्या होत्या.' 'केळीच्या बुंध्याशी असणाऱ्या गुलबक्षीच्या झाडावरच्या कळ्याही हा उन्मत्त नाच आ वासून पाहू लागल्या होत्या.' माका, राजहंसाचा वाटोळ्या सॅटिनसारख्या रेशमी पानांचा आंबट पाला, ओव्याची पाने, टाकळा अश्या खेड्यातील भाज्यांवर देखील लिहिले आहे. पावसाळ्यात उड्या मारणाऱ्या बेडक्या त्यांना त्रास देऊन जीव रमवणारी उनाड पोरे यावरही लिहिले आहे. तसेच भूछत्रांवरदेखील अतिशय छान लिहिले आहे. 'मुचकुंद (कनकचंपा) या झाडाच्या उथळ ढोलीत केव्हातरी त्यांचे बी पडून ती उगवली होती. शेवंतीसारख्या पिवळ्या रंगाची.' पण त्या उनाड पोरांनी ती सुंदर भूछत्र भराभर तोडली, हुंगली, आणि शेवटी कोळपून गेलेली ती छत्रे फेकून दिली. कर्नाटकात भूछत्रांना 'अणिबे' आणि कोकणात 'अळमी' असे म्हणतात.
कावळ्यांची घरटी पावसाळ्यातच बनतात. मग त्यातल्या पिलांच्या जगण्याची धडपड पावसाळ्यात पाहायला मिळते त्याचेही अतिशय निर्विकार वर्णन केले आहे. 'सुरुपापेक्षा कुरुपाचे मरण पाहणे अति दुःसह असते' 'पावसाळ्यात विशेषतः श्रावणात, अशी दुबळी पोरे कितीतरी मरतात. लायक असेल त्यालाच जगू देण्याचा पाखरांचा कायदा मोठा कडक असतो. अश्या श्रावणातल्या दुपारी कटू प्रसंगही दिसतात, आणि मधेच आपले शंखाचे भस्मी रंगाचे घरकुल पाठीवर घेऊन, शिंगे रोखून संथ गतीने सरकत चाललेली अळूच्या पानावरची गोगलगाय देखील दिसते. तिच्या अंगातून निघणारा चिकट द्रव सरपटत गेलेल्या मार्गावर सांडलेला असतो आणि त्या तेलाच्या तवंगाप्रमाणे दिसणाऱ्या पट्ट्यात सूर्यकिरणांमुळे इंद्रधनुष्याचे रुंग उमटलेलेही दिसतात.


'ऊन-पाऊस' ही एका चिमणीच्या केलेल्या अवलोकनाची दर्दभरी कहाणी. दुर्गा भागवतांनी त्यांच्या खास मोजक्या पण चटका लावणाऱ्या शब्दात सांगावी अशी. चिमणी या पक्ष्याशी अतिशय सख्य असल्याने मला एकदा वाचल्यानंतर हा लेख पुन्हा वाचावासा वाटेना. हा लेख 'भावमुद्रा' मधेही समाविष्ट आहे, आणि तो पूर्वी वाचला होता. क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस, तसे क्षणात आनंद आणि क्षणात दुःख असे त्या चिमणीचे जगणे. कोकणातला पावसाळा असा असतो, क्षणात सोनेरी ऊन आणि क्षणात काळवंडून टाकणारे आभाळ.

'मुंबईत वसंतागम' हा लेख म्हणजे दुर्गा भागवतांची खासियत. इतकी सौन्दर्यदृष्टी त्यांना लाभली होती की मुंबईसारख्या बकाल शहरातील वसंत ऋतूचे आगमन त्या टिपतात. लेखाची सुरवातच अतिशय सुंदर आहे. त्या लिहितात, 'मुंबईतील झाडे, काय आहे त्याबद्धल लिहिण्यासारखे असे पुष्कळ जण म्हणतील. पण याच मुंबईत माझ्या डोळ्यांनी झाडांची सुंदर चित्रे बघितली आहेत.' 'ऋतूंमधला बदल म्हणजे निसर्गातील क्रांती व उत्क्रांती, एक ऋतू पालटून जेव्हा दुसरा येतो तेव्हा वरचे आकाश, खालची जमीन, अवतीभवतीचे वातावरण नित्य नवा रंग धारण करते. या नव्या रंगातच आमच्या शहरी झाडापानांचा कायापालट होतो.'
किती झाडांवर आणि त्यावर येणाऱ्या पक्षण्यावर त्यांनी लिहिले आहे.
आंबा : आंब्याचे मोहोर आणि त्यावर घोंगावणाऱ्या केंबरी (केंबरी हा एक अतिशय सूक्ष्म कीटक असतो, मालवणीत त्याला किमरु म्हणतात) आणि लांब सुईसारख्या चोचीने मोहोर टिपणाऱ्या मिराळ्या चिमण्या (मिराळ्या चिमण्या म्हणजे फ्लॉवरपेकेर्स की सनबर्ड?)
बदामाचे झाड: पळसासारखी मोठी लांबट पाने, पिकून गाळताहेत, पण रंग किती सुंदर लाल! त्याचा कोवळ्या पानांनी सुद्धा हेवा करावा. ठिकठिकाणी गळत्या पानांच्या जागी नव्या पानांचे पोपटी लालसर, निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे दिसणारे मोठेमोठे कळे जोरात वर येत आहेत.
शेवगा पांढऱ्या फुलांनी भरून गेलेला, आंबा, फणस, शेवगा यांच्या मागचे गुलमोहराचे झाड त्यामानाने कितीतरी साधे दिसत आहे.
'शिरीष या झाडाची पाने सपासप गळून पडताहेत. आणि लालसर रंगाची सुंदर कोवळी पालवी त्या झाडाच्या अंगाअंगावर फुलत आहे. एप्रिल महिन्यात हि झाडे जांभळट, गुलाबी, नाजूक फुलांनी बाहेरून जातील.;'   शिरीषच्या झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पोपटांबद्धल त्या लिहितात 'आजूबाजूला एकवेळेला निदान पन्नास-साठ तरी पोपट दिसतात. प्राणाला पोपटाची उपमा का देतात, 'मायेचा हिरवा रावा' का म्हणतात हे मला या झाडावरचे पोपट पाहिले तेव्हा चांगले कळून आले'. पाखरांमुळे झाड जिवंत वाटते असेही त्या लिहितात. पोपटांच्या पिलांना बोक्यापासून वाचवण्यासाठी कावळे गोंगाट करून मदत करतात पण हेच कावळे पोपटाची पिले जरा घरट्यातून बाहेर आली कि केव्हा मारू केव्हा नको असे करतात. या कावळ्यांच्या विचित्र मैत्री/शत्रूत्वाच्या विसंगत वागण्याबद्धलही त्यांनी लिहिले आहे.
मार्चच्या अखेरीस फुलणारा पळस, पांगारा या झाडांचे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण फुलांचे त्या वर्णन करतात. ''पीलक' (म्हणजेच 'हळद्या' (Black headed Oriole)) ह्या पक्ष्याने पळसाच्या झाडावर घरटे बांधलेले आहे. चिनी जास्वंदीची अर्धोन्मीलित असणारी फुले आणि त्यावर येणारा काळसर लहान पक्षी म्हणजे फुलचूखी (हनीसकर). त्याचे केलेले निरीक्षण त्यांनी शब्दात असे मांडले आहे. ' बसला तो जास्वंदीच्या झाडावर! फुलाचे नळकांड्यासारखे खालच्या बाजूस असणारे तोंड. त्या तोंडात खालच्या बाजूने मान उंचावून आपली लांब टाचणीसारखी बारीक चोच या पक्ष्याने खुपसली आणि तो मध पिऊ लागला. फुलपाखरे मध चाखतात. पण फूलचूखीने घेतलेला हा मधाचा आस्वाद मी कधीच विसरणे शक्य नाही. 'मध चाखावा फुलपाखरांनीच, पक्ष्याला त्याचे काय होय?' असे कविवचन आहे. पण फुलचूखी मधाचा घास कसा घेते हे एकदा तरी ज्याने पहिले आहे तो ते दृश्य विसरणे शक्य नाही.' 'एप्रिलच्या भरात गोविंद पक्षी(थ्रश ? हा कुठला पक्षी? ) , तांबट, गावठी बुलबुल या सगळ्यांची संगीतशाळा भरते. प्रत्येकजण आपले आकर्षण वाढवतो आहे, गातो आहे, आपली जात वाढवण्याची धडपड करतो आहे. '


'गुलमोहराच्या आठवणी' या लेखात त्या आपल्या स्मृतीतील गुलमोहराच्या झाडांविषयी लिहितात. ऐन वसंतात जेव्हा इतर झाडे कोवळी पालवी घेऊन नटलेली असतात तेव्हा हे झाड काट्याकुटक्यांचा आपला देह घेऊन उभे असते. त्यातही असलेल्या सौदर्यांविषयी त्या लिहितात. 'त्याच्या त्या काळ्या कबऱ्या फांद्या,  निळसर भुरक्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर किती खुलून दिसतात! सूक्ष्मतेने पाहणाऱ्या खेरीज कुणाला कळणार नाही. चिनी चित्रकारांनी निष्पर्ण वृक्षांचे कलात्मक चित्रण करण्यात सिद्धी मिळवली आहे. गुलमोहराच्या उन्हाळी रूपाचे हे उघडे-नागडे चित्र पाहिल्यानंतर मला त्या चित्रातले माधुर्य थोडेसे समजू लागले.
उन्हाळयाच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरवातीला पूर्ण फुललेला बहारदार लालभडक, ऐन पावसाळ्यात आणि अखेरीस पूर्ण हिरवागार आणि ऐन वसंतात निष्पर्ण अशी रूपे घेणारा गुलमोहर मलाही आगळावेगळाच वाटतो. त्याच्याविषयीच्या अनेक आठवणी दुर्गाबाईंनी सांगितल्या आहेत. त्यातल्या काही म्हणजे , गुलमोहराच्या शेंगाना तरवारी समजून खेळले जाणारे पोरांचे खेळ, गुलमोहराच्या टपोऱ्या कळ्या बाहुलीच्या लग्नात नारळ म्हणून वापरल्या जायच्या, पाकळ्यांचे ठसे हातावर काढून गोंदण्याचे, मेंदीचे सुख अनुभवले जायचे, कळीच्या आतले पराग म्हणजे लहान मुलांच्या दुकानातील स्वस्त केशर, सर्वात मोठे विलोभन म्हणजे लाल पराग आणि त्याच्या माथ्यावरचा बडीशेपेच्या आकाराचा पिवळा पागडीसारखा तुकडा लहान मुलांना लढाऊ शिपायांसारखा वाटतो , या परागांची झुंज लावून कुठल्या शिपायाची पगडी उडते ते बघणे असा लहान मुलांचा खेळ, अश्या अनेक आठवणी. या सर्वच आठवणी सुखद नाहीत काही दुःखद पण आहेत. जशी गुलमोहराच्या झाडाखाली राहणारी वेश्या आणि एक दिवस वाधळात उन्मळून पडलेले ते झाड, त्यानंतर वेश्येची आणि तिने आश्रय दिलेल्या कुत्र्यांची झालेली वाताहतही आहे. अत्यंत गलिच्छ अशा शौचकूपांच्या गर्दीत वाढलेले आणि दार मोसमाच्या वेळी जे काही आहे त्यावर सृष्टिनियमाला मानून पुष्पवृष्टी करणारे करूण झाडही दुर्गाबाईंना दिसते. आणि त्या म्हणतात 'अशा कर्मयोगाचा मला धाक वाटतो, त्या झाडामुळे त्या गलिच्छ ठिकाणालाही शोभा आली आहे याचा विसर पडतो आणि मन उदास होते' अशा या झाडाखाली एक भिकारीही मेला तेव्हा त्याच्यावरही गुलमोहोर आपल्या शिळ्या पाकळ्या टाकीत होता.


