Wednesday 19 October 2016

उडणारं शुष्क पान आणि पुष्प-योगिनी

संजय गांधी नॅशनल पार्कमधे एक छोटीशी वाट आहे. तिला 'शिलोंडा ट्रेल' म्हणतात. रानवाटच आहे ती पण आता माणसाच्या बरीचशी पायाखालून जाणारी. इथे पक्षी बघायला मिळतील म्हणून गेले होते, पण तसा थोडा उशीरच झाला होता, पक्षी फारसे दिसले नाहीत पण दोन गोष्टी दिसल्या ज्या खूपच चित्तवेधक होत्या. निसर्ग हा 'दी जिनिअस आर्टिस्ट', 'दी जिनिअस क्रिएटर' आहे याचा वारंवार प्रत्यय येतच असतो त्यातीलच आलेला हा आणखी एक प्रत्यय. 'दी जिनिअस आर्टिस्ट' यातला 'दी' महत्वाचा. त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. पण निसर्ग इतका नम्र निर्माता आहे, की कधीही आपल्या निर्मितीचे प्रदर्शन तो करीत नाही. तुम्ही जर त्याला भेटायला गेलात, त्याच्याशी संवाद साधलात तरच तो आपल्या निर्मितीची रहस्य थोडीफार उलघडून दाखवतो. 

त्यातलेच एक म्हणजे 'ब्लु ओकलीफ बटरफ्लाय' हे फुलपाखरू. त्याचं  शास्त्रीय नाव 'Kallimaa horsfieldii'. हे खालच्या फोटोत आहे ते हे फुलपाखरू.
दिसलं का? नाही ना? नाहीच दिसणार. आता पुढच्या फोटोमधे दिसेल.

 
या फुलपाखराचे छान फोटो इथे बघायला मिळतील. याचे Kallima जातीतले इतर भाऊबंद भारतातल्या वेगवेगळ्या भागात आढळतात पण हे फुलपाखरू मात्र फक्त पश्चिमी घाटांत आढळून येतं. सर्वात कोड्यात टाकणारं त्याचं वैशिष्ट्य म्हणजेच त्याचं पंख मिटून camouflage करण्याचं टेक्निक.  हे फुलपाखरू पंख मिटून घेऊन स्वतःला 'सुकलेलं पान' बनवतं. म्हणजे पंख मिटले की ते सुकलेल्या पानासारखं दिसतं. त्यामुळे जर उडताना दिसलं  नसेल तर त्याला झाडावर शोधणं तसं कठीणच आहे. मग जेव्हा कधी ते पंख उघडेल आणि  त्याचा मध्यभागी निळसर आणि टोकाकडे शेंदरी होत जाणारा रंग, पंखांच्या वरच्या बाजूला दिसणारा पांढरा पट्टा आणि त्यावरची काळी महिरप हे सर्व दिसेल तेव्हाच  ते फुलपाखरू आहे हे कळेल. हे फुलपाखरू उडताना फार सुंदर दिसतं.
Mark Alexander Wynter-Blyth नावाच्या निसर्गसंशोधकाच्या 'बटरफ्लाईज ऑफ इंडियन रिजन' या पुस्तकात त्याने म्हटलं आहे की एका ब्लु ओकलीफच्या मिटलेल्या पंखांवरचा पॅटर्न दुसऱ्या ब्लु ओकलीफच्या मिटलेल्या पंखांच्या पॅटर्नशी कधीच जुळत नाही. म्हणजे प्रत्येक पंख मिटलेल्या ब्लु ओकलीफची ओळख वेगळी असते. हवे तेव्हा पंख मिटून, सुकलेल्या पानाचे रूप घेऊन निसर्गात मिसळून जाण्याची त्याची हातोटी खास आहे. 

अनेक वर्षांनी फुलणारी 'पुष्प-योगिनी' कारवी

एखादा संशोधक एखादा शोध लावण्यासाठी किंवा एखादा चित्रकार/शिल्पकार एखादी कलाकृती घडवण्यासाठी जशी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतो तशी ही कारवी आपली फुलं निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे (सात ते दहा वर्षे) कार्यरत असते. वनस्पती का फुलत असतील आणि कश्या फुलत असतील यामागची रहस्य शास्त्रीय कारणांत न शोधात त्या वनस्पतीच्या व्यक्तिमत्वात शोधली पाहिजेत. वनस्पतींचंदेखील एक मानसशास्त्र असलं पाहिजे. त्यानुसार अबोलीचं वेगळं व्यक्तिमत्व, सदाफुलीचं वेगळं, ओसंडून फुलणाऱ्या मोगरीचं वेगळं , तसंच कारवीचंही. वर्षांनुवर्षे आपल्या फुलांसाठी आराधना करणारी कारवी ही फुलणाऱ्या वनस्पतीतील पुष्प-योगिनी असली पाहिजे. सप्टेंबर मध्ये पाऊस सरण्याच्या जवळपास, ती सात ते दहा वर्षांनी एकदा फुलते. मला हि कारवी 'शिलोंडा ट्रेल' मध्ये फुललेली दिसली, फुलांचा बाहेर जवळपास ओसरून गेला होता पण अजूनही एक दोन फुलं होती.



