Wednesday, 19 October 2016

दोन अज्ञात

जपानी काबुकी डान्सर

जेव्हा नोकरी सोडून घरातील वास्तव्य वाढले तेव्हा खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या mangrove (खारफुटी)कडे माझे लक्ष गेले. तिथे आणि त्याच्या बाजूलाच असणाऱ्या लहानशा टेकडीवर दाटीवाटीने वाढलेल्या झाडांत अनेक पक्ष्यांची हालचाल नेहमी दिसायची. लालबुड्या बुलबुल, मैना, खंड्या, हळद्या, राखी बगळा, पॉण्ड हेरॉन, कोतवाल, घार, ब्राह्मणी घार असे पक्षी अधून मधून दिसत. पण बाकीचे अनेक छोटे पक्षी जे या खारफुटीच्या झुडपात राहतात ते मात्र क्वचितच दिसत. त्यांचे आवाज मात्र ऐकायला येत. त्यातला एक अतिशय मोहक आणि लक्षात राहणारा आवाज होता 'टीट-टी-टी  SSSSSSS टीटी SSS टीटी SSS टीटी टी SSS'  
ही शीळ  बऱ्याचदा पूर्ण ऐकू येई, पण काही वेळेला अर्धी पण ऐकू येई. या शिळीचे अनेक प्रकारही ऐकू येत. हा असा सुरेल शिळा घालणारा आणि त्यातही व्हेरीअशन करू पाहणारा कोण हा बीथोवेनचा वारशी? म्हणून त्या अज्ञात पक्ष्याचे नाव मी 'बीथोवेन' ठेवले होते. पक्षी कधीच दिसला नाही. दहाव्या मजल्यावरून दिसणार तरी कसा म्हणा? पण मला नेहमी त्याचा आवाज ऐकला की तो कुठला पक्षी असेल हे शोधावेसे वाटे. पण शोधायचे कसे?  जेव्हा जेव्हा तो आवाज कानावर पडे तेव्हा मी मनात त्या पक्ष्यालाच उद्देशून म्हणत असे 'आज ना उद्या नक्कीच शोधून काढेन मी तू कोण आहेस ते.' माझे पक्ष्यांबद्धलचे फक्त कुतूहल जास्त आणि अज्ञान त्याहूनही जास्त, त्यामुळे शोधायचे कुठे आणि विचारायचे कुणाला आणि कसे? आवाज रेकॉर्ड करून कुणा पक्षी-निरीक्षकाला ऐकवता आला असता पण तेव्हा पक्षीनिरीक्षण आणि पक्षीनिरीक्षक या दोहोंबाबतीत ज्ञान अत्यल्पच होते. म्हणून हा आवाज हुडकणे बाजूलाच राहिले. दोन अडीज वर्षं तरी त्याचा काहीच पत्ता लागला नाही. जवळपास त्या आवाजाचा काहीही पाठपुरावा न करता, कुठचाही खटाटोप न करता मी गप्प बसून राहिले तो आवाज ऐकत. सकाळी बऱ्याचदा ऐकू येई, अधेमधे कधीही ऐकू येई आणि काही काही दिवस, महिने महिने त्याचा आवाज नसे. मी त्या आवाजाला अनुसरून त्या अज्ञात पक्ष्याचे एक चित्र मनात बांधले. माझ्या मनातल्या चित्रात तो पक्षी म्हणजे एक खूप छोटा, पिवळ्या निळ्या रंगाचा आणि कुणीतरी गायनाचा पंडित असावा त्याप्रमाणे डोक्यावर तुरा असणारा होता. जेव्हा काही काळ त्याचा आवाज ऐकू येत नसे तेव्हा मला वाटे कि बहुतेक आता ऐटीत फांदीवर बसून तो सुरांची छान रचना बनवत असेल. आणि त्या सुरावटी बांधण्यातच तो गर्क असेल. मग जेव्हा त्याची सुरावट बांधून होई तेव्हाच तो रियाज करत असेल. किंवा नवीन चीजा शिकण्यासाठी खारफुटीचे रान सोडून आपल्या गुरुकडे साधना करण्यासाठीदेखील गेला असेल. मोठा पंडितच गाण्यातला. त्याची नेहमीची 'टीट-टी-टी  SSSSSSS टीटी SSS टीटी SSS टीटी टी SSS' ही शीळ  तो वेगवेगळ्या व्हेरिएशनने ऐकवत असे.

शेवटी एकदाचा या सुरेल आवाजाचा गायक समोर आला. मी कोकणात गेले असताना, घराच्या देवखोलीतून समोरच्या आंब्याच्या झाडावर हालचाल दिसली म्हणून बघितलं तर एक सुमार दिसणारा चिमणीएवढा काळसर, पोटाकडे पांढरट, पण अतिशय सुरेख जपानी पंख्यासारखी शेपटी असलेला पक्षी या फांदीवरून त्या फांदीवर टणाटण उडया मारीत होता.  पायावर नक्षत्र पडल्यासारखा नुसता इथून तिथे नाचत, फुदकत होता, काही सेकंदातच तो नजरेआड झाला. त्या झाडावरून दुसऱ्या, तिसऱ्या झाडावर पसार झाला. हाच तो  'बीथोवेन' हे काही मला तेव्हा कळले नाही. पण दूर गेल्यानंतर तीच नेहमीची शीळ ऐकू आली. तेव्हा चटकन डोक्यात प्रकाश पडला की खारफुटीतला 'बीथोवेन' इथे पण आहे. मग मी कान देऊन परत ती शीळ ऐकू येते का ते बघत राहिले. अनेक दिवस त्या आवाजाच्या दिशेने धावू लागले. त्याला पकडणे आता शक्य होते कारण घर जमनीलगत, झाडांच्या आसपास असल्याने कुणी असलाच आवाज करत तर चटकन त्या आवाजाच्या दिशेने हुडकले की पक्षी दिसू शकणार होता. म्हणून आवाजावर नजर ठेऊन होते पण तो आवाज अजूनही हुलकावण्या देतच होता. पक्षी काही समोर आला नाही. 

एक दिवस समोरच्या जांभळीच्या झाडावर आलेली हरेवा या पक्ष्याची जोडी कॅमेराबंद करण्यासाठी घराच्या टेरेसवर दबा धरून बसले होते, तेव्हा त्यांच्या camouflage करणाऱ्या हिरव्या रंगामुळे त्यांना हुडकताच येत नव्हते म्हणून आणि उन्हाच्या माऱ्यामुळे बेजार झाले होते. तेव्हा अचानक तीच नेहमीची शीळ समोरच्या झाडावर ऐकू आली. ऊन अगदी समोरून डोळ्यावर पडत होतं आणि त्या उन्हाने आंब्याची फांदी देखील काळसर दिसत होती तेव्हा नाचत नाचत जपानी पंखा फुलवत तो पक्षी त्या फांदीवर अवतरला. हरेवा नाही तर नाही याला तरी कॅमेराबंद करूया म्हणून मी झटकन त्याला कॅमेऱ्याने टिपले. कॅमेऱ्यात त्याची silhouette च दिसत होती. तर तीच शीळ तो घालू लागला. मी खात्री करून घेण्यासाठी कॅमेऱ्यातून त्याच्याकडे बघतले, तोच होता शीळ घालत. 'अरे चोरा ! तूच काय तो बीथोवेन!' असे म्हणून मी कपाळाला हात लावला. तूच काय तो स्वरांची बांधणी करणारा, सुरेख आवाज काढणारा. कुठे तो पिवळा-निळा राजेशाही तुरा असलेला तानसेन मी योजला होता आणि तू एकदम त्याच्या विरुद्ध निघालास. पण दिसण्यास अगदीच काही सुमार नाहीस! छानच आहेस! किंबहुना जपानी किमोनो घालून जपानी पंखा फिरवीत नाचणारा काबुकी डान्सरच वाटतोस! 
 


माझ्याकडचा तुझा फोटो तेवढा छान नाही पण इतर तुझे फोटो बघितले तेव्हा समजले खरा कलाकार-गायक आणि नर्तक वाटतोस खरा. तुझ्या गाण्यापेक्षा तुझं नाचणंच वाखाणलं गेलंय पण! त्यावरूनच तुला नाचण, नाचरा, नर्तक म्हणतात. 
तर असा मला या अज्ञात 'बीथोवेन' चा शोध लागला. ज्याला मी बीथोवेन समजत होते तो होता नाचण्यात निपुण , त्याचं  नाव नाचरा किंवा व्हाईट स्पॉटटेड फॅनटेल (Rhipidura albogularis, ऱ्हिपिड्युरा आल्बोग्युलॅरीस). 


हवेत भिरभिरत जाणारं गवताचं पातं 

'पक्षी आपले सख्खे शेजारी' या किरण पुरंदरे यांच्या पुस्तकात एका पक्ष्याबाबत त्यांनी लिहिलंय 'त्या काळात (भरपूर पाऊस सुरु होऊन सगळीकडे हिरवंगार झालं असलं की ) मला लोकांचे लांबलचक हिरव्या रंगाची शेपूट असलेला पक्षी पाहिल्याचे फोन येत.' 

हे वाचल्यावर एकदम कसलीतरी लिंक लागली आणि आनंदाने चेहरा उजळला. मी अनेक दिवस शोधत होते तो हा! ' ठिपकेवाला मुनिया' 

हे हिरव्या रंगाचं लांब शेपूट मला आमच्या दहाव्या मजल्याच्या खिडकीतून वारंवार दिसलं  होतं. पुढे नुसता एक चॉकलेटी भुरभुरणारा कापसाचा गोंडा, आणि मागे लांब हिरवी केवढीतरी शेपटी. मी याला इतक्यांदा बघितले कि असा विचित्र पक्षी असूच शकत नाही असेच मला वाटले आणि तो पक्षी नसून कोणीतरी मोठ्ठा किडा आहे असेही मला वाटले. मुख्य म्हणजे सकाळच्या वेळी बाहेर पाहत असताना चटकन ते हिरवं लांबलचक पातं उडताना दिसे. तेव्हा काय असेल ही  विचित्र गोष्ट? कित्येकदा मी ते भिरभिरतं पातं दिसलं की इतरांना दाखवायला जाई पण तोपर्यंत सुसाट वेगाने भिरभिरत ते नाहीसं होई आणि ते काय आहे याच्या रहस्याचा उलघडा होत नसे. खरोखरच पाहणाऱ्याला ते असे काही दिसते की माहित नसेल तर क्षणभर तो अचंबित होऊन बघतच राहील कि हे आहे तरी काय? कसला किडा आहे का एवढा मोठा ज्याला पानाची शेपटी उगवलीय.  पण किडा एवढ्या झाडांच्या उंचीवरून उडेल का? हा कुठला राक्षसी किडा असेल? असाच विचार मनात येईल. 

शेवटी त्या भिरभिरणाऱ्या विचित्र गवताच्या पात्याचा शोध किरण पुरंदरे यांच्या पुस्तकात लागला. हाच तो ठिपकेवाला मुनिया. त्यांनी लिहिलं आहे 'जरा डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा. साधारण चिमणीचं पिल्लू वाटावं एवढ्या आकाराचा चॉकलेटी रंगाचा मुनिया आकाशात उडतोय आणि त्याने चोचीत धरलेलं हिरवं पातं वाऱ्यावर भुरभुरतंय!' तेव्हाच डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला दिसणारी वाऱ्यावर भिरभिणारी हिरवी लांबलचक शेपटी आणि पुढे उडणारा चॉकलेटी गोंडा म्हणजे हाच 'ठिपकेवाला मुनिया'. ठिपकेवाला मुनिया गवताच्या पात्यांपासून आपलं घरटं बांधतो. आणि पावसाच्या दिवसात हिरवीगार गवताची पाती लांबलचक वाढली की हा त्यांना खुडून घरटं बांधण्यासाठी ये-जा करू लागतो. स्वतःच्या आकारापेक्षा मोठी पाती घेऊन उडण्यामुळेच तो असा मजेशीर दिसतो.  याचा एक भाऊबंद अशाच उचापती  करताना मी अगदी बघितला आहे. त्याचं नाव व्हाईट रम्पड मुनिया (पांढऱ्या पुठ्ठयाची मनोली). हा देखील असाच घर बांधण्याच्या उद्योगात हिरव्यागार गवताचे तुरे, विशेषतः ग्रे लव्हग्रास चे मोठे मोठे फुललेले तुरे खुडून घेऊन जात होता. त्याला अनेकदा जवळून पाहताना तो इतका मजेशीर दिसायचा की एकदा तर मला मोरासारखा पिसाऱ्याचा जुडगा असलेला कुणीतरी दुसराच पक्षी आहे असे वाटले. हा देखील गवतात सारखा ये-जा करत राहतो आणि ग्रे लव्हग्रास चे तुरे, काड्या खुडून स्वतःच्या आकारापेक्षा मोठा भर चोचीने उचलून झाडावरच्या घरट्यापर्यंत घेऊन जातो. पण याला मी बरंच जवळून पाहिलं त्यामुळे माझी ठिपकेवाल्याच्या बाबतीत झाली तशी फसगत झाली नाही. 

