Tuesday 6 December 2016

काळी मखमल

काल दार उघडताच
एक काळी मखमल आत आली
जुनी ओळख असल्यासारखी
बेधडक किचनपर्यंत गेली

काळी मखमल भिरभिरती
काल बागडत होती
या भिंतीवरून त्या कोनात
अज्ञात अवकाश शोधत होती

आज मात्र होती निपचित
किचनच्या ओट्यावर
मुंग्यांची रांग अविरत
होती पोखरत

काल  जीच्या असण्याने घर उजळलं
फक्त एका दिवसाची ओळख
हे काळं फुलपाखरू
होतं कुणाला शोधत 

त्याचा सांगाडा माझ्यासमोर होता पडून
मी तो काड्यापेटीत ठेवला ,
वाचवला पोखरणाऱ्या मुंग्यांपासून
पण भिरभिरणारं चैतन्य त्यात आणू कुठून

काळी मखमल त्यानंतर अनेक दिवस मनावर दाटून राहिली 
अनेक दिवस, अनेक महिने
पण शेवटी आणखी अनेक दिवसांनी, अनेक महिन्यांनी
ड्रॉवर उघडून तीच काडेपेटी झाडाच्या कुंडीत उपडी केली



-मुंबई, २६-१०-२०१५

Friday 2 December 2016

अनटायटल्ड पोएम पाच

हे करावं ते करावं
सोडावं, धरावं, निर्माण करावं, मिटवावं
व्हॅन गॉग, वडापाव, पुस्तकं घ्यावी अंगावर
समुद्र, मांजर, पक्षी, घरं, दारं चढवावी डोक्यावर
राहिलं असेल तर हे ही घ्यावं अन ते ही उचलावं
आयुष्य, पाणी , आकाश, चपला, टेबलं, खुर्च्या, उद्योग
नाजूक रूप, साजूक तूप, तिकिटं, बिलं, अल्बम्स, टेलीस्कोप 
मस्त चहा, गर्दी, सूर्य , झाडं-बीडं, गाड्यांचे लाईट्स, किंगफिशर
शोकेस मधल्या वस्तू, किशोर कुमार ,लहानपणीचा जुना स्वेटर
शेवटी घोंगडं घेऊन लपून बसावं भीती वाटून
की आपण कुणाच्या नजरेस पडू नये
कानोसा घेत घेत  की कुणी आपल्याला धरू नये
अस्वस्थ, अशांत होऊन वेताळासारख्या
कर्र कर्र चपला वाजवत चालू पडावं
जखमेवर चोळायला तेल शोधत फिरत राहावं
पळत राहावं की कुणाच्या नजरेस आपण पडू नये
कानोसा घेत घेत की कुणी आपल्याला धरू नये
या चिमण्या बिनबोभाट नुसत्या
हल्ला करून सगळी बिस्किटं फस्त करतात
ठेवलेल्या खाण्या,पाण्यावर टणाटण उड्या मारीत येतात,जातात
यांना धरायला कुणी कसं येत नाही. 

-कांदिवली, मुंबई, २० नोव्हेंबर २०१६

Thursday 1 December 2016

अनटायटल्ड पोएम चार

मी आज हास्यास्पद झालो, असं ऐकलं आणि धावलो
तसा मी अनाकलनीय वाटतो
पण मी तसा नाही, खूप साधासुधा आहे हो मी !
पटत नसेल तर चिमणीला विचारा

तुम्हाला मी आकळत नाही
म्हणून मला किती विशेषणं पडतात
शॉकिंग, अकाली, करूण, चटका लावणारा
विदारक.

पण आज मी हास्यास्पद झालो
म्हणून गपचूप तिथे गेलो
कानोसा घेतला तर
आजूबाजूचे चुकचुकत होते

काही कुजबुजत होते
काही तर मला
आतूनच हसत होते
उगाच नसती थेरं, म्हणत होते

सुखासुखी असलेलं आयुष्य
लोकांना,
घास मिळवण्याची धडपड
आणि याना हे सुचतं

नीट मन लावून जगता येत नाही?
जीवनाचा साधा व्यवहारसुद्धा कळत कसा नाही?

कसलं टेन्शन, कसली भ्रांत
काल हसतखिदळत होती ही व्यक्ती
ना जबाबदारी,
ना कसली खंत

रात्री फोनवरही बोलली तासभर
म्हणाली दूध नासलं
आता दूध नासलं
हे काय कारण झालं?

कानोसा देऊन मी हे ऐकलं आणि संतापलो
धडधडत गेलो आणि मेलेल्या व्यक्तीच्या
बकोटीला धरून सणसणीत कानाखाली लावली
ती खाली पडली, उठून तिने तरीही मला गच्च मिठी मारली

भांबावून गेलो, क्षणभर थांबलो
कारण विचारलं तिला
म्हणाली, जबाबदारी पेलवत नाही
विचारलं कसली ? तर म्हणाली जगत राहण्याची

मी वैतागलो, का असं केलंस?
मला उगाच हास्यास्पद ठरवलंस
म्हणाली, लोकंच ती,
त्यांचं काय मनावर घ्यायचं

कुणी चुकचुकणार, कुणी हळहळणार, कुणी हसणार
त्यांच्या बोलण्यावरून का आपण ठरवणार

चाल जाऊ आता बरोबरच
जेव्हा तेही तुझं बोट धरून येतील 
तेव्हा मलाच काय
ते तुलाही विसरतील

मी म्हणालो, पण तुला काय घाई मला भेटण्याची?
म्हणाली एकटं वाटत होतं मला
वैतागलो, म्हणालो, तुला एकटेपणा वाटत असला तरी 
मला नको कुणाची सोबत

नाही लागत कुणाची साथ, मी एकटाच बरा
चिमणी कशी सुईसायडल जम्प मारते ,पण मला न भेटता, ती भुर्रकन वर जाते
अलगद, तिला ओळख आहे माझी, तिला तरी विचारायचंस
आज तुझ्या मुर्खपणामुळे मी हास्यास्पद ठरलो खरा

-कांदिवली, मुंबई, १-डिसेंबर २०१६  

अनटायटल्ड पोएम तीन

इथून व्ही. टी. स्टेशन
तिथून ट्रेनचा प्लॅटफॉर्म
तिथून ट्रेनची बर्थ,
तू असलेल्या शहरापर्यंत

मग, त्या शहराचे स्टेशन
तिथून पायीच मैलोन् मैल 
मग गाठीन तुझा घाट
बसून राहीन निर्मनुष्य
होण्याची बघीन वाट

चालत राहीन तीरावरून
चांदण्या घेत अंगावर
आळवत राहीन तुला
तुझी शक्ती दे ओंजळभर

खडक असून मन
तडकत कसं नाही
कोण जाणे कोण
त्याच्या भेगा भरतच राही

तू असशील कुणी,
असह्य ओढ मला लावून 
पण इतरही अनेक तीरावर आहेत
डोळयात माती फेकत आहेत

तीरावरची वेली,फुलं खूप चिवट
पायात अडकलीत,ती आधी खणते
तुझ्याच कातळावर
माझा खडक फोडून टाकीन म्हणते

मग उडी थेट
त्यानंतर तुला मी अन मला तू
याच ठिकाणी ठरवली आहे
घ्यायची तुझी भेट

-कांदिवली, मुंबई, १-डिसेंबर-२०१६









अनटायटल्ड पोएम दोन

काळोख किती रोमँटिक असतो
ते खिडकी सांगते, दिवा ऐकतो
आणि तो स्वतः विझून जातो

परतणाऱ्या सूर्यासाठी
मग शेवटी काळोखही विझतो
स्वतःच्या परतीची वाट बघत बसतो

सूर्य बुडतो, पुन्हा काळोख खिडकीपाशी येतो
भेटणे, विझणे, परतणे, बुडणे
सातत्याने चालूच

आज पण सूर्य पुन्हा बुडून गेला
आणि होडी एकटी पडली
नेहमीसारखीच

ती दूरवर दिसणारी
एकच दिवा असलेली
अधांतरी सरकणारी 

काळ्याशार काळोखातील 
माझी सखी
जिवाभावाची

तिची गती
माझी गती
एकसारखी



-कांदिवली, मुंबई , २२ नोव्हेंबर २०१६






Friday 25 November 2016

मेला बुद्ध


आतंकवाद, दहशदवाद , घुसखोरी, युद्ध
आतील बाहेरील शत्रू
धडधडत्या तोफा बंदुकीच्या फैरी
सरकारी पेटीत बसून घरी जाणारे जवान
आणि बेवारस पुजले जाणारे वैरी

नंतर फक्त
विधानं, शक्यतो अविचारी विधानं
आणि जमल्यास विचार थोडा
संभाषणं भाषणं आरोळ्या आणि चारोळ्या
आरोप प्रत्यारोप आग्रह आंदोलनं
मेणबत्यांचं जळणं आणि विझणं / वितळणं
दगडफेक चिखलफेक जमावबंदी संचारबंदी
पाण्याचे फवारे अश्रुधुराचे ढग आणि अश्रू
लाठ्यांची बरसात, प्रसंगी गोळीबार
अत्याचार स्वैराचार भ्रष्टाचार
आयोग चौकशीचे, अहवाल आरोपपत्रं
आणि झालीच तर कुणाला तरी शिक्षा

या सर्वांचं मूळ
धर्म जात वर्ण प्रांत
देश पैसा प्रसिद्धी सत्ता
इत्यांदींचं खूळ
जरीही सर्वश्रुत
अश्वत्थाम्यासारखं अमर, अबाधित

कुणी प्राणी पक्षी पान फुल रान
कुठे हवा पाणी माती धोंडा
आणि माझं दगड मन
अंतःबाह्य आहे त्रस्त
नको झालाय परशु आणि राम
नको नानक महावीर ना खुदा ना ख्रिस्त

दुःखाचा या शेवट व्हावा म्हणून
वाटतं उजव्या कुशीवर शांतपणे झोपी जावं
विझता वात, विरून जातील धर्म आणि जात
न म्हणतील कोणी (बुद्ध बुद्ध) मेला बुद्ध
अधिक मागणं काही नाही

- विवेकानंद सामंत , पूणे , १३-१०-२०१६


तेरावं

बाबा गेले
तेरावं झालं
दुःखाचं जेवण
पचून गेलं

श्राद्धाला काढायची
आणि प्रसंगी यायची
ती आठवण नंतर
यायची आणि जायची

काळ गेला वेळ गेली
अनेक वर्ष आणि श्राद्ध लोटली
पोरं बाबा झाली
बाबा झाली

दबक्या पावलांनी पुन्हा एकदा
काळ आला, वेळही आली
डोळ्यादेखत पस्तिशीतली
पोर गेली

जिला काऊचा घास भरवला
त्याचा त्याला
परत दिला
शेवटी तो उसनाच !

तेरावा दिवस यायचा तो आला
पुन्हा तेच तीळ, सात दर्भ
आणि तोच
जेवणाचा प्रसंग

या वेळी मात्र दुःख
ताट भरून आलं होतं
तांब्या,भांडं, वाटी पेल्यात
अश्रूंचं तळं झालं होतं

मग कसासाच गिळला घास
दाटल्या गळ्यात अडकला
विद्युतदाहिनीचा जाळ
पुन्हा डोळ्यांपुढे भडकला

जाणवून सत्य वितळलं मन
आधी मरावा बाप
मग पोरं 
हेच बरं.

-विवेकानंद सामंत, पूणे , २०-१०-२०१६.

ऐसाही है मैं


जेवून झाल्यानंतरच मला खरी भूक लागते
मेलेली जीभ जिवंत होऊन नवी चव मागते
जेव्हा ती एका घोटासाठी प्रतिक्षा करेल, अखेर
तेव्हा कोरडी पडेल का ती ?

स्वेटरमधली त्वचा स्वतःच चाचपून पाहते
उबदार, गरम, जिवंतपण जाणवत राहते
जेव्हा ती एकटीच गोठत पडेल
तेव्हा तिथली थंडी सोसेल का तिला ?

पावलांकडे नजर जाते, मला उचलून धरलं आहे त्यांनी
कायमचं, कायमच
जेव्हा याच पावलांवर पहिल्यांदा उभं राहता आलं असेल
तेव्हा काय वाटलं असेल त्यांना

तळपायांतली आग त्यांनी
खूपदा सहन केली आहे
पण तो बेचिराख करणारा अग्नी
सहन होईल का त्यांना

समोरचे दृश्य वारंवार दिसते
झाडे, आकाश, पाणी, चिमण्या, सूर्य
जेव्हा डोळ्यांतील असंख्य अभ्र पुसून पसरेल पोकळी
तेव्हा तेच  आकाश, त्याच चिमण्या , तोच सूर्य दिसेल का त्यांना?

