Sunday 7 August 2016

भुलेश्वर मंदिर


एका ऊंच टेकडीवर अनेक पडके किल्ल्याचे अवशेष बरोबर घेऊन भुलेश्वर मंदिर उभे आहे. टेकडीवरून दूरवर पसरलेले सपाट प्रदेश दिसतात. ही सह्याद्रीचीच छोटीशी रांग, याला 'सिंहगढ-भुलेश्वर रांग' असेही म्हणतात. या टेकडीवर हे मंदिर तेराव्या शतकात(first half मध्ये) देवगिरीच्या यादव राजवटीने बांधले.पुण्यापासून साधारण पंचेचाळीस कि.मी.  अंतरावर असलेल्या 'यावत' येथे ही टेकडी आहे.

मंदिराचे नाव भुलेश्वर पण या मंदिराला यवतेश्वर असे स्थानिक नावही आहे. भुलेश्वर हे शंकराचे मंदिर आहे, भुलेश्वर म्हणजे भोलेश्वर असावे का? या भुलेश्वर नावावरून एक लोककथा देखील आहे, पण ती तितकीशी रंजक नाही, भुलेश्वर या नावावरून ती रचलेली वाटते. ती अशी आहे की देवी पार्वतीचा शिवाशी वाद होतो  त्यामुळे क्रोधीत होऊन शिवशंकर इथे या टेकडीवर येऊन ध्यानस्थ बसतो. पार्वती ग्रामीण पोशाख करून तिथे येते आणि शिवासमोर नृत्य करते. त्या नृत्याने मोहित होऊन शिवशंकर आपला क्रोध विसरतो. आणि पार्वतीसमवेत परत कैलास पर्वतावर परततो. त्याच्या या मोहित होण्यामुळे ('भुल'ण्यामूळे) या जागेचे नाव म्हणे भुलेश्वर पडले. शिवपार्वतीची अशी कुठली पुराणिक कथा खरोखरच अस्तित्वात आहे का ते बघायला हवे.

मंदिर बाहेरून एखादा किल्ला असावा तसे वाटते. १३ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या परिसरावर त्या काळात यादवांचा अंमल होता, त्यानंतर मुस्लिम राजवट आणि त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली हा प्रदेश होता, त्यामुळे इथे किल्ल्याचे बुरुज, कमानी  आणि इतर भग्न अवशेष दिसतात. 'दौलत मंगल' या नावाने हा किल्ला ओळखला जातो. यातील काही अवशेषांवर मुस्लिम स्थापत्यशैलीची छाप दिसते, तर काही ठिकाणी सोळाव्या-सतराव्या शतकांतील मराठेशाहीच्या बांधकामाची छाप दिसते. या किल्ल्याला प्रवेशद्वार आहे जिथून मंदिरापर्यंत पोचता येते, तसेच हे मंदिर नंतरच्या काळात किल्ल्याच्या इतर इमारतीतच समाविष्ट केले गेले असावे, कारण मंदिरालाच जोडून, दगडी रचना, नगारखाना इ. वास्तू बांधलेल्या आहेत. या मंदिराचे प्रमुख विशेष म्हणजे त्याची अतिशय वेगळ्या प्रकारची रचना. याला 'प्राकारा' (prakara) असे म्हणतात. 'प्राकार' (किंवा प्राकारा) ही एक भिंत असते जी संपूर्ण मंदिराला वेढून बांधलेली असते, एखाद्या कंपाऊंडसारखी. तिच्या बाह्यभागावर फारशी शिल्पकला, सुशोभीकरण केलेले नसते. फक्त वरती गोपुरं(towered gates) असू शकतात. 'प्राकारा' हे द्रविड मंदिरशैलीचे वैशिष्ट्य आहे. तसेच जैन मंदिरातही ती वापरली जाते. 'प्राकारा ' या भिंतीच्या आत खरे मंदिर असते. या 'प्राकारा 'ची रचना मुख्य मंदिराचे संरक्षण करण्यासाठी केलेली असते. अशाप्रकारची शैली १३ व्या शतकात प्रचलित होती. बहुदा या काळात वाढलेल्या परकीय आक्रमणामूळेच अश्या पद्धतीचा अवलंब मंदिरशैलीत केला गेला असावा. १३ वे शतक हा मध्ययुगीन यादवकाळ. या काळात देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रातील अनेक प्रदेशांवर राज्य होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात यादवकालीन मंदिरे सापडतात. यातील काही महत्वाची मंदिरे आहेत सिन्नर (नाशिक) येथील गोंदेश्वर, औंढा नागनाग येथील नागनाथेश्वर मंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, लोणारचे दैत्य सुदान मंदिर, तसेच यवत येथील हे भुलेश्वर मंदिर.