                               ठिपकेवाला मुनिया (विकिपीडियाच्या सौजन्याने), पांढऱ्या पुठ्ठयाचा मुनिया                                                             

उडणारं शुष्क पान आणि पुष्प-योगिनी

संजय गांधी नॅशनल पार्कमधे एक छोटीशी वाट आहे. तिला 'शिलोंडा ट्रेल' म्हणतात. रानवाटच आहे ती पण आता माणसाच्या बरीचशी पायाखालून जाणारी. इथे पक्षी बघायला मिळतील म्हणून गेले होते, पण तसा थोडा उशीरच झाला होता, पक्षी फारसे दिसले नाहीत पण दोन गोष्टी दिसल्या ज्या खूपच चित्तवेधक होत्या. निसर्ग हा 'दी जिनिअस आर्टिस्ट', 'दी जिनिअस क्रिएटर' आहे याचा वारंवार प्रत्यय येतच असतो त्यातीलच आलेला हा आणखी एक प्रत्यय. 'दी जिनिअस आर्टिस्ट' यातला 'दी' महत्वाचा. त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. पण निसर्ग इतका नम्र निर्माता आहे, की कधीही आपल्या निर्मितीचे प्रदर्शन तो करीत नाही. तुम्ही जर त्याला भेटायला गेलात, त्याच्याशी संवाद साधलात तरच तो आपल्या निर्मितीची रहस्य थोडीफार उलघडून दाखवतो. 

त्यातलेच एक म्हणजे 'ब्लु ओकलीफ बटरफ्लाय' हे फुलपाखरू. त्याचं  शास्त्रीय नाव 'Kallimaa horsfieldii'. हे खालच्या फोटोत आहे ते हे फुलपाखरू.
दिसलं का? नाही ना? नाहीच दिसणार. आता पुढच्या फोटोमधे दिसेल.

 
या फुलपाखराचे छान फोटो इथे बघायला मिळतील. याचे Kallima जातीतले इतर भाऊबंद भारतातल्या वेगवेगळ्या भागात आढळतात पण हे फुलपाखरू मात्र फक्त पश्चिमी घाटांत आढळून येतं. सर्वात कोड्यात टाकणारं त्याचं वैशिष्ट्य म्हणजेच त्याचं पंख मिटून camouflage करण्याचं टेक्निक.  हे फुलपाखरू पंख मिटून घेऊन स्वतःला 'सुकलेलं पान' बनवतं. म्हणजे पंख मिटले की ते सुकलेल्या पानासारखं दिसतं. त्यामुळे जर उडताना दिसलं  नसेल तर त्याला झाडावर शोधणं तसं कठीणच आहे. मग जेव्हा कधी ते पंख उघडेल आणि  त्याचा मध्यभागी निळसर आणि टोकाकडे शेंदरी होत जाणारा रंग, पंखांच्या वरच्या बाजूला दिसणारा पांढरा पट्टा आणि त्यावरची काळी महिरप हे सर्व दिसेल तेव्हाच  ते फुलपाखरू आहे हे कळेल. हे फुलपाखरू उडताना फार सुंदर दिसतं.
Mark Alexander Wynter-Blyth नावाच्या निसर्गसंशोधकाच्या 'बटरफ्लाईज ऑफ इंडियन रिजन' या पुस्तकात त्याने म्हटलं आहे की एका ब्लु ओकलीफच्या मिटलेल्या पंखांवरचा पॅटर्न दुसऱ्या ब्लु ओकलीफच्या मिटलेल्या पंखांच्या पॅटर्नशी कधीच जुळत नाही. म्हणजे प्रत्येक पंख मिटलेल्या ब्लु ओकलीफची ओळख वेगळी असते. हवे तेव्हा पंख मिटून, सुकलेल्या पानाचे रूप घेऊन निसर्गात मिसळून जाण्याची त्याची हातोटी खास आहे. 

अनेक वर्षांनी फुलणारी 'पुष्प-योगिनी' कारवी

एखादा संशोधक एखादा शोध लावण्यासाठी किंवा एखादा चित्रकार/शिल्पकार एखादी कलाकृती घडवण्यासाठी जशी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतो तशी ही कारवी आपली फुलं निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे (सात ते दहा वर्षे) कार्यरत असते. वनस्पती का फुलत असतील आणि कश्या फुलत असतील यामागची रहस्य शास्त्रीय कारणांत न शोधात त्या वनस्पतीच्या व्यक्तिमत्वात शोधली पाहिजेत. वनस्पतींचंदेखील एक मानसशास्त्र असलं पाहिजे. त्यानुसार अबोलीचं वेगळं व्यक्तिमत्व, सदाफुलीचं वेगळं, ओसंडून फुलणाऱ्या मोगरीचं वेगळं , तसंच कारवीचंही. वर्षांनुवर्षे आपल्या फुलांसाठी आराधना करणारी कारवी ही फुलणाऱ्या वनस्पतीतील पुष्प-योगिनी असली पाहिजे. सप्टेंबर मध्ये पाऊस सरण्याच्या जवळपास, ती सात ते दहा वर्षांनी एकदा फुलते. मला हि कारवी 'शिलोंडा ट्रेल' मध्ये फुललेली दिसली, फुलांचा बाहेर जवळपास ओसरून गेला होता पण अजूनही एक दोन फुलं होती.



Strobilanthes Callosus हे तिचे शास्त्रीय नाव आहे. ती acanthaceae या कुटुंबातील आहे. हि अडुळसा कुळातील दोन तीन मीटर वाढणारी वनस्पती आहे. हिची पानेही बरीचशी अडुळश्यासारखी असतात. कोकणात अडुळसा विपुल प्रमाणात आढळतो, तिकडे खोकला येणाऱ्या माणसाला सर्रासपणे, अडुळश्याच्या पानं,  तुळशीची पानं, मिरी, चहाची पात आणि कांदा घालून काढा करतात आणि त्यात गूळ मिसळून देतात. सर्दी खोकल्यावर अडुळसा उपकारक आहे, तसे कारवीचे काही औषधी उपयोग आहेत का म्हणून कोकणात वाढलेल्या माझ्या आईलाच विचारले तर 'कारवी म्हणजे काय तेच ठाऊक नाही' असे उत्तर तिने दिले. 'वनश्रीसृष्टी' या डॉ. वि. म. आपटे यांच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे करावी  पश्चिम घाटात विपुल प्रमाणात उगवते. मावळ कोकण आणि उत्तर कारवार ही त्यांची माहेरघरे आहेत. म्हणजे कोकणातही  कारवी उगवत असावी.



'नीस' (Christian Gottifried Daniel Nees von Esenbeck) या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञाने या वनस्पतीचे  प्रथम शास्त्रोक्त वर्गीकरण केले. आदिवासी लोकांत कारवीच्या वाळलेल्या काठ्यांचा उपयोग कुडासाठी(कुंपण किंवा झोपडीच्या आधारासाठी) करतात. तसेच तिची पाने, फुलातला मध यांचाही वापर करतात. कारवीच्या फुलातला मध मधमाश्या गोळा करतात. या मधाला 'कारवीचा मध' म्हणतात. या मधालाही औषधी गुणधर्म आहेत. आदिवासी लोकांच्या औषधांमध्ये कारवीची पाने आणि मधाचा वापर होतो. पण या पानांना वापरण्याची विशिष्ट पद्धत आहे. पानाच्या मागील अंगावर असणाऱ्या शिरांवरची लव काढून टाकली नसेल तर अशी पानं खाऊन पोटात क्षोभ होऊ शकतो. आदिवासींना हे बरोबर ठाऊक असले पाहिजे. मध्यप्रदेशातही कारवी उगवत असून तिला 'मरुआदोना' असे म्हणतात.

या कारवीला इतक्या वर्षातून एकदाच फुलं का येत असावीत? तर यामागचं कारण तिची जडणघडण हे आहे. हि वनस्पती Plietesials या प्रकारच्या वनस्पतींमध्ये मोडणारी आहे. या वनस्पती अनेक वर्ष वाढत राहतात आणि मग एका विशिष्ट वर्षी सगळ्या एकदम ओसंडून फुलतात. फुलण्यानंतर फळ आणि बीजनिर्मितीदेखील एकाच वेळी होते.  त्यांच्या या प्रकारच्या बीजप्रक्रियेला masting (synchronous production of flowers and seeds)  म्हणतात. फळं मातीत पडून राहतात आणि पुढच्या पावसाळ्यात फुटून रुजतात. रानोमाळ जिथे कारवी फुललेली असेल तिथे पुढच्या पावसाळ्यात फळे फुटण्याचा एकत्रित आवाज होतो. या Plietesials वनस्पतींमधे अश्या काही प्रजाती आहेत ज्या monocarpic आहेत(reproduce once and die) आणि एकदा फुलल्या-फळल्यानंतर या वनस्पती एकत्रितपणे नष्ट होतात. अश्या विपुल फुलल्या-फळल्या नंतर नष्ट होऊन जाण्यामागे देखील काहीतरी genetic प्रेरणा असली पाहिजे.  म्हणजे उत्स्फूर्त निर्मिती नंतर आत्मनाश करून घेणारे निसर्गाचे हे छोटे छोटे सहाय्यक कलाकारच  आहेत असे म्हणायला पाहिजे.

निसर्गातील या दोन विलक्षण गोष्टी. मला या गोष्टी बघून आणखीही काही प्रश्न पडले, जसे 'ओकलीफ बटरफ्लाय' ला 'ओकलीफ' नाव का पडलं? 'ओक'च्या झाडाची पानं तर मुळीच या फुलपाखराच्या मिटलेल्या पंखांच्या आकारासारखी दिसत नाहीत. मग 'ओकलीफ' हे का? आणि कारवीचा आदीवासी लोकं आणखी कसा वापर करत असतील आणि कारवीवर त्यांच्या काही लोककथा, अनुभव आणि आख्यायिका असतील का?  

Friday, 7 October 2016

शांत, स्तब्ध, एकांतप्रिय व्याध


पावसाळी संध्याकाळ.  दूर एका पेंडराच्या झाडाच्या शिखरावरील पर्णहीन डेळक्यावर एक पक्षी बसून होता. इतक्या दूर असूनही तो बऱ्यापैकी मोठा दिसत होता. म्हणजे प्रत्यक्षात किती मोठा असेल याचा अंदाज बांधत मी घराच्या अंगणातून त्याला न्याहाळत होते. काही कामामुळे मी घरात गेले आणि पुन्हा येऊन बघते तर तो गायब झाला होता. त्यानंतरच्या अनेक संध्याकाळी मी त्या झाडाकडे पाहीले पण तो दिसला नाही. तो बहुदा गरुड असावा असे माझ्या अज्ञानी मनाला वाटले. 'गरुड'. कुणाला ठाऊक नसतो हा पक्षी? कुठचाही मोठा पक्षी दिसला की 'गरुड' च नाव मनात येते. हा पण गरुडच असावा का? पुन्हा दिसावा म्हणून मनोमन त्याची प्रतीक्षा केली. गणपतीचे दिवस होते. गावच्या आमच्या घरात त्या दिवसात खूप गजबज होती. एका दिवशी, सकाळचा जवळच्या झाडावर बसलेला तो, घराच्या पोर्चमधून मला दिसला. इतरांनाही दाखवला. केवढा मोठं आहे! एवढा मोठा कोण हा पक्षी? प्रत्येकाने म्हटले पण तो नक्की कोण असेल त्याबद्धल कुणालाच माहित नव्हते. पाऊस नव्हता, चांगले ऊन होते. बराच वेळ तो पक्षी झाडावरच बसून होता.