'ऐसाही है मैं' मीच मला म्हणते 'फार विचार करतेस'
एकदिवस, एकवेळी, त्या क्षणी,
विचार, पोटाची भूक, सर्व होतील मूक
पडेल स्वप्न शेवट, विसर पडेल आपसूक

पडेल तेव्हा पडेल
तूर्तास 
कटिंगचहा, गरम गोधडी, पायपीट, झाडं, आकाश, पाणी, चिमण्या आणि खूप काही 
लांबच लांब, मजेत चालला आहे प्रवास

Friday 18 November 2016

अबोली, मोगरी

अबोली, मोगरी थँक्स तुम्हाला
मार्चच्या उकाड्यात
कुणाला तरी झालेलं असाध्य दुखणं
आणि मी, माझी डोकेदुखी घेऊन

बस! एक शब्द फुटत नाही
एक ओळ सुचत नाही
एक रेघ उमटत नाही
एक रंग खुलत नाही, नुसता अंधार

खूप गच्च आतून
कुठे गोठून गेले सर्व
त्याच विवंचनेत मी
वितळवायला पैलतडीचा सूर्य हवा

आणि इथे गॅलरीत खुशाल
नुसत्या उतू जातायत, रंगाने, गंधाने, आकाराने
हे फुलणं आतून खास
त्यांनी ठरवलंय तसं

कसं जमतं हे त्यांना
बस! जायचं या वाटेवरून
नसेल कुणीही, ना मिळेल काहीही
पण आपण जायचं याच वाटेवरून

कसं जमलं हे त्यांना ?
विचारलं ढीग, त्या सांगताहेत ढीग
पण कशाच कशाला, कुणाचं कुणाला
काहीच कळत नाहीए


-  कांदिवली, मुंबई , ४-फेब्रुवारी-२०१६



Monday 14 November 2016

लेडीज डब्बा


सुटली आहे ट्रेन
लांबलचक,
तुडुंब,
दाटून आलं अक्षरशः

सुटला आहे त्यातला लेडीज डब्बाही
चपाती मेकर? सुपची रेसिपी
उद्धार, धक्का,
बुक्की

ए!,टिकली ले
इयरिंग्ज, नेलपॉलिश ले
'कळलं ना?'
अरे चलो अंदर?!!!

प्लॅटफ़ॉर्मवरचा कुत्रा सताड, बेफिकीर
आजुबाजुला किरकिर
त्यामागच्या बिळातून
ये-जा करणारे उंदीर

आणि घुसणारे
ए!
एवढंच असेल ना तर
फर्स्ट क्लास मधून जायचं

समोर बसलेली बाई
चिवड्याचं अख्खं पाकिट फस्त केलंन
हिला काय गरज बोकणे मारून खाण्याची
हि चार दिवस जेवली नाही तरी चालेल


सुसाट मग वेग घेतला
दूरच्या झोपडपट्टीतला कोंबडा
झरकन मागे पडला
लाल तुरा

मागे पडली चालणारीही
माणसं प्लॅटफॉर्मवरची
मग करू लुंगी डान्स वगैरे भेंड्या
सात्विक भजन आधी

लहान मुल डोकावणारे

पेंगणारे, शून्यात ढेपाळलेले
सुटकेची प्रतीक्षा करणारे
हॅन्डल्स हात धरलेले

काही वेगळे चेहरे
सुंदर, रंगसंगती असलेले
वाहतेय, धावतेय एकटी
लोंबकळण्याला प्राप्त झालीय गती

नेक्स्ट स्टेशन,अगला स्टेशन,पुढील स्टेशन कांदिवली
क्षणभर विसर कोण तू? आणि उतर
मग स्टेशन वरचा तिखट वडापाव
आणि घर.

-कांदिवली मुंबई , ८-१२-२०१३

Friday 11 November 2016

अनटायटल्ड पोएम एक

सोसायटीच्या गेटपाशी जाताजाता कानावर पडलं
तिथला सिक्युरिटी कुत्र्याशी छान बोलत होता
मी तिथून जाताच तो  एकदम गप्प झाला
पण बहुतेक कुत्राही छान बसून त्याचे ऐकत होता

खिडकीतून बाहेर बघताना एक छोटा निळा पक्षी
तुफान वेगाने निळी रेष उठवत गेला
त्याचा निळा रंग अल्ट्रामरिन,सेलुरीअन की कोबाल्ट ब्लु?
हा रंग कुठला ?

पक्षी, झाडाचा बुंधा
चालणारे, पिशवी घेऊन बाबा
संध्याकाळचा चहा
डस्टबिनमधल्या कपच्या कपाच्या


चपाती चिवडणारे तोंड
दाढी करणारे तोंड
पाणीपुरी खाणारे तोंड
तरी नाचून नाचून खाणे निवडणे फक्त चिमणीलाच जमते

बुडण्याचा अनुभव
एकटं रमणं,
ज्या पेनला हात लावते ते नुसतं लिहायला कुरकुरणं

या सगळ्याची सांगड कशी घालायची?

~ ११ नोव्हेंबर २०१६

Tuesday 8 November 2016

'दत्तू' ची व्हिस्की

मी जेव्हा हा एक विशिष्ट लेखक वाचते तेव्हा त्या लेखकाने बनवलेले रसायन मेंदूतल्या बारक्या नळ्यांत खोल उतरते आणि तिथे दडून बसलेल्या असंख्य कड्या तोडून,  शिडी लावून वरही चढते, सोबत अनेक आकृत्या घेऊन. म्हणून मी नाव त्याला दिले आहे 'दत्तूव्हिस्की'. अधून मधून ही दत्तूची व्हिस्की घ्यावीच लागते. 

तर अशीच 'दत्तू'ची व्हिस्की घेऊन बसले होते.  दत्तू'च्या  व्हिस्कीने खोल जाऊन बसलेली एक कडी शोधली  तेव्हा अचानक एक आकृती कडी तोडून, शिडी चढून वर आली.  हळूहळू चेहरा स्पष्ट होत गेला तेव्हा ओळखलं कि ते खुद्द माझे वडील होते. त्यांच्याबरोबर ते एक वातावरण घेऊन आले होते. विशिष्ट दर्प. दारूचा, औषधांचा, मलमूत्राचा, डेटॉलचा, कोंदट. तो दर्प नाकात शिरताच एक अनुभव मन व्यापू लागला. भयंकर तुरुंग म्हणजे ती हॉस्पिटलची खाट. त्या खाटेवर सतत पडून राहायचं आणि त्या खिळलेल्या अवस्थेत भेटायला येणाऱ्या लोकांकडे बघायचं. आपण खाटेवर झोपलेले असू आणि माणसं आपल्याकडे उभं राहून बघत आहेत तेव्हाची शरीराची पोझिशन आयुष्यातल्या आपल्या सगळ्या शरीराच्या पोझिशनमधली सर्वात कठीण पोझिशन. तो आपल्याला दिसणारा 'व्ह्यू' च भयंकर. आयुष्यात बघितलेल्या अनेक सुंदर सकाळी, अनेक संध्याकाळी, रमणीय देखावे आणि भयानक दृश्ये यांना पार  मागे टाकेल असा हा 'व्ह्यू'. तो 'व्ह्यू' बघतानाचा क्षण म्हणजे अफाट माळरान. एकटपणाचं. जेव्हा आम्ही बघे होतो खाटेच्या सभोवती तेव्हा तो 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' अनुभवत होते माझे वडील.  त्यांना 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू'  बघताना चाहूल लागली असेल का की आता आपण जाणार आहोत. आता काही दिवसच हा 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' डोळ्यापुढे असणार आहे. काय विचार आले असतील त्यांच्या मनात?

आपण प्रवास करतो, कुठल्याश्या गावी जातो. तिथून परत येतो. पण हा जो राहती जागा सोडतानाचा, जगलेलं, भिनलेलं वातावरण सोडून जातानाचा सूक्ष्म बदल आहे तो किती खोल आहे? आपण सामानाची बांधाबांध करतो, जाण्याचेही मग वेध लागतात. राहतं घर, तिथला परिसर, आजूबाजूची माणसे, या सर्वांची झालेली सवय. या सगळ्याबद्धल एक अनामिक हुरहूर दाटून येते. हळवेपणा वाढतो. कुंडीतल्या झाडांवरची सुकलेली पानं जरी  वाऱ्याने खाली पडली तरी उदास वाटतं. जे वाटतं त्याची धार वाढत जाते. यावेळी आपण वेगळेच कुणीतरी बनतो. संध्याकाळी सूर्य बुडला की, कालच्या, परवाच्या, अनेक दिवसांपूर्वीची त्या परिसराची, तिथे घडलेल्या प्रसंगांची, क्षणांची  आठवण येते. हे क्षण कधी खरे घडलेले, कधी आपल्या विचारांमधले, कधी नुसतेच अनुभवलेले असतात. त्या क्षणात समोर घडलेला आसमंताचा खेळ, उडणारी पाखरं, कानांवर पडणारे काही आवाजही लक्षात राहिलेले असतात. मग आपण आठवतो तेव्हा ते आवाजही ऐकायला येतात. आपली मनःस्थिती आपण पुन्हा अनुभवतो. सगळ्या कालच्या आठवणी आज पुन्हा  आठवल्या की मन एका विचित्र स्थितीत पोहोचते. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्धल आपण नकळत, उगाचच खिन्न होतो. ते तसं वाटणं हा अनुभव म्हणजे 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' चे ट्रेलर असेल का? जीवन अखेरच्या  'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' चे ट्रेलर आपल्याला वारंवार दाखवत असते बहुतेक. 

वडील आजारी असताना मी काहीच कामधाम नसल्यासारखी पूर्णवेळ हॉस्पिटलमधेच बसून असे, तिथले तेव्हाचे वातावरण मनात इतके ठासून  बसले आहे की एका आकृतीच्या वर येण्याने तेच वातावरण निर्माण होते आजूबाजूला, ज्या वातावरणात तेव्हा मी त्या बाकावर बसून होते.एकदा हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर बघत असताना समोरच्या बिल्डिंगच्या खिडकीवरच्या विंडोपेनवर एक कबुतर पाय मुडपून बसले होते तेही वातावरणातून वर येते. मन त्या संपूर्ण वातावरणाच्या मॅनिफेस्टेशनने विषण्ण होते. हे जे काय वाटते ते शब्दांत सांगणे अवघड. जीवनाच्या अशा किती तऱ्हा आहेत आणि किती स्थिती ज्यात तुम्हाला काय आहे, काय होते, काय वाटते ते व्यक्तच करता येत नाही. 

तेव्हा गपचूप मी पुन्हा  'दत्तू' ची व्हिस्की घेते. आणखी थोडा वेळ जातो. वर येणाऱ्या आकृत्यांना  खाली दाबून मी  चांगल्या आठवणी काढून त्यांना कायमचं घालवण्याचा प्रयत्न करते. पण काही आठवणी जिवंत असेपर्यंत सगळ्या गच्च कड्यांआड बसूनच राहतील. मला ही दत्तूची व्हिस्की जमत नाही. जहाल आहे. घसा  जळजळतो. तेवढी माझी कपॅसिटीदेखील नाही. पण आपल्या हिरव्या-काळ्या सोनेरी बुचाच्या शिश्यातून  ती मला अधूनमधून खुणावतच राहते.  

Thursday 3 November 2016

उजाड माळरान, विखुरलेलं बरंच काही


एमिली ब्रॉन्टे
आज सकाळी घराशेजारच्या खारफुटीच्या जंगलाच्या दिशेने पक्षी बघायला बाहेर पडले होते. तिथे सकाळी लवकर गेलं तर खूप पक्षी दिसतात. सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडले आणि छोट्या रस्त्याला लागले. रस्त्यावर कितीतरी चिमण्या काहीतरी टिपण्यात व्यग्र होत्या. त्यांच्याकडे पाहून मन ताजेतवाने करत मी चालले होते. त्यांच्या मखमली पंखांचा सुखद स्पर्श मनाला जाणवत होता. तितक्यातच एका बाजूला माझी नजर गेली. एक कावळा आणि त्याच्या पायात पकडलेलं काहीतरी नजरेला पडलं. ते बघितलं आणि एकदम पोटात गोळा आला. ते पकडलेलं एक चिमणीचं गोजिरवाणं, बहुदा नुकतंच उडायला शिकलेलं पिल्लू होतं. मला काय करावं सुचेना, न राहून मी त्याच्या दिशेने कावळ्याला मारायला धावले. पण त्या क्षणी तो त्या पिल्लाला धरून उडून गेला. असहाय, एक क्षणात जे काही वाटलं त्याचं आकलन मला अजूनही झालेलं नाही. एकदम अंगातलं त्राण निघून गेल्यासारखं, दिग्मूढ वाटलं. वाटलं आता सरळ मागे फिरावं आणि कुठेतरी लपून बसावं. पक्षी बघणं नको, काही नको आता. पुरे झालं. तरीही पाय चालत राहिले, का ते माहित नाही. पुढे जाऊन खारफुटीच्या जंगलाजवळच्या कच्च्या रस्त्यावर उभं राहून दिसणारे पक्षी बघितले. अनेक पक्षी दिसले. येताना घराजवळच्या एका शेवग्याच्या झाडावर दोन अत्यंत देखणे हिरवेगार पोपटही बघितले.


दुपारी काहीतरी लिहावेसे वाटले, आणि डोळ्यांसमोर आलं एक पुस्तक 'वूदरिंग हाईट्स' आणि ते लिहिणारी मुलगी एमिली ब्रॉन्टे. एमिली ब्रॉन्टे सारखी मनात होतीच. अनेक वर्षांपूर्वी वाचलेली तिची ही कादंबरी. कधीपासून लिहावंसं वाटलं तिच्यावर आणि तिच्या पुस्तकावर,पण लिहिलं नाही कधीही. आज अचानक परत वाटलं प्रकर्षाने लिहावंसं.

'वूदरिंग हाईट्स' हि एमिली ब्रॉन्टेची पहिली आणि शेवटची कादंबरी. तीस वर्षाच्या अपुऱ्या आयुष्यात लिहिलेली. पण लेखिकेचे नाव अजरामर करून गेलेली अशी अप्रतिम साहित्यकृती. एमिली ब्रॉन्टेबद्धल सर्वप्रथम हेच वाटतं की एवढ्या कमी वयात नात्यांच्या गुंतागुंतीचा एवढा खोलवर पाठपुरावा तिने कसा काय केला. धगधगता निखारा मनात ठेऊन तिने लिहिलेले हे लिखाण म्हणजे आश्चर्याची गोष्टच वाटते. अतिशय उद्विग्न, तरल आणि त्याचबरोबर पराकोटीची त्रासदायक अशी नाती तिने या कादंबरीत रेखाटली आहेत. ही कादंबरी लिहिताना ती अठ्ठावीस वर्षांची होती. कादंबरी प्रथम 'एलिस बेल' या नावाखाली प्रसिद्ध झाली.  (तिने तिचे नाव प्रसिद्ध केले नाही) एमिलीच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीने शार्लट ब्रॉन्टेने त्या कादंबरीच्या  मॅन्यूस्क्रिप्टमध्ये काही बदल केले आणि १८५० साली दुसरी आवृत्ती म्हणून ती प्रकाशित केली.