हे शिवमंदिर असल्याने येथील शिल्पांवर शैव प्रतिमा(iconography) आढळतात. मंदिराला वेढलेल्या 'प्राकारा' ह्या  भिंतीला आतल्या बाजूने अनेक देवकुलिका (देवतांसाठी असलेली खोरणे(cells) आहेत. ही रचना चौसष्ट  योगिनींच्या मंदिरासारखी वाटते. सोमनाथपूर(बेलूर) येथील चन्नकेशव नावाचे होयसळ मंदिरही अश्या प्रकारच्या रचनेचे आहे. त्या मंदिरच्या सभोवतालच्या 'प्राकारा' भिंतीच्या आतल्या बाजूने चौसष्ट cells आहेत. नंतरच्या काळात (१२ व्या - १३ व्या शतकात) या अशाप्रकारच्या प्राकारा भिंतीचा अवलंब आतले मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असावा. चन्नकेशव मंदिर तर वैष्णव मंदिर आहे, तिथे अश्या भिंतीमधल्या चौसष्ट cells चा(चौसष्ट योगिनींच्या  रचनेसारखा) वापर का केला असावा हे एक कोडेच आहे. यावरून समजते की 'प्राकार' ही यादव आणि इतर दक्खनी मंदिराची नेहमीची रचना नसून, तिचा अवलंब बाहेरील रचनाशैलीवरून केला आहे.

भुलेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे, मंदिराची रचना सर्वप्रथम नंदीमंडप, त्यानंतर मंडप(सभामंडप), अंतराळ आणि शेवटी गर्भगृह अशी आहे. नंदीमंडपात नंदीची गर्भगृहाकडे तोंड करून असलेली अवाढव्य मूर्ती आहे. अंतराळ हा एक छोटासा भाग (passage)असतो जो मंडप(सभामंडप) आणि गर्भगृहाला जोडतो. या मंदिरातील अंतराळ आणि गर्भगृहामध्ये दरवाजा नाही, अंतराळालाच दरवाजा आहे आणि त्यावर अतिशय सुंदर शिल्पं, सुशोभीकरण केलेलं आहे. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांवर कीर्तिमुख आहेत. आणि त्यावरची हंसाची सुंदर रचना केलेली शिल्पपट्टी आहे. गर्भगृहात शंकरची पिंडी आहे.

नंदीमंडपातील नंदी

मंदिराच्या 'प्राकारा' भिंतीला आतल्याबाजूने असलेले खांब(pillar), मंदिराच्या मंडपाच्या खांबांसारखेच आहेत, फक्त मंडपांच्या खांबांवर  नागशीर्षक(फणाधारी नाग) आहेत, आणि प्राकाराच्या खांबांवर कीचकशिल्पं आहेत. 'कीचक' नावाचा शिल्प नमूना (motif) मंदिरांच्या खांबांवर वापरला जातो. खांब जिथे छपराला जोडला जातो, त्या ठिकाणी हात वर टेकवून आधार देत असल्यासारखी, 'भारवाहक' या अर्थाने,त्याची प्रतिमा बहुदा वापरली जाते.
भारवाहक किचक
मंदिरातील देवीदेवतांची बहुतेक शिल्पं 'त्रिभंगा' या अवस्थेत(posture मध्ये) आहेत. ही उभं राहण्याच्या निरनिराळ्या अवस्थातील एक अवस्था आहे. ज्यामध्ये शरीर तीन ठिकाणी वेगवेगळ्या कोनांतून वाकलेलं असतं त्याला 'त्रिभंगा' अवस्था म्हणतात. ह्या अवस्था नृत्यकलेतील, नृत्याच्या पावित्र्याशी निगडित आहेत. मंदिर शिवाचे असल्याने देव देवता शिवाशी निगडित अश्या आहेत. त्यातील काही महत्वाची शिल्पं आहेत मातृकांची (mother deities).