साधारण अकराच्या दरम्यान कुठूनसा एक पिसांचा लोट सळसळत उंच झाडांच्या वर आभाळात उडताना दादाला दिसला. तो चटकन हात दाखवत म्हणाला 'अरे मोर मोर!' त्या दिशेला तोंड वळवले तर एक मोर चक्क वरती आकाशात उडताना दिसला. त्याच्यामागे त्याचा पिसांचा लोटही हेलकावे खात होता. एवढ्या उंचीवर उडणारा मोर कधीच पहिला नव्हता. हा मोर जो उडाला तो काही मोठ्या पक्ष्यासारख्या भराऱ्या मारण्यासाठी नव्हे, तर एका झाडीतून शेताच्या बांधावरून लपत छपत तो दुसऱ्या झाडीकडे चालला होता. तिथे चटकन पोहोचण्यासाठी तो उडाला असावा. गरुड(त्याला तूर्तास गरुडच म्हणूया) तर आपल्या जाग्यावर बसूनच होता. त्याचे मोराकडे नक्कीच लक्ष असणार. मोर विजेसारखा एका सेकंदात झाडीत गायबही झाला. ज्या झाडीत तो घुसला ती गरुडाच्या झाडापासून तशी जवळच होती. 

त्या मोराला पाहण्यासाठी मी आणि दादा दोघे झाडीलगतच्या वाटेने लगबगीने गेलो. चालता चालता, ते गरुडाचे झाड अगदी समोर दिसत  होते पण रस्त्याला लागून नव्हते, अनेक झाडाच्या गर्दीत , वाटेपासून दूरच होते.पण त्यावर बसलेला गरुड नक्कीच आमची चाहूल घेऊन होता. कारण थोडा दूर असतानाच जेव्हा मी त्याचा एक फोटो काढला, तेव्हा त्याने थोडी हालचाल केली. त्या दोन्ही बाजूने असलेल्या झाडीच्या रस्त्याने आम्ही पुढे गेलो. मोर रस्त्याच्या एका बाजूच्या झाडीत घुसला होता (एवढेच आम्ही घराच्या अंगणातून पाहू शकलो होतो ) आणि गरुडाचे झाड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या झाडीत होते. त्या झाडाच्या आसपास पोचलो, मान वरती करून गरुडाकडे पहिले, आणि बघताक्षणी त्याने आपले अजस्त्र पंख उघडले आणि बळकट दिसणाऱ्या पायांची  झाडाच्या फांदीवरची पकड सुटली. क्षणार्धात गरुड उडून गेला. 


एक सेकंद दिग्मूढ होऊन आम्ही बघतच राहिलो. काही पक्षी, प्राणी असतातच असे. मंत्रमुग्ध होऊन त्यांना फक्त बघायचे. बहुदा डहाण्या वाघ दिसला तर असेच होईल. भान हरपेल. एका (बहुदा मारुतीचितमपल्ली यांच्या) पुस्तकात वाचले आहे की अश्या काही शिकारी प्राण्यांत मृत्यूचे संमोहन घालण्याची विद्या असते. तसंच काहीसं पक्ष्यांतही असेल का? कोण जाणे. पण ह्या अजस्त्र पक्ष्याला बघून मात्र संमोहन घातल्यासारखे झाले. 

मोर पाहण्यासाठी आलो होतो याचा क्षणभर विसर पडला. मोर काही दिसला नाही. तो केव्हाच झाडीच्या दाटीवाटीने पलीकडच्या शेतात पसारही झाला असावा. इकडे तिकडे बघितले. पण कुठेच काही हालचाल नव्हती. पुन्हा काही गणपतीच्या दिवसात गरुड दिसला नाही. गणपतीनंतर घरात सामसूम झाली. मी मात्र काही दिवस आईबरोबर मागे थांबले. गणपती गेला आणि दबा धरून बसल्यासारखा पावसाने कोसळायला सुरवात केली. दिवस दिवस काळवंडून टाकणाऱ्या वातावरणात पाऊस पडत राहिला. त्या दिवशी दुपार सरून संध्याकाळ व्हायला आली तरी पाऊस पडतच होता. पोर्चमध्ये खुर्ची टाकून मी पुस्तक वाचत होते. पावसाचा जोर वाढला तसे मी बाहेर बघितले. दूर धूसर झालेल्या पेंडाराच्या झाडावर पुन्हा गरुडाचा ठिपका दिसला. तसा ठिपका म्हणता येणार नाही कारण त्याचा उभट आकार. पंख जवळ घेऊन बसलेली उंचाडी काळसर आकृती दिसत होती. गरुड पावसात भिजत होता. झाडाच्या त्याच डेळक्यावर एकटाच बसून होता. मी अधून मधून त्या झाडाकडे बघत राहिले. आता सहा वाजून गेले होते. पावसामूळे काळोख लवकरच पसरत होता. पण गरुड अजून तिथेच होता. जवळपास एक-दीड तास तो तिथेच एका जागेवर, जराही हालचाल न करता, तेही भर पावसाचा का बसला असावा, तेही एकटाच? मीही तासदीडतास पोर्चमध्ये पुस्तक बाजूला ठेवून बसून राहिले,  त्याच्याकडे बघत. मात्र तो जराही हलला नाही. सगळा आसमंत चिडीचूप होता. माणसे नाहीत. पाखरे नाहीत, कुणी नाही. मला मात्र त्याच्या तशा भिजत बसण्याचे आश्चर्य वाटले. नंतर, म्हणजे एक-दीड तासांनंतर , केव्हातरी माझे लक्ष नसताना मात्र तो तिथून उडून गेला. 

आता रात्रीचा कुठे गेला असेल, बाजूच्या डोंगरात, तिथल्या छोट्या जंगलात? रात्रीचा हा काय करत असेल? त्याचे एकटे आयुष्य असेल तरी कसे? त्यानंतर बऱ्याचदा जवळच्या झाडावर तो मला दिसला. चार-दोन फोटोही काढले. हे जवळचे झाड नक्की कसले आहे माहित नाही. पण तिथे तो बऱ्याचदा येऊन बसायचा. आणि दुसरे झाड म्हणजे ते पेंडाराचे. ही दोन झाडे त्याची दिवसभराच्या कामकाजातील विश्रांतीची स्थाने बहुतेक. म्हणजे हा गरुड इथे जवळपासच राहणारा होता तर. त्याच्या फोटोंवरून त्याचे पक्के नावही शोधले 'व्याध गरुड' म्हणजेच Changable Hawk Eagle (Nisaetus cirrhatus). साधारण दोन फूट उंच. पट्ठ्या कमालीचा देखणा. डोक्यावर पिसांची शेंडी. काही फोटोमधे ही पिसांची शेंडी दिसत होती. याला Crested Hawk Eagle सुद्धा म्हणतात. माणसाला किंवा कुणालाही (म्हणजे सर्व सजीवांना) कुणाशीही मैत्री करता यायला हवी होती, पक्ष्यांशी बोलता यायला हवे होते. असे असते तर मी या गरुडाशी मैत्री केली असती. (त्याने मैत्री स्वीकारली असती की नाही कुणास ठाऊक). 


त्याचे डोळे मला दुरून दिसले नाहीत. पण नंतर त्याच्या काही इन्टरनेटवर बघितलेल्या फोटोत त्याचे विलक्षण डोळे दिसले. गुढाने भारलेला हा पक्षी आहे. 'गरुडपुराण' म्हणून एक पुराण आहे, ते सहसा वाचले जात नाही, फक्त मृत्यूनंतरच घरात (किंवा क्रियाकर्म करण्याच्या जागी) ते वाचतात. या पुराणात मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन इत्यादींविषयी विष्णूने गरुडाशी केलेला संवाद आहे. गरुड हे विष्णूचे वाहन. अट्टल शिकारी. पक्षांचा राजाच. या समोर दिसणाऱ्या गरुडाविषयी मला कुतूहल वाटतच राहिलं. रात्री, कुठे दूर घनदाट जंगलात त्याचे एखादे रात्रनिवाऱ्याचे घरटे असेल का? कारण काळोख पडताना तो मला डोंगराच्या दिशेने उडताना अनेकदा दिसला. कि कि कि कि कि कि किवववववववववी(ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्युवववववववववी ) अशी किंकाळी फोडली त्याने डोंगराच्या दिशेने उडताना. ती कुणा सहचरासाठी होती का? तसा एकदा मला तो जवळच्या झाडावर दिसला आणि तसाच दिसणारा, दुसरा एक पक्षी त्याच झाडावर थोडासा खालच्या फांदीवर बसला होता. ही गरुड मादी असावी का? त्या दिवशीही पावसाने नुसता काळोख केला होता. फोटो तर सोडाच त्याला नुसतं बघणं सुद्धा त्या रपारप पावसात कठीण झालं. नंतर वाचल्यावर कळलं की या गरुडाच्या विणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिल असतो. आणि हा एकांतप्रिय पक्षी फक्त विणीच्या हंगामातच सहचराबरोबर राहतो. त्यामुळे बहुदा तो दुसरा पक्षी त्याचा सहचर नसावा.

एकाच झाडावर बसलेल्या दोन गरुडांविषयी अत्यंत सुंदर श्लोक मुंडकोपनिषदात आहे. एक गरुड खालच्या फांदीवर बसला आहे जो सतत काहीतरी खात आहे. जे चांगले लागले त्याबद्धल सुखी आणि जे वाईट लागले त्याविषयी दुःखी होत आहे. वर बसलेला गरुड मात्र शांत आहे. तो सुखदुःखाच्या पलीकडे गेला आहे. खाली बसलेल्या गरुडाचे जेव्हा वरच्या गरुडाकडे लक्ष जाते तेव्हा त्याला कळून चुकते की आपण मोहमायेच्या अधीन होऊन सुखदुःखं अनुभवत आहोत. जेव्हा तो हे जाणतो तेव्हा तो वरच्या गरुडाशी एकरूप होतो.  


'आभाळवाटांचे प्रवासी' या किरण पुरंदरे यांच्या अतिशय सुंदर पुस्तकात त्यांनी निरनिराळ्या गरुडांबाबत आपल्या अत्यंत खुमासदार शैलीत लिहिले आहे, तिथेच मला या गरुडाचे मराठी नाव 'व्याध' (शिकारी) आहे असे कळले. त्यात ते म्हणतात 'हा सडपातळ, आणि अस्सल जंगली गरुड आहे. डोक्यावरच्या तुऱ्यात काही लांबसडक पिसे असतात, सर्वसाधारणपणे त्याचा  रंग पाठीकडून तपकिरी आणि पोटाकडून पांढरा असतो. घश्यावरून काळे ओघळ यावेत तशा काळ्या लांब रेघा, आणि छातीवर चॉकलेटी रंगाच्या जाड रेषा, व्याधाचे पाय पंजापर्यंत पिसांनी झाकलेले असतात. पायाला पुढे तीन आणि मागे एक बोट असतं, इतर बोटांच्या मानानं पाहिलं बोट आणि मागील बोट ताकदवान असतं. व्याध गरुडाची मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते' असे त्यांनी लिहिले आहे. मला त्या दोन पक्षांतील लहान मोठा फरक करता आला नाही. त्यामुळे तो दुसरा पक्षी मादी होती का आणखी एक व्याध गरुडच ते काही कळलं नाही. त्यांनी या गरुडाच्या शिकारीचे काही चित्तथरारक प्रसंग या पुस्तकात दिले आहेत. पण मला आपला तो शांत, स्तब्ध, एकांतप्रिय बसलेला गरुडच जास्त बघायला आवडेल/आवडला. निसर्ग कितीही PRACTICAL आणि निर्विकार असला तरी मी नाहीये. त्यामुळे शिकार-बिकार माझ्याच्याने तरी बघवणार नाही. तरीपण त्यांनी केलेले वर्णन वाचनीय आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत लिहिलं आहे 'व्याध शांत बसून राहतो, लक्ष ठेऊन असतो आणि भक्ष्य दिसताच भयंकर वेगानं अचानक हल्ला करतो, पंखानी फाडफाड मारून भक्षाला गोंधळात टाकतो. पंखांच्या, शेपटीच्या रचनेमुळे झाडाझुडांतून वेगाने उडू शकतो. गरज वाटेल तेव्हा झटकन दिशाही बदलू शकतो. सखोल शास्त्रीय अभ्यासातील काही निष्कर्षांवरून त्याच्या भक्ष्ययादीत पक्षी आहेत: लालबुड्या बुलबुल,बुरखा हळद्या, साळुंकी, कीर पोपट, मोर, रानकोंबडा, तित्तीर, लावरी, हरोळी, पाळीव कोंबडी , सरडे, घोरपड, कास्य सर्प, खार, ससा, पाळीव मांजर.  पण मला यातले बरेचसे पक्षी तो जवळच्या झाडावर असताना आसपास दिसले होते. त्याने कुणाला धरले नाही. बहुदा आजूबाजूला दोन-पाच घरे आणि माणसांची वस्ती असल्याने असे असेल का? पण मी त्याला जवळपास आठेक दिवस तरी पाहिलं, पण फक्त शांत बसलेलं. कदाचित जंगलात शिकार करून खाऊन-पिऊन आराम करायला तो इथे येत असेल. किंवा इथे माणसांच्या भीतीनेही तो शिकार करत नसावा. 