'सिध्देश्वरच्या तळ्यातील कमळे' या लेखात त्या सोलापूर येथील सिद्धेश्वराच्या देवळासमोर असलेल्या तळ्यातील मोठ्या कमळांविषयी लिहितात. मोठी फुले म्हणजे कमळ, लहान फुले म्हणजे लिली असे त्या सांगतात. हे सिद्धेश्वराचे तळे नंतर बुजवले गेले आणि कमळेही गेली, त्याबद्धल त्या हालहाल व्यक्त करतात. कमळाचे तिचे गाढले गेलेले बी शोधून कुणी ती कमळे पुन्हा जिवंत करावीत असा आग्रह त्या धरतात. 'मला वाटते, सारखे वाटते, की आजही तळ्याच्या ठिकाणी खोदाखोद केली तर काही बिया सापडतील. एक हजार वर्षांपूर्वी सुकलेल्या चीनमधल्या मांच्युरियाच्या तळ्याच्या तळाशी बिया सापडल्या, त्यातल्या काही रुजल्या. त्या कमालिनीच्या कळ्या धरल्या. त्या फुलल्या. सोळा पाकळ्यांची ती कमळे होती. जपानमध्ये टोकियोत एका इमारतीचा खोल पाया खणताना तीन हजार वर्षांपूर्वीच्या कमळांच्या बिया मिळाल्या, याच काळच्या कमळाच्या बिया पिरॅमिडातही मिळाल्या. मग सिद्धेश्वराच्या तळ्यात बुडी मारलेले मकाणे रुजून खचित मेले नसतील. कुणी त्यांना वर काढून त्या सोनदळी कमळांच्या वेलींना पुनर्जीवन देईल का?'

'तुळस' तुळशीच्या झाडाचे सौन्दर्य, त्या झाडाच्या लहानखुऱ्या रूपाबद्धल भारतीयांची जडलेली सात्विक, वत्सल भावना, सगळ्या पारंपरिक गोष्टीत तिचा होणारा उपयोग, तिचे महत्व, तिच्यावर रचलेल्या पौराणिक कथा, करुणरसाने भरलेल्या लोककथा, लोकगीते याबद्धल या लेखात लिहिले आहे. तुळस हि कुमारिकेचे प्रतीक आहे, तरीही पुराणातील नियमानुसार लग्न तिलाही चुकले नाही. तुळशीचे लग्न आणि त्यावरील कथा फारच रंजक आहेत. खुद्द दुर्गा भागवतांनी 'तुळशीचे लग्न' नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे ज्यात तुळशीची आणि तिच्या लग्नाची कथा आहे. या लेखात पुराणातल्या तुळशीशी निगडित अनेक कथा, संदर्भाचा परामर्श त्या घेतात.

'वनकथा' या लेखात दुर्गाबाई आपल्या मध्यप्रदेशातील भ्रमंतीतील आणि महानदीच्या तीराच्या आसपासच्या भागातील आदिवासींच्या आठवणी आणि अनुभव सांगतात. आदिवासींचे वागणे, बोलणे, त्यांच्या समजुती इत्यादिविषयी त्या लिहितात.

'रानझाडांची गोष्ट' या लेखात त्यांनी जातककथांतील एक कथा सांगितली आहे. जातककथा या गौतम बुद्धाच्या पूर्व जन्माच्या (या कथांत त्याला बोधिसत्व म्हटले जाते). शाल म्हणजेच सागाच्या झाडाशी निगडित हि कथा आहे.

'झाडांचे आक्रंदन' या अतिशय सुंदर लेखात त्यांनी झाडेही बोलतात, त्यांनाही भावना व्यक्त करता येतात, स्वतःच्या दुःखाचे आक्रंदनही करता येते त्याबद्धल कळकी, केळी यांचे काही पुरावे दिले आहेत. अँथोनी जुलिअन हक्सले या अत्यंत गुणी आणि रसिक शास्त्रज्ञाने 'प्लांट अँड दि प्लॅनेट' नावाच्या पुस्तकात कळकीच्या कोंब फुटताना होणाऱ्या आक्रन्दनाविषयी लिहिले आहे. कळकीचा कोंब म्हणे सात पदर तोडून बाहेर येतो. याविषयीच्या अनेक आख्यायिकाही आहेत. तसेच पाऊस येणार म्हणून नाचलेल्या एका झाडाविषयी एक शास्त्रज्ञांनी सांगितलेली गोष्टही त्या सांगतात.

'खडपा उसाची आठवण' या लेखात त्यांनी लहानपणीची एक रुद्द्य आठवण सांगितली आहे. त्या तेव्हा नाशिकमध्ये आत्याकडे राहत होत्या आणि गावातील बंधनांना जुगारून मोकळेपणे, मस्ती करत त्या जगत होत्या. लोक काय म्हणतील याची भीड त्यांनी बाळगली नाही. परंतु लोक बेरकी होते, त्यातीलच एक म्हणजे दुर्गाबाईंच्या मैत्रिणीच्या घरांतल्यानीच एकदा दुर्गाबाई आणि त्यांच्या बहिणीला बोलावून त्यांचा अपमान करण्याचे ठरवले आणि त्यांना कुणीही न खाऊ शकणारा खडपा ऊस खाऊ घातला. त्या लोकांना मात्र दुर्गाबाई पुरून उरल्या आणि त्यांची चांगली खोड कशी मोडली त्याबद्धल हा लेख आहे.

'गेंडा' , 'हत्तीची कथा' या लेखांत या प्राण्यांविषयी अनेक संदर्भ, त्याच्या विषयीची अतिशय छान माहिती त्यांनी दिली आहे.


'पक्ष्यांचे बोल' हा अतिशय सुंदर लेख आहे, कवडा, पावश्या , पोपट, कबुतर, भुंगा , चिमणी  यांच्या बोलांविषयी त्यांनी लिहिले आहे, त्यांच्या बोलांवरून पडलेल्या लोककथा आणि आख्यायिकांचे संदर्भही दिले आहेत. तसेच 'पिवळीच मी पाकोळी की' या लेखातही त्या पाकोळीविषयी, आणि 'वेडे झाड' या लेखात एकही पान सारखे नसलेल्या एका झाडाविषयी त्यांनी लिहिले आहे.

अतिशय सुंदर माहिती, आणि अवलोकन असलेला हा निसर्गाच्या अनंत लीलांच्या संदर्भांनी नटलेल्या  लेखांचा असा हा वाचनीय 'निसर्गोत्सव' आहे.


Monday, 29 August 2016

चित्रकला आणि कलरब्लाइंड रवींद्रनाथ टागोर

'People often ask me about meaning of my pictures, I remian silent, as my pictures are
It is for them to express and not to explain.'

'I have nothing to say about my pictures, I do not know what I have done or wanted to say.'
- Rabindranath Tagore 



रवींद्रनाथ टागोर (ठाकुर) यांना कवी, कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून ओळखले जाते. पण ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे चित्रकारही होते. मी त्यांच्या चित्रांचे एक पुस्तक लायब्ररीत बघतले आणि त्यातली त्यांची चित्रे मला अतिशय आवडली मग त्यांच्या चित्रकलेबद्धल जाणून घ्यावेसे वाटले. २०१३ मध्ये मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट मध्ये टागोरांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले होते. त्याच्या चित्रांचे वैशिष्ट्य असे कि ती खूप काळ लक्षात राहतात. माझ्या मनात ती अधून मधून रेंगाळतात आणि त्यांच्यामागे काय आहे हे जाणून घ्यावेसे वाटते. म्हणून हा खटाटोप करत आहे. त्या चित्रातली गूढ माणसं, विचित्र आकार आणि विलक्षण रंग आणि रेषा यांचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपद्व्याप.

एखाद्या कोकिळ पक्ष्याचे चे आर्त ओरडणे रंगवायचे झाले तर ते कसे रंगवायचे? जेव्हा पोटात भीतीचा गोळा येतो आणि नक्की भीती कश्याची वाटते तेही कळत नाही तेव्हा चित्रात ते कसे दिसेल? जेव्हा एखाद्या माणसाचा फोटो काढला जातो तेव्हा तो चांगले कपडे घालून, केस विंचरून (कदाचित थोडी पावडर फासूनही) फोटोला बसतो. जसाच्या तसा येतो फोटो. पण त्या माणसाच्या आतल्या पिचलेल्या, खचलेल्या, खस्ता खाल्लेल्या, अपमान गिळून, ओढग्रस्त, नकारात्मक अनुभवाने भरलेल्या, कंटाळलेल्या, घाबरलेल्या, कधीकधी रागावणारऱ्या, तर कधी हसणाऱ्या, तर कधी नशीबाला दोष देणाऱ्या 'त्या आतल्या' माणसाचे काय? तो कुठे आहे? फोटोत तर तो कुठेच नसतो. अश्या माणसाचा खराखुरा फोटो, अगदी आत आरपार पाहून काढलेला, मिळेल कधी, असे त्याचे काढलेले खरेखुरे चित्र मिळेल?  कुठून आणायचे रंग आणि आकार मग हे व्यक्त करण्यासाठी? हे रंग मनाच्या तळगाभाऱ्यातले हवेत. पोटात पडलेल्या खोल खळग्यातले हवेत.
त्यासाठी दृष्टी बदलावी लागेल. डोळ्यांचीही आणि मनाचीही. रवींद्रनाथ टागोर यांची चित्र थेट अशी आहेत. माणूस साधासुधा नाही. महामानव.