मातृका : गणेशी, माहेश्वरी , ब्राह्मणि
या मातृकांची उपासना प्राचीन काळापासून चालत आली आहे, त्यातील अनेक मातृकांची शिल्पं तीन-तीन च्या गटाने मंदिराच्या भिंतींच्या वरच्या भागांवर कोरलेली आहेत. या मातृका आहेत, माहेश्वरी, ब्रह्माणी, कौमारी, वैष्णवी, चामुंडा, इंद्राणी(ऐंद्री(aindri), शची), वराही. यांना सप्तमातृका म्हणतात, या  मातृकांमध्ये नरसिंही, महिषासुरमर्दिनी यांचाही कधीकधी समावेश होतो. तसेच या मातृकांबरोबर गणपती किंवा कार्तिकेय (स्कंद) यांचीही मूर्ती असते. भुलेश्वर येथील मातृकांच्या मूर्तींमध्ये गणेशी(विनायकी) ही एक अत्यंत वेगळी मूर्ती आहे. ही गणेशासारखी दिसणारी परंतु स्त्रीमूर्ती आहे. खरेतर सप्त किंवा अष्टमातृकांमध्ये गणेशीचा उल्लेख होत नाही. वैनायकी/गजाननी नावाची एक देवता (गज मुख आणि गणपतीसारखीच दिसणारी) चौसष्ट योगिनींपैकी एक आहे. तिची मूर्ती या मंदिरात का आहे ते मात्र कळत नाही. ह्या मंदिराचा तांत्रिक संप्रदायाशी तसा संबंध होता की नाही ते इतर इतर काही पुरावे नसल्याने सांगता येणार नाही. शैव पंथाशी निगडित काही इतर शिल्पं मात्र सापडतात, जश्या भैरव आणि चामुंडा यांच्या मूर्ती.

मंदिरातील अलंकरण केलेल्या शिल्पांबरोबरच रामायण आणि महाभारतातील प्रसंग देखील शिल्पात कोरलेले आढळतात. 
रामायण, महाभारतातील प्रसंग
मंदिराची शिखरं नंतरच्या काळात (१३व्या शतकानंतर)बांधलेली वाटतात. शिखरांवर असलेल्या शिल्पांत सिंह, मकर यांची अतिशय वेगळ्या शैलीतील  शिल्पं आहेत. तसेच प्राकाराच्या बाहेरील भिंतीच्या टोकावरची (गोपुरांवरची) शिल्पे अतिशय वेगळ्याच शैलीची (आणि आधुनिकही) वाटतात. 