किरण पुरंदरेंच्या लेखानुसार व्याध मनुष्यवस्तीजवळ घरटी करत नाही. पाच ते दहा मीटर उंचीवर घरटी  करतो, आणि  अशी जागा निवडतो जिथून बराच आसमंत नजरेखालून घालता येईल, मोठ्या काटक्यांचं हे घरटं असतं, आणि बरंच मोठं असतं, मादी एकच अंडे घालते. त्यांनी अशी अनेक घरटी बघितली आहेत. त्यांनी तर म्हटलं आहे की हा गरुड बघितल्यानंतर आता पक्षी बघावा तर गरुडच असं त्यांना वाटलं. ते खरंच आहे. इतका रुबाबदार हा व्याध गरुड. 

काहीतरी शोधत असताना, एका दोन वर्षांपूर्वीच्या(२६-१०-२०१४ तारखेच्या फोटोत) गावच्या फोटोत मला एक फोटो सापडला ज्यात दिसले पेंडराचे तेच झाड आणि त्यावर बसलेली धूसर, पण ओळखीची तीच उंचाडी, काळसर आकृती. म्हणजे हा व्याध गरुड तेव्हापासून तिथे होता तर. (तो किंवा त्याचा कुणी जातभाई) याचं आयुष्य किती असतं ते शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलं नाही. एका ठिकाणी वाचलं की दहा वर्षांपर्यंत जगतो, पण नक्की माहित नाही. हा गरुड तोच असला दोन वर्षांपूर्वीचा तर त्याची दृष्टी कालातीत आहे असेच म्हणावे लागेल. तेव्हापासून या गरुडाने आपल्या दृष्टीक्षेपात काळ बंद केला आहे आणि मलाही तो ओळखत असेल. म्हणजे हा जर तोच असला तर मी त्याला जरी आता ओळखले, तरी तो मला दोन वर्षांपासून ओळखून आहे!

हाच तो दोन वर्षांपूर्वीचा फोटो

Tuesday, 4 October 2016

अंबरनाथचे शिवमंदिर

अंबरनाथचे शिवमंदिर

ठाणे जिल्ह्यातील, अंबरनाथ येथे दहाव्या शतकातील शिवमंदिर आहे. मंदिराच्या उत्तर द्वाराकडे असलेल्या शिलालेखावरील नोंदीप्रमाणे हे मंदिर १०६० मध्ये शिलाहार राजवटीतील एक मुख्य (अधिकारी) मम्मूनी किंवा ममवनी याने बांधले आहे. 'वालधुनी' नदीच्या किनाऱ्यालगत हे मंदिर बांधले आहे(पूर्वी ही मोठी नदी असावी). आता बघतले तर मंदिराच्या बाजूने एक मळकट पाण्याचा ओढा वाहताना दिसतो. या मंदिराच्या चहूबाजूना काही अंतरावर संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार-तोरणं(gateways) होती. पण आता ती अस्तित्वात नाहीत फक्त त्यांचे काही तुटके-फुटके अवशेष आजूबाजूला सापडतात.  

मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याची रचना मंडप आणि गर्भगृह अशी आहे. मंडपाला तीन बाजूने प्रवेशद्वारं आहेत. प्रत्येक प्रवेशद्वाराला स्वतःचा पोर्च आहे. चार स्वतंत्रपणे उभे असलेले स्तंभ मंडपाचे छत डोक्यावरती घेऊन आहेत आणि तीन पोर्चांमधे असलेले एकूण सहा स्तंभ एवढेच मंदिराला आधार देत उभे आहेत. या स्तंभांवरही मूर्ती कोरलेल्या आहेत. अत्यंत प्राचीन असल्याने मंदिराची पडझडही बरीच झाली आहे आणि बहुदा अनेक विरोधक आक्रमणंही या मंदिराने सोसली असावीत. मंदिराची रचना आत्तापेक्षा बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे आणि आक्रमणांमधील तोडफोडीमुळे नंतरच्या काळात मंदिरात अनेक बदलही झाले असावेत. नंतरच्या हिंदू राजवटींनी मंदिराची डागडुजी काही प्रमाणात केली असल्याचे त्याच्या रचनेवरून दिसते. 

या मंदिरच्या स्थापत्यशैलीला भूमिज शैली म्हणतात. 'भूमिज' मंदिरे पृथ्वीच्या कवचातून वर येऊन वाढलेली वाटतात. या मंदिरांचा चेहरामोहरा डोंगरांच्या रचनेच्या जवळ जाणारा असतो. ही शैली द्रविड आणि नागर शैलीचा सुवर्णमध्य म्हणता येईल. हिला 'दक्खनी शैली' असेही म्हणतात. छोटी छोटी शिखरं आणि त्यांना तोलून धरणारे ( वेगवेगळ्या शिल्पपट्टया आणि शिल्पांच्या चोकटी एकमेकांवर रचून बनलेले ) उभे स्तंभ. हे स्तंभ एकमेकाला जोडलेले. या अश्या एकमेकाला जोडलेल्या अनेक स्तंभांतूनच एक एक भिंतीसारखी रचना उभी राहते. ही अशी रचना हेच भूमिज शैलीचे वैशिष्ट्य. या बाह्य भागांवर अतिशय सुंदर शिल्पकाम आहे. 


मंदिराची रचना : उभे शिखरांपर्यंत जाणारे स्तंभ आणि आढव्या शिल्पपट्ट्या

जशी उभ्या स्तंभांची छोट्या  शिखरांपर्यंत गेलेली रचना तशीच आढवी शिल्पपट्ट्यांची रचना. असे हे उभ्या आढव्या पट्ट्यांचे 'मॅट्रिक्स'. शिल्पंपट्ट्या एकावर एक रचलेल्या. वेगवेगळ्या शिल्पांच्या. या मंदिराला, जमिनीलगतच्या भक्कम पाया रोवणाऱ्या दोन पट्ट्या आहेत. त्यांच्यावर शिल्पं नाहीत. त्यावरची पट्टी हि 'कीर्तिमुख' या राक्षसाच्या तोंडांची पट्टी आहे. त्यावरची पट्टी गजमुखांची आहे. त्यावरील पट्टी वेली-फुलांच्या अलंकारिक आकारांची बनलेली आहे. त्यावरील पट्टी हि मोठ्या आकाराची असून त्यात अनेक स्थानिक दृश्यं, नृत्य-वादनाचे प्रसंग, मैथुन शिल्पं कोरलेली आहेत. हि पट्टी अतिशय सौन्दर्यपूर्ण आहे, परंतु कालानुरूप तिची खूपच पडझड झाली आहे. याच्या वरही काही शिल्पविरहित पट्ट्या असून त्याच्यावर मुख्य अशा विशिष्ट देवतांच्या शिल्पांच्या चौकटी आहेत. या चौकटींच्या वर छपरांसारख्या वाटणाऱ्या पट्ट्या असून वर वर जाताना त्या निमुळत्या होत जाऊन शेवटी त्या शिखरांपर्यंत साथसंगत करतात. 

बाह्य भागावरील अनेक शिल्पे उत्कृष्ट आहेत. त्यातली काही:
साधू/संन्यासी

सुरसुंदरी:   सुरसुंदरी म्हणजेच स्वर्गीय अप्सरांसदृश युवती. शिल्पशास्त्रांच्या प्राचीन ग्रंथातील नियमांनुसार मंदिरांवर सुरसुंदरीची शिल्पे असणे गरजेचे आहे. या सुरसुंदरी विपुलता, सौख्य, सुपीकता, सौन्दर्य, समृद्धी यांचे प्रतीक मानल्या गेल्या आहेत. त्यांच्याविना बांधलेले मंदिर ते मंदिर कसले अशा अर्थाचे संदर्भ या प्राचीन ग्रंथात नोंदलेले आहेत. त्यामुळेच अतिशय सौन्दर्याने, सौष्ठ्वाने परिपूर्ण सुरसुंदरींची शिल्पे प्राचीन मंदिरांवर आढळतात. खजुराहो मधेही सुरसुंदरींची विलोभनीय शिल्पे आहेत. अंबरनाथच्या मंदिरावर देखील काही अतिशय देखणी शिल्पं आहेत आणि पडझडीनेही त्यांचे सौन्दर्य जराही कमी झालेले नाही. या सुरसुंदरींची शिल्पे मुख्य चौकटींमध्ये नसून दोन स्तंभांच्या मधील कोपऱ्यात असतात, किंवा मुख्य देवतांच्या शिल्पांशेजारील भागांत असतात. सुशोभीकरण, आणि सौन्दर्यनिर्मिती हे या शिल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सुरसुंदरी

देवता: शिव मंदिर असल्याने शिवाशी निगडित देवदेवतांची शिल्पे इथे कोरली आहेत. त्रिमूर्ती, ब्रह्मा, महाकाली, नटेश्वर , विष्णू , पार्वती, चामुंडा अशा देवदेवता आहेत.
१. बहुदा ब्रह्मा २. वराही ३. ? (बहुदा नटेश्वर )

१. बहुदा विष्णू  २. गणपती ३. बहुदा पार्वती
१. ? २. चामुंडा  किंवा महाकाली ३. चामुंडा
हि अतिशय सुंदर पण भग्न देवता कोण असावी? ती अनेक हातांची आहे. शिवाची असावी. पण नक्की ओळखता येत नाही. बहुदा शिव तांडव करणारा नटेश्वर असावा का?


नृत्य - वादन 

पश्चिमेकडील प्रवेशद्वारातील पोर्चमध्ये भव्य नंदीची मूर्ती आहे. आत गेल्यावर मंडप लागतो, जिथे फोटो काढण्यास मनाई आहे. तेथील स्तंभांवर आणि छताच्या तुळयांवर कोरीवकाम केलेलं आहे, पण अपुऱ्या प्रकाशामुळे ते फारसे दृष्टीस पडत नाही. मंडप आणि गर्भगृहाच्या मधे अंतराळ नसून सरळ गर्भगृहाचे प्रवेशद्वारच लागते. हे प्रवेशद्वार सुद्धा शिल्पांनी सुशोभित आहे, मात्र इथेही बराच अंधार असल्याने ते स्पष्ट दिसत नाही. त्यातून मी जेव्हा या मंदिराला भेट दिली तो सुट्टीचा दिवस होता आणि त्यातून श्रावण महिनाही होता त्यामुळे मंदिरात खूपच वर्दळ होती. पुन्हा एकदा निवांत निर्मनुष्य दिवशी जायला हवे. गर्भगृहाच्या प्रवेशदवारातून आत पायऱ्यांनी उतरावे लागते. त्यामुळे गर्भगृह खोल विहिरीसारखे वाटते. गर्भगृह अतिशय उंच भिंतींचे असून त्यात मध्यभागी शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या वरील छप्पराला वर्तुळाकृती खुला भाग(open to sky) आहे. हा खुला भाग का असावा? मंदिरातील होमहवनाचा धूर जाण्यासाठी तो आहे असेच वाटते. पण हि रचना मी अजून कुठे बघितली नाही. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरालाही छताला असा मोठा खुला भाग आहे असे वाचले आहे. ते मंदिर अजून बघितले नाही.