त्यांनी १५७३ रंगचित्र आणि रेखाचित्र काढली.
त्यांच्या चित्रांकडे बघून अनेकदा असं वाटतं कि या माणसाला जे दिसतं त्यापलीकडे जाऊन, सापडलेलं असं काहीतरी सांगायचं आहे. त्यांच्या चित्रातले रंग तर एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती देतात. आपल्याला  सहजासहजी असे रंग आपल्याला पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या संवेदना काहीतरी खोल जाणीव करतात. का वापरत ते असे रंग? त्यांच्या चित्रांच्या रंगामागे, आकारांमागे कोणते सौंदर्यशास्त्र दडलेले आहे?

त्यांच्या चित्रातील या विचित्र रंगांचे कारण हे आहे रवींद्रनाथांना उतारवयात आलेला रंगांधळेपणा (protanopic-Red-green color blindness, in which the wavelengths of light that we see as the colour red are lost to the eye, and there is confusion between red and green in perception. It is not an illness, just a genetically inherited condition. There is no ‘cure’ for it.). त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी चित्रे काढायला सुरुवात केली. सुरवातीला लिहिताना सहज पेनाने केलेला चाळा म्हणून ते डूडल चित्रे काढीत. हळूहळू त्यात रंग भरणे चालू झाले तसे त्यांनी पेपर, रंग घेऊन त्यावर आपल्या अभिव्यक्तीला मुक्त वाट करून दिली. मुळात कवी, आणि खरं तर असे म्हटले जाते कि 'सगळ्या प्रकारची कला काव्याकडे वळते'. त्याउलट या कवीचे काव्यच चित्र निर्माण करत गेले. काव्य आणि चित्र यात फरकच उरला नाही. त्यांची चित्रकला अतिशय उच्च दर्जाची असली तरी ते स्वतः त्याबाबतीत असंतुष्टच होते. कारण ते स्वतःच्या या अविष्काराला मोजक्या तंत्रशुद्ध, चित्रकलेत मान्यता पावलेल्या अश्या नियमांच्या भिंगातून बघत होते. काही काळानंतर त्यांना स्वतःची चित्रकला इतर चित्रकलेच्या दृष्टीने कमी दर्जाची वाटू लागली. आपल्याला तांत्रिकदृष्ट्या चित्र या वयात शिकणे शक्य नाही आणि चित्रकलेची ती(बहुदा त्यांना अपेक्षित असलेली ) पायरी गाठणे शक्य नाही असे त्यांनी मनाकडे घेतले आणि चित्रकला सोडूनही दिली. पण खरंतर  त्यांची न शिकता काढलेली चित्र खूपच श्रेष्ठ आहेत. खुद्द व्ही. एस. गायतोंडेना विचारले गेले होते कि या काळात भारतात श्रेष्ठ चित्रकार कोण आहे? त्यावर व्ही. एस. गायतोंडेनी रवींद्रनाथ टागोरांचे नाव घेतले होते.  


सगळ्यात वेगळी आहेत त्यांची व्यक्तिचित्र (portraits) आणि  निसर्गचित्रं (landscapes). सगळ्या श्रेष्ठ कलाकृती सारख्याच पातळीवर असतात आणि एकातून दुसऱ्याची आठवण करून देणाऱ्या असतात. टागोरांचे एखादे व्यक्तीचित्र किंवा गडद निसर्गचित्र कधीतरी मनात खोल रुतून बसलेली एखादी संगीताची धून समोर आणते, तर कधी एखाद्या कवितेची ओळ, किंवा ग्रेसची संध्याकाळ.





स्वतःच्या चित्रकलेबद्धल ते म्हणतात, 'Words are too conscious; lines are not. Ideas have their form and color, which wait for their incarnation in pictorial art. Just now painting has become a mania with me. My morning began with songs and poems; now, in the evening of my life, my mind is filled with forms and colors.'

त्यांच्या चित्रकलेवर Ernst Ludwig Kirchner याच्या वूडकट प्रिंटींगचा तसेच 'मलागान कार्विंग', 'हैदा' ( sculptural tradition among the Haida Indigenous Nation from the northwest coast of the North America) , आणि स्क्रीमशौ (scrimshaw is scrollwork, engravings, and carvings done in bone or ivory)  या  कलाप्रकारांचा प्रभाव होता.   
त्यांच्या चित्रकलेबद्धल केतकी डायसन या लेखिकेने 'रोंगेर रबिन्द्रनाथ'(Ronger Rabindranath/ Rabindranather Sahitye o Chitrakalay Ronger Byabahar) या पुस्तकात अभ्यासपूर्ण  लेखन केले आहे. हे पुस्तक मला कुठेही  मिळाले नाही. खूप शोधले. जर मला ते मिळाले तर ते वाचण्यासाठी बंगाली शिकण्याचीही  माझी तयारी आहे. 

There's ultimate mystery at the heart of great art!
'Beauty that can all too easily vanish if we seek to understand it too easily and too quickly'. 

घर थकलेले संन्यासी

घर. म्हणजे नक्की काय? आजवरच्या आयुष्यात आपण कुठे कुठे राहिलो? मी विचार केला, समजत असल्यापासून आजवर जवळपास चौदा वेगवेगळ्या ठिकाणच्या घरात मी राहिले. राहिले म्हणजे दोन चार दिवस नव्हे, तर खरंखुरं वास्तव्य करून, अनेक महिने, अनेक वर्षं. इतक्या घरांना भेटून सुद्धा 'घर' म्हणजे नक्की काय ते मला सांगता येत नाही. 

पण एक अनुभव मात्र आला. घर ही मोठी विलक्षण चीज आहे. आमच्या गावचं घर, किमान दोनशे वर्षं तरी जुनं होतं. लहानपणी खूप राहिले होते तिथे. त्यावेळी अनेक लोकं राहायची तिथे. पण हळूहळू लोकं पांगली. काहींनी आपली स्वतंत्र घरे आजूबाजूला बांधली. माणसेही कमी कमी होत गेली. शेवटी घरात राहणाऱ्या माणसांची संख्या झाली 'एक'. ती होती माझी आजी. शेवटी तीही गेली. आणि घरानेही संन्यास घेतला.  ते ढासळू लागलं. वासे कोरम झाले. भिंतींना चिरा गेल्या. पूर्वी घर होतं  ऐसपैस, अनेक खोल्यांचं. देवखोली आणि तिला लागून असलेली प्रशस्त आयताकृती जागा, जिला 'मधला लोटा' म्हणत. प्रत्येक खोलीला एक वैशिष्ट्यपूर्ण नाव , 'पुढला लोटा', 'मधला लोटा', 'वाणशी' अशी विचित्र नावं. 

या मधल्या लोट्याला लागून जीना, जीन्याच्या बाहेरील भिंतीवरील खालच्या कोपऱ्यात नागोबाचे चित्र. हा चित्रातला पिवळा नागोबा घराएवढ्याच वर्षांचा झाला असावा. पण घर रिकामं झालं आणि नागोबाच्या सोबतीला उरले फक्त कवडसे. फुटक्या नळ्यातून पाझरणारे. आणि उंदरांनी पोखरलेल्या भुसभुशीत जमिनीतून उगवलेल्या वेली. 


माझा भाऊ या कोसळणाऱ्या घराला पाहायला गेला असताना त्याने काढलेला हा वरचा फोटो, पण हा फोटो नाही, आहे एक चित्र, एका जिवंत घराचे. या रिकाम्या पोकळीत आहेत शांत, स्तब्ध उभ्या असलेल्या भिंती, आतल्या एका खोलीचं बंद दार, न दिसणारा जिना, कोपऱ्यातला धूसर झालेला नागोबा. ही पोकळी, हा चार भिंतीत गोठलेला अवकाश आता कधीच डोळ्यासमोर परत दिसणार नाही असेच हा फोटो पहिला तेव्हा वाटले होते. 

जुने घर शेवटी पडले. J.C.B आला. त्याचे पार्थिव बाजूला करून त्या जागी आता एक छोटेसे घर उभे आहे. या नवीन घरात आहे एक देवखोली आणि त्याला लागून असलेला हाच, एवढ्याच आकाराचा मधला लोटा. एवढेच सोपे सुटसुटीत घर. पूर्वी होते माणसांचे घर आता झाले आहे देवांचे घर. त्या घराच्या वर्धापनदिनी आम्ही सर्वजण गेलो होतो. बाजूला आमचे स्वतंत्र घर आहे, तिथे मी रात्री झोपले पण झोप आली नाही.  दुसऱ्या रात्री या नवीन घरात झोपले. आणि काय कोणास ठाऊक पण जेव्हा डोळे मिटले तेव्हा असा भास झाला की आपण जुन्या घरातच झोपलोय. त्याच भिंती,तीच जमीन जिच्यावर वर्षानुवर्षे डोकं टेकलं. चार भिंतीतली तीच पोकळी. तीच स्पेस जी पूर्वी होती. काहीच बदलले नाहीये. हे तर तेच घर आहे. दृश्य भिंतीनी की अदृश्य भिंतीनी बनलेले घर. त्या जागेतला कण अन कण तोच. भिंती कोसळू शकतात पण त्यातलं जिवंतपण कोसळू शकत नाही. आणि बिनघोर झोप लागली.  

या अनुभवावरून घर म्हणजे काय ते समजले नाही पण एवढे मात्र समजले ते म्हणजे घर ही एक मोठी विलक्षण चीज आहे.