Strobilanthes Callosus हे तिचे शास्त्रीय नाव आहे. ती acanthaceae या कुटुंबातील आहे. हि अडुळसा कुळातील दोन तीन मीटर वाढणारी वनस्पती आहे. हिची पानेही बरीचशी अडुळश्यासारखी असतात. कोकणात अडुळसा विपुल प्रमाणात आढळतो, तिकडे खोकला येणाऱ्या माणसाला सर्रासपणे, अडुळश्याच्या पानं,  तुळशीची पानं, मिरी, चहाची पात आणि कांदा घालून काढा करतात आणि त्यात गूळ मिसळून देतात. सर्दी खोकल्यावर अडुळसा उपकारक आहे, तसे कारवीचे काही औषधी उपयोग आहेत का म्हणून कोकणात वाढलेल्या माझ्या आईलाच विचारले तर 'कारवी म्हणजे काय तेच ठाऊक नाही' असे उत्तर तिने दिले. 'वनश्रीसृष्टी' या डॉ. वि. म. आपटे यांच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे करावी  पश्चिम घाटात विपुल प्रमाणात उगवते. मावळ कोकण आणि उत्तर कारवार ही त्यांची माहेरघरे आहेत. म्हणजे कोकणातही  कारवी उगवत असावी.



'नीस' (Christian Gottifried Daniel Nees von Esenbeck) या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञाने या वनस्पतीचे  प्रथम शास्त्रोक्त वर्गीकरण केले. आदिवासी लोकांत कारवीच्या वाळलेल्या काठ्यांचा उपयोग कुडासाठी(कुंपण किंवा झोपडीच्या आधारासाठी) करतात. तसेच तिची पाने, फुलातला मध यांचाही वापर करतात. कारवीच्या फुलातला मध मधमाश्या गोळा करतात. या मधाला 'कारवीचा मध' म्हणतात. या मधालाही औषधी गुणधर्म आहेत. आदिवासी लोकांच्या औषधांमध्ये कारवीची पाने आणि मधाचा वापर होतो. पण या पानांना वापरण्याची विशिष्ट पद्धत आहे. पानाच्या मागील अंगावर असणाऱ्या शिरांवरची लव काढून टाकली नसेल तर अशी पानं खाऊन पोटात क्षोभ होऊ शकतो. आदिवासींना हे बरोबर ठाऊक असले पाहिजे. मध्यप्रदेशातही कारवी उगवत असून तिला 'मरुआदोना' असे म्हणतात.

या कारवीला इतक्या वर्षातून एकदाच फुलं का येत असावीत? तर यामागचं कारण तिची जडणघडण हे आहे. हि वनस्पती Plietesials या प्रकारच्या वनस्पतींमध्ये मोडणारी आहे. या वनस्पती अनेक वर्ष वाढत राहतात आणि मग एका विशिष्ट वर्षी सगळ्या एकदम ओसंडून फुलतात. फुलण्यानंतर फळ आणि बीजनिर्मितीदेखील एकाच वेळी होते.  त्यांच्या या प्रकारच्या बीजप्रक्रियेला masting (synchronous production of flowers and seeds)  म्हणतात. फळं मातीत पडून राहतात आणि पुढच्या पावसाळ्यात फुटून रुजतात. रानोमाळ जिथे कारवी फुललेली असेल तिथे पुढच्या पावसाळ्यात फळे फुटण्याचा एकत्रित आवाज होतो. या Plietesials वनस्पतींमधे अश्या काही प्रजाती आहेत ज्या monocarpic आहेत(reproduce once and die) आणि एकदा फुलल्या-फळल्यानंतर या वनस्पती एकत्रितपणे नष्ट होतात. अश्या विपुल फुलल्या-फळल्या नंतर नष्ट होऊन जाण्यामागे देखील काहीतरी genetic प्रेरणा असली पाहिजे.  म्हणजे उत्स्फूर्त निर्मिती नंतर आत्मनाश करून घेणारे निसर्गाचे हे छोटे छोटे सहाय्यक कलाकारच  आहेत असे म्हणायला पाहिजे.

निसर्गातील या दोन विलक्षण गोष्टी. मला या गोष्टी बघून आणखीही काही प्रश्न पडले, जसे 'ओकलीफ बटरफ्लाय' ला 'ओकलीफ' नाव का पडलं? 'ओक'च्या झाडाची पानं तर मुळीच या फुलपाखराच्या मिटलेल्या पंखांच्या आकारासारखी दिसत नाहीत. मग 'ओकलीफ' हे का? आणि कारवीचा आदीवासी लोकं आणखी कसा वापर करत असतील आणि कारवीवर त्यांच्या काही लोककथा, अनुभव आणि आख्यायिका असतील का?  

No comments:

Post a Comment