मुख्य प्रवेशद्वाराजवळील नंदी
प्राचीन मंदिर म्हणून या मंदिराला खरोखरच महत्व आहे पण एकंदरीतच त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी गलिच्छ वातावरण आढळले. हे मंदिर पूजेत आहे. आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळेदेखील मंदिराच्या परिसरावर परिणाम होता असावा. पुन्हा एकदा उन्हाळ्यात या मंदिराला जरूर भेट द्यायला हवी. तरीही अतिशय सुंदर शिल्पकामासाठी हे मंदिर पुन्हा पुन्हा बघावेसे नक्कीच आहे.

Friday, 30 September 2016

जगद्व्यापी वटवृक्ष

कोकणातील, मालवण तालुक्यातील, कुसरवे या माझ्या मावशीच्या गावी घराच्या जवळच  दोन जूनी आणि भव्य अशी वडाची झाडं आहेत. दोन्ही झाडे साधारण शंभर वर्षे तरी जूनी असावीत. मावशीच्या घरातल्या दोन पिढ्यांनी तरी ती झाडं बघितलेली आहेत. एका पावसाळी संध्याकाळी मी ही झाडं बघायला गेले होते. कोकणातला पाऊस म्हणजे मुसळधार आणि काळोखी. संध्याकाळच्या वेळी नुकताच पाऊस थांबला होता आणि सर्वत्र निथळून गेलेले, काळवंडलेले, धीरगंभीर वातावरण होते. घरापासून या झाडांकडे जाणाऱ्या पायवाटेला दोन फाटे फुटतात. एक जातो तळीच्या वडाकडे. आणि दुसरा फाटा एका पाणंदीतुन 'वडाची गाळी' इथल्या वडाकडे जातो.

तळीचा वड
इतक्या वर्षात ही झाडं मी कधीच पहिली नव्हती, ना कुणी मला त्यांच्याविषयी सांगितले होते. पण कुठूनतरी विषय निघाला आणि त्यावेळी आईने मला या झाडांविषयी सांगितले , म्हणून यावेळी त्यांच्या घरी गेले असता ती झाडे बघायचीच असे ठरवले. पावसाच्या चिखलात जाऊन मला झाडं दाखवायला आई थोडीशी नाखुषच होती पण शेवटी ती तयार झाली. आणि कुणीही न बोलावता, तयार होता मावशीच्या घरचा 'टाग्या' कुत्रा. आम्ही त्या पायवाटेला लागतातच तो आमच्यापुढे धावू लागला. या कुत्र्याचे पाय एवढे लांब आहेत की 'टाग्या' ऐवजी त्याचे नाव 'टांग्या' च असायला हवे होते. पहिल्या फाट्याने आम्ही तळीच्या वडाकडे गेलो. इथे पूर्वी एक पाण्याचे मोठे डबके होते, तिलाच तळी म्हणत. आईच्या लहानपणापासून ही तळी आणि बाजूचा हा वड तिने पहिला आहे. माझी मावशी सर्वात मोठी, तिचे लग्न झाले तेव्हा आई आठ-दहा वर्षांची असेल, त्यामुळे ती इथे तिच्या लहानपणी येत असे. त्या काळी या तळीवरूनच पाणी भरून घरी न्यावे लागे. आता या तळीवर विहीर बांधलेली आहे. हि विहीर साधारण तीस-पस्तीस फूट व्यासाची असेल. आता पावसाच्या पाण्याने ती तुडुंब भरलेली होती. तिच्यावरच झाडाच्या फांद्या लोंबकळत होत्या. या तळीच्या बाजूला तेवढ्याच किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त विस्ताराने हे वडाचे झाड पसरलेले आहे. वडाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बुंधा मोठा नसला तरी पारंब्या पुन्हा जमिनीत घुसून त्यापासून झाडाचा विस्तार होतच राहतो. जर जागा मिळाली तर आसपासचा परिसर व्यापून ते कित्येक किलोमीटर विस्तारू शकते.
पूर्वीची 'तळी' आणि आताची 'विहीर'

कलकत्ता येथील ग्रेट बनियान ट्री

अशी अवाढव्य विस्ताराची वडाची झाडे भारतात अस्तित्वात आहेत. त्यापैकी एक आहे कलकत्त्याच्या जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मधील वडाचे झाड, हे झाड अडीजशे वर्षांहून अधिक जुने आहे. हे झाड जगातील सर्वात मोठे (विस्तार असलेले) झाड आहे. याचा विस्तार एवढा मोठा आहे की पाच हजार माणसं त्याच्या छायेखाली विश्रांती घेऊ शकतात. एकदा एक ब्रिटिश लेखक Brian Aldiss फेरीबोटने हुगळी नदीतून बोटॅनिकल गार्डन बघायला गेले होते, तेव्हा हे प्रचंड विस्ताराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले. थॉमस हक्सले या ब्रिटिश बायोलॉजिस्टने या झाडाबद्धल एका लेखात लिहून ठेवले आहे की हे झाड जग व्यापू शकतं. Brian Aldiss यांनीही हा लेख वाचला होता. या वटवृक्षाने आणि त्याच्या जग व्यापून टाकण्याविषयीच्या कल्पनेने ते एवढे प्रेरित झाले की त्यातून त्यांनी Hothouse नावाची वैज्ञानिक कादंबरी लिहिली.

तळीचा वड
तळीजवळचे हे झाड सुद्धा आपल्या फांद्यांचा अमाप विस्तार घेऊन उभे आहे, बहुतेक जग व्यापण्याची इच्छा घेऊनच. संस्कृतमध्ये वडाच्या झाडाला 'बहुपदा' म्हणतात. वडाच्या झाडाला भ्रमंतीत रस असावा. म्हणूनच आपले पारंब्यांसारखे पाय पुढे पुढे रोवून ते पुढे सरकत असते. थॉमस हक्सले यांची त्याची जग व्यापण्याची कल्पना खरंच विलक्षण आहे. जर त्याला असेच अडथळ्याविना पुढे पुढे जायला दिले तर हे झाड जग फिरायला निघाल्याप्रमाणे पावले पुढे टाकीत चालेल बहुतेक. तळीजवळचे हे झाड वर्षनुवर्षे धीरगंभीरपणे याच प्रतिक्षेत असावे. माणसाने उभारलेली शिल्पं, मंदिरे आजवर अनेक बघितली, पण हे निसर्गाने उभारलेले अवाढव्य जिवंत शिल्पच. त्यापुढे आपण खुजे होऊन उभे राहतो. पावसाळ्याच्या पाण्याने अधिकच गडद झालेल्या काळ्या फांद्या. काळोख पडत असल्याने या झाडाजवळ अधिक थांबून त्याला निवांतपणे  निरखता आले नाही. वड, पिंपळ ही भारतीय परंपरेतील धार्मिकतेशी जोडलेली झाडं. काहीशी गूढाने भारलेलीही. अश्या या भव्य झाडांची स्थानं लोकांच्या श्रद्धेची स्थानं आपोआप बनत जातात. हा तळीचा वडही त्याला अपवाद नाही.

'वडाची गाळी' इथला वड
या झाडाचा निरोप घेऊन आम्ही दुसऱ्या 'वडाच्या गाळी' कडे निघालो. 'गाळी/गाळवी' किंवा 'गाळू' म्हणजे शेत, या वडाच्या समोर पुढे दूरवर पसरलेले शेत आहे. म्हणूनच या जागेला 'वडाची गाळी' म्हणतात. तिथे जाताना मध्ये एक छोटीशी पाणंद लागते. या पाणंदीच्या रस्त्याला झाडीझुडपात पेंडकुळ, नांगरखडी यांची तांबडीलाल फुलं डोकावत होती. मधेच काही जंगली सातभाई पक्षी झाडीत कलकलाट करत होते. शेवटी आम्ही वडाच्या झाडापाशी आलो. हे वडाचे झाड मात्र दोन्ही बाजूने बघता आले. तळीचा वड फक्त एकाच बाजूने बघता येतो. कारण दुसऱ्या बाजूला दाट शेत, आणि चिखल होता. त्यामानाने 'वडाच्या गाळी' चा वड आणि त्याच्या आसपासचा परिसर, दोन्ही बाजूने झाडी किंवा शेत नसल्याने चांगला नजरेखालून घालता येतो. पण माणसाचे धार्मिक आक्रमण या झाडालाही चुकलेले नाही. या वडाच्या एका बाजूला तुळशी वृंदावन बांधलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यवस्थित बांधून काढलेली  छोटेशी पाण्याची डोणी आहे. या डोणीत गणपती विसर्जन करतात. पण एक खरंच चांगलं आहे की या झाडांना माणसांच्या धार्मिक भावभावनांत स्थान मिळाल्याने ही झाडे नष्ट होण्यापासून तरी वाचली आहेत.

'वडाची गाळी' येथील तुळशी वृंदावन 
संध्याकाळच्या वेळी, आणि पावसाच्या वातावरणाने या दोन्ही झाडाभोवतालचा अवकाश खूपच गहन वाटत होता. पारंब्यांचे  जडजंजाळ घेऊन बसलेले आहेत म्हणून या वृक्षांना  ध्यानस्थ बसलेले दाढीवाले ऋषी म्हणावे की त्यांच्या पारंब्या रोवून चाललेल्या फिरस्तीमुळे त्यांना भ्रमण करणारे संन्यासी म्हणावे कोण जाणे. त्यांच्या विस्तीर्ण पारंब्यामध्ये शांतता गोठून राहिल्यासारखी वाटत होती. दुर्दैवाने पावसामूळे एकही पक्षी मात्र मला या झाडांवर दिसला नाही. खरे तर वडाची भव्य झाडे म्हणजे पक्षांचे हक्काचे घर. पुन्हा केव्हातरी चकचकीत सकाळी, या झाडांचे काळोखी, शांत रूप पालटले दिसेल, तेव्हा अनेक पक्षी यांच्यावर बागडतही असतील.

कलकत्त्याचा 'ग्रेट बनियान ट्री' अजून बघितला नाही. पण तूर्तास या भव्य, धीरगंभीर झाडातला सर्वव्यापी अवकाश मात्र अनुभवता आला. एव्हाना खूपच अंधार झाला होता. त्यामुळे 'टाग्या' च्या मागून आम्ही घरची वाट धरली.  

Wednesday, 28 September 2016

पेंडकुळ, नांगरखडी आणि पेवा

गणपतीनिमित्त  कोकणात गेले असताना अनेक वनस्पती वारंवार समोर येत राहिल्या म्हणून त्यांच्यासंबंधी लिहावेसे वाटले. कोकणामध्ये  पावसाळ्यात जिकडेतिकडे विपुल प्रमाणात दिसणाऱ्या वनस्पती म्हणजे  हरणं(पिवळ्या रंगाची नाजूक फुले असलेली वनस्पती), तेरडा, पेवा, नांगरखडी. त्याचबरोबर पेंडकुळ हे तर बारमाही फुलणारे कोकणातले झुडूप. 
त्यापैकी सर्वात आधी पेंडकुळ, नांगरखडी आणि पेवा यांच्याविषयी.