Tuesday, 9 August 2016

काली


 'काली' ही जी. ए. कुलकर्णी यांची कथा आहे. 'सांजशकुन' या त्यांच्या कथासंग्रहातली. फक्त तीन पानांची आहे. पण त्यांच्या अनेक कथांतील अतिशय परिपूर्ण अश्या काही कथा आहेत त्यापैकी ती एक वाटते. 

एक माणूस एका गावातील कालीच्या देवळात येतो. खुप लांबचा प्रवास करून. गाडीने. पण एका ठिकाणापाशी दारातच उभ्या असलेल्या त्याला कुणीतरी गाडीतून ढकलून देते. तो धडपडतच तोल सावरत चालत्या गाडीतूनच उतरवला जातो. तो गाडीतून कुठे चालला होता? गाडी कुठे चालली होती? कोण जाणे. 

पण उतरवून दिल्यावर मात्र तो म्हणतो, 'मी काही पुढे जाणारच नव्हतो. मला येथेच उतरायचे होते. मग गाडी नीटपणे थांबवायला काय झाले होते?' अर्थात हा राग तो स्वतःलाच सांगतो.

कोण आहे हा माणूस? जो ढकलून दिल्यावर तोल सावरत उतरतो एकदाचा, म्हणतो की मला इथेच उतरायचे होते.  पण मग तो तसे गाडीवानाला सांगतो का? की गाडी थांबेलच असा त्याचा अंदाज असतो? बहुतेक गाडी इथे येईपर्यंत त्याच्या मनाची खात्रीच नसावी कि आपण इथे उतरावे की नाही. तो निर्णय घ्यावा की नाही? निर्णय. चॉईस. तो घेण्याचे स्वातंत्र्य त्याला फक्त तोपर्यंतच होते जोपर्यंत तो गाडीच्या दारापाशी उभा होता. गाडी थांबेपर्यंत नक्की करणार नव्हता तो हा निर्णय. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते का त्याला पण? नव्हते. त्याच्या निर्णय घेण्याआधी तिसऱ्याच कुणीतरी त्याला गाडीबाहेर ढकलून दिले. कुणी? तर अश्या कुणीतरी ज्याच्यावर या माणसाचा कंट्रोल नव्हता. निर्णय कुणी घेतला मग? कुणीही नाही. 
जे काही अभावितपणे  घडलं त्यावरची या माणसाची प्रतिक्रिया म्हणजे 'मला इथेच उतरायचं होतं'. त्याला त्याची नियती कळली होती आणि बहुदा हेही कळलं होतं की आपण फक्त मनात ठरवायचं. प्रत्यक्षात निर्णय घेणं आपल्या हातात नाही. याच जीवनाची सवय लागली होती त्याला. 

जे घडेल त्यावर आपला कंट्रोल नाही हे मान्य आहे त्याला. पण कुरकुर करणे सोडेल का तो? कुरकुर करणे आणि निषेध व्यक्त करणेच त्याच्या हातात असल्याने त्याने तो व्यक्त केला.त्याच्या मनातील अफाट पसरल्या केवळ आणि केवळ त्याच्या विश्वातला(आणि त्या विश्वाचा) तो नायक. त्याला वाटते आपलेच विश्व  खरे. मग आपल्याला उतरताना थोडे अदबीने, मृदूभावाने उतरवले पाहिजे गाडीतून. पण हे त्याचे वाटणे. त्याच्यापुरतेच. त्याच्याबाहेरील विश्वात तो एक कस्पट. म्हणून ढकलून दिले गाडीतून. निषेध गाडीतून ढकलल्याचा नाही. निषेध आपल्या मनातील विश्व खोटे ठरल्याच्या आलेल्या प्रत्ययाचा. 

तो चालत गावात येतो. गाव ओसाड  पडलेले. कड्याच्या पायथ्याशी वसलेले. एका कड्याने आपला काळा फणा गावावर धरलेला. 'काळा फणा' की 'काळ फणा'?.  तो इथल्या स्मृती आठवत, कालीच्या देवळात येतो. गावातील घरे त्याच्या ओळखीची. पण आता तिथे कुणी नाही. हे गाव खरं की परत मनातलं? जुन्या आठवणीतलं? 

हा माणूस आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहे कि जिथून आठवणीत जिवंत असलेली पण आता ओसाड पडलेली घरं त्याला दिसत आहेत? ऊन तर कथा सुरु होते तेव्हापासून साथीला आहेच त्याच्या. कथेला सुरवात होते तेव्हा ऊन प्रखर असते. त्याच्या झळा जाणवत राहतात. ते ऊन आठवणींच्या ओसाड घरांच्या भिंती-छपरावरून निर्विकारपणे ओघळत असते. 

शेवटी जेव्हा तो पायऱ्या चढत कालीच्या मंदिरात पोहोचला तेव्हा ऊन 'थोडे मऊ' झाले होते. 

कालीची मूर्ती भव्य. दोन पुरुष उंच. सहा हातांची. चकचकीत काळ्या पाषाणाची. त्या माणसाने हि मूर्ती पूर्वी अनेकदा पहिली होती. पण तिच्या भेदक नजरेने त्याचा भीतीने थरकाप उडत असे. मूर्तीच्या उजव्या हातात खड्ग होते. काली म्हणजे संहारी. मृत्यूची देवता. या देवळात तो माणूस कश्यासाठी आला होता? त्याने ही मूर्ती पूर्वी अनेकदा बघितली होती, या गावात राहत असताना बघितलेली खरीखुरी, या गावच्या आठवणींमध्ये असेलली, आणि मनातही पाहिलेली. काली त्याने खुद्द बघितलेली आणि काली त्याच्या मनात व्यापून राहिलेली. 

तो देवळाच्या गाभाऱ्याचे वर्णन करतो. गाभारा म्हणजे गर्भगृह. त्यात असलेली कालीची मूर्ती. गर्भातला रक्तरंजित लाल प्रकाश तिच्या सर्वांगावर निथळत होता. गर्भगृहाची विशाल चौकट, पूर्णपणे मोकळी दिसत होती. म्हणजे गर्भगृहात येण्याला मज्जाव नाही. जाण्याला आहे बहुतेक. पण या माणसाला माहित होते कि मोकळ्या दिसणाऱ्या या गर्भगृहाच्या चौकटीत एक अत्यंत पारदर्शक अशी स्फटिकाची भिंत होती. अभेद्य, अदृश्य. त्याला तिचे अस्तिव उमगले होते. या स्फटिकातून आरपार जाण्याचा प्रयत्नही त्याने आधी केला होता, तो जवळजवळ पार झाला असताना ऐनवेळेला त्याला आपली बायको-मुलं आठवली, आणि स्फटिक पुन्हा अभेद्य शिलाखंडाप्रमाणे झाला होता. कोणीतरी ओढून फेकून दिल्याप्रमाणे तो फरशीवर येऊन आधळला होता. 

म्हणजे मागाचचे गाडीतून ढकलणारे इतर कुणीही नव्हते आणि त्यावेळी स्फटिकातून ओढून फेकून देणारेही इतर कोणीही नव्हते. 

जुने आठवून तो थोडा उदास झाला मग पुन्हा स्फटिकापाशी आला आणि कालीला उद्देशून म्हणाला 'देवी, या खेपेला मला स्वीकार. मोहात अपयश आल्याने होणारी यातनाही नको मला आणि यशस्वी झाल्यास क्षणिक तृप्ती देऊन नंतर अनंत असमाधान करणारे सुखही नको मला. मृत्यू अटळ आहे आणि तोच अढळ, निश्चल विश्वास ठेवण्याजोगा. पण एखाद्या मारेकऱ्याप्रमाणे येऊन मृत्यूने माझ्यापुढे प्रहार करावा ही घटना मला कमीपणाची वाटते. मीच मृत्यूपुढे येऊन उभा ठाकलो आणि सन्मानाने त्याच्या अधीन झालो असे एवढे तरी मानचिन्ह माझ्यापाशी राहू दे.'

आपल्या मनातल्या मनात उभारलेल्या विश्वातील त्या विश्वनायकाला मृत्यूचा चोरासारखा येऊन घातलेला घाला अपमानास्पद वाटणारच. कारण त्याच्या विश्वाचा तो हिरो आहे. नायक आहे. माझ्या मनातल्या विश्वातलेच घडावे हीच त्याची इच्छा. त्याविरुद्ध घडणे म्हणजे कमीपणाचे होणारच त्याच्यासाठी. त्यासाठी कालीला प्रार्थना करून तो स्फटिकात शिरतो. 

स्फटिकातून आरपार घेण्यावर त्याच्यात आणि कालीमध्ये अंतर उरतच नाही. जसा तो पुढे जाऊ लागतो तशी कालीची मूर्ती मागे मागे जात लहान होत जाताना तो बघतो. ती शेवटी एवढी लहान होते की तिच्या हातातले खड्ग त्याला शूद्र तुकड्यासारखे दिसायला लागते. आता त्या माणसात भयाचा अंश राहत नाही. समोरच्या भिंतीवर एक पूर्ण भिंत व्यापलेला आरसा असतो. त्या आरश्यात फक्त कालीचा रिकामा चबुतरा त्याला दिसतो. तो जोरजोरात हसतो म्हणतो 'या असल्या मृत्यूने माझ्या जीवाचा थरकाप झाला होता.  या मूर्तीची नजर मला भिववत होती. पण ते स्फटिकाबाहेर. तिथे त्या स्फटिकामुळे मूर्तीचे स्वरूप एवढे भव्य दिव्य झाले होते ज्याला मी घाबरत होतो. पण ही मूर्तीच एवढी टीचभर तर त्या मूर्तीच्या आधाराने जगणारा मृत्यू याहीपेक्षा शूद्र नव्हे तर काय ?' 