सगळं लेखन नेहमी लक्षात राहतंच असं नाही. पण राहतो तो त्याच्या वाचनाने मिळालेला अनुभव. तशी काही लेखनं आपलं मन शांत करतात , प्रत्येक शब्दागणिक येणारी एक थंड, निरव वाऱ्याची झुळूक घेऊन येतात. शब्दांचे सामर्थ्य एवढे की क्षणार्धात आपण त्या लेखनात बुडून जातो. शब्दांच्या लाटांचा अथांग समुद्र. जसं दुर्गा भागवत, कावाबाता यांचं लेखन. तर जी.ए. कुलकर्णी यांचं लेखन गूढ काळोखात एखाद्या घुबडाने झर्रकन मान एकशेऐंशी अंशात वळवावी आणि भेदक नजरेने बघावं तसे.

आणि काही लेखन म्हणजे खदखदणारा लाव्हारस. त्याची धग असह्य होते. चटके बसतात. पुस्तक खाली ठेवावेसे वाटतं पण ठेववत नाही. शब्द नुसते जळत असतात. डोळ्यात निखाऱ्यांचे किटाळ उडत राहतात. असं  लेखन Eugene O'neill च्या Mourning becomes electra किंवा सिल्विया प्लाथच्या 'द बेल जार' सारखं .....  आणि एमिली ब्रॉन्टेच्या 'वूदरिंग हाईट्स'सारखं.   

'वूदरिंग हाईट्स' हे मूरलॅंड( म्हणजेच माळरानावरचं) एक फार्महाउस. पूर्ण कथानक या घराभोवती आणि 'टचक्रॉस ग्रॅंज' नावाच्या घराभोवती घडतं. संपूर्ण कथा हा एक वृतांत आहे. कुणीतरी  कहाणी सांगावी तसा. ही कहाणी सांगते नेली डीन नावाची, 'वुदरिंग हाइट्स' आणि 'टचक्रॉस ग्रॅंज' या दोन्ही घरांशी अतिशय जवळचा संबंध असलेली आणि तिथे घडलेल्या सर्व गोष्टीना साक्षीदार असलेली एक मेड. ही कहाणी घडून गेल्यानंतर जवळपास तीस वर्षांनी लॉकवुड नावाचा एक श्रीमंत माणूस 'टचक्रॉस ग्रॅंज' हे घर  निवांत सुट्टी घालवण्यासाठी भाड्याने विकत घेतो. 'टचक्रॉस ग्रॅंज' चा मालक असतो एक म्हातारा. त्याचं नाव असतं 'हेथक्लीफ'. हेथक्लीफ हा या कादंबरीच्या खदखदणाऱ्या लाव्ह्याचे उगमस्थानही आहे आणि अंतिमस्थानही. हा उगम कुठेही जात नाही. कुठेही त्याचे निर्वाण होत नाही. स्वतःमधेच विलीन होत तो खदखदत राहतो. त्या लाव्ह्याच्या  झळीची जाणीव परक्या लॉकवुडही होते. इथे काहीतरी गूढ आहे, विक्षिप्त माणसे आणि  सभ्य वाटणारा आणि तरीही माणूसघाणा, विक्षिप्त म्हातारा 'हेथक्लीफ', आ वासून बसलेले 'वूदरिंग हाईट्स' हे घर या सगळ्याने तो अचंबित होतो. 'टचक्रॉस ग्रॅंज' मध्ये राहिल्याने  'वूदरिंग हाईट्स' बद्धलचे त्याचे कुतूहल वाढत असते. 'वूदरिंग हाईट्स' मध्ये 'हेथक्लीफ' बरोबर राहणारी मितभाषी, पण त्रासलेली सुंदर तरुणी, जवळपासच वावरणारा, अतिफाटका, नोकर नसला तरी नोकराप्रमाणे दिसणारा तरुण या घरातल्या सदस्यांबद्धल लॉकवुडला कुतूहल वाटते. त्यातूनच एकदा घरभाड्याविषयी 'हेथक्लीफ'शी बोलणी करण्यासाठी तो 'वूदरिंग हाईट्स' मध्ये येतो त्यावेळी  अचानक झालेल्या बर्फाच्या वाधळामूळे त्याला तिथेच रात्र काढणे भाग होऊन बसते. पण 'हेथक्लीफ' किंवा इतर कुणीही त्याला तिथे राहण्याचा आग्रह सोडा पण साधा औपचारिकपणा म्हणून 'राहा' असे म्हणत नाहीत. शेवटी वाधळ थांबण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत  तेव्हा नाईलाजानेच 'हेथक्लीफ' त्याला राहण्याची परवानगी देतो. जिथे लॉकवुड राहतो त्या खोलीत त्याला झोप येत नाही, मग तो खोलीत इकडेतिकडे काहीतरी धुंडाळत बसतो, त्या जागी त्याला काही पुस्तकं आणि त्यावरची 'कॅथरीन' या नावाची ग्राफिटी सापडते. ही 'कॅथरीन' कोण हे त्याला समजत नाही. रात्री झोपेत त्याला एक स्त्री ('कॅथरीन') खिडकीतून आत शिरत असल्याचे दिसते, अथवा भास होतो आणि त्याच्या भीतीपूर्ण रुदनाने जागा होऊन  'हेथक्लीफ' धावत येतो. 'कॅथरीन' खिडकीतून आत आल्याचे सांगताच  'हेथक्लीफ' तिला वेड्यासारखा शोधतो आणि तिला परत येण्याच्या विनवण्या करतो.  लॉकवुडला स्वतःच्या खोलीत पाठवून तो स्वतः तिथे  'कॅथरीन'च्या येण्याची वाट बघत बसतो. हे गौडबंगाल काय आहे हे लॉकवुडला कळत नाही, तो जेव्हा दुसऱ्या दिवशी 'टचक्रॉस ग्रॅंज' ला परत येतो तेव्हा त्याबद्धल नेली डीनला विचारतो. मग नेली डीन त्याला जी कहाणी सांगते तीच ही कादंबरी.

ही कहाणी आहे 'हेथक्लीफ'च्या विलक्षण तीव्र अशा प्रेमभावनेची, तितक्याच विलक्षण तिटकाऱ्याची, रागाची, सुडाची, नात्यांच्या आणि त्या नात्यांत धुमसणाऱ्या आगीची. आजूबाजूला माळरान, तसेच माळरान आहे मनातही, जीवनातही, कुठेही सावलीचा टिपूस नसलेले. भावनांची विलक्षण तीव्रता आणि त्यामुळे होरपळून निघणारे प्रसंगी राख होणारे जीवन तिथे आहे. ही तीव्रता इतकी दाहक की 'हेथक्लीफ' त्यात जळून राख होतो. स्वतःवर झालेल्या अन्यायामुळे ठेचून निघाल्याने बनलेलं सुडाचं आणि द्वेषाचं अमानवी घुबड त्याच्या मानगुटीवर कायमचं असं ठाण मांडून बसतं की तो स्वतःच त्या घुबडाचा घुत्कार बनतो. सतत सूडाच्या आणि द्वेषाच्या भावनेने त्याच्यातला अतिसंवेदनशील माणूस केव्हाच मरून जातो पण त्या अतिसंवेदनशीलतेचे पडसाद त्याच्यावर पुनःप्रक्षेपित होत राहतात. त्यामुळे तो बनतो : बाहेरून विक्षिप्त, माणूसघाणा आणि आतून अतिशय हळवा,नाजूक, मोडून गेलेला. त्याचा अहं त्याला जगू देत नाही, पश्चातापालाही तूसभर उसंत न मिळावी असा स्वतःच्या आगीत तो शेवटपर्यंत होरपळत राहतो. शेवटी त्याची सुडाची आग त्याच्या म्हाताऱ्या शरीराबरोबर कमी व्हायला बघते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. पश्चाताप झाला तरी तो व्यक्त करायला आणि माफी मागायला कुणीच उरू नये असलं त्याचं प्राक्तन. शेवटी त्या आगीत होरपळतच तो मृत्यूला समोरा जातो. खाणेपिणे सोडून देतो. आणि तीन-चार दिवसांनी 'कॅथरीन' च्या खोलीतच मृत्यू पावलेला आढळतो इतका त्याचा मृत्यू दुर्लक्षित ठरतो.

हेथक्लीफ हा एक अनाथ मुलगा. लहान असताना 'कॅथरीन'चे वडील त्याला आपल्या घरी आणतात. लहानपणापासून 'कॅथरीन'च्या वडिलांचे प्रेम त्याला मिळते. 'कॅथरीन' वर त्याचे अफाट प्रेम. 'कॅथरीन' चे ही त्याच्यावर. दोघेजण लहानपणापासूनचे सवंगडी. त्यामुळे 'कॅथरीन'च्या भावाचा त्याच्यावर रोष. पण 'हेथक्लीफ' शेवटी त्यांच्या घरात वाढलेला पण साधारणपणे घरातला नोकरवर्गाचाच सदस्य. लहानपणी जरी त्याला कॅथरीनच्या वडिलांचे प्रेम मिळते तरी मोठा झाल्यावर आणि विशेषतः त्यांच्या मृत्यूनंतर त्याला आपल्या हीनवर्गाची जाणीव करून दिली जाते. किंवा त्याला स्वतःलाच ती अधिकाधिक जाणवत, भेडसावत  राहते आणि त्याने तो त्रस्त होतो.  विशेषतः कॅथरीनच्या भावाकडून, जो त्याचा लहानपणापासून 'वडिलांच्या प्रेमातील अपात्र वाटेकरी' म्हणूनच अपमान करत असतो. जेव्हा हेथक्लीफला हे कळते की आपण जिच्यावर प्राणांपेक्षा अधिक प्रेम केले ती 'कॅथरीन' देखील लग्न करण्याचा निर्णय घेताना हेथक्लीफच्या हीनवर्गातील असण्याचा त्याचा उल्लेख करते तेव्हा तो उद्विग्न होतो आणि तिथून निघून कायमचा जातो. कॅथरीनला शेवटी मानमरातब,उच्चस्तर यांचा विचार करावा लागतोच. तरीही तिचं  हेथक्लीफवरचं  प्रेम जराही कमी झालेले नसतं. तिचं खरं प्रेम त्याच्यावरच असतं. पण ती 'टचक्रॉस ग्रॅंज' च्या श्रीमंत मुलाशी लग्न करून आपल्या अधिकाराचा उपयोग हेथक्लीफसाठीच करण्याच्या विचाराने श्रीमंत मुलाला होकार देते. हेथक्लीफ आपली दुविधा समजेल अशी तिला आशा असावी पण हेथक्लीफच्या जाण्याने तिच्याही आशेवर पाणी पडते, विश्वासाला तडा जातो आणि ती सैरभैर होते , आजारी पडते. कॅथरीनच्या लग्नानंतर सहा महिन्यांनी हेथक्लीफ परत येतो तो एक श्रीमंत उमराव बनून. पण तो पूर्वीचा हेथक्लीफ राहिलेला नसतो. तो फक्त सुडाने पेटलेला एक ज्वालामुखी झालेला असतो आणि त्याच्या आगीत कॅथरीनच काय पण कॅथरीनचं पूर्ण कुटुंब, टचक्रॉस ग्रॅंजचं पूर्ण कुटुंब, होरपळून निघतं. कॅथरीन, तिचा भाऊ, कॅथरीनचा नवरा, त्याची बहीण हे सर्वच त्या सूडाच्या आगीत नष्ट होतात. एवढेच नव्हे तर हेथक्लीफच्या द्वेषाच्या आणि सूडाच्या दुष्टचक्रातून पुढच्या पिढीचीही सुटका होत नाही. त्याची सूडबुद्धी त्याला कॅथरीनची मुलगी, कॅथरीनच्या भावाचा मुलगा इतकंच काय स्वतःचा (हेथक्लीफ सूडबुद्धीनेच कॅथरीनच्या नवऱ्याच्या बहिणीला फशी पासून तिच्याशी लग्न करून तिलाही उध्वस्त करतो, त्यातूनच जन्माला आलेला मुलगा) मुलगा यांनाही आपल्या आगीत ओढून घेते. शेवटी उरतात कॅथरीनची विधवा मुलगी आणि नोकर बनून राहिलेला 'वूदरिंग हाईट्स' चा खरा वारस, कॅथरीनच्या भावाचा मुलगा.