पेंडकुळ

कोकणात ज्याला पेंडकुळ म्हणतात ते आहे  Ixora coccinea. मराठी नाव आहे बकोरा, ही वनस्पती shrub (झुडूप) या प्रकारात मोडते.अगदी लहानखुरे. कोकणात रानावनात इतर झाडझाडोऱ्यात छोटे झुडूप बनून ते वाढते. लांबट गर्द हिरवी चमकदार पाने असतात. या छोट्याश्या  झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चांदणीसारखी नाजूक तांबडी फुले, आणि चमकदार लालभडक फळे. या लाल फुलांफळांमुळेच ते गच्च झाडीत देखील ते चटकन ओळखता येते. लालभडक रंगामुळेच याला इंग्रजीत 'फ्लेम ऑफ द वूड्स', 'जंगल फ्लेम' म्हणत असावेत. इंग्रजीत 'जंगल जिरॅनियम' असेही याचे नाव आहे. या झाडाची पाने पेरावर समोरासमोर दोन असून  त्यांना सामायिक उपपर्णे असतात. झाडाला बारमहा फुले येतात.
पेंडकुळाचे फुल अतिशय सुंदर. फांदीच्या टोकाशी फुलांचा गुच्छ असतो. लांबसडक दांडीला चार निमुळत्या टोकाच्या नाजूक पाकळ्या असतात. पेंडकुळाचे पाच पाकळ्यांचे फुल सुद्धा असते म्हणे पण ते अतिशय दुर्मिळ असते अशी  गावातल्या लोकांची समजूत आहे. असे फुल मिळणे अत्यंत भाग्याचे समजले जाते. बहुतेक या या फुलविषयीच्या मिथचा प्रकार आहे. लहानपणी, मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर आम्ही कधीकधी शेजारच्या गुरे चारणाऱ्या मुलांबरोबर फिरायला जाऊ तेव्हा ती मुले या फुलांचे गुच्छ दिसले की हमखास पाच पाकळ्यावाले फुल शोधत, आणि आम्हालाही शोधायला लावत.

पेंडकुळाचे फळ (फोटो सौजन्य :विकिपीडिया)
फळे देखील दिसायला अतिशय सुंदर. खायला करवंदांइतकी मजेदार, रसाळ नसली तरी  खाण्यालायक असतात. ही फळे कुठले वन्य प्राणी, पक्षी खातात त्याचे मात्र निरीक्षण करता आले नाही. 

कोकणात फक्त लाल रंगाच्या फुलांचे झाड आढळते. आणि विशेषतः रानझाड म्हणूनच ते ओळखले जाते, पण याच्या पानांच्या, फुलांच्या आणि फळाच्या सौन्दर्यामुळे ते शहराल्या उद्यानात, (आणि  परदेशातही) बागेत शोभेचे झाड म्हणून लावतात. या बागेतील जातींच्या फुलांचा रंग पिवळा, नारिंगी, गुलाबी देखील असतो. कोकणात मात्र ते रानातच उपेक्षितपणे वाढते. गावाकडे पेंडकुळाचे मूळ औषधात वापरतात. मला आठवते , लहान असताना आमच्या या गावातील घराशेजारी दाजी तोंडवळकर म्हणून एक वृद्ध गृहस्थ राहत होते, त्यांना वाडीतील सगळे 'डाक्टर' म्हणत. खरोखरीच त्यांना जंगलातील औषधी वनस्पतींचे सूक्ष्म ज्ञान होते. ते या पेंडकुळाची, सातविणीची, कुड्याची पाळंमूळं शोधून आणीत असत. माणसांच्या साध्या आजारांबरोबरच गाईगुरांच्या आजारावर देखील उपकारक ठरणाऱ्या वनस्पतींची त्यांना माहिती होती. त्यांच्याकडून ती माहिती कुणीच घेऊन जतन केली नाही याची आता खंत वाटते. आज ते असते तर या  पेंडकुळाच्या औषधी गुणांबद्धल त्यांनी नक्कीच सांगितले असते. 

पेंडकुळ बहुदा आशिया खंडात, भारत, श्रीलंका आणि प्रशांत महासागरातील Pohnpei, Kosrae या काही बेटांवर आढळते. इथल्या लोकांचे या वनस्पतीविषयी काही समज आहेत. Pohnpei मध्ये या वनस्पतीच्या काठ्या पारंपरिक  नृत्यात वापरल्या जातात. Kosrae मध्ये या वनस्पतीवर  एखादा  पक्षी बसला असेल तर त्याची शिकार करणे निषध्द मानतात. 
नांगरखडी
'नांगरखडी' ही पावसाळ्यामध्ये रानातील  झाडाझुडपांवर वाढणारी वेल.  पोपटी रंगाची पाने आणि  जर्द पिवळ्या,  नारिंगी आणि लाल रंगात विभागलेली फुले. फुलांच्या पाकळ्या झळाळत्या ज्वाळांच्या आकाराच्या. त्यामुळे ही फुले वैचित्र्यपूर्ण असूनही अतिशय आकर्षक दिसतात. हिच्या सौन्दर्यावर भाळून काही लोकांनी,विशेषतः परदेशात आपल्या बागबगिच्यात हिला स्थान दिले आहे. कोकणात हिला 'नांगरखडी' म्हणतात. का हे सांगणे  तसे कठीणच आहे. बहुदा नौकेच्या नांगरासारखी तिची फुले असल्याने तिला 'नांगरखडी' हे नाव पडले असावे. तिची इतर भारतीय नावं देखील मजेशीर आहेत. मराठीत तिला 'कळलावी' असे म्हणतात. यामागचे कारण तिच्यातला औषधी गुण हे आहे. हिच्या कांद्यात गर्भाशयास वेणा  आणणारे द्रव्य असते त्यामुळे तिला 'कळलावी' असे नाव मिळाले आहे. हिंदीमध्ये तिला 'करीहारी' म्हणतात. 
या वेलीचा कांदा भुईत शिल्लक राहतो. पावसाळ्यातच फक्त त्याला खोडे, पालवी , फुले येतात. नंतर हा विस्तार झडून जातो. पुन्हा पावसाळ्यात सगळा विस्तार उत्पन्न होतो. सहा पाकळ्यांचे फुल आपले तोंड खाली वळवून फुलते. या सुंदर फुलावरून आणि खाली तोंड करून राहण्यावरून या वेलीला 'विलोमकल्लारी' असेही नाव पडले आहे. 'कल्लार' म्हणजे तांबडे कमळ आणि 'विलोम' म्हणजे उलटे. फुलाची टोके तांबडी- नारिंगी, मध्ये पिवळी आणि तळाला हिरवी. असे झळाळते आकर्षक रंग या फुलाला लाभले आहेत. हि फुले चार दिवस टिकतात. 
परदेशात हिची लागवड बागेत करतात, हिला Gloriosa Lily, Fire lily, Flame lily अशी इंग्रजी नावे आहेत. हिच्यावर भारतात सत्तरच्या दशकात पोस्टाचे तिकीटही निघाले होते. 


'पेव' किंवा कोकणातला 'पेवा' हे आणखी एक पावसाळ्यात सर्वत्र भरघोस उगवणारे छोटेसे झाड. शास्त्रीय नाव 'Cheilocostus speciosus' आणि इंग्रजीत त्याला 'Crepe Ginger' असे म्हणतात. पण आल्याच्या झाडांपेक्षा याच्या पानांची रचना वेगळी असते.

पेवा
भारत आणि दक्षिण आशिया खंडातील  देशात हे झाड आढळते. कोकणात त्याच्या विपुलतेमूळे त्याचे सौन्दर्यदेखील बरेचसे दुर्लक्षिले गेले आहे. विशेषतः पावसाच्या पाण्याने निथळून गेल्यानंतर जेव्हा या झाडाच्या लांबलचक पानांवर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्याचे चमकणारे सौन्दर्य विलोभनीय असते. पाने जाडसर आणि लांब असतात, एकेकट्याच फांद्या असतात आणि फांद्यांचा रंग लाल-तपकिरी असतो. फांद्याच्या टोकाला गडद-लाल-तपकिरी  अश्या एकमेकांना जोडलेल्या अनेक देठातून पांढऱ्या तलम रंगाची मोठी फुले येतात. ही फुलेही अतिशय सुंदर दिसतात. छोटा शिंजीर (Crimson Backed Sunbird) या फुलांच्या  देठातील मध खाण्यासाठी येतो. इतरही प्रकारचे सनबर्ड्स या झाडाच्या फुलांवर आपली हजेरी लावतात. आमच्या घरच्या पाठीमागेच भरपूर पेवा उगवल्याने मला खिडकीतूनच अनेक पक्ष्यांचे या फुलावर येणे बघता आले. हे सूर्यपक्षी फुलांच्या आत चोच खुपसताना दिसले नाहीत तर ते लाल-तपकिरी देठातच आपली सुईसारखी चोच खुपसून मध चाखतात. हे छोटेसे झाड देखील औषधी असून त्याचा ताप, पोटातील कृमी, अस्थमा, ब्रॉन्कायटिस इ. आजारांच्या औषधात प्राचीन आयुर्वेदात वापर केला गेला आहे. 

Tuesday, 27 September 2016

निसर्गोत्सव

'निसर्गोत्सव' हे दुर्गा भागवतांचे अतिशय छोटे आणि छान पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक ९६ सालातील आहे. यातील काही लेख नंतर 'भावमुद्रा' या पुस्तकात समाविष्ट केले गेलेले आहेत. दुर्गा भागवत म्हणजे अशा लेखिका ज्यांच्या लेखणीतून सरस्वतीने साक्षात स्वतःच शाई बनून शब्दरुपी पाझरावे. इतकं सहज, सोपं आणि सुंदर ललित लेखन मराठीत क्वचितच कुठे आढळेल. म्हणून त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे शब्दानंद अनुभवणं. हे पुस्तकही तसंच आहे. याच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात कि 'या पुस्तकाचे नाव मी दिलेले नाही. माझ्या संपादकांनीच ते मुक्रर केले आहे. संपादक माझे वाचक आहेत आणि साहित्य निर्मितीत वाचकाचाही सहभाग असतो असे मानणारी मी आहे.'

दुर्गा भागवतांच्या बहुतेक लेखांत निसर्ग असतोच, किंबहुना निसर्गाला साथीला घेऊनच त्या लेखन करतात. प्रत्येक गोष्ट इतक्या रसिकतेने अनुभवणे आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणचे संदर्भ देऊन वेगवेगळ्या गोष्टींशी त्याचा संबंध दाखवणे ही  त्यांच्या लेखनाची खासियत आहे. त्यामुळे त्यांचे लेखन ललित असूनही अनेक स्तरांना स्पर्शून जाते. त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन तर समृद्ध आहेच पण त्या स्वतःच्या अनुभवांविषयी देखील तितक्याच समर्थपणे लिहितात. 'वाळूतील पाउले' या लेखाबद्धल आपला सानेगुरुजींबद्धलचा अनुभव त्या प्रस्तावनेत लिहितात. साने गुरुजींनी त्यांना त्यांच्या 'साधना' अंकासाठी लेख लिहिण्यावर वारंवार सुचवले होते. पण तसा लेख त्या काही लिहू शकल्या नव्हत्या. मग एके दिवशी मात्र त्यांना असा भास होऊ लागला की साने गुरुजी लेखासाठी धरणे धरून बसले आहेत आणि त्यामुळे  त्या लिहू लागल्या. लेख रात्रंदिवस बसून लिहीत होत्या. लेख साने गुरुजींना पाठवूनच त्या स्वस्थ बसल्या. गुरुजींचे लेख  पोचल्याचे पत्रही आले. त्यात गुरुजींनी 'वाळूतील पाउले' ऐवजी 'काळाची पाउले' असे लिहिले होते. ते पत्र ज्या दिवशी दुर्गाबाईंकडे पोचले त्याच्या  दुसऱ्या दिवशीच साने गुरुजींनी आत्महत्या केली. असा विलक्षण योगायोग असलेला अनुभव त्या सांगतात. तसेच आणखी एका 'वात्सल्याचा अविष्कार' या लेखाबद्धलही त्या लिहितात. हा लेख प्रस्तुत पुस्तकात नाही. स्वतःचे पिल्लू गमावलेले एक माकडाचे जोडपे पोर मिळवण्यासाठी (मग ते कुठल्याही प्राण्याचे असो) कसे धडपड करते, या स्वतः बघितलेल्या अनुभवावर त्यांनी हा लेख लिहिला आहे. लेखातले माकडाचे जोडपे मांजराचे पिल्लू घेऊन त्याला वाढवू लागले. ते पिल्लूही जेव्हा मरून गेले तेव्हा दुर्गाबाईंच्या घरातीलच त्यांच्या आत्याची तान्ही मुलगी पळवण्याचाही त्या जोडप्याचा बेत होता. पण घरातल्या खंड्या कुत्र्यामुळे तो बेत सफल झाला नाही. 'श्रावणातल्या दुपारी' या लेखाविषयी त्या लिहितात की अळंबी(भूछत्र) त्यांनी लेख लिहिताना खाल्ली नव्हती, पण लेख जेव्हा या पुस्तकातून प्रकाशित होत आहे तेव्हा मात्र त्यांनी अळंबीची चव चाखली होती. ज्या काश्मीरच्या हॉटेलमध्ये त्यांनी अळंबीचा आस्वाद घेतला त्याबद्धल त्या आपला अनुभव सांगतात. 