पण जेव्हा असे म्हणत, तो हातवारे करत जोरजोरात हसू लागला, खोलीतला प्रकाश त्याच्यावर पडत होता आणि त्याच्या बाजूच्या भिंतीवर देवीच्या दोन पुरुष एवढ्या आकाराची सावली  दिसत होती, तेच हातवारे करत. जेव्हा तो आरश्यापाशी आला तेव्हा पुन्हा त्याच्या मनात भय दाटले. कारण त्या आरश्यात त्याचे प्रतिबिंबच नव्हते. तरीही उसने अवसान आणून तो म्हणाला 'मृत्यू, मी तुज्यावर विजयच मिळवला आहे, मीच आपणहुन तुझ्याकडे आलो, तू माझे शरिर घेऊन गेलास. जे मला नकोच होते. आता हा जो मी उरलो आहे त्याच्यवर शस्त्राचा काही परिणाम होणार नाही. मी आता इथे उभा आहे आणि नंतर त्या रिकाम्या चबुतऱ्यावर उभा राहणार आहे'

सावली कोणाची? प्रतिबिंब कसले? आणि सावली असून प्रतिबिंब नसलेला माणूस तरी कसला? शरीरहीन माणसाला मन असते का? ही सावली कुणाची? मनाची? जी त्याचे हावभाव तसेच्या तसे दाखवत आहे. आणि प्रतिबिंब का बरे नष्ट झाले? की हे सर्व त्याच्या मनाचेच मनाने मनाशीच केलेले खेळ आहेत? आणि प्रतिबिंब न दाखवणारा आरसा तरी कसला?

जेव्हा त्याने मृत्यूला उद्देशून केलेले आपले बोलणे संपवले आणि समाधानाने डोळे मिटले त्याक्षणी त्याचे चाळे  पाहत आतापर्यंत उभ्या असलेल्या कालीच्या मूर्तीने हातातले  खड्ग उगारून त्याचा शिरस्छेद केला. धड फरफटत कोपऱ्यात नेले, आधीचे धड बाजूला करून ताजे धड त्या जागी ठेवले. आणि पुन्हा चबुतऱ्यावर आली. हातात खड्ग घेऊन निर्विकारपणे पाहत उभी राहिली. 

हेच आहे. 
माणूस. मनातला आणि खराखुरा. 
जगणे. मनातले आणि खरेखुरे. 
काली. मनातली आणि खरीखुरी. 
मृत्यू. मनातला आणि खराखुरा. 

आपल्याला  जगण्याचा खराखुरा अनुभव कधी येत नाही आणि आपल्याला खऱ्याखुऱ्या मृत्यूचा अनुभव कधी येत नाही. आपण जे जगतो ते मनात. खरंखुरं नाही. आपण जे मरतो ते मनात. खरा मृत्यू आपल्याला कधी दिसतच नाही. आपण आपल्या मनात. काली आपल्या मनात. सगळं जग आपल्या मनात. आपण कल्पिलेला मृत्यूही आपल्या मनात. 

मनात, 
आपण असे, आपण तसे,
काली तशी, 
जगणे असे,
आणि मृत्यू तसा,
फक्त 'अशी' आणि 'तशी' नसते 
ती वास्तविकता.

Sunday, 7 August 2016

भुलेश्वर मंदिर


एका ऊंच टेकडीवर अनेक पडके किल्ल्याचे अवशेष बरोबर घेऊन भुलेश्वर मंदिर उभे आहे. टेकडीवरून दूरवर पसरलेले सपाट प्रदेश दिसतात. ही सह्याद्रीचीच छोटीशी रांग, याला 'सिंहगढ-भुलेश्वर रांग' असेही म्हणतात. या टेकडीवर हे मंदिर तेराव्या शतकात(first half मध्ये) देवगिरीच्या यादव राजवटीने बांधले.पुण्यापासून साधारण पंचेचाळीस कि.मी.  अंतरावर असलेल्या 'यावत' येथे ही टेकडी आहे.

मंदिराचे नाव भुलेश्वर पण या मंदिराला यवतेश्वर असे स्थानिक नावही आहे. भुलेश्वर हे शंकराचे मंदिर आहे, भुलेश्वर म्हणजे भोलेश्वर असावे का? या भुलेश्वर नावावरून एक लोककथा देखील आहे, पण ती तितकीशी रंजक नाही, भुलेश्वर या नावावरून ती रचलेली वाटते. ती अशी आहे की देवी पार्वतीचा शिवाशी वाद होतो  त्यामुळे क्रोधीत होऊन शिवशंकर इथे या टेकडीवर येऊन ध्यानस्थ बसतो. पार्वती ग्रामीण पोशाख करून तिथे येते आणि शिवासमोर नृत्य करते. त्या नृत्याने मोहित होऊन शिवशंकर आपला क्रोध विसरतो. आणि पार्वतीसमवेत परत कैलास पर्वतावर परततो. त्याच्या या मोहित होण्यामुळे ('भुल'ण्यामूळे) या जागेचे नाव म्हणे भुलेश्वर पडले. शिवपार्वतीची अशी कुठली पुराणिक कथा खरोखरच अस्तित्वात आहे का ते बघायला हवे.

मंदिर बाहेरून एखादा किल्ला असावा तसे वाटते. १३ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या परिसरावर त्या काळात यादवांचा अंमल होता, त्यानंतर मुस्लिम राजवट आणि त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली हा प्रदेश होता, त्यामुळे इथे किल्ल्याचे बुरुज, कमानी  आणि इतर भग्न अवशेष दिसतात. 'दौलत मंगल' या नावाने हा किल्ला ओळखला जातो. यातील काही अवशेषांवर मुस्लिम स्थापत्यशैलीची छाप दिसते, तर काही ठिकाणी सोळाव्या-सतराव्या शतकांतील मराठेशाहीच्या बांधकामाची छाप दिसते. या किल्ल्याला प्रवेशद्वार आहे जिथून मंदिरापर्यंत पोचता येते, तसेच हे मंदिर नंतरच्या काळात किल्ल्याच्या इतर इमारतीतच समाविष्ट केले गेले असावे, कारण मंदिरालाच जोडून, दगडी रचना, नगारखाना इ. वास्तू बांधलेल्या आहेत. या मंदिराचे प्रमुख विशेष म्हणजे त्याची अतिशय वेगळ्या प्रकारची रचना. याला 'प्राकारा' (prakara) असे म्हणतात. 'प्राकार' (किंवा प्राकारा) ही एक भिंत असते जी संपूर्ण मंदिराला वेढून बांधलेली असते, एखाद्या कंपाऊंडसारखी. तिच्या बाह्यभागावर फारशी शिल्पकला, सुशोभीकरण केलेले नसते. फक्त वरती गोपुरं(towered gates) असू शकतात. 'प्राकारा' हे द्रविड मंदिरशैलीचे वैशिष्ट्य आहे. तसेच जैन मंदिरातही ती वापरली जाते. 'प्राकारा ' या भिंतीच्या आत खरे मंदिर असते. या 'प्राकारा 'ची रचना मुख्य मंदिराचे संरक्षण करण्यासाठी केलेली असते. अशाप्रकारची शैली १३ व्या शतकात प्रचलित होती. बहुदा या काळात वाढलेल्या परकीय आक्रमणामूळेच अश्या पद्धतीचा अवलंब मंदिरशैलीत केला गेला असावा. १३ वे शतक हा मध्ययुगीन यादवकाळ. या काळात देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रातील अनेक प्रदेशांवर राज्य होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात यादवकालीन मंदिरे सापडतात. यातील काही महत्वाची मंदिरे आहेत सिन्नर (नाशिक) येथील गोंदेश्वर, औंढा नागनाग येथील नागनाथेश्वर मंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, लोणारचे दैत्य सुदान मंदिर, तसेच यवत येथील हे भुलेश्वर मंदिर.

हे शिवमंदिर असल्याने येथील शिल्पांवर शैव प्रतिमा(iconography) आढळतात. मंदिराला वेढलेल्या 'प्राकारा' ह्या  भिंतीला आतल्या बाजूने अनेक देवकुलिका (देवतांसाठी असलेली खोरणे(cells) आहेत. ही रचना चौसष्ट  योगिनींच्या मंदिरासारखी वाटते. सोमनाथपूर(बेलूर) येथील चन्नकेशव नावाचे होयसळ मंदिरही अश्या प्रकारच्या रचनेचे आहे. त्या मंदिरच्या सभोवतालच्या 'प्राकारा' भिंतीच्या आतल्या बाजूने चौसष्ट cells आहेत. नंतरच्या काळात (१२ व्या - १३ व्या शतकात) या अशाप्रकारच्या प्राकारा भिंतीचा अवलंब आतले मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असावा. चन्नकेशव मंदिर तर वैष्णव मंदिर आहे, तिथे अश्या भिंतीमधल्या चौसष्ट cells चा(चौसष्ट योगिनींच्या  रचनेसारखा) वापर का केला असावा हे एक कोडेच आहे. यावरून समजते की 'प्राकार' ही यादव आणि इतर दक्खनी मंदिराची नेहमीची रचना नसून, तिचा अवलंब बाहेरील रचनाशैलीवरून केला आहे.

भुलेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे, मंदिराची रचना सर्वप्रथम नंदीमंडप, त्यानंतर मंडप(सभामंडप), अंतराळ आणि शेवटी गर्भगृह अशी आहे. नंदीमंडपात नंदीची गर्भगृहाकडे तोंड करून असलेली अवाढव्य मूर्ती आहे. अंतराळ हा एक छोटासा भाग (passage)असतो जो मंडप(सभामंडप) आणि गर्भगृहाला जोडतो. या मंदिरातील अंतराळ आणि गर्भगृहामध्ये दरवाजा नाही, अंतराळालाच दरवाजा आहे आणि त्यावर अतिशय सुंदर शिल्पं, सुशोभीकरण केलेलं आहे. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांवर कीर्तिमुख आहेत. आणि त्यावरची हंसाची सुंदर रचना केलेली शिल्पपट्टी आहे. गर्भगृहात शंकरची पिंडी आहे.