या सर्वांमध्ये जीवघेणी गोष्ट आहे ती एमिलीची कादंबरी लिहिण्याची पद्धत. एमिली किती अलौकिक प्रतिभा घेऊन आली होती याचा प्रत्यय या कादंबरीत येतो. इतक्या सूक्ष्म पद्धतीने तिने मांडलेली नात्यांची, मानवी - अमानवी भावनांची गुंतागुंत फक्त मोजक्या प्रतिभाशाली लेखकांना मांडता आली असेल.
ही कादंबरी जेव्हा पहिल्यांदा १८४७ मध्ये प्रकाशित झाली तेव्हा तिने वाचकांत एवढी खळबळ माजवली की अशी अनैतिक वागणारी, कसलीही भीडभाड न ठेवता वागणारी माणसं, सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करणारी ही कहाणी , आणि तेवढेच तप्त, अतिशय भयंकर असे संपूर्ण कहाणीचे कथन, कसं काय लिहिलं गेलं याबदल वाचक स्थिमित झाले. या कादंबरीत पदोपदी शब्दांची तीक्ष्ण धारेची पाती लखलखत राहतात. वाचताना वाटते की हे सर्व कसं लिहू शकलं कोणी? कसं लिहू शकतं?
एका समीक्षकाने तर म्हटलं आहे की ही कादंबरी लिहिताना, त्याचे कथानक, त्यातली पात्रे जगताना लेखकाने आत्महत्या कशी केली नाही? इतकं हे कथानक ज्वलंत आहे. माणसाच्या अंतरंगाची एवढी खोलवर जाण या कादंबरीत आहे की काहीवेळेला तिच्यातील प्रसंग, माणसांची वर्तनं, त्यांचे संभाषण, त्यांचे जीवन, हे सर्व ज्या पद्धतीने लिहिले आहे ते शब्दांचे जंजाळ आपल्या पायांना गुंतवत-गुंतवत आपल्याला खोल आतमध्ये ओढून घेते. शब्दांच्या सामर्थ्याने आणि एमिलीच्या लेखनाच्या विशिष्ट शैलीने डोळे दिपतात.

हि एकच कादंबरी लिहून एमिली ब्रॉन्टेने जगाचा निरोप घेतला. पण या एकाच कादंबरीने ती साहित्यविश्वात अजरामर झाली. ही विलक्षण कादंबरी लिहिणारी एमिली स्वतःही एका गुढापेक्षा कमी नव्हती. तिचं जीवन अत्यंत विरक्त, एकटं होतं. तिच्या मृत्यूनंतर विशेषतः या कादंबरीच्या प्रकाशनानंतर ती स्वतःच अनेक पुस्तकांचा विषय बनली, अनेकांनी तिच्या गूढ व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर आणि तिच्या भावंडांवर  'डिव्होशन' नावाचा एक चित्रपटही काढला गेला. अनेक डॉक्युमेंटरीज बनवल्या गेल्या. आजही तिची कादंबरी आपल्या अढळ स्थानापासून हललेली नाही. एमिली आणि तिची भावंडं यांचं खडतर जीवन आणि एमिलीच्या भावाची आणि त्यापाठोपाठ एमिलीचीही झालेली शोकांतिका सदैव गुढाने भरलेली राहतील. एमिली ही प्रतिभेचे देणे(की शाप?) लाभलेली एक अतिसंवेदनशील लेखक. जी. एं. ना एमिलीविषयी विलक्षण आदर होता, तिचा 'डिव्होशन' चित्रपट त्यांना अत्यंत व्याकुळ करून गेला होता. तिच्याविषयी आणि तिने व्यथित केलेल्या आयुष्याविषयी त्यांनी आपल्या अनेक पत्रांतून लिहिलं आहे. एमिली इंग्लंडमधील यॉर्कशायरच्या 'हॉवर्थ पार्सनेज' नावाच्या, एकाकी, गडद उदासीचे सावट असलेल्या एका छोट्याश्या खेडेगावात राहत असे. आई गेल्यानंतर ही लहान लहान असलेली भावंडंच एकमेकांचे आधार बनली होती. सहा भावंडातील फक्त तिघी बहिणी(एमिली, शार्लेट, ऍनी) आणि एक भाऊ एवढेच वाचले. एकमेकांना धरूनच ती मोठी झाली. त्यामुळे भावंडात घट्ट प्रेम होते. पण तसे असले तरी एमिली अबोल, एकाकीच राहिली. आपल्या दारुड्या आणि उदासीचा शिकार बनलेल्या भावाची ती पाठराखीण झाली. दुःखाचे सावट सदैव माथ्यावर असलेल्या एमिलीला जवळच्या मूरलॅंड्स या विस्तीर्ण पठारांवर शांती मिळत असे. ती दूरदूर आपल्या आवडत्या कुत्र्याला घेऊन या भयाण, एकाकी पठारांवर फिरत असे. तेच तिचे खरे साथी होते. या मूरलॅंड्सवर(माळरानावर) फिरतानाच तिला दूरच्या टेकाडावर एक घर दिसले आणि त्यातूनच या कादंबरीतील 'वूदरिंग हाईट्स' ची कल्पना तिला सुचली. एमिली एकाकी होती पण तिचे मन सवेंदनशील आणि प्रवाही होते, कल्पनारम्य (highly imaginative) होते. तिच्या प्रतिभेने तिने स्वतः जगलेल्या, अनुभवलेल्या आणि सहन केलेल्या अनेक परिस्थितींचे, तिच्या मनात चाललेल्या सूक्ष्म भावनांचे, संघर्षांचे मूर्त स्वरूप या कादंबरीत प्रकट केले. पण प्रश्न असा पडतो की 'हेथक्लीफ' हे जहाल /अमानवी वाटण्याइतपतच्या तीव्र भावनांनी वेढलेले, विलक्षण गुंतागुंतीचे आणि तरीही शेवटी  माणूसच  असलेले पात्र तिने कसे उभे केले, तिने तिच्या स्वतःच्या आयुष्यात हे पात्र कुठे बघितले, अनुभवले होते? यावर काही अभ्यासकांचे असेही म्हणणे आहे की 'हेथक्लीफ' हे एमिलीचे स्वतःचेच अंतरंग आहेत. ते तिचेच तिने उभे केलेले रूप आहे. नाहीतर एवढं तापदायक, ज्वलंत, धगधगीत हेथक्लीफचं आयुष्य ती कुठून आणू शकली असती? ते तिचंच passionate रूप आहे. दुर्दैवाने ज्या पद्धतीने 'हेथक्लीफ' चा अंत झाला आहे, काही तश्याच पद्धतीने एमिलीचाही अंत झाला. तिच्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या दफनविधीच्या वेळी तिला थंडी वाजू लागली. नंतर ताप भरला, त्याचे रूपांतर क्षयात झाले पण कुठचाही वैद्यकीय उपचार घेण्यास एमिलीने नकार दिला. शेवटी जेव्हा ती मृत्यूशैय्येवर असल्याचे तिला जाणवले तेव्हा ती म्हणाली 'आता डॉक्टरना भेटायला मी तयार आहे'.

एमिलीचे आयुष्य चटका लावणारे आहे आणि तशीच तिची हि ''वूदरिंग हाईट्स' ही चटका लावणारी आहे. तिची दोघांची धग वर्षानुवर्षे मनात जाणवत राहते.  

जी. ए कुलकर्णी हे एमिलीच्या लेखनाचे चाहते होतेच पण एमिलीची एक निस्सीम चाहती होती मराठी लेखिका तारा वनारसे. 'तीळा तीळा दार उघड' या पुस्तकात त्यांनी एमिलीला अर्पण केलेला 'हॉवर्थच्या परिसरात' हा लेख लिहिला आहे. त्या आपल्या आवडत्या लेखिकेसाठी, 'वूदरिंग हाईट्स' मधील अफाट पसरलेला मूरलॅंडचा एकांत अनुभवण्यासाठी हॉवर्थला गेल्या होत्या. जाताना हॉवर्थच्या जवळपास पोचताच तेथील बदलेल्या वातावरणाला बघून त्या उदास झाल्या. त्या लिहितात :' माझी अपेक्षा काही वेगळीच होती. हॉवर्थच्या इतकं जवळ आल्यानंतर तरी - पण माझ्या मनातला तो उत्तुंग, वैराण प्रदेश कुठे आहे? क्षितिजापर्यंत भिडणारी ती मूर्स - ते जांभळं हेदर - हॉवर्थच्या वाटेवर त्याचं ओझरतं तरी दर्शन व्हायला हवं होतं. त्याऐवजी हे नुसतंच घराचं आणि धुराचं कुरूप जंगल. ... 'एकतर कल्पनेला मोकाट सोडायचं आणि वर कल्पनेतल्या विश्वाचा प्रत्यक्षात पडताळा पाहण्याचा हव्यास बाळगायचा. विसावं शतक अर्धं उलटून गेलं आणि मी सव्वाशे वर्षांपूर्वीचं जग शोधू पाहतेय.'  पण पुढे गेल्यावर जशी शहराची गजबज संपून हॉवर्थचा खरा परिसर सुरु झाला तेव्हा त्यांना  चराचरात व्यापून राहिलेल्या एमिलीला भेटता आलं, अनुभवता आलं. तो अनुभव त्यांनी अतिशय तरलतेने या लेखात मांडला आहे. तारा वनारसे एमिलीच्या कविताही खऱ्या अर्थाने जगल्या होत्या. हॉवर्थच्या चर्चमधील एमिलीच्या मृत्युलेखाकडे बघून त्यांना एमिलीची कविता आठवते, त्या लिहितात , 'अवघ्या एकविसाव्या वर्षी एमिली हे लिहून गेली :

And If I pray, the only prayer
That moves my lips for me
Is - 'Leave the heart that now I bear
and give me liberty'

शरीराच्या बेड्या तिला असह्य झाल्या होत्या, त्या बंधनातून सुटण्याचा ध्यास तिला लागून राहिला होता. त्याच कवितेत ती पुढे म्हणते:

'Yes, as my swift days near their goal
'Tis all that I implore -
Through life and death , o chainless soul
with courage to endure

तारा वनारसे यांनी दिलेलं तिच्या कवितांचं आकलनही वाचण्यासारखं आहे: 'अगदी अबोल आणि एकाकी अशा या मुलीनं आपल्या आयुष्यात अशी काही निर्भेळ एकसंधता आणि निर्व्याज सचोटी राखली की ती एखाद्या अवलियालाही साधू नये. जीवनाशी तर राहूच देत पण मरणाशीही तडजोड करण्याचं तिनं नाकारलं. आयुष्याच्या शेवटी लिहिलेल्या कवितेत ती म्हणते :

No coward soul is mine
No trembler in the world's storm-troubled sphere
अंतःस्थ प्रचितीचा पीळ तिच्या शब्दांमागे आहे.
O God within my breast
Almighty ever present deity
Life that within me hast rest
As I undying life , have power in thee
...
There is not room for death
Nor atom that his might could render void
Since thou art Being and Breath
And what thou art may never be destroyed

'असं सांगतात की एमिली कित्येकदा आपलं लिहिण्याचं डेस्क घेऊन बाहेर बागेत जाई. एखाद्या झाडाच्या सावलीत बसून तासंतास लिहीत राहत असे. 'वूदरिंग हाईट्सचा बराचसा भाग तिने असा मोकळ्यावर लिहून काढला. हॉवर्थ पार्सनेजच्या आसपास असलेल्या कित्येक झाडावेलींचा उल्लेख तिच्या लेखनात येतो.'

तारा वनारसे यांचा हा लेख अतिशय सुंदर आहे आणि तो वाचून आपल्याही वाटतं की एकदा त्या विस्तीर्ण, अफाट पसरलेल्या 'मूर्स' च्या माळरानावर भटकावं. सोबतीला कुत्रा घेऊन  आणि हृदयात निखारे घेऊन एकट्याच फिरणाऱ्या त्या एकमेवाद्वितीय एमिलीला भेटावं. पण नकोच ते. सहन होईल की नाही सांगता यायचं नाही.

दुपारी हे लिहुन पूर्ण झालं. पण त्या रात्री बराच वेळ झोप आली नाही. सारखं ते सकाळचं दृश्य डोळ्यासमोर येत राहिलं. तो भयानक काळा कावळा आणि त्याच्या तावडीत सापडलेलं ते चिमणीचं पिल्लू. कावळ्याने त्या कोवळ्या जीवावर कशी निर्दय झडप घातली. पण निर्दय कोण? कठोर निर्विकार कोण? ते ठरवता येऊ शकत नव्हतं.  पण सतत तेच दिसत राहिलं , त्याबरोबर हृदय फाटून चिंधड्या होतंच राहिल्या. ती लख्तरं मी वेचत राहिले. झोप आलीच नाही आणि थोड्या वेळाने दुपारीच जिच्यावर लिहिलं ती एमिली समोर आली. एकदम लिंक लागली. एमिलीच नव्हे  का ती चिमणी? आणि कावळा म्हणजे तिला मिळालेलं आयुष्य. आणि जसं खऱ्या दृश्याला बघून असहाय वाटलं, अगदी तसंच असहाय वाटलं. काही क्षण. त्यानंतर जसं सकाळी ते खरंखुरं दृश्य बघून, काही क्षण असहाय वाटून , चिंधड्या झालेलं मन सावरत मी पुन्हा  खऱ्या आयुष्यात पुढे चालू लागले अगदी त्याचप्रमाणे मला झोप लागली. असहाय कोण? निर्दय कोण ? कठोर कोण? आणि निर्विकार कोण हे प्रश्न झोपेत विरून गेले. 

कंपोझिशन

आज, चौतिसाव्या वर्षी, आठ महिन्यानंतर
आणि सहा दिवसांनी विचार करत आहे
काय आहे माझं कंपोझिशन

रंग, रेषा , आकार, पोत सगळं ठीकठाक?
नाक, कान, डोळे , तोंड आहेत का जिथेच्या तिथे?
की सोडली आहे त्यांनी आपली वाट

मेंदूच्या आकाराला त्रिमित स्वरूप नाही
मणक्यातली स्पेस कमी होऊन
बॅलन्स उरलाय का काही ?

