Monday 29 August 2016

चित्रकला आणि कलरब्लाइंड रवींद्रनाथ टागोर

'People often ask me about meaning of my pictures, I remian silent, as my pictures are
It is for them to express and not to explain.'

'I have nothing to say about my pictures, I do not know what I have done or wanted to say.'
- Rabindranath Tagore 



रवींद्रनाथ टागोर (ठाकुर) यांना कवी, कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून ओळखले जाते. पण ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे चित्रकारही होते. मी त्यांच्या चित्रांचे एक पुस्तक लायब्ररीत बघतले आणि त्यातली त्यांची चित्रे मला अतिशय आवडली मग त्यांच्या चित्रकलेबद्धल जाणून घ्यावेसे वाटले. २०१३ मध्ये मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट मध्ये टागोरांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले होते. त्याच्या चित्रांचे वैशिष्ट्य असे कि ती खूप काळ लक्षात राहतात. माझ्या मनात ती अधून मधून रेंगाळतात आणि त्यांच्यामागे काय आहे हे जाणून घ्यावेसे वाटते. म्हणून हा खटाटोप करत आहे. त्या चित्रातली गूढ माणसं, विचित्र आकार आणि विलक्षण रंग आणि रेषा यांचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपद्व्याप.

एखाद्या कोकिळ पक्ष्याचे चे आर्त ओरडणे रंगवायचे झाले तर ते कसे रंगवायचे? जेव्हा पोटात भीतीचा गोळा येतो आणि नक्की भीती कश्याची वाटते तेही कळत नाही तेव्हा चित्रात ते कसे दिसेल? जेव्हा एखाद्या माणसाचा फोटो काढला जातो तेव्हा तो चांगले कपडे घालून, केस विंचरून (कदाचित थोडी पावडर फासूनही) फोटोला बसतो. जसाच्या तसा येतो फोटो. पण त्या माणसाच्या आतल्या पिचलेल्या, खचलेल्या, खस्ता खाल्लेल्या, अपमान गिळून, ओढग्रस्त, नकारात्मक अनुभवाने भरलेल्या, कंटाळलेल्या, घाबरलेल्या, कधीकधी रागावणारऱ्या, तर कधी हसणाऱ्या, तर कधी नशीबाला दोष देणाऱ्या 'त्या आतल्या' माणसाचे काय? तो कुठे आहे? फोटोत तर तो कुठेच नसतो. अश्या माणसाचा खराखुरा फोटो, अगदी आत आरपार पाहून काढलेला, मिळेल कधी, असे त्याचे काढलेले खरेखुरे चित्र मिळेल?  कुठून आणायचे रंग आणि आकार मग हे व्यक्त करण्यासाठी? हे रंग मनाच्या तळगाभाऱ्यातले हवेत. पोटात पडलेल्या खोल खळग्यातले हवेत.
त्यासाठी दृष्टी बदलावी लागेल. डोळ्यांचीही आणि मनाचीही. रवींद्रनाथ टागोर यांची चित्र थेट अशी आहेत. माणूस साधासुधा नाही. महामानव.

त्यांनी १५७३ रंगचित्र आणि रेखाचित्र काढली.
त्यांच्या चित्रांकडे बघून अनेकदा असं वाटतं कि या माणसाला जे दिसतं त्यापलीकडे जाऊन, सापडलेलं असं काहीतरी सांगायचं आहे. त्यांच्या चित्रातले रंग तर एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती देतात. आपल्याला  सहजासहजी असे रंग आपल्याला पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या संवेदना काहीतरी खोल जाणीव करतात. का वापरत ते असे रंग? त्यांच्या चित्रांच्या रंगामागे, आकारांमागे कोणते सौंदर्यशास्त्र दडलेले आहे?

त्यांच्या चित्रातील या विचित्र रंगांचे कारण हे आहे रवींद्रनाथांना उतारवयात आलेला रंगांधळेपणा (protanopic-Red-green color blindness, in which the wavelengths of light that we see as the colour red are lost to the eye, and there is confusion between red and green in perception. It is not an illness, just a genetically inherited condition. There is no ‘cure’ for it.). त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी चित्रे काढायला सुरुवात केली. सुरवातीला लिहिताना सहज पेनाने केलेला चाळा म्हणून ते डूडल चित्रे काढीत. हळूहळू त्यात रंग भरणे चालू झाले तसे त्यांनी पेपर, रंग घेऊन त्यावर आपल्या अभिव्यक्तीला मुक्त वाट करून दिली. मुळात कवी, आणि खरं तर असे म्हटले जाते कि 'सगळ्या प्रकारची कला काव्याकडे वळते'. त्याउलट या कवीचे काव्यच चित्र निर्माण करत गेले. काव्य आणि चित्र यात फरकच उरला नाही. त्यांची चित्रकला अतिशय उच्च दर्जाची असली तरी ते स्वतः त्याबाबतीत असंतुष्टच होते. कारण ते स्वतःच्या या अविष्काराला मोजक्या तंत्रशुद्ध, चित्रकलेत मान्यता पावलेल्या अश्या नियमांच्या भिंगातून बघत होते. काही काळानंतर त्यांना स्वतःची चित्रकला इतर चित्रकलेच्या दृष्टीने कमी दर्जाची वाटू लागली. आपल्याला तांत्रिकदृष्ट्या चित्र या वयात शिकणे शक्य नाही आणि चित्रकलेची ती(बहुदा त्यांना अपेक्षित असलेली ) पायरी गाठणे शक्य नाही असे त्यांनी मनाकडे घेतले आणि चित्रकला सोडूनही दिली. पण खरंतर  त्यांची न शिकता काढलेली चित्र खूपच श्रेष्ठ आहेत. खुद्द व्ही. एस. गायतोंडेना विचारले गेले होते कि या काळात भारतात श्रेष्ठ चित्रकार कोण आहे? त्यावर व्ही. एस. गायतोंडेनी रवींद्रनाथ टागोरांचे नाव घेतले होते.  


सगळ्यात वेगळी आहेत त्यांची व्यक्तिचित्र (portraits) आणि  निसर्गचित्रं (landscapes). सगळ्या श्रेष्ठ कलाकृती सारख्याच पातळीवर असतात आणि एकातून दुसऱ्याची आठवण करून देणाऱ्या असतात. टागोरांचे एखादे व्यक्तीचित्र किंवा गडद निसर्गचित्र कधीतरी मनात खोल रुतून बसलेली एखादी संगीताची धून समोर आणते, तर कधी एखाद्या कवितेची ओळ, किंवा ग्रेसची संध्याकाळ.





स्वतःच्या चित्रकलेबद्धल ते म्हणतात, 'Words are too conscious; lines are not. Ideas have their form and color, which wait for their incarnation in pictorial art. Just now painting has become a mania with me. My morning began with songs and poems; now, in the evening of my life, my mind is filled with forms and colors.'

त्यांच्या चित्रकलेवर Ernst Ludwig Kirchner याच्या वूडकट प्रिंटींगचा तसेच 'मलागान कार्विंग', 'हैदा' ( sculptural tradition among the Haida Indigenous Nation from the northwest coast of the North America) , आणि स्क्रीमशौ (scrimshaw is scrollwork, engravings, and carvings done in bone or ivory)  या  कलाप्रकारांचा प्रभाव होता.   
त्यांच्या चित्रकलेबद्धल केतकी डायसन या लेखिकेने 'रोंगेर रबिन्द्रनाथ'(Ronger Rabindranath/ Rabindranather Sahitye o Chitrakalay Ronger Byabahar) या पुस्तकात अभ्यासपूर्ण  लेखन केले आहे. हे पुस्तक मला कुठेही  मिळाले नाही. खूप शोधले. जर मला ते मिळाले तर ते वाचण्यासाठी बंगाली शिकण्याचीही  माझी तयारी आहे. 

There's ultimate mystery at the heart of great art!
'Beauty that can all too easily vanish if we seek to understand it too easily and too quickly'. 

No comments:

Post a Comment