नंदीमंडपातील नंदी

मंदिराच्या 'प्राकारा' भिंतीला आतल्याबाजूने असलेले खांब(pillar), मंदिराच्या मंडपाच्या खांबांसारखेच आहेत, फक्त मंडपांच्या खांबांवर  नागशीर्षक(फणाधारी नाग) आहेत, आणि प्राकाराच्या खांबांवर कीचकशिल्पं आहेत. 'कीचक' नावाचा शिल्प नमूना (motif) मंदिरांच्या खांबांवर वापरला जातो. खांब जिथे छपराला जोडला जातो, त्या ठिकाणी हात वर टेकवून आधार देत असल्यासारखी, 'भारवाहक' या अर्थाने,त्याची प्रतिमा बहुदा वापरली जाते.
भारवाहक किचक
मंदिरातील देवीदेवतांची बहुतेक शिल्पं 'त्रिभंगा' या अवस्थेत(posture मध्ये) आहेत. ही उभं राहण्याच्या निरनिराळ्या अवस्थातील एक अवस्था आहे. ज्यामध्ये शरीर तीन ठिकाणी वेगवेगळ्या कोनांतून वाकलेलं असतं त्याला 'त्रिभंगा' अवस्था म्हणतात. ह्या अवस्था नृत्यकलेतील, नृत्याच्या पावित्र्याशी निगडित आहेत. मंदिर शिवाचे असल्याने देव देवता शिवाशी निगडित अश्या आहेत. त्यातील काही महत्वाची शिल्पं आहेत मातृकांची (mother deities).

मातृका : गणेशी, माहेश्वरी , ब्राह्मणि
या मातृकांची उपासना प्राचीन काळापासून चालत आली आहे, त्यातील अनेक मातृकांची शिल्पं तीन-तीन च्या गटाने मंदिराच्या भिंतींच्या वरच्या भागांवर कोरलेली आहेत. या मातृका आहेत, माहेश्वरी, ब्रह्माणी, कौमारी, वैष्णवी, चामुंडा, इंद्राणी(ऐंद्री(aindri), शची), वराही. यांना सप्तमातृका म्हणतात, या  मातृकांमध्ये नरसिंही, महिषासुरमर्दिनी यांचाही कधीकधी समावेश होतो. तसेच या मातृकांबरोबर गणपती किंवा कार्तिकेय (स्कंद) यांचीही मूर्ती असते. भुलेश्वर येथील मातृकांच्या मूर्तींमध्ये गणेशी(विनायकी) ही एक अत्यंत वेगळी मूर्ती आहे. ही गणेशासारखी दिसणारी परंतु स्त्रीमूर्ती आहे. खरेतर सप्त किंवा अष्टमातृकांमध्ये गणेशीचा उल्लेख होत नाही. वैनायकी/गजाननी नावाची एक देवता (गज मुख आणि गणपतीसारखीच दिसणारी) चौसष्ट योगिनींपैकी एक आहे. तिची मूर्ती या मंदिरात का आहे ते मात्र कळत नाही. ह्या मंदिराचा तांत्रिक संप्रदायाशी तसा संबंध होता की नाही ते इतर इतर काही पुरावे नसल्याने सांगता येणार नाही. शैव पंथाशी निगडित काही इतर शिल्पं मात्र सापडतात, जश्या भैरव आणि चामुंडा यांच्या मूर्ती.

मंदिरातील अलंकरण केलेल्या शिल्पांबरोबरच रामायण आणि महाभारतातील प्रसंग देखील शिल्पात कोरलेले आढळतात. 
रामायण, महाभारतातील प्रसंग
मंदिराची शिखरं नंतरच्या काळात (१३व्या शतकानंतर)बांधलेली वाटतात. शिखरांवर असलेल्या शिल्पांत सिंह, मकर यांची अतिशय वेगळ्या शैलीतील  शिल्पं आहेत. तसेच प्राकाराच्या बाहेरील भिंतीच्या टोकावरची (गोपुरांवरची) शिल्पे अतिशय वेगळ्याच शैलीची (आणि आधुनिकही) वाटतात. 








मंदिरात सामावलेली सृष्टी आणि काही जिवंत शिल्पं
कीर्तिमुख
'कीर्तीमुख' हे बहुतेक शिव मंदिरांवर सापडणारे शिल्पं अतिशय वेगळे आहे. कीर्तीमुख म्हणजे 'face of fame'. कीर्तीमुखाची गोष्टही फारच रंजक आहे. एकदा एक अतिशय बलाढ्य दैत्य राक्षस इतकी अंदाधुंदी माजवतो की देवही घाबरतात. शेवटी त्या राक्षसापासून सुटकारा मिळावा यासाठी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ते शंकराकडे जातात. शंकर त्या राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी एक दैत्य राक्षस निर्माण करतो. हा राक्षस जे दिसेल त्याला खाऊ शकणारा असतो. आणि सतत फक्त खाणे(गिळंकृत करणे) हेच त्याचे काम असते. त्या अंदाधुंदी माजवणाऱ्या राक्षसापुढे शंकर हा नवीन राक्षस सोडतो. तेव्हा अंदाधुंदी माजवणारा राक्षस शंकराला शरण येतो आणि या सतत खाणाऱ्या राक्षसापासून वाचवण्याची विनंती शंकराला करतो. शंकर प्रसन्न होऊन त्याला जीवनदान देतो. आता नवीन निर्माण झालेला सतत काहीतरी खाऊ पाहणारा राक्षस मात्र आता मी कुणाला खाऊ असे शंकराला विचारतो. तेव्हा शंकर त्याला सांगतो की तू स्वतःलाच खा. त्यावर आज्ञेचं पालन करून तो शेपटीपासून स्वतःलाच खाऊ लागतो आणि शेवटी फक्त त्याचे मुख शिल्लक राहते. तेव्हा शंकर त्याच्या आज्ञाधारकतेवर प्रसन्न होतो आणि त्याला वर देतो. शंकर त्याला सांगतो की आजपासून तुझे नाव 'कीर्तिमुख' असेल आणि माझ्या प्रत्येक रहिवासाच्या ठिकाणी, मंदिरांवर तुझे वास्तव्य असेल. या कीर्तीमुखाची अशी कहाणी आहे. या कहाणीमागे 'स्वतःचा स्वतःच नाश करणे म्हणजेच स्वतःचा अहंकार (ego) / अहं याचा स्वतःच नाश करणे असा मतितार्थही असू शकतो. 'Medieval Temples of Dakhan' या Henry Cousen यांच्या पुस्तकात दिलेली कीर्तीमुखाची गोष्ट थोड़ी वेगळी आहे. ती अशी की जालंधर नावाचा राक्षस पार्वतीवर लुब्ध होऊन तिला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करू लागला. तेव्हा शिवाने आपल्या त्रितियनेत्रातून एक असा भयंकर राक्षस निर्माण केला ज्याने शिवाकडे  काहीतरी गिळंकृत करण्यासाठी देण्याची मागणी केली, त्यावर शिवाने त्याला स्वतःलाच गिळंकृत करण्याची आज्ञा केली, जिचे पालन करून त्याने स्वतःला मुखापर्यंत खाऊन टाकले. या आज्ञापालनावर प्रसन्न होऊन शिवाने त्याला 'कीर्तीमुख' ही पदवी दिली. या कीर्तीमुखाचे शिल्पं शंकराच्या मंदिराच्या मुख्य द्वारावर, शिखरांवर असतात. तसेच सुशोभीकरणाच्या शिल्पपट्ट्यातही असतात. 

या शिल्पाशिवाय हंस, मकर, हत्ती, उंट , सिंह अश्या प्राण्यांची शिल्पंही मंदिरात आहेत. आतल्या भिंतींवर जी उंटांची शिल्पं आहेत, तशी शिल्पं महाराष्ट्रातील इतर मंदिरात क्वचितच सापडतात. या शिल्पांचे सौन्दर्य अतुलनीय आहेच पण काही जिवंत शिल्पंही मंदिराचा भाग झाली आहेत. ही शिल्पं आहेत आजूबाजूच्या झाडांची, प्राण्या-पक्षांची जे या मंदिराचे रहिवासी आहेत. त्यातले एक आहे 'चार झाडांचे एक झाड'. हे आहे पिंपळाचे झाड, झाडाभोवती पार बांधलेला आहे, या झाडाचे वैशिष्टय आहे हे की या झाडाच्या बरोबरच कडुनिंबाचे ('निम') झाड, वेलीसारखे दिसणारे  दुसरे आणि तिसरे आणखी छोटे झाड अशी चार झाडे एकत्रितपणे एकमेकांत दाटपणे मिसळून गेली आहेत. तशीच आहेत मंदिराच्या बाजूची गुलमोहर, चिंच, कडुनिंब अशी अनेक झाडं. मंदिरांवरची आणखी जिवंत शिल्पं म्हणजे तिथे राहणारे पोपट, रखवालदाराचा रुबाबदार कुत्रा आणि मंदिरात डोळे मिटून ध्यान करीत बसलेले मांजर.

निसर्गाच्या कुशीत राहून, निसर्गालाच कडेवर घेऊन झाडे, पाने , फुले, पशु, पक्षी यांच्या सानिध्यात उभे असलेले हे मंदिर परत परत भेट द्यावे असे आहे. 


मंदिराजवळची जिवंत शिल्पं
(सर्व फोटोग्राफी सौजन्य : मधुमिता कुळकर्णी)

Tuesday, 26 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग ४

योगिनी मंदिरं आणि त्यांचे आश्रयदाते 

खजुराहो, मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश आणि चंदेल राजे
खजुराहो येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर चंदेल राजांनी बांधले. हे मंदिर नवव्या शतकातील असून आयताकृती आहे. ग्रॅनाईट दगडांपासून बनलेले हे मंदिर आता अत्यंत पडक्या अस्तित्वात आहे. या मंदिरातील फक्त तीन मूर्ती आज अस्तित्वात असून त्या मूर्ती मातृकांच्या आहेत. एक आहे महिषासुरमर्दिनी, दुसरी महेश्वरी आणि तिसरी ब्रह्माणी. चंदेल राजे दहाव्या शतकांपासून ते तेराव्या शतकापर्यंत मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशाचा काही भाग, यांवर राज्य करत होते. अत्यंत प्रभावशाली अश्या या राजांनीच खजुराहोची विलक्षण मंदिरं उभारली. या मंदिरांवरची कामशिल्पं आणि चौसष्ट योगिनींचे मंदिर हे दर्शवते की हे राजे शैव आणि शाक्त तांत्रिक उपासनांचे साधक होते. कीर्तिवर्मन या दहाव्या शतकातील राजच्या दरबारी असलेल्या कृष्णमिस्र याने लहिलेल्या 'प्रबोधचंद्रोदया' या नाटकात कपालिक संप्रदायाच्या साधकाचा जैन व्यक्तीला आपल्या उपासनेचे महत्व पटवून देणारा संवाद आहे. हे नाटक कपालिक या शैव तांत्रिक संप्रदायाच्या पार्श्वभूमीवर बेतले आहे. यावरून चंदेलांच्या काळात इथे शैव(कपालिक)-शाक्त(कौल) तांत्रिक साधना होत होत्या असे सिद्ध होते. आणि या उपसकांचे हे राज्यकर्ते आश्रयदाते होते. दहाव्या शतकापासून मध्य भारतात, अनेक परकीय मुस्लिम राजांच्या(गझनीचा मुहंमद इ.) स्वाऱ्या होते होत्या. आपले राज्य अबाधित राखण्यासाठी, साहजिकच इथल्या राजांनी योगिनी मंदिरांच्या उपसनेद्वारे आपले सैन्यबळ, साम्राज्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले असावेत. 
चंदेल राजांनी खजुराहो बरोबरच जवळच्या प्रदेशात जवळपास आणखी आठ मंदिरे बांधली होती. आज त्यापैकी कुठलेच अस्तित्वात नाही. शाहदोल, बदोह, रिखियांन,लोखरी इ. ठिकाणची मंदिरे भग्नावस्थेत आहेत.  