शेवटी त्या म्हणतात 'इतक्या वर्षांपूर्वीचे हे लेख आहेत. त्यात निसर्गाला धरून  येणाऱ्या सांस्कृतिक जीवनाचेही दर्शन आहे. निसर्ग म्हणजे प्रकृती. जे असते ते. किंवा मूळ स्वरूप आणि संस्कृती म्हणजे उपयोगाच्या दृष्टीने घडवलेली कर्मसृष्टी. त्यामुळे हे लेख वाचल्यावर संपादकांनी केलेली निवड मला स्वीकारार्ह वाटते.'

'वाळूतील पाउले' या लेखात संध्याकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर भेटलेल्या तांदूळमणी वेचणाऱ्या एका गरीब लहान मुलीवर त्या लिहितात. तिच्या विषयी, तांदुळमण्याविषयी लिहितानाही सभोवतालचा निसर्ग त्यांच्या नजरेतून सुटत नाही. थंडीच्या मोसमातील संध्याकाळच्या वेळचा समुद्रकिनारा त्यांना आल्हाददायक वाटत नाही. त्या लिहितात 'संध्याकाळच्या वेळी विशेषतः कृष्णपक्षात पाण्याचा शेजार नेहमीच भयाण वाटतो, मग आता तर क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भरलेला समुद्र पातळ काळोखातून जसा काही हिसकाळून निघत होता. लाटांचा तोच आवाज रात्रीच्या हुंकाराप्रमाणे वाटत होता. सारी पंचमहाभूते जणू काही सृष्टीपासून अलग होऊन दूर दूर आपल्या स्वतःच्या प्रेरणेने वावरत होती. स्वतःची भाषा बोलत होती. मानवाविरुद्ध कट करत होती. नेहमीच्या परिचयाचे ते स्थळ, पण किती वेगळे, अनोळखी वाटत होते.' निसर्गाच्या या अवस्थेत त्यांना खूप उदास वाटतं त्यातूनच त्या वाळू तुडवत चालल्या होत्या. चालत चालत त्या अश्या ठिकाणी आल्या जिथे मुलं खेळत होती. तिथे शंख, शिंपले आणि तांदुळमण्यांची पखरण पडली होती. तांदूळमणी म्हणजे नक्की काय हे मला माहित नाही. कदाचित ते मी बघितले आहेत पण यांनाच तांदुळमणी म्हणतात हे मला माहित नाही. या तांदुळमण्यांविषयी त्या लिहितात 'लहानपणी कितीतरी तास तांदुळमणी वेचण्यात आम्ही घालवत असू, बाहुलीचे दागिने करायला तांदुळमण्यांसारखे मणी नाहीत. किती नाजूक, किती पांढरे!  वाळूत बसले की नकळत माझे हात तांदुळमणी टिपू लागतात आणि आजूबाजूचा विसर पडतो.' तिथे वाळूत बसून लहान मूल होऊन त्या तांदुळमणी वेचू लागल्या, तेव्हा त्यांच्याजवळ एक सावळी, किडकिडीत, आठनऊ वर्षांची मुलगी येऊन त्यांच्याशी जुनी ओळख असल्यासारखी बोलू लागली. आपली कहाणी त्यांना सांगू लागली. लहानपणी आईवडिलांचं छत्र हरवल्याने तिच्या बोलण्यात प्रौढपणाची झाक होती. चुलत्यांच्या घरी त्यांचा मुलगा सांभाळत ती राहत होती. शाळा नाही. अपुरं अन्न. गाल बसलेले. ओठ सुकलेले. वेणीफणी कित्येक दिवसात न झालेल्या अश्या त्या मुलीचे डोळे मात्र चमकदार होते. खूप दुःखे पचवून समंजस झालेले होते. तांदुळमण्यांचीच काय ती दौलत तिच्यापाशी होती. ती तिने लेखिकेला देऊ केली. तिने आपली गोष्ट लेखिकेला सांगितली. तिला आणि त्या छोट्या मुलाला पुरीभाजी, गंडेरी , पेपरमिंट असं बरंच काही लेखिकेने खाऊ घातलं. 'उद्या तुमच्या भाचीला पण आणा, पुष्कळ तांदुळमणी देईन तुम्हाला' असं सांगून ती मुलगी कडेवरच्या मुलाला घेऊन निघून गेली. त्यानंतर मात्र अनेकदा संध्याकाळी चौपाटीवर शोधून सुद्धा ती मुलं कधीही सापडली नाहीत. जास्त खाल्लं म्हणून त्यांचं काही बरंवाईट तर झालं असावं की लोकांकडून घेऊन खाल्लं म्हणून शिक्षा झाली असावी अशी विचित्र हुरहूर दुर्गा भागवतांच्या मनाला मात्र कायमची लागून राहिली.

'श्रावणातल्या दुपारी' हाही एक सुंदर लेख. निसर्गाचे, निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक साध्या साध्या गोष्टीचे तरल पण निर्विकार वर्णन करणारा रिपोर्ताज. या लेखातला प्रत्येक शब्द निसर्ग साक्षात समोर मांडणारा. ध्वनी, प्रकाश यांची बदलते रुपे. पावसामुळे, वाऱ्यामुळे, उन्हामुळे निसर्गात होणारे सूक्ष्म बदल. झाडे, पाखरे यांच्या हालचाली यांचे अतिशय सुंदर अवलोकन या लेखात आहे. 'केळीच्या मधल्या कोंबाची सुरळी सोडली तर बाकीची पाने वाऱ्यापावसाने फाटून फाटून त्यांच्या चिरफळ्या उडाल्या होत्या.' 'केळीच्या बुंध्याशी असणाऱ्या गुलबक्षीच्या झाडावरच्या कळ्याही हा उन्मत्त नाच आ वासून पाहू लागल्या होत्या.' माका, राजहंसाचा वाटोळ्या सॅटिनसारख्या रेशमी पानांचा आंबट पाला, ओव्याची पाने, टाकळा अश्या खेड्यातील भाज्यांवर देखील लिहिले आहे. पावसाळ्यात उड्या मारणाऱ्या बेडक्या त्यांना त्रास देऊन जीव रमवणारी उनाड पोरे यावरही लिहिले आहे. तसेच भूछत्रांवरदेखील अतिशय छान लिहिले आहे. 'मुचकुंद (कनकचंपा) या झाडाच्या उथळ ढोलीत केव्हातरी त्यांचे बी पडून ती उगवली होती. शेवंतीसारख्या पिवळ्या रंगाची.' पण त्या उनाड पोरांनी ती सुंदर भूछत्र भराभर तोडली, हुंगली, आणि शेवटी कोळपून गेलेली ती छत्रे फेकून दिली. कर्नाटकात भूछत्रांना 'अणिबे' आणि कोकणात 'अळमी' असे म्हणतात.
कावळ्यांची घरटी पावसाळ्यातच बनतात. मग त्यातल्या पिलांच्या जगण्याची धडपड पावसाळ्यात पाहायला मिळते त्याचेही अतिशय निर्विकार वर्णन केले आहे. 'सुरुपापेक्षा कुरुपाचे मरण पाहणे अति दुःसह असते' 'पावसाळ्यात विशेषतः श्रावणात, अशी दुबळी पोरे कितीतरी मरतात. लायक असेल त्यालाच जगू देण्याचा पाखरांचा कायदा मोठा कडक असतो. अश्या श्रावणातल्या दुपारी कटू प्रसंगही दिसतात, आणि मधेच आपले शंखाचे भस्मी रंगाचे घरकुल पाठीवर घेऊन, शिंगे रोखून संथ गतीने सरकत चाललेली अळूच्या पानावरची गोगलगाय देखील दिसते. तिच्या अंगातून निघणारा चिकट द्रव सरपटत गेलेल्या मार्गावर सांडलेला असतो आणि त्या तेलाच्या तवंगाप्रमाणे दिसणाऱ्या पट्ट्यात सूर्यकिरणांमुळे इंद्रधनुष्याचे रुंग उमटलेलेही दिसतात.


'ऊन-पाऊस' ही एका चिमणीच्या केलेल्या अवलोकनाची दर्दभरी कहाणी. दुर्गा भागवतांनी त्यांच्या खास मोजक्या पण चटका लावणाऱ्या शब्दात सांगावी अशी. चिमणी या पक्ष्याशी अतिशय सख्य असल्याने मला एकदा वाचल्यानंतर हा लेख पुन्हा वाचावासा वाटेना. हा लेख 'भावमुद्रा' मधेही समाविष्ट आहे, आणि तो पूर्वी वाचला होता. क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस, तसे क्षणात आनंद आणि क्षणात दुःख असे त्या चिमणीचे जगणे. कोकणातला पावसाळा असा असतो, क्षणात सोनेरी ऊन आणि क्षणात काळवंडून टाकणारे आभाळ.

'मुंबईत वसंतागम' हा लेख म्हणजे दुर्गा भागवतांची खासियत. इतकी सौन्दर्यदृष्टी त्यांना लाभली होती की मुंबईसारख्या बकाल शहरातील वसंत ऋतूचे आगमन त्या टिपतात. लेखाची सुरवातच अतिशय सुंदर आहे. त्या लिहितात, 'मुंबईतील झाडे, काय आहे त्याबद्धल लिहिण्यासारखे असे पुष्कळ जण म्हणतील. पण याच मुंबईत माझ्या डोळ्यांनी झाडांची सुंदर चित्रे बघितली आहेत.' 'ऋतूंमधला बदल म्हणजे निसर्गातील क्रांती व उत्क्रांती, एक ऋतू पालटून जेव्हा दुसरा येतो तेव्हा वरचे आकाश, खालची जमीन, अवतीभवतीचे वातावरण नित्य नवा रंग धारण करते. या नव्या रंगातच आमच्या शहरी झाडापानांचा कायापालट होतो.'
किती झाडांवर आणि त्यावर येणाऱ्या पक्षण्यावर त्यांनी लिहिले आहे.
आंबा : आंब्याचे मोहोर आणि त्यावर घोंगावणाऱ्या केंबरी (केंबरी हा एक अतिशय सूक्ष्म कीटक असतो, मालवणीत त्याला किमरु म्हणतात) आणि लांब सुईसारख्या चोचीने मोहोर टिपणाऱ्या मिराळ्या चिमण्या (मिराळ्या चिमण्या म्हणजे फ्लॉवरपेकेर्स की सनबर्ड?)
बदामाचे झाड: पळसासारखी मोठी लांबट पाने, पिकून गाळताहेत, पण रंग किती सुंदर लाल! त्याचा कोवळ्या पानांनी सुद्धा हेवा करावा. ठिकठिकाणी गळत्या पानांच्या जागी नव्या पानांचे पोपटी लालसर, निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे दिसणारे मोठेमोठे कळे जोरात वर येत आहेत.
शेवगा पांढऱ्या फुलांनी भरून गेलेला, आंबा, फणस, शेवगा यांच्या मागचे गुलमोहराचे झाड त्यामानाने कितीतरी साधे दिसत आहे.
'शिरीष या झाडाची पाने सपासप गळून पडताहेत. आणि लालसर रंगाची सुंदर कोवळी पालवी त्या झाडाच्या अंगाअंगावर फुलत आहे. एप्रिल महिन्यात हि झाडे जांभळट, गुलाबी, नाजूक फुलांनी बाहेरून जातील.;'   शिरीषच्या झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पोपटांबद्धल त्या लिहितात 'आजूबाजूला एकवेळेला निदान पन्नास-साठ तरी पोपट दिसतात. प्राणाला पोपटाची उपमा का देतात, 'मायेचा हिरवा रावा' का म्हणतात हे मला या झाडावरचे पोपट पाहिले तेव्हा चांगले कळून आले'. पाखरांमुळे झाड जिवंत वाटते असेही त्या लिहितात. पोपटांच्या पिलांना बोक्यापासून वाचवण्यासाठी कावळे गोंगाट करून मदत करतात पण हेच कावळे पोपटाची पिले जरा घरट्यातून बाहेर आली कि केव्हा मारू केव्हा नको असे करतात. या कावळ्यांच्या विचित्र मैत्री/शत्रूत्वाच्या विसंगत वागण्याबद्धलही त्यांनी लिहिले आहे.
मार्चच्या अखेरीस फुलणारा पळस, पांगारा या झाडांचे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण फुलांचे त्या वर्णन करतात. ''पीलक' (म्हणजेच 'हळद्या' (Black headed Oriole)) ह्या पक्ष्याने पळसाच्या झाडावर घरटे बांधलेले आहे. चिनी जास्वंदीची अर्धोन्मीलित असणारी फुले आणि त्यावर येणारा काळसर लहान पक्षी म्हणजे फुलचूखी (हनीसकर). त्याचे केलेले निरीक्षण त्यांनी शब्दात असे मांडले आहे. ' बसला तो जास्वंदीच्या झाडावर! फुलाचे नळकांड्यासारखे खालच्या बाजूस असणारे तोंड. त्या तोंडात खालच्या बाजूने मान उंचावून आपली लांब टाचणीसारखी बारीक चोच या पक्ष्याने खुपसली आणि तो मध पिऊ लागला. फुलपाखरे मध चाखतात. पण फूलचूखीने घेतलेला हा मधाचा आस्वाद मी कधीच विसरणे शक्य नाही. 'मध चाखावा फुलपाखरांनीच, पक्ष्याला त्याचे काय होय?' असे कविवचन आहे. पण फुलचूखी मधाचा घास कसा घेते हे एकदा तरी ज्याने पहिले आहे तो ते दृश्य विसरणे शक्य नाही.' 'एप्रिलच्या भरात गोविंद पक्षी(थ्रश ? हा कुठला पक्षी? ) , तांबट, गावठी बुलबुल या सगळ्यांची संगीतशाळा भरते. प्रत्येकजण आपले आकर्षण वाढवतो आहे, गातो आहे, आपली जात वाढवण्याची धडपड करतो आहे. '