किती जुनी कॅलेंडरं रचून ठेवलीयत ड्रॉवरात
किती कॅल्शियम
उरलंय हातात

काय आठवतंय?
संध्याकाळचं गावच्या घरचं पाठल्यादार
तिथलं, हिरवं गंजलेलं बारीक जाळीचं कपाट

आणखी बरंच काही
मग फास्ट फॉरवर्ड, काहीच दिसत नाही
धावतंय, धावतंय रीळ, वेगाने तुटेल की काय?

जागा, घरं, दारं, खिडक्या कोलमडतायत
एकामागून एक,
भुईसपाट होतायत

हसणं कुणाचं , कुणाचं रडणं, भांडणं-तंडणं
टीव्ही ओनिडाचा, संध्याकाळचा सींधी बटाटावडा
सगळं आज गेलंय कुठे?

काय शिकलेय? कमवायला? नाही
शिकवायला? नाही
शिकायला? नाही

उठून उभं राहायला ? नाही
शांत बसायला? नाही
जगायला? हो की नाही ?

चट्कन डोळ्यांपुढे आंधारी(भोवळ) येते
पण त्यातही मला स्पष्ट दिसते
गॅसवरचं दूध फ्रिजमध्ये ठेवायचंय

कालचे वॉशिंगमशीन मधले कपडे तसेच पडलेत
कपाट लावायचंय, बघायचंय किती कपडे
विरलेत, किती फाटलेत, किती आहेत नवेपणाचा वास घेऊन  

Wednesday 19 October 2016

दोन अज्ञात

जपानी काबुकी डान्सर

जेव्हा नोकरी सोडून घरातील वास्तव्य वाढले तेव्हा खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या mangrove (खारफुटी)कडे माझे लक्ष गेले. तिथे आणि त्याच्या बाजूलाच असणाऱ्या लहानशा टेकडीवर दाटीवाटीने वाढलेल्या झाडांत अनेक पक्ष्यांची हालचाल नेहमी दिसायची. लालबुड्या बुलबुल, मैना, खंड्या, हळद्या, राखी बगळा, पॉण्ड हेरॉन, कोतवाल, घार, ब्राह्मणी घार असे पक्षी अधून मधून दिसत. पण बाकीचे अनेक छोटे पक्षी जे या खारफुटीच्या झुडपात राहतात ते मात्र क्वचितच दिसत. त्यांचे आवाज मात्र ऐकायला येत. त्यातला एक अतिशय मोहक आणि लक्षात राहणारा आवाज होता 'टीट-टी-टी  SSSSSSS टीटी SSS टीटी SSS टीटी टी SSS'  
ही शीळ  बऱ्याचदा पूर्ण ऐकू येई, पण काही वेळेला अर्धी पण ऐकू येई. या शिळीचे अनेक प्रकारही ऐकू येत. हा असा सुरेल शिळा घालणारा आणि त्यातही व्हेरीअशन करू पाहणारा कोण हा बीथोवेनचा वारशी? म्हणून त्या अज्ञात पक्ष्याचे नाव मी 'बीथोवेन' ठेवले होते. पक्षी कधीच दिसला नाही. दहाव्या मजल्यावरून दिसणार तरी कसा म्हणा? पण मला नेहमी त्याचा आवाज ऐकला की तो कुठला पक्षी असेल हे शोधावेसे वाटे. पण शोधायचे कसे?  जेव्हा जेव्हा तो आवाज कानावर पडे तेव्हा मी मनात त्या पक्ष्यालाच उद्देशून म्हणत असे 'आज ना उद्या नक्कीच शोधून काढेन मी तू कोण आहेस ते.' माझे पक्ष्यांबद्धलचे फक्त कुतूहल जास्त आणि अज्ञान त्याहूनही जास्त, त्यामुळे शोधायचे कुठे आणि विचारायचे कुणाला आणि कसे? आवाज रेकॉर्ड करून कुणा पक्षी-निरीक्षकाला ऐकवता आला असता पण तेव्हा पक्षीनिरीक्षण आणि पक्षीनिरीक्षक या दोहोंबाबतीत ज्ञान अत्यल्पच होते. म्हणून हा आवाज हुडकणे बाजूलाच राहिले. दोन अडीज वर्षं तरी त्याचा काहीच पत्ता लागला नाही. जवळपास त्या आवाजाचा काहीही पाठपुरावा न करता, कुठचाही खटाटोप न करता मी गप्प बसून राहिले तो आवाज ऐकत. सकाळी बऱ्याचदा ऐकू येई, अधेमधे कधीही ऐकू येई आणि काही काही दिवस, महिने महिने त्याचा आवाज नसे. मी त्या आवाजाला अनुसरून त्या अज्ञात पक्ष्याचे एक चित्र मनात बांधले. माझ्या मनातल्या चित्रात तो पक्षी म्हणजे एक खूप छोटा, पिवळ्या निळ्या रंगाचा आणि कुणीतरी गायनाचा पंडित असावा त्याप्रमाणे डोक्यावर तुरा असणारा होता. जेव्हा काही काळ त्याचा आवाज ऐकू येत नसे तेव्हा मला वाटे कि बहुतेक आता ऐटीत फांदीवर बसून तो सुरांची छान रचना बनवत असेल. आणि त्या सुरावटी बांधण्यातच तो गर्क असेल. मग जेव्हा त्याची सुरावट बांधून होई तेव्हाच तो रियाज करत असेल. किंवा नवीन चीजा शिकण्यासाठी खारफुटीचे रान सोडून आपल्या गुरुकडे साधना करण्यासाठीदेखील गेला असेल. मोठा पंडितच गाण्यातला. त्याची नेहमीची 'टीट-टी-टी  SSSSSSS टीटी SSS टीटी SSS टीटी टी SSS' ही शीळ  तो वेगवेगळ्या व्हेरिएशनने ऐकवत असे.

शेवटी एकदाचा या सुरेल आवाजाचा गायक समोर आला. मी कोकणात गेले असताना, घराच्या देवखोलीतून समोरच्या आंब्याच्या झाडावर हालचाल दिसली म्हणून बघितलं तर एक सुमार दिसणारा चिमणीएवढा काळसर, पोटाकडे पांढरट, पण अतिशय सुरेख जपानी पंख्यासारखी शेपटी असलेला पक्षी या फांदीवरून त्या फांदीवर टणाटण उडया मारीत होता.  पायावर नक्षत्र पडल्यासारखा नुसता इथून तिथे नाचत, फुदकत होता, काही सेकंदातच तो नजरेआड झाला. त्या झाडावरून दुसऱ्या, तिसऱ्या झाडावर पसार झाला. हाच तो  'बीथोवेन' हे काही मला तेव्हा कळले नाही. पण दूर गेल्यानंतर तीच नेहमीची शीळ ऐकू आली. तेव्हा चटकन डोक्यात प्रकाश पडला की खारफुटीतला 'बीथोवेन' इथे पण आहे. मग मी कान देऊन परत ती शीळ ऐकू येते का ते बघत राहिले. अनेक दिवस त्या आवाजाच्या दिशेने धावू लागले. त्याला पकडणे आता शक्य होते कारण घर जमनीलगत, झाडांच्या आसपास असल्याने कुणी असलाच आवाज करत तर चटकन त्या आवाजाच्या दिशेने हुडकले की पक्षी दिसू शकणार होता. म्हणून आवाजावर नजर ठेऊन होते पण तो आवाज अजूनही हुलकावण्या देतच होता. पक्षी काही समोर आला नाही. 

एक दिवस समोरच्या जांभळीच्या झाडावर आलेली हरेवा या पक्ष्याची जोडी कॅमेराबंद करण्यासाठी घराच्या टेरेसवर दबा धरून बसले होते, तेव्हा त्यांच्या camouflage करणाऱ्या हिरव्या रंगामुळे त्यांना हुडकताच येत नव्हते म्हणून आणि उन्हाच्या माऱ्यामुळे बेजार झाले होते. तेव्हा अचानक तीच नेहमीची शीळ समोरच्या झाडावर ऐकू आली. ऊन अगदी समोरून डोळ्यावर पडत होतं आणि त्या उन्हाने आंब्याची फांदी देखील काळसर दिसत होती तेव्हा नाचत नाचत जपानी पंखा फुलवत तो पक्षी त्या फांदीवर अवतरला. हरेवा नाही तर नाही याला तरी कॅमेराबंद करूया म्हणून मी झटकन त्याला कॅमेऱ्याने टिपले. कॅमेऱ्यात त्याची silhouette च दिसत होती. तर तीच शीळ तो घालू लागला. मी खात्री करून घेण्यासाठी कॅमेऱ्यातून त्याच्याकडे बघतले, तोच होता शीळ घालत. 'अरे चोरा ! तूच काय तो बीथोवेन!' असे म्हणून मी कपाळाला हात लावला. तूच काय तो स्वरांची बांधणी करणारा, सुरेख आवाज काढणारा. कुठे तो पिवळा-निळा राजेशाही तुरा असलेला तानसेन मी योजला होता आणि तू एकदम त्याच्या विरुद्ध निघालास. पण दिसण्यास अगदीच काही सुमार नाहीस! छानच आहेस! किंबहुना जपानी किमोनो घालून जपानी पंखा फिरवीत नाचणारा काबुकी डान्सरच वाटतोस! 
 


माझ्याकडचा तुझा फोटो तेवढा छान नाही पण इतर तुझे फोटो बघितले तेव्हा समजले खरा कलाकार-गायक आणि नर्तक वाटतोस खरा. तुझ्या गाण्यापेक्षा तुझं नाचणंच वाखाणलं गेलंय पण! त्यावरूनच तुला नाचण, नाचरा, नर्तक म्हणतात. 
तर असा मला या अज्ञात 'बीथोवेन' चा शोध लागला. ज्याला मी बीथोवेन समजत होते तो होता नाचण्यात निपुण , त्याचं  नाव नाचरा किंवा व्हाईट स्पॉटटेड फॅनटेल (Rhipidura albogularis, ऱ्हिपिड्युरा आल्बोग्युलॅरीस). 


हवेत भिरभिरत जाणारं गवताचं पातं 

'पक्षी आपले सख्खे शेजारी' या किरण पुरंदरे यांच्या पुस्तकात एका पक्ष्याबाबत त्यांनी लिहिलंय 'त्या काळात (भरपूर पाऊस सुरु होऊन सगळीकडे हिरवंगार झालं असलं की ) मला लोकांचे लांबलचक हिरव्या रंगाची शेपूट असलेला पक्षी पाहिल्याचे फोन येत.' 

हे वाचल्यावर एकदम कसलीतरी लिंक लागली आणि आनंदाने चेहरा उजळला. मी अनेक दिवस शोधत होते तो हा! ' ठिपकेवाला मुनिया' 

हे हिरव्या रंगाचं लांब शेपूट मला आमच्या दहाव्या मजल्याच्या खिडकीतून वारंवार दिसलं  होतं. पुढे नुसता एक चॉकलेटी भुरभुरणारा कापसाचा गोंडा, आणि मागे लांब हिरवी केवढीतरी शेपटी. मी याला इतक्यांदा बघितले कि असा विचित्र पक्षी असूच शकत नाही असेच मला वाटले आणि तो पक्षी नसून कोणीतरी मोठ्ठा किडा आहे असेही मला वाटले. मुख्य म्हणजे सकाळच्या वेळी बाहेर पाहत असताना चटकन ते हिरवं लांबलचक पातं उडताना दिसे. तेव्हा काय असेल ही  विचित्र गोष्ट? कित्येकदा मी ते भिरभिरतं पातं दिसलं की इतरांना दाखवायला जाई पण तोपर्यंत सुसाट वेगाने भिरभिरत ते नाहीसं होई आणि ते काय आहे याच्या रहस्याचा उलघडा होत नसे. खरोखरच पाहणाऱ्याला ते असे काही दिसते की माहित नसेल तर क्षणभर तो अचंबित होऊन बघतच राहील कि हे आहे तरी काय? कसला किडा आहे का एवढा मोठा ज्याला पानाची शेपटी उगवलीय.  पण किडा एवढ्या झाडांच्या उंचीवरून उडेल का? हा कुठला राक्षसी किडा असेल? असाच विचार मनात येईल. 

शेवटी त्या भिरभिरणाऱ्या विचित्र गवताच्या पात्याचा शोध किरण पुरंदरे यांच्या पुस्तकात लागला. हाच तो ठिपकेवाला मुनिया. त्यांनी लिहिलं आहे 'जरा डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा. साधारण चिमणीचं पिल्लू वाटावं एवढ्या आकाराचा चॉकलेटी रंगाचा मुनिया आकाशात उडतोय आणि त्याने चोचीत धरलेलं हिरवं पातं वाऱ्यावर भुरभुरतंय!' तेव्हाच डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला दिसणारी वाऱ्यावर भिरभिणारी हिरवी लांबलचक शेपटी आणि पुढे उडणारा चॉकलेटी गोंडा म्हणजे हाच 'ठिपकेवाला मुनिया'. ठिपकेवाला मुनिया गवताच्या पात्यांपासून आपलं घरटं बांधतो. आणि पावसाच्या दिवसात हिरवीगार गवताची पाती लांबलचक वाढली की हा त्यांना खुडून घरटं बांधण्यासाठी ये-जा करू लागतो. स्वतःच्या आकारापेक्षा मोठी पाती घेऊन उडण्यामुळेच तो असा मजेशीर दिसतो.  याचा एक भाऊबंद अशाच उचापती  करताना मी अगदी बघितला आहे. त्याचं नाव व्हाईट रम्पड मुनिया (पांढऱ्या पुठ्ठयाची मनोली). हा देखील असाच घर बांधण्याच्या उद्योगात हिरव्यागार गवताचे तुरे, विशेषतः ग्रे लव्हग्रास चे मोठे मोठे फुललेले तुरे खुडून घेऊन जात होता. त्याला अनेकदा जवळून पाहताना तो इतका मजेशीर दिसायचा की एकदा तर मला मोरासारखा पिसाऱ्याचा जुडगा असलेला कुणीतरी दुसराच पक्षी आहे असे वाटले. हा देखील गवतात सारखा ये-जा करत राहतो आणि ग्रे लव्हग्रास चे तुरे, काड्या खुडून स्वतःच्या आकारापेक्षा मोठा भर चोचीने उचलून झाडावरच्या घरट्यापर्यंत घेऊन जातो. पण याला मी बरंच जवळून पाहिलं त्यामुळे माझी ठिपकेवाल्याच्या बाबतीत झाली तशी फसगत झाली नाही. 

                               ठिपकेवाला मुनिया (विकिपीडियाच्या सौजन्याने), पांढऱ्या पुठ्ठयाचा मुनिया                                                             

उडणारं शुष्क पान आणि पुष्प-योगिनी

संजय गांधी नॅशनल पार्कमधे एक छोटीशी वाट आहे. तिला 'शिलोंडा ट्रेल' म्हणतात. रानवाटच आहे ती पण आता माणसाच्या बरीचशी पायाखालून जाणारी. इथे पक्षी बघायला मिळतील म्हणून गेले होते, पण तसा थोडा उशीरच झाला होता, पक्षी फारसे दिसले नाहीत पण दोन गोष्टी दिसल्या ज्या खूपच चित्तवेधक होत्या. निसर्ग हा 'दी जिनिअस आर्टिस्ट', 'दी जिनिअस क्रिएटर' आहे याचा वारंवार प्रत्यय येतच असतो त्यातीलच आलेला हा आणखी एक प्रत्यय. 'दी जिनिअस आर्टिस्ट' यातला 'दी' महत्वाचा. त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही. पण निसर्ग इतका नम्र निर्माता आहे, की कधीही आपल्या निर्मितीचे प्रदर्शन तो करीत नाही. तुम्ही जर त्याला भेटायला गेलात, त्याच्याशी संवाद साधलात तरच तो आपल्या निर्मितीची रहस्य थोडीफार उलघडून दाखवतो. 

त्यातलेच एक म्हणजे 'ब्लु ओकलीफ बटरफ्लाय' हे फुलपाखरू. त्याचं  शास्त्रीय नाव 'Kallimaa horsfieldii'. हे खालच्या फोटोत आहे ते हे फुलपाखरू.
दिसलं का? नाही ना? नाहीच दिसणार. आता पुढच्या फोटोमधे दिसेल.

 
या फुलपाखराचे छान फोटो इथे बघायला मिळतील. याचे Kallima जातीतले इतर भाऊबंद भारतातल्या वेगवेगळ्या भागात आढळतात पण हे फुलपाखरू मात्र फक्त पश्चिमी घाटांत आढळून येतं. सर्वात कोड्यात टाकणारं त्याचं वैशिष्ट्य म्हणजेच त्याचं पंख मिटून camouflage करण्याचं टेक्निक.  हे फुलपाखरू पंख मिटून घेऊन स्वतःला 'सुकलेलं पान' बनवतं. म्हणजे पंख मिटले की ते सुकलेल्या पानासारखं दिसतं. त्यामुळे जर उडताना दिसलं  नसेल तर त्याला झाडावर शोधणं तसं कठीणच आहे. मग जेव्हा कधी ते पंख उघडेल आणि  त्याचा मध्यभागी निळसर आणि टोकाकडे शेंदरी होत जाणारा रंग, पंखांच्या वरच्या बाजूला दिसणारा पांढरा पट्टा आणि त्यावरची काळी महिरप हे सर्व दिसेल तेव्हाच  ते फुलपाखरू आहे हे कळेल. हे फुलपाखरू उडताना फार सुंदर दिसतं.
Mark Alexander Wynter-Blyth नावाच्या निसर्गसंशोधकाच्या 'बटरफ्लाईज ऑफ इंडियन रिजन' या पुस्तकात त्याने म्हटलं आहे की एका ब्लु ओकलीफच्या मिटलेल्या पंखांवरचा पॅटर्न दुसऱ्या ब्लु ओकलीफच्या मिटलेल्या पंखांच्या पॅटर्नशी कधीच जुळत नाही. म्हणजे प्रत्येक पंख मिटलेल्या ब्लु ओकलीफची ओळख वेगळी असते. हवे तेव्हा पंख मिटून, सुकलेल्या पानाचे रूप घेऊन निसर्गात मिसळून जाण्याची त्याची हातोटी खास आहे. 

अनेक वर्षांनी फुलणारी 'पुष्प-योगिनी' कारवी

एखादा संशोधक एखादा शोध लावण्यासाठी किंवा एखादा चित्रकार/शिल्पकार एखादी कलाकृती घडवण्यासाठी जशी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतो तशी ही कारवी आपली फुलं निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे (सात ते दहा वर्षे) कार्यरत असते. वनस्पती का फुलत असतील आणि कश्या फुलत असतील यामागची रहस्य शास्त्रीय कारणांत न शोधात त्या वनस्पतीच्या व्यक्तिमत्वात शोधली पाहिजेत. वनस्पतींचंदेखील एक मानसशास्त्र असलं पाहिजे. त्यानुसार अबोलीचं वेगळं व्यक्तिमत्व, सदाफुलीचं वेगळं, ओसंडून फुलणाऱ्या मोगरीचं वेगळं , तसंच कारवीचंही. वर्षांनुवर्षे आपल्या फुलांसाठी आराधना करणारी कारवी ही फुलणाऱ्या वनस्पतीतील पुष्प-योगिनी असली पाहिजे. सप्टेंबर मध्ये पाऊस सरण्याच्या जवळपास, ती सात ते दहा वर्षांनी एकदा फुलते. मला हि कारवी 'शिलोंडा ट्रेल' मध्ये फुललेली दिसली, फुलांचा बाहेर जवळपास ओसरून गेला होता पण अजूनही एक दोन फुलं होती.



Strobilanthes Callosus हे तिचे शास्त्रीय नाव आहे. ती acanthaceae या कुटुंबातील आहे. हि अडुळसा कुळातील दोन तीन मीटर वाढणारी वनस्पती आहे. हिची पानेही बरीचशी अडुळश्यासारखी असतात. कोकणात अडुळसा विपुल प्रमाणात आढळतो, तिकडे खोकला येणाऱ्या माणसाला सर्रासपणे, अडुळश्याच्या पानं,  तुळशीची पानं, मिरी, चहाची पात आणि कांदा घालून काढा करतात आणि त्यात गूळ मिसळून देतात. सर्दी खोकल्यावर अडुळसा उपकारक आहे, तसे कारवीचे काही औषधी उपयोग आहेत का म्हणून कोकणात वाढलेल्या माझ्या आईलाच विचारले तर 'कारवी म्हणजे काय तेच ठाऊक नाही' असे उत्तर तिने दिले. 'वनश्रीसृष्टी' या डॉ. वि. म. आपटे यांच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे करावी  पश्चिम घाटात विपुल प्रमाणात उगवते. मावळ कोकण आणि उत्तर कारवार ही त्यांची माहेरघरे आहेत. म्हणजे कोकणातही  कारवी उगवत असावी.



'नीस' (Christian Gottifried Daniel Nees von Esenbeck) या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञाने या वनस्पतीचे  प्रथम शास्त्रोक्त वर्गीकरण केले. आदिवासी लोकांत कारवीच्या वाळलेल्या काठ्यांचा उपयोग कुडासाठी(कुंपण किंवा झोपडीच्या आधारासाठी) करतात. तसेच तिची पाने, फुलातला मध यांचाही वापर करतात. कारवीच्या फुलातला मध मधमाश्या गोळा करतात. या मधाला 'कारवीचा मध' म्हणतात. या मधालाही औषधी गुणधर्म आहेत. आदिवासी लोकांच्या औषधांमध्ये कारवीची पाने आणि मधाचा वापर होतो. पण या पानांना वापरण्याची विशिष्ट पद्धत आहे. पानाच्या मागील अंगावर असणाऱ्या शिरांवरची लव काढून टाकली नसेल तर अशी पानं खाऊन पोटात क्षोभ होऊ शकतो. आदिवासींना हे बरोबर ठाऊक असले पाहिजे. मध्यप्रदेशातही कारवी उगवत असून तिला 'मरुआदोना' असे म्हणतात.

या कारवीला इतक्या वर्षातून एकदाच फुलं का येत असावीत? तर यामागचं कारण तिची जडणघडण हे आहे. हि वनस्पती Plietesials या प्रकारच्या वनस्पतींमध्ये मोडणारी आहे. या वनस्पती अनेक वर्ष वाढत राहतात आणि मग एका विशिष्ट वर्षी सगळ्या एकदम ओसंडून फुलतात. फुलण्यानंतर फळ आणि बीजनिर्मितीदेखील एकाच वेळी होते.  त्यांच्या या प्रकारच्या बीजप्रक्रियेला masting (synchronous production of flowers and seeds)  म्हणतात. फळं मातीत पडून राहतात आणि पुढच्या पावसाळ्यात फुटून रुजतात. रानोमाळ जिथे कारवी फुललेली असेल तिथे पुढच्या पावसाळ्यात फळे फुटण्याचा एकत्रित आवाज होतो. या Plietesials वनस्पतींमधे अश्या काही प्रजाती आहेत ज्या monocarpic आहेत(reproduce once and die) आणि एकदा फुलल्या-फळल्यानंतर या वनस्पती एकत्रितपणे नष्ट होतात. अश्या विपुल फुलल्या-फळल्या नंतर नष्ट होऊन जाण्यामागे देखील काहीतरी genetic प्रेरणा असली पाहिजे.  म्हणजे उत्स्फूर्त निर्मिती नंतर आत्मनाश करून घेणारे निसर्गाचे हे छोटे छोटे सहाय्यक कलाकारच  आहेत असे म्हणायला पाहिजे.

निसर्गातील या दोन विलक्षण गोष्टी. मला या गोष्टी बघून आणखीही काही प्रश्न पडले, जसे 'ओकलीफ बटरफ्लाय' ला 'ओकलीफ' नाव का पडलं? 'ओक'च्या झाडाची पानं तर मुळीच या फुलपाखराच्या मिटलेल्या पंखांच्या आकारासारखी दिसत नाहीत. मग 'ओकलीफ' हे का? आणि कारवीचा आदीवासी लोकं आणखी कसा वापर करत असतील आणि कारवीवर त्यांच्या काही लोककथा, अनुभव आणि आख्यायिका असतील का?  

Friday 7 October 2016

शांत, स्तब्ध, एकांतप्रिय व्याध


पावसाळी संध्याकाळ.  दूर एका पेंडराच्या झाडाच्या शिखरावरील पर्णहीन डेळक्यावर एक पक्षी बसून होता. इतक्या दूर असूनही तो बऱ्यापैकी मोठा दिसत होता. म्हणजे प्रत्यक्षात किती मोठा असेल याचा अंदाज बांधत मी घराच्या अंगणातून त्याला न्याहाळत होते. काही कामामुळे मी घरात गेले आणि पुन्हा येऊन बघते तर तो गायब झाला होता. त्यानंतरच्या अनेक संध्याकाळी मी त्या झाडाकडे पाहीले पण तो दिसला नाही. तो बहुदा गरुड असावा असे माझ्या अज्ञानी मनाला वाटले. 'गरुड'. कुणाला ठाऊक नसतो हा पक्षी? कुठचाही मोठा पक्षी दिसला की 'गरुड' च नाव मनात येते. हा पण गरुडच असावा का? पुन्हा दिसावा म्हणून मनोमन त्याची प्रतीक्षा केली. गणपतीचे दिवस होते. गावच्या आमच्या घरात त्या दिवसात खूप गजबज होती. एका दिवशी, सकाळचा जवळच्या झाडावर बसलेला तो, घराच्या पोर्चमधून मला दिसला. इतरांनाही दाखवला. केवढा मोठं आहे! एवढा मोठा कोण हा पक्षी? प्रत्येकाने म्हटले पण तो नक्की कोण असेल त्याबद्धल कुणालाच माहित नव्हते. पाऊस नव्हता, चांगले ऊन होते. बराच वेळ तो पक्षी झाडावरच बसून होता.

साधारण अकराच्या दरम्यान कुठूनसा एक पिसांचा लोट सळसळत उंच झाडांच्या वर आभाळात उडताना दादाला दिसला. तो चटकन हात दाखवत म्हणाला 'अरे मोर मोर!' त्या दिशेला तोंड वळवले तर एक मोर चक्क वरती आकाशात उडताना दिसला. त्याच्यामागे त्याचा पिसांचा लोटही हेलकावे खात होता. एवढ्या उंचीवर उडणारा मोर कधीच पहिला नव्हता. हा मोर जो उडाला तो काही मोठ्या पक्ष्यासारख्या भराऱ्या मारण्यासाठी नव्हे, तर एका झाडीतून शेताच्या बांधावरून लपत छपत तो दुसऱ्या झाडीकडे चालला होता. तिथे चटकन पोहोचण्यासाठी तो उडाला असावा. गरुड(त्याला तूर्तास गरुडच म्हणूया) तर आपल्या जाग्यावर बसूनच होता. त्याचे मोराकडे नक्कीच लक्ष असणार. मोर विजेसारखा एका सेकंदात झाडीत गायबही झाला. ज्या झाडीत तो घुसला ती गरुडाच्या झाडापासून तशी जवळच होती. 

त्या मोराला पाहण्यासाठी मी आणि दादा दोघे झाडीलगतच्या वाटेने लगबगीने गेलो. चालता चालता, ते गरुडाचे झाड अगदी समोर दिसत  होते पण रस्त्याला लागून नव्हते, अनेक झाडाच्या गर्दीत , वाटेपासून दूरच होते.पण त्यावर बसलेला गरुड नक्कीच आमची चाहूल घेऊन होता. कारण थोडा दूर असतानाच जेव्हा मी त्याचा एक फोटो काढला, तेव्हा त्याने थोडी हालचाल केली. त्या दोन्ही बाजूने असलेल्या झाडीच्या रस्त्याने आम्ही पुढे गेलो. मोर रस्त्याच्या एका बाजूच्या झाडीत घुसला होता (एवढेच आम्ही घराच्या अंगणातून पाहू शकलो होतो ) आणि गरुडाचे झाड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या झाडीत होते. त्या झाडाच्या आसपास पोचलो, मान वरती करून गरुडाकडे पहिले, आणि बघताक्षणी त्याने आपले अजस्त्र पंख उघडले आणि बळकट दिसणाऱ्या पायांची  झाडाच्या फांदीवरची पकड सुटली. क्षणार्धात गरुड उडून गेला. 


एक सेकंद दिग्मूढ होऊन आम्ही बघतच राहिलो. काही पक्षी, प्राणी असतातच असे. मंत्रमुग्ध होऊन त्यांना फक्त बघायचे. बहुदा डहाण्या वाघ दिसला तर असेच होईल. भान हरपेल. एका (बहुदा मारुतीचितमपल्ली यांच्या) पुस्तकात वाचले आहे की अश्या काही शिकारी प्राण्यांत मृत्यूचे संमोहन घालण्याची विद्या असते. तसंच काहीसं पक्ष्यांतही असेल का? कोण जाणे. पण ह्या अजस्त्र पक्ष्याला बघून मात्र संमोहन घातल्यासारखे झाले. 

मोर पाहण्यासाठी आलो होतो याचा क्षणभर विसर पडला. मोर काही दिसला नाही. तो केव्हाच झाडीच्या दाटीवाटीने पलीकडच्या शेतात पसारही झाला असावा. इकडे तिकडे बघितले. पण कुठेच काही हालचाल नव्हती. पुन्हा काही गणपतीच्या दिवसात गरुड दिसला नाही. गणपतीनंतर घरात सामसूम झाली. मी मात्र काही दिवस आईबरोबर मागे थांबले. गणपती गेला आणि दबा धरून बसल्यासारखा पावसाने कोसळायला सुरवात केली. दिवस दिवस काळवंडून टाकणाऱ्या वातावरणात पाऊस पडत राहिला. त्या दिवशी दुपार सरून संध्याकाळ व्हायला आली तरी पाऊस पडतच होता. पोर्चमध्ये खुर्ची टाकून मी पुस्तक वाचत होते. पावसाचा जोर वाढला तसे मी बाहेर बघितले. दूर धूसर झालेल्या पेंडाराच्या झाडावर पुन्हा गरुडाचा ठिपका दिसला. तसा ठिपका म्हणता येणार नाही कारण त्याचा उभट आकार. पंख जवळ घेऊन बसलेली उंचाडी काळसर आकृती दिसत होती. गरुड पावसात भिजत होता. झाडाच्या त्याच डेळक्यावर एकटाच बसून होता. मी अधून मधून त्या झाडाकडे बघत राहिले. आता सहा वाजून गेले होते. पावसामूळे काळोख लवकरच पसरत होता. पण गरुड अजून तिथेच होता. जवळपास एक-दीड तास तो तिथेच एका जागेवर, जराही हालचाल न करता, तेही भर पावसाचा का बसला असावा, तेही एकटाच? मीही तासदीडतास पोर्चमध्ये पुस्तक बाजूला ठेवून बसून राहिले,  त्याच्याकडे बघत. मात्र तो जराही हलला नाही. सगळा आसमंत चिडीचूप होता. माणसे नाहीत. पाखरे नाहीत, कुणी नाही. मला मात्र त्याच्या तशा भिजत बसण्याचे आश्चर्य वाटले. नंतर, म्हणजे एक-दीड तासांनंतर , केव्हातरी माझे लक्ष नसताना मात्र तो तिथून उडून गेला. 

आता रात्रीचा कुठे गेला असेल, बाजूच्या डोंगरात, तिथल्या छोट्या जंगलात? रात्रीचा हा काय करत असेल? त्याचे एकटे आयुष्य असेल तरी कसे? त्यानंतर बऱ्याचदा जवळच्या झाडावर तो मला दिसला. चार-दोन फोटोही काढले. हे जवळचे झाड नक्की कसले आहे माहित नाही. पण तिथे तो बऱ्याचदा येऊन बसायचा. आणि दुसरे झाड म्हणजे ते पेंडाराचे. ही दोन झाडे त्याची दिवसभराच्या कामकाजातील विश्रांतीची स्थाने बहुतेक. म्हणजे हा गरुड इथे जवळपासच राहणारा होता तर. त्याच्या फोटोंवरून त्याचे पक्के नावही शोधले 'व्याध गरुड' म्हणजेच Changable Hawk Eagle (Nisaetus cirrhatus). साधारण दोन फूट उंच. पट्ठ्या कमालीचा देखणा. डोक्यावर पिसांची शेंडी. काही फोटोमधे ही पिसांची शेंडी दिसत होती. याला Crested Hawk Eagle सुद्धा म्हणतात. माणसाला किंवा कुणालाही (म्हणजे सर्व सजीवांना) कुणाशीही मैत्री करता यायला हवी होती, पक्ष्यांशी बोलता यायला हवे होते. असे असते तर मी या गरुडाशी मैत्री केली असती. (त्याने मैत्री स्वीकारली असती की नाही कुणास ठाऊक). 


त्याचे डोळे मला दुरून दिसले नाहीत. पण नंतर त्याच्या काही इन्टरनेटवर बघितलेल्या फोटोत त्याचे विलक्षण डोळे दिसले. गुढाने भारलेला हा पक्षी आहे. 'गरुडपुराण' म्हणून एक पुराण आहे, ते सहसा वाचले जात नाही, फक्त मृत्यूनंतरच घरात (किंवा क्रियाकर्म करण्याच्या जागी) ते वाचतात. या पुराणात मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन इत्यादींविषयी विष्णूने गरुडाशी केलेला संवाद आहे. गरुड हे विष्णूचे वाहन. अट्टल शिकारी. पक्षांचा राजाच. या समोर दिसणाऱ्या गरुडाविषयी मला कुतूहल वाटतच राहिलं. रात्री, कुठे दूर घनदाट जंगलात त्याचे एखादे रात्रनिवाऱ्याचे घरटे असेल का? कारण काळोख पडताना तो मला डोंगराच्या दिशेने उडताना अनेकदा दिसला. कि कि कि कि कि कि किवववववववववी(ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्वी ट्युवववववववववी ) अशी किंकाळी फोडली त्याने डोंगराच्या दिशेने उडताना. ती कुणा सहचरासाठी होती का? तसा एकदा मला तो जवळच्या झाडावर दिसला आणि तसाच दिसणारा, दुसरा एक पक्षी त्याच झाडावर थोडासा खालच्या फांदीवर बसला होता. ही गरुड मादी असावी का? त्या दिवशीही पावसाने नुसता काळोख केला होता. फोटो तर सोडाच त्याला नुसतं बघणं सुद्धा त्या रपारप पावसात कठीण झालं. नंतर वाचल्यावर कळलं की या गरुडाच्या विणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिल असतो. आणि हा एकांतप्रिय पक्षी फक्त विणीच्या हंगामातच सहचराबरोबर राहतो. त्यामुळे बहुदा तो दुसरा पक्षी त्याचा सहचर नसावा.

एकाच झाडावर बसलेल्या दोन गरुडांविषयी अत्यंत सुंदर श्लोक मुंडकोपनिषदात आहे. एक गरुड खालच्या फांदीवर बसला आहे जो सतत काहीतरी खात आहे. जे चांगले लागले त्याबद्धल सुखी आणि जे वाईट लागले त्याविषयी दुःखी होत आहे. वर बसलेला गरुड मात्र शांत आहे. तो सुखदुःखाच्या पलीकडे गेला आहे. खाली बसलेल्या गरुडाचे जेव्हा वरच्या गरुडाकडे लक्ष जाते तेव्हा त्याला कळून चुकते की आपण मोहमायेच्या अधीन होऊन सुखदुःखं अनुभवत आहोत. जेव्हा तो हे जाणतो तेव्हा तो वरच्या गरुडाशी एकरूप होतो.  


'आभाळवाटांचे प्रवासी' या किरण पुरंदरे यांच्या अतिशय सुंदर पुस्तकात त्यांनी निरनिराळ्या गरुडांबाबत आपल्या अत्यंत खुमासदार शैलीत लिहिले आहे, तिथेच मला या गरुडाचे मराठी नाव 'व्याध' (शिकारी) आहे असे कळले. त्यात ते म्हणतात 'हा सडपातळ, आणि अस्सल जंगली गरुड आहे. डोक्यावरच्या तुऱ्यात काही लांबसडक पिसे असतात, सर्वसाधारणपणे त्याचा  रंग पाठीकडून तपकिरी आणि पोटाकडून पांढरा असतो. घश्यावरून काळे ओघळ यावेत तशा काळ्या लांब रेघा, आणि छातीवर चॉकलेटी रंगाच्या जाड रेषा, व्याधाचे पाय पंजापर्यंत पिसांनी झाकलेले असतात. पायाला पुढे तीन आणि मागे एक बोट असतं, इतर बोटांच्या मानानं पाहिलं बोट आणि मागील बोट ताकदवान असतं. व्याध गरुडाची मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते' असे त्यांनी लिहिले आहे. मला त्या दोन पक्षांतील लहान मोठा फरक करता आला नाही. त्यामुळे तो दुसरा पक्षी मादी होती का आणखी एक व्याध गरुडच ते काही कळलं नाही. त्यांनी या गरुडाच्या शिकारीचे काही चित्तथरारक प्रसंग या पुस्तकात दिले आहेत. पण मला आपला तो शांत, स्तब्ध, एकांतप्रिय बसलेला गरुडच जास्त बघायला आवडेल/आवडला. निसर्ग कितीही PRACTICAL आणि निर्विकार असला तरी मी नाहीये. त्यामुळे शिकार-बिकार माझ्याच्याने तरी बघवणार नाही. तरीपण त्यांनी केलेले वर्णन वाचनीय आहे. त्यांनी दिलेल्या माहितीत लिहिलं आहे 'व्याध शांत बसून राहतो, लक्ष ठेऊन असतो आणि भक्ष्य दिसताच भयंकर वेगानं अचानक हल्ला करतो, पंखानी फाडफाड मारून भक्षाला गोंधळात टाकतो. पंखांच्या, शेपटीच्या रचनेमुळे झाडाझुडांतून वेगाने उडू शकतो. गरज वाटेल तेव्हा झटकन दिशाही बदलू शकतो. सखोल शास्त्रीय अभ्यासातील काही निष्कर्षांवरून त्याच्या भक्ष्ययादीत पक्षी आहेत: लालबुड्या बुलबुल,बुरखा हळद्या, साळुंकी, कीर पोपट, मोर, रानकोंबडा, तित्तीर, लावरी, हरोळी, पाळीव कोंबडी , सरडे, घोरपड, कास्य सर्प, खार, ससा, पाळीव मांजर.  पण मला यातले बरेचसे पक्षी तो जवळच्या झाडावर असताना आसपास दिसले होते. त्याने कुणाला धरले नाही. बहुदा आजूबाजूला दोन-पाच घरे आणि माणसांची वस्ती असल्याने असे असेल का? पण मी त्याला जवळपास आठेक दिवस तरी पाहिलं, पण फक्त शांत बसलेलं. कदाचित जंगलात शिकार करून खाऊन-पिऊन आराम करायला तो इथे येत असेल. किंवा इथे माणसांच्या भीतीनेही तो शिकार करत नसावा. 

किरण पुरंदरेंच्या लेखानुसार व्याध मनुष्यवस्तीजवळ घरटी करत नाही. पाच ते दहा मीटर उंचीवर घरटी  करतो, आणि  अशी जागा निवडतो जिथून बराच आसमंत नजरेखालून घालता येईल, मोठ्या काटक्यांचं हे घरटं असतं, आणि बरंच मोठं असतं, मादी एकच अंडे घालते. त्यांनी अशी अनेक घरटी बघितली आहेत. त्यांनी तर म्हटलं आहे की हा गरुड बघितल्यानंतर आता पक्षी बघावा तर गरुडच असं त्यांना वाटलं. ते खरंच आहे. इतका रुबाबदार हा व्याध गरुड. 

काहीतरी शोधत असताना, एका दोन वर्षांपूर्वीच्या(२६-१०-२०१४ तारखेच्या फोटोत) गावच्या फोटोत मला एक फोटो सापडला ज्यात दिसले पेंडराचे तेच झाड आणि त्यावर बसलेली धूसर, पण ओळखीची तीच उंचाडी, काळसर आकृती. म्हणजे हा व्याध गरुड तेव्हापासून तिथे होता तर. (तो किंवा त्याचा कुणी जातभाई) याचं आयुष्य किती असतं ते शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलं नाही. एका ठिकाणी वाचलं की दहा वर्षांपर्यंत जगतो, पण नक्की माहित नाही. हा गरुड तोच असला दोन वर्षांपूर्वीचा तर त्याची दृष्टी कालातीत आहे असेच म्हणावे लागेल. तेव्हापासून या गरुडाने आपल्या दृष्टीक्षेपात काळ बंद केला आहे आणि मलाही तो ओळखत असेल. म्हणजे हा जर तोच असला तर मी त्याला जरी आता ओळखले, तरी तो मला दोन वर्षांपासून ओळखून आहे!

हाच तो दोन वर्षांपूर्वीचा फोटो

Tuesday 4 October 2016

अंबरनाथचे शिवमंदिर

अंबरनाथचे शिवमंदिर

ठाणे जिल्ह्यातील, अंबरनाथ येथे दहाव्या शतकातील शिवमंदिर आहे. मंदिराच्या उत्तर द्वाराकडे असलेल्या शिलालेखावरील नोंदीप्रमाणे हे मंदिर १०६० मध्ये शिलाहार राजवटीतील एक मुख्य (अधिकारी) मम्मूनी किंवा ममवनी याने बांधले आहे. 'वालधुनी' नदीच्या किनाऱ्यालगत हे मंदिर बांधले आहे(पूर्वी ही मोठी नदी असावी). आता बघतले तर मंदिराच्या बाजूने एक मळकट पाण्याचा ओढा वाहताना दिसतो. या मंदिराच्या चहूबाजूना काही अंतरावर संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार-तोरणं(gateways) होती. पण आता ती अस्तित्वात नाहीत फक्त त्यांचे काही तुटके-फुटके अवशेष आजूबाजूला सापडतात.  

मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याची रचना मंडप आणि गर्भगृह अशी आहे. मंडपाला तीन बाजूने प्रवेशद्वारं आहेत. प्रत्येक प्रवेशद्वाराला स्वतःचा पोर्च आहे. चार स्वतंत्रपणे उभे असलेले स्तंभ मंडपाचे छत डोक्यावरती घेऊन आहेत आणि तीन पोर्चांमधे असलेले एकूण सहा स्तंभ एवढेच मंदिराला आधार देत उभे आहेत. या स्तंभांवरही मूर्ती कोरलेल्या आहेत. अत्यंत प्राचीन असल्याने मंदिराची पडझडही बरीच झाली आहे आणि बहुदा अनेक विरोधक आक्रमणंही या मंदिराने सोसली असावीत. मंदिराची रचना आत्तापेक्षा बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे आणि आक्रमणांमधील तोडफोडीमुळे नंतरच्या काळात मंदिरात अनेक बदलही झाले असावेत. नंतरच्या हिंदू राजवटींनी मंदिराची डागडुजी काही प्रमाणात केली असल्याचे त्याच्या रचनेवरून दिसते. 

या मंदिरच्या स्थापत्यशैलीला भूमिज शैली म्हणतात. 'भूमिज' मंदिरे पृथ्वीच्या कवचातून वर येऊन वाढलेली वाटतात. या मंदिरांचा चेहरामोहरा डोंगरांच्या रचनेच्या जवळ जाणारा असतो. ही शैली द्रविड आणि नागर शैलीचा सुवर्णमध्य म्हणता येईल. हिला 'दक्खनी शैली' असेही म्हणतात. छोटी छोटी शिखरं आणि त्यांना तोलून धरणारे ( वेगवेगळ्या शिल्पपट्टया आणि शिल्पांच्या चोकटी एकमेकांवर रचून बनलेले ) उभे स्तंभ. हे स्तंभ एकमेकाला जोडलेले. या अश्या एकमेकाला जोडलेल्या अनेक स्तंभांतूनच एक एक भिंतीसारखी रचना उभी राहते. ही अशी रचना हेच भूमिज शैलीचे वैशिष्ट्य. या बाह्य भागांवर अतिशय सुंदर शिल्पकाम आहे. 


मंदिराची रचना : उभे शिखरांपर्यंत जाणारे स्तंभ आणि आढव्या शिल्पपट्ट्या

जशी उभ्या स्तंभांची छोट्या  शिखरांपर्यंत गेलेली रचना तशीच आढवी शिल्पपट्ट्यांची रचना. असे हे उभ्या आढव्या पट्ट्यांचे 'मॅट्रिक्स'. शिल्पंपट्ट्या एकावर एक रचलेल्या. वेगवेगळ्या शिल्पांच्या. या मंदिराला, जमिनीलगतच्या भक्कम पाया रोवणाऱ्या दोन पट्ट्या आहेत. त्यांच्यावर शिल्पं नाहीत. त्यावरची पट्टी हि 'कीर्तिमुख' या राक्षसाच्या तोंडांची पट्टी आहे. त्यावरची पट्टी गजमुखांची आहे. त्यावरील पट्टी वेली-फुलांच्या अलंकारिक आकारांची बनलेली आहे. त्यावरील पट्टी हि मोठ्या आकाराची असून त्यात अनेक स्थानिक दृश्यं, नृत्य-वादनाचे प्रसंग, मैथुन शिल्पं कोरलेली आहेत. हि पट्टी अतिशय सौन्दर्यपूर्ण आहे, परंतु कालानुरूप तिची खूपच पडझड झाली आहे. याच्या वरही काही शिल्पविरहित पट्ट्या असून त्याच्यावर मुख्य अशा विशिष्ट देवतांच्या शिल्पांच्या चौकटी आहेत. या चौकटींच्या वर छपरांसारख्या वाटणाऱ्या पट्ट्या असून वर वर जाताना त्या निमुळत्या होत जाऊन शेवटी त्या शिखरांपर्यंत साथसंगत करतात. 

बाह्य भागावरील अनेक शिल्पे उत्कृष्ट आहेत. त्यातली काही:
साधू/संन्यासी

सुरसुंदरी:   सुरसुंदरी म्हणजेच स्वर्गीय अप्सरांसदृश युवती. शिल्पशास्त्रांच्या प्राचीन ग्रंथातील नियमांनुसार मंदिरांवर सुरसुंदरीची शिल्पे असणे गरजेचे आहे. या सुरसुंदरी विपुलता, सौख्य, सुपीकता, सौन्दर्य, समृद्धी यांचे प्रतीक मानल्या गेल्या आहेत. त्यांच्याविना बांधलेले मंदिर ते मंदिर कसले अशा अर्थाचे संदर्भ या प्राचीन ग्रंथात नोंदलेले आहेत. त्यामुळेच अतिशय सौन्दर्याने, सौष्ठ्वाने परिपूर्ण सुरसुंदरींची शिल्पे प्राचीन मंदिरांवर आढळतात. खजुराहो मधेही सुरसुंदरींची विलोभनीय शिल्पे आहेत. अंबरनाथच्या मंदिरावर देखील काही अतिशय देखणी शिल्पं आहेत आणि पडझडीनेही त्यांचे सौन्दर्य जराही कमी झालेले नाही. या सुरसुंदरींची शिल्पे मुख्य चौकटींमध्ये नसून दोन स्तंभांच्या मधील कोपऱ्यात असतात, किंवा मुख्य देवतांच्या शिल्पांशेजारील भागांत असतात. सुशोभीकरण, आणि सौन्दर्यनिर्मिती हे या शिल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सुरसुंदरी

देवता: शिव मंदिर असल्याने शिवाशी निगडित देवदेवतांची शिल्पे इथे कोरली आहेत. त्रिमूर्ती, ब्रह्मा, महाकाली, नटेश्वर , विष्णू , पार्वती, चामुंडा अशा देवदेवता आहेत.
१. बहुदा ब्रह्मा २. वराही ३. ? (बहुदा नटेश्वर )

१. बहुदा विष्णू  २. गणपती ३. बहुदा पार्वती
१. ? २. चामुंडा  किंवा महाकाली ३. चामुंडा
हि अतिशय सुंदर पण भग्न देवता कोण असावी? ती अनेक हातांची आहे. शिवाची असावी. पण नक्की ओळखता येत नाही. बहुदा शिव तांडव करणारा नटेश्वर असावा का?


नृत्य - वादन 

पश्चिमेकडील प्रवेशद्वारातील पोर्चमध्ये भव्य नंदीची मूर्ती आहे. आत गेल्यावर मंडप लागतो, जिथे फोटो काढण्यास मनाई आहे. तेथील स्तंभांवर आणि छताच्या तुळयांवर कोरीवकाम केलेलं आहे, पण अपुऱ्या प्रकाशामुळे ते फारसे दृष्टीस पडत नाही. मंडप आणि गर्भगृहाच्या मधे अंतराळ नसून सरळ गर्भगृहाचे प्रवेशद्वारच लागते. हे प्रवेशद्वार सुद्धा शिल्पांनी सुशोभित आहे, मात्र इथेही बराच अंधार असल्याने ते स्पष्ट दिसत नाही. त्यातून मी जेव्हा या मंदिराला भेट दिली तो सुट्टीचा दिवस होता आणि त्यातून श्रावण महिनाही होता त्यामुळे मंदिरात खूपच वर्दळ होती. पुन्हा एकदा निवांत निर्मनुष्य दिवशी जायला हवे. गर्भगृहाच्या प्रवेशदवारातून आत पायऱ्यांनी उतरावे लागते. त्यामुळे गर्भगृह खोल विहिरीसारखे वाटते. गर्भगृह अतिशय उंच भिंतींचे असून त्यात मध्यभागी शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या वरील छप्पराला वर्तुळाकृती खुला भाग(open to sky) आहे. हा खुला भाग का असावा? मंदिरातील होमहवनाचा धूर जाण्यासाठी तो आहे असेच वाटते. पण हि रचना मी अजून कुठे बघितली नाही. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरालाही छताला असा मोठा खुला भाग आहे असे वाचले आहे. ते मंदिर अजून बघितले नाही.

मुख्य प्रवेशद्वाराजवळील नंदी
प्राचीन मंदिर म्हणून या मंदिराला खरोखरच महत्व आहे पण एकंदरीतच त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी गलिच्छ वातावरण आढळले. हे मंदिर पूजेत आहे. आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळेदेखील मंदिराच्या परिसरावर परिणाम होता असावा. पुन्हा एकदा उन्हाळ्यात या मंदिराला जरूर भेट द्यायला हवी. तरीही अतिशय सुंदर शिल्पकामासाठी हे मंदिर पुन्हा पुन्हा बघावेसे नक्कीच आहे.

Friday 30 September 2016

जगद्व्यापी वटवृक्ष

कोकणातील, मालवण तालुक्यातील, कुसरवे या माझ्या मावशीच्या गावी घराच्या जवळच  दोन जूनी आणि भव्य अशी वडाची झाडं आहेत. दोन्ही झाडे साधारण शंभर वर्षे तरी जूनी असावीत. मावशीच्या घरातल्या दोन पिढ्यांनी तरी ती झाडं बघितलेली आहेत. एका पावसाळी संध्याकाळी मी ही झाडं बघायला गेले होते. कोकणातला पाऊस म्हणजे मुसळधार आणि काळोखी. संध्याकाळच्या वेळी नुकताच पाऊस थांबला होता आणि सर्वत्र निथळून गेलेले, काळवंडलेले, धीरगंभीर वातावरण होते. घरापासून या झाडांकडे जाणाऱ्या पायवाटेला दोन फाटे फुटतात. एक जातो तळीच्या वडाकडे. आणि दुसरा फाटा एका पाणंदीतुन 'वडाची गाळी' इथल्या वडाकडे जातो.

तळीचा वड
इतक्या वर्षात ही झाडं मी कधीच पहिली नव्हती, ना कुणी मला त्यांच्याविषयी सांगितले होते. पण कुठूनतरी विषय निघाला आणि त्यावेळी आईने मला या झाडांविषयी सांगितले , म्हणून यावेळी त्यांच्या घरी गेले असता ती झाडे बघायचीच असे ठरवले. पावसाच्या चिखलात जाऊन मला झाडं दाखवायला आई थोडीशी नाखुषच होती पण शेवटी ती तयार झाली. आणि कुणीही न बोलावता, तयार होता मावशीच्या घरचा 'टाग्या' कुत्रा. आम्ही त्या पायवाटेला लागतातच तो आमच्यापुढे धावू लागला. या कुत्र्याचे पाय एवढे लांब आहेत की 'टाग्या' ऐवजी त्याचे नाव 'टांग्या' च असायला हवे होते. पहिल्या फाट्याने आम्ही तळीच्या वडाकडे गेलो. इथे पूर्वी एक पाण्याचे मोठे डबके होते, तिलाच तळी म्हणत. आईच्या लहानपणापासून ही तळी आणि बाजूचा हा वड तिने पहिला आहे. माझी मावशी सर्वात मोठी, तिचे लग्न झाले तेव्हा आई आठ-दहा वर्षांची असेल, त्यामुळे ती इथे तिच्या लहानपणी येत असे. त्या काळी या तळीवरूनच पाणी भरून घरी न्यावे लागे. आता या तळीवर विहीर बांधलेली आहे. हि विहीर साधारण तीस-पस्तीस फूट व्यासाची असेल. आता पावसाच्या पाण्याने ती तुडुंब भरलेली होती. तिच्यावरच झाडाच्या फांद्या लोंबकळत होत्या. या तळीच्या बाजूला तेवढ्याच किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त विस्ताराने हे वडाचे झाड पसरलेले आहे. वडाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बुंधा मोठा नसला तरी पारंब्या पुन्हा जमिनीत घुसून त्यापासून झाडाचा विस्तार होतच राहतो. जर जागा मिळाली तर आसपासचा परिसर व्यापून ते कित्येक किलोमीटर विस्तारू शकते.
पूर्वीची 'तळी' आणि आताची 'विहीर'

कलकत्ता येथील ग्रेट बनियान ट्री

अशी अवाढव्य विस्ताराची वडाची झाडे भारतात अस्तित्वात आहेत. त्यापैकी एक आहे कलकत्त्याच्या जगदीशचंद्र बोस बोटॅनिकल गार्डन मधील वडाचे झाड, हे झाड अडीजशे वर्षांहून अधिक जुने आहे