भेडाघाट आणि कालचुरी राजे 
भेडाघाट, जबलपूर येथे असलेले योगिनींचे मंदिर अजूनही सुस्थितीत असून यातील एक्याऐंशी योगिनींच्या मूर्तीदेखील पडझड झालेल्या असूनही बऱ्यापैकी स्थितीत आहेत. हे मंदिर नवव्या शतकात त्रिपुरीच्या (त्रिपुरी म्हणजे आत्ताचे तेवर,जबलपूर) कलचुरी राजांनी बांधले. हे मंदिर नर्मदेच्या काठावर आहे. कलचुरी राजे शैव संप्रदायाचे उपासक होते. यांनींही या प्रांतातील आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी योगिनी मंदिर स्थापन केले असावे. तांत्रिक ग्रंथात एक्याऐंशी योगिनींची उपासना ही विशेषकरून राज्यसत्तांसाठी, त्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी दिली गेली आहे.

मितौली, नारेसर आणि कच्छपघट राजे 
उत्तरप्रदेशातील मितौली हा ग्वाल्हेरच्या जवळचा भाग आणि नारेसर याठिकाणी चंदेल राजांचे मांडलिक कच्छपघट यांची सत्ता होती. यांनी नंतरच्या काळात चंदेलांचे मांडलिकत्व जुगारून देऊन, स्वतंत्र सत्ता म्हणून या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यांनीच या भागांत मितौली आणि नारेसर इ.  ठिकाणी योगिनींच्या मंदिरांची स्थापना केली. नारेसर येथील मंदिर नवव्या शतकात तर मितौली येथील मंदिर दहाव्या शतकात बांधले गेले. यातले नारेसर येथील मंदिर आज भग्नावस्थेत आहे आणि त्यातल्या योगिनींची शिल्पे संग्रहालयात ठेवलेली आहेत. मितौली येथील मंदिर अजूनही बऱ्याच सुस्थितीत आहे. हे मंदिर कच्छपघट राजा देवपाल याने बांधले, या मंदिरावर असलेल्या अस्पष्ट अश्या शिलालेखावरून कळते की देवपाल आणि त्याची पत्नीने या मंदिराची उभारणी केली असावी. या शिलालेखात पुढे तेराव्या शतकाचाही उल्लेख आहे. ज्यात कछवाह या राजपूत राजाचे नाव आहे. ग्वाल्हेरचा परिसर त्या काळात राजपुतांच्या अधिपत्याखाली होता, त्यानंतरच्या काळात आलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये ग्वालेर आणि आजूबाजूचा परिसर मुस्लिमांच्या सत्तेखाली होता. तेराव्या शतकानंतर वाढत्या मुस्लिम सत्तांमूळे ही मंदिरं ओसाड पडली असावीत. 

हिरापूर आणि रानीपूर, ओरिसा 
ओरिसा येथील हिरापूर, भुवनेश्वर येथील मंदिर  नवव्या शतकात बांधले गेले. ओरिसामध्ये नवव्या-दहाव्या शतकात अनेक छोटेछोटे राजे राज्य करीत असल्याने हे मंदिर नक्की कुणी बांधले ते कळणे अवघड आहे. भूम-कारा, सोमवंशी, भांजा अश्या अनेक सत्ता तिथे होत्या. त्यापैकी भांजा हे शाक्त पूजक होते. हिरापूरचे मंदिर त्यांनी बांधले असण्याची शक्यता आहे. ओरिसाच्या आणि छत्तीसगढच्या सीमेजवळ असलेले, रानीपूर-झारियल येथील मंदिरही जवळपास याच काळात बांधले गेले असून  ते बहुदा सोमवंशी या राजांनी बांधले असावे कारण त्या काळात त्यांची सत्ता तिथे होती. हि दोन्ही मंदिरे बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहेत. आणि त्यातले हिरापूर येथील मंदिर सर्वात लहान योगिनी मंदिर आहे. हिरापूर आणि रानीपूर येथील दोन्ही मंदिरांत असलेल्या योगिनींमध्ये मातृका नाहीत. याचे कारण हे असावे की ओरिसात अन्य अनेक ठिकाणी मातृकांची वेगळी मंदिरं आहेत.हिरापूर येथील योगिनींचे मंदिर इतके गुप्त होते की भुवनेश्वरच्या जवळ पंधरा किलोमीटर अंतरावरच्या या मंदिराला प्रथम १९५३ मध्ये, केदारनाथ महापात्रा यांनी प्रकाशात आणले.

गुजरात, राजस्थान 
गुजरात आणि राजस्थान येथील राजपूत आणि अन्य राजांनी देखील योगिनी उपासनेसाठी मंदिरे स्थापन केली होती परंतु आज त्यातील एकही मंदिर अस्तित्वात नाही. राजस्थान आणि गुजरात मध्ये कागद आणि कापडावर योगिनी चक्र आणि योगिनींची लोककलाचित्रं मात्र अस्तित्वात आहेत. 

दक्षिण भारत 
आंध्रप्रदेशात योगिनी उपासना नवखी नसल्याची काही उदाहरणे त्यांच्या धार्मिक ग्रंथातून सापडतात. परंतु आंध्रप्रदेशात कुठलेही मंदिरचे पुरावे मात्र सापडले नाहीत. तामिळनाडू मधील कांचीपुरम येथे मंदिर नसले तरी योगिनींच्या मूर्ती मात्र सापडल्या आहेत. या चोल राजांच्या राजवटीतील आहेत. यावरून स्पष्ट होते की दक्षिण भारतातदेखील योगिनी उपासना आणि मंदिरे अस्तित्वात होती. 

आसाम, नेपाळ , काश्मीर, दिल्ली 
नेपाळ देशात आजतागायत मुख्यत्वे तांत्रिक उपासना होते, येथील सर्व महत्वाच्या तांत्रिक ग्रंथात योगिनी उपासना दिलेल्या आहेत. तरीही नेपाळ येथे एकही योगिनींचे मंदिर आढळत नाही. आसाम येथील कामख्या (Kamakhya) मंदिरातील दैनिक पूजेमध्ये योगिनींची नावं उद्धृत केली जातात. दिल्ली च्या बाह्यभागात असलेले योगिनीपुरा येथील मंदिर देखील योगिनींशी संबंधित आहे. काश्मीर हे सातव्या ते दहाव्या शतकापर्यंत शैव आणि शाक्त तांत्रिक उपासनेचे अत्यंत महत्वाचे केंद्र होते. येथील अभिनवगुप्त या नवव्या शतकातील पंडित तत्ववेत्याने  तांत्रिक साधनेवर अतिशय प्रगल्भ लेखन केले आहे. परंतु काश्मीरमधेही आता एकही योगिनींचे मंदिर अस्तित्वात नाही.
 

चौसष्ट योगिनींची शिल्पं प्रतिमा (Iconography )
 

अतिशय वेधक , गूढ , कल्पनारम्य आणि दैवी अशी ही योगिनींची शिल्पं आहेत. त्यांची शिल्पं विशेष आहेत कारण शिल्पकारांनी त्यांच्यापैकी काहींच्या निर्मितीसाठी  कलेतील रौद्र, बीभत्स, भयानकरसांचा अवलंब केला आहे.

योगिनींची उपासना असामान्य असल्याने त्यांचे रूपही असामान्य असले पाहिजे. तशीच हि शिल्पं आहेत. योगिनींचे मुख्य गुणविशेष त्यांच्या शिल्पात व्यक्त केले गेले आहेत.  योगिनींची नावं, त्यांचे विशेष हे सर्व या त्या ठिकाणच्या परंपरेने, तिथल्या ग्रामीण देवतांच्या प्रतिमांनी प्रभावित झालेले आहे. प्रत्येक योगिनीचे वाहन आहे. काही योगिनी वाहनरहितदेखील आहेत. काही योगिनी रूपे धारण करणाऱ्या आहेत. या शिल्पांमध्ये निरनिराळ्या प्राण्यांची मुखं त्यांनी धारण केली आहेत. योगिनींच्या साधनेत अवलंब होणाऱ्या मत्स्य, मांस, मद्य, मुद्रा(grain) या गोष्टींचा त्यांच्या शिल्पात थेट संदर्भ दिसत नसला तरी अनेक योगिनींच्या हातात कवटीचे भांडे(skull cup), मनुष्य मुंडके दिसते. काही शिल्पांत, त्यांच्या चर्येवरुन त्या मांस भक्षण करत असाव्यात असे वाटते. परंतु मैथुन या शिल्पांत कुठेही दिसत नाही. शवसाधना हा योगिनी उपासनेचा महत्वाचा भाग होता. त्याचे अनेक संदर्भ या शिल्पांत सापडतात. काही योगिनी शवाचा आसनासारखा उपयोग करतात. काही शिल्पांमध्ये योगिनींच्या आसनाजवळ सेवक, साधक शवासहित दिसतात.
योगिनींच्या मूर्ती उभ्या किंवा आसनस्थ किंवा नृत्य करणाऱ्या गतिशील पावित्र्यात आहेत. योगिनींच्या सर्व मूर्ती अलंकारांनी मढलेल्या आहेत. पैंजण, बाजूबंध, गळ्यातील कंठा, माळा, कमरबंध, केसातील आभूषणे, कानांतील डूल अश्या अनेक अलंकारांनी युक्त त्या आहेत. काही ठिकाणी अलंकार म्हणून सर्पाचे बाजूबंध, कामरबंधही त्यांनी परिधान केले आहेत. कानातील आभूषणे देखील सर्प, किंवा मानवी मुंडकी अशी भीषण देखील आहेत. त्यांच्या केशरचनाही अतिशय वैविध्य असलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही योगिनींचे केस (विशेषतः दक्षिण भारतातील)मोकळे सोडलेले, ऊर्ध्वकेशी(उभे असलेले)आहेत. काही योगिनी सुहास्यवदना आहेत, काही रौद्ररूप धारिणी तर काही भयरुपी आहेत. काहींच्या डोक्यामागे (दैवी वैशिष्ट्य दर्शविण्यासाठी) तेजोवलय (halo) आहे. यावरून असे वाटते की काही योगिनी मानुषी होत्या का?  काहींना दोन हात आहेत, पण अनेक योगिनींना दोन पेक्षा अधिक हात(चार, आठ, बारा इ.) आहेत. सर्वच योगिनींच्या शिल्पांच्या शरीराचा वरचा भाग अनावृत्त आहे.
या शिल्पप्रतिमांचे (iconography) सर्वात मोठे वैशिष्ट्य  म्हणजे योगिनींची विविध पशु मुखं आणि त्यांची वाहनं. यातली विविधता वाखाणण्यासारखी आहे. काही योगिनी वृक्षांवर राहणाऱ्या असल्या(ग्रंथातील संदर्भावरून) तरी वृक्षांचे संदर्भ शिल्पांत फारसे दिसत नाहीत.फक्त एकाच ठिकाणी एका गर्धभमुखी योगिनीचे वाहन वृक्ष आहे. आणि एकदोन ठिकाणी तिच्या मागे वृक्ष आहे पण हे फारच क्वचित दिसते. प्राणीपक्षीजगत मात्र शिल्पांत समृद्धतेने वापरले गेले आहे. अस्वल, ससा, सिंह, बिबळ्या वाघ, हत्ती, घोडा, मांजर, गाढव, सर्प, म्हैस(गाय/बैल), मेंढा, पक्षी,कोल्हा यांची मुखं धारण योगिनींनी धारण केली आहेत. या प्राण्यांबरोबरच विंचू, खेकडा, कासव, बेडूक, डुक्कर(रानडुक्कर), मासा, उंदीर, हंस, मोर, पोपट, कोंबडा, घुबड,  हरण(चितळ), एडका, इग्वाना (एक प्रकारचा सरडा) असे विविध प्राणी-पक्षी योगिनींचे वाहन झाले आहेत.
हिरापूर येथील योगिनी अत्यंत मोहक आणि अतिशय नेत्रसुखद आहेत. हि सर्व उभी शिल्पं आहेत. शिल्पाची कारागिरी अतिशय नाजूक आणि प्रमाणबद्ध आहे. या योगिनींच्या एक योगिनी स्वतःचे पैंजण नीट करत आहे. एक योगिनी शिकारी आहे हातातील धनुष्यबाण ताणून ती उभी आहे. एक योगिनी उंदरावरील दोन चक्रांवर तोल सांभाळत हातात डमरू घेऊन उभी आहे. या योगिनींच्या शिल्पात सौन्दर्यपूर्ण डौल आहे. येथील काही योगिनी पशुमुखी आहेत. अश्वमुखी, गर्धभमुखी योगिनी येथे आहेत. पशुमुखी असल्या तरी त्यांचे सौन्दर्य कुठेही कमी झालेले नाही.  एक योगिनी हातात कवटीचे भांडे घेऊन तोंडाला लावत आहे. हि सुराप्रिया असू शकते किंवा रुधिरपायनी, किंवा कपालिनी( हातातील कवटी म्हणजे शैव-कपालिकांचे भांडे) असू शकते. 

चामुंडा सदृश योगिनी आणि शिकार करणारी योगिनी
पोपट हे वाहन असलेली योगिनी आणि पैंजण ठीक करणारी योगिनी

चक्रावर तोल सांभाळणारी योगिनी आणि कोंबडा वाहन असलेली योगिनी (सर्व फोटो @ विकिपीडिया)
एक योगिनी चामुंडेच्या मूर्तीसारखी भयावह आहे. हि जी शिल्प-प्रतिमा आहे ती सर्वसाधारण देवीच्या अत्यंत रौद्र-भीषण रूपासाठी वापरली जाते. 'काली'/चामुंडा/चंडी' इत्यादी देवीची संहारी रूपे सौन्दर्य-विरक्त असतात. अत्यंत कृश, गाल बसलेले, बरगड्या बाहेर, ओघळलेले(sagging) वक्ष, वर आलेले मोठे डोळे असा काहीसा त्यांचा भयावह अविर्भाव असतो. येथील अनेक योगिनी त्यांच्या वाहनासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक योगिनी तर हातात सूप (winnower) घेऊन आहे. या योगिनी मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्यभागावर रक्षक स्त्री मूर्ती आहेत. यांना काही पंडितांनी 'कात्यायनी' असे नाव दिले आहे. प्रवेशद्वारावर पुरुष द्वारपाल आहेत. 

रानीपूर झारियल येथील योगिनी (आणि भैरवमूर्तीही ) नृत्य करणाऱ्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डोक्यामागे तेजोवलय नाही. यात वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं आहे मांजराचे मुख असलेल्या योगिनीचे. तिला बिदालीदेवी किंवा मार्जारी असे म्हणतात. आणखी एका योगिनीचे मुख चित्त्याचे आहे. तिच्या हातात शव आहे. अनेक ठिकाणी दर्शविलेल्या या शिल्पातील शवांच्या संदर्भावरून शवसाधना हे या योगिनींच्या उपासनेचे प्रमुख अंग होते असे दिसते. आता अस्तित्वात नसलेली एक योगिनी मूर्ती 'कनिंगहॅम' या पुरातत्ववेत्त्याने नोंदवून ठेवली आहे. जी सूर्याशी संबंधित होती. जिच्या हातात कमळ आणि पायाशी घोडे होते. अनेक मूर्ती कालांतराने मंदिरातून चोरल्या गेल्या. या सर्व मूर्ती वालुकाष्म दगडाच्या असल्याने शिल्पांचा दर्जा कालमानाने बराच ढासळला आहे. 

जिथपासून या योगिनींच्या शिल्पांचा, संकल्पनेची ओळख झाली त्या खजुराहो येथील मूर्ती मात्र काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. यातील फक्त तीन मूर्ती खजुराहोच्या संग्रहालयात आढळतात. त्या आहेत मातृकांच्या (सप्तमातृकांपैकी तीन). महिषासुरमर्दिनी, ब्राह्मणी आणि माहेश्वरी.

भेडाघाट येथील योगिनी मात्र बऱ्याच पडझड झालेल्या असल्या तरीही अजून बऱ्याच सुस्थितीत आहेत. या सर्व मूर्ती ओरिसा योगिनी मंदिरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या मागे तेजोवलय आहे, पायाशी सेवक, साधक आहेत. या मूर्ती नाजूक नाहीत तर शरीरसौष्ठवाने परिपूर्ण आहेत. या शिल्पांवर त्यांची नावे कोरलेली आहेत. इरुडी, सर्वोतोमुखी, इंद्रजाली , फणेंद्रि, अंतकारी अशी त्यांची नावं आहेत.

याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जी योगिनींची शिल्पं सापडली आहेत, ती रीखियान, शाहदोल, लोखारी, मितौली, दुधाई, हिंगलाजढ , बादोह आणि कांचीपुरम येथील आहेत. यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं आहेत. लोखारी येथील तर सर्व योगिनी या प्राण्यांची मुखे धारण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, सश्याचे मुख धारण केलेली योगिनी सासकनना, सर्पस्या ही योगिनी सर्पाचे मुख धारण केलेली. दुर्दैवाने यातील अनेक शिल्पं आज भग्नावस्थेत अस्तित्वात आहेत. सासकनना हि ससायोगिनी आता अखंडावस्थेत नाही, तिचे दोन भाग झाले आहेत. हि सर्व शिल्पे वेगवेगळ्या शिल्पकारांच्या कार्यशाळेतून निर्माण झाली आहेत. अशी ओरिसा मधील योगिनी शिल्पं ओरिसी शिल्पकलेचे नमुने वाटतात. मध्य आणि उत्तर प्रदेशातील शिल्पं तेथील शिल्पकलांच्या त्या काळातील परंपरेतून घडलेली वाटतात. याउलट दक्षिण भारतातील कांचीपुरम येथील शिल्पं 'चोल'(Chola) शिल्पकलेचे नमुने वाटतात. भारताचे हेच मोठे वैशिष्ट्य की एकाच संप्रदायातील एकाच उपासनेतही त्यांच्या मूर्तींमध्ये,नावांमध्ये  प्रांतानुसार कितीतरी विविधता आढळते.

योगिनींच्या शिल्पप्रतिमा देखील कल्पनारम्य, अनेक पैलूंनी युक्त आहेत. त्यांच्या हातांतील वस्तू त्यांच्या विशेषाच्या सूचक आहेत. उदाहरणार्थ सूप घेतलेली एक योगिनी हिरापूर येथे आहे. तशीच सूप आणि झाडू घेतलेली एक योगिनी कांचीपुरम येथे सापडलेल्या योगिनींत आहे. सूप आणि झाडू हे कृषी हंगामाचे (harvest) पीक येण्याचे प्रतीक आहे. मग ही योगिनी त्यासाठी(सुबत्ता, विपुलता, समृद्धी यासाठी) पुजली जात असण्याची शक्यता आहे. कांचीपुरम येथील एका योगिनीच्या हातात दंड(wand) आणि कमंडलू, पाण्याचे भांडे आहे. हि योगिनी रोगनिवारण करणारी आहे. नकारात्मक आणि सकारात्मक या ऊर्जांबरोबरच त्यांच्या शिल्पप्रतिमांतून या योगिनी बरेच काही व्यक्त करू पाहत आहेत.

लोखारी येथील ससाकनना योगिनी आणि कोल्हयाच्या मुखाची योगिनी (विद्या देहिजीया यांच्या पुस्तकातून)