मंदिरात सामावलेली सृष्टी आणि काही जिवंत शिल्पं
कीर्तिमुख
'कीर्तीमुख' हे बहुतेक शिव मंदिरांवर सापडणारे शिल्पं अतिशय वेगळे आहे. कीर्तीमुख म्हणजे 'face of fame'. कीर्तीमुखाची गोष्टही फारच रंजक आहे. एकदा एक अतिशय बलाढ्य दैत्य राक्षस इतकी अंदाधुंदी माजवतो की देवही घाबरतात. शेवटी त्या राक्षसापासून सुटकारा मिळावा यासाठी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ते शंकराकडे जातात. शंकर त्या राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी एक दैत्य राक्षस निर्माण करतो. हा राक्षस जे दिसेल त्याला खाऊ शकणारा असतो. आणि सतत फक्त खाणे(गिळंकृत करणे) हेच त्याचे काम असते. त्या अंदाधुंदी माजवणाऱ्या राक्षसापुढे शंकर हा नवीन राक्षस सोडतो. तेव्हा अंदाधुंदी माजवणारा राक्षस शंकराला शरण येतो आणि या सतत खाणाऱ्या राक्षसापासून वाचवण्याची विनंती शंकराला करतो. शंकर प्रसन्न होऊन त्याला जीवनदान देतो. आता नवीन निर्माण झालेला सतत काहीतरी खाऊ पाहणारा राक्षस मात्र आता मी कुणाला खाऊ असे शंकराला विचारतो. तेव्हा शंकर त्याला सांगतो की तू स्वतःलाच खा. त्यावर आज्ञेचं पालन करून तो शेपटीपासून स्वतःलाच खाऊ लागतो आणि शेवटी फक्त त्याचे मुख शिल्लक राहते. तेव्हा शंकर त्याच्या आज्ञाधारकतेवर प्रसन्न होतो आणि त्याला वर देतो. शंकर त्याला सांगतो की आजपासून तुझे नाव 'कीर्तिमुख' असेल आणि माझ्या प्रत्येक रहिवासाच्या ठिकाणी, मंदिरांवर तुझे वास्तव्य असेल. या कीर्तीमुखाची अशी कहाणी आहे. या कहाणीमागे 'स्वतःचा स्वतःच नाश करणे म्हणजेच स्वतःचा अहंकार (ego) / अहं याचा स्वतःच नाश करणे असा मतितार्थही असू शकतो. 'Medieval Temples of Dakhan' या Henry Cousen यांच्या पुस्तकात दिलेली कीर्तीमुखाची गोष्ट थोड़ी वेगळी आहे. ती अशी की जालंधर नावाचा राक्षस पार्वतीवर लुब्ध होऊन तिला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करू लागला. तेव्हा शिवाने आपल्या त्रितियनेत्रातून एक असा भयंकर राक्षस निर्माण केला ज्याने शिवाकडे  काहीतरी गिळंकृत करण्यासाठी देण्याची मागणी केली, त्यावर शिवाने त्याला स्वतःलाच गिळंकृत करण्याची आज्ञा केली, जिचे पालन करून त्याने स्वतःला मुखापर्यंत खाऊन टाकले. या आज्ञापालनावर प्रसन्न होऊन शिवाने त्याला 'कीर्तीमुख' ही पदवी दिली. या कीर्तीमुखाचे शिल्पं शंकराच्या मंदिराच्या मुख्य द्वारावर, शिखरांवर असतात. तसेच सुशोभीकरणाच्या शिल्पपट्ट्यातही असतात. 

या शिल्पाशिवाय हंस, मकर, हत्ती, उंट , सिंह अश्या प्राण्यांची शिल्पंही मंदिरात आहेत. आतल्या भिंतींवर जी उंटांची शिल्पं आहेत, तशी शिल्पं महाराष्ट्रातील इतर मंदिरात क्वचितच सापडतात. या शिल्पांचे सौन्दर्य अतुलनीय आहेच पण काही जिवंत शिल्पंही मंदिराचा भाग झाली आहेत. ही शिल्पं आहेत आजूबाजूच्या झाडांची, प्राण्या-पक्षांची जे या मंदिराचे रहिवासी आहेत. त्यातले एक आहे 'चार झाडांचे एक झाड'. हे आहे पिंपळाचे झाड, झाडाभोवती पार बांधलेला आहे, या झाडाचे वैशिष्टय आहे हे की या झाडाच्या बरोबरच कडुनिंबाचे ('निम') झाड, वेलीसारखे दिसणारे  दुसरे आणि तिसरे आणखी छोटे झाड अशी चार झाडे एकत्रितपणे एकमेकांत दाटपणे मिसळून गेली आहेत. तशीच आहेत मंदिराच्या बाजूची गुलमोहर, चिंच, कडुनिंब अशी अनेक झाडं. मंदिरांवरची आणखी जिवंत शिल्पं म्हणजे तिथे राहणारे पोपट, रखवालदाराचा रुबाबदार कुत्रा आणि मंदिरात डोळे मिटून ध्यान करीत बसलेले मांजर.

निसर्गाच्या कुशीत राहून, निसर्गालाच कडेवर घेऊन झाडे, पाने , फुले, पशु, पक्षी यांच्या सानिध्यात उभे असलेले हे मंदिर परत परत भेट द्यावे असे आहे. 


मंदिराजवळची जिवंत शिल्पं
(सर्व फोटोग्राफी सौजन्य : मधुमिता कुळकर्णी)

No comments:

Post a Comment