'गुलमोहराच्या आठवणी' या लेखात त्या आपल्या स्मृतीतील गुलमोहराच्या झाडांविषयी लिहितात. ऐन वसंतात जेव्हा इतर झाडे कोवळी पालवी घेऊन नटलेली असतात तेव्हा हे झाड काट्याकुटक्यांचा आपला देह घेऊन उभे असते. त्यातही असलेल्या सौदर्यांविषयी त्या लिहितात. 'त्याच्या त्या काळ्या कबऱ्या फांद्या,  निळसर भुरक्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर किती खुलून दिसतात! सूक्ष्मतेने पाहणाऱ्या खेरीज कुणाला कळणार नाही. चिनी चित्रकारांनी निष्पर्ण वृक्षांचे कलात्मक चित्रण करण्यात सिद्धी मिळवली आहे. गुलमोहराच्या उन्हाळी रूपाचे हे उघडे-नागडे चित्र पाहिल्यानंतर मला त्या चित्रातले माधुर्य थोडेसे समजू लागले.
उन्हाळयाच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरवातीला पूर्ण फुललेला बहारदार लालभडक, ऐन पावसाळ्यात आणि अखेरीस पूर्ण हिरवागार आणि ऐन वसंतात निष्पर्ण अशी रूपे घेणारा गुलमोहर मलाही आगळावेगळाच वाटतो. त्याच्याविषयीच्या अनेक आठवणी दुर्गाबाईंनी सांगितल्या आहेत. त्यातल्या काही म्हणजे , गुलमोहराच्या शेंगाना तरवारी समजून खेळले जाणारे पोरांचे खेळ, गुलमोहराच्या टपोऱ्या कळ्या बाहुलीच्या लग्नात नारळ म्हणून वापरल्या जायच्या, पाकळ्यांचे ठसे हातावर काढून गोंदण्याचे, मेंदीचे सुख अनुभवले जायचे, कळीच्या आतले पराग म्हणजे लहान मुलांच्या दुकानातील स्वस्त केशर, सर्वात मोठे विलोभन म्हणजे लाल पराग आणि त्याच्या माथ्यावरचा बडीशेपेच्या आकाराचा पिवळा पागडीसारखा तुकडा लहान मुलांना लढाऊ शिपायांसारखा वाटतो , या परागांची झुंज लावून कुठल्या शिपायाची पगडी उडते ते बघणे असा लहान मुलांचा खेळ, अश्या अनेक आठवणी. या सर्वच आठवणी सुखद नाहीत काही दुःखद पण आहेत. जशी गुलमोहराच्या झाडाखाली राहणारी वेश्या आणि एक दिवस वाधळात उन्मळून पडलेले ते झाड, त्यानंतर वेश्येची आणि तिने आश्रय दिलेल्या कुत्र्यांची झालेली वाताहतही आहे. अत्यंत गलिच्छ अशा शौचकूपांच्या गर्दीत वाढलेले आणि दार मोसमाच्या वेळी जे काही आहे त्यावर सृष्टिनियमाला मानून पुष्पवृष्टी करणारे करूण झाडही दुर्गाबाईंना दिसते. आणि त्या म्हणतात 'अशा कर्मयोगाचा मला धाक वाटतो, त्या झाडामुळे त्या गलिच्छ ठिकाणालाही शोभा आली आहे याचा विसर पडतो आणि मन उदास होते' अशा या झाडाखाली एक भिकारीही मेला तेव्हा त्याच्यावरही गुलमोहोर आपल्या शिळ्या पाकळ्या टाकीत होता.


'सिध्देश्वरच्या तळ्यातील कमळे' या लेखात त्या सोलापूर येथील सिद्धेश्वराच्या देवळासमोर असलेल्या तळ्यातील मोठ्या कमळांविषयी लिहितात. मोठी फुले म्हणजे कमळ, लहान फुले म्हणजे लिली असे त्या सांगतात. हे सिद्धेश्वराचे तळे नंतर बुजवले गेले आणि कमळेही गेली, त्याबद्धल त्या हालहाल व्यक्त करतात. कमळाचे तिचे गाढले गेलेले बी शोधून कुणी ती कमळे पुन्हा जिवंत करावीत असा आग्रह त्या धरतात. 'मला वाटते, सारखे वाटते, की आजही तळ्याच्या ठिकाणी खोदाखोद केली तर काही बिया सापडतील. एक हजार वर्षांपूर्वी सुकलेल्या चीनमधल्या मांच्युरियाच्या तळ्याच्या तळाशी बिया सापडल्या, त्यातल्या काही रुजल्या. त्या कमालिनीच्या कळ्या धरल्या. त्या फुलल्या. सोळा पाकळ्यांची ती कमळे होती. जपानमध्ये टोकियोत एका इमारतीचा खोल पाया खणताना तीन हजार वर्षांपूर्वीच्या कमळांच्या बिया मिळाल्या, याच काळच्या कमळाच्या बिया पिरॅमिडातही मिळाल्या. मग सिद्धेश्वराच्या तळ्यात बुडी मारलेले मकाणे रुजून खचित मेले नसतील. कुणी त्यांना वर काढून त्या सोनदळी कमळांच्या वेलींना पुनर्जीवन देईल का?'

'तुळस' तुळशीच्या झाडाचे सौन्दर्य, त्या झाडाच्या लहानखुऱ्या रूपाबद्धल भारतीयांची जडलेली सात्विक, वत्सल भावना, सगळ्या पारंपरिक गोष्टीत तिचा होणारा उपयोग, तिचे महत्व, तिच्यावर रचलेल्या पौराणिक कथा, करुणरसाने भरलेल्या लोककथा, लोकगीते याबद्धल या लेखात लिहिले आहे. तुळस हि कुमारिकेचे प्रतीक आहे, तरीही पुराणातील नियमानुसार लग्न तिलाही चुकले नाही. तुळशीचे लग्न आणि त्यावरील कथा फारच रंजक आहेत. खुद्द दुर्गा भागवतांनी 'तुळशीचे लग्न' नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे ज्यात तुळशीची आणि तिच्या लग्नाची कथा आहे. या लेखात पुराणातल्या तुळशीशी निगडित अनेक कथा, संदर्भाचा परामर्श त्या घेतात.

'वनकथा' या लेखात दुर्गाबाई आपल्या मध्यप्रदेशातील भ्रमंतीतील आणि महानदीच्या तीराच्या आसपासच्या भागातील आदिवासींच्या आठवणी आणि अनुभव सांगतात. आदिवासींचे वागणे, बोलणे, त्यांच्या समजुती इत्यादिविषयी त्या लिहितात.

'रानझाडांची गोष्ट' या लेखात त्यांनी जातककथांतील एक कथा सांगितली आहे. जातककथा या गौतम बुद्धाच्या पूर्व जन्माच्या (या कथांत त्याला बोधिसत्व म्हटले जाते). शाल म्हणजेच सागाच्या झाडाशी निगडित हि कथा आहे.

'झाडांचे आक्रंदन' या अतिशय सुंदर लेखात त्यांनी झाडेही बोलतात, त्यांनाही भावना व्यक्त करता येतात, स्वतःच्या दुःखाचे आक्रंदनही करता येते त्याबद्धल कळकी, केळी यांचे काही पुरावे दिले आहेत. अँथोनी जुलिअन हक्सले या अत्यंत गुणी आणि रसिक शास्त्रज्ञाने 'प्लांट अँड दि प्लॅनेट' नावाच्या पुस्तकात कळकीच्या कोंब फुटताना होणाऱ्या आक्रन्दनाविषयी लिहिले आहे. कळकीचा कोंब म्हणे सात पदर तोडून बाहेर येतो. याविषयीच्या अनेक आख्यायिकाही आहेत. तसेच पाऊस येणार म्हणून नाचलेल्या एका झाडाविषयी एक शास्त्रज्ञांनी सांगितलेली गोष्टही त्या सांगतात.

'खडपा उसाची आठवण' या लेखात त्यांनी लहानपणीची एक रुद्द्य आठवण सांगितली आहे. त्या तेव्हा नाशिकमध्ये आत्याकडे राहत होत्या आणि गावातील बंधनांना जुगारून मोकळेपणे, मस्ती करत त्या जगत होत्या. लोक काय म्हणतील याची भीड त्यांनी बाळगली नाही. परंतु लोक बेरकी होते, त्यातीलच एक म्हणजे दुर्गाबाईंच्या मैत्रिणीच्या घरांतल्यानीच एकदा दुर्गाबाई आणि त्यांच्या बहिणीला बोलावून त्यांचा अपमान करण्याचे ठरवले आणि त्यांना कुणीही न खाऊ शकणारा खडपा ऊस खाऊ घातला. त्या लोकांना मात्र दुर्गाबाई पुरून उरल्या आणि त्यांची चांगली खोड कशी मोडली त्याबद्धल हा लेख आहे.

'गेंडा' , 'हत्तीची कथा' या लेखांत या प्राण्यांविषयी अनेक संदर्भ, त्याच्या विषयीची अतिशय छान माहिती त्यांनी दिली आहे.


'पक्ष्यांचे बोल' हा अतिशय सुंदर लेख आहे, कवडा, पावश्या , पोपट, कबुतर, भुंगा , चिमणी  यांच्या बोलांविषयी त्यांनी लिहिले आहे, त्यांच्या बोलांवरून पडलेल्या लोककथा आणि आख्यायिकांचे संदर्भही दिले आहेत. तसेच 'पिवळीच मी पाकोळी की' या लेखातही त्या पाकोळीविषयी, आणि 'वेडे झाड' या लेखात एकही पान सारखे नसलेल्या एका झाडाविषयी त्यांनी लिहिले आहे.

अतिशय सुंदर माहिती, आणि अवलोकन असलेला हा निसर्गाच्या अनंत लीलांच्या संदर्भांनी नटलेल्या  लेखांचा असा हा वाचनीय 'निसर्गोत्सव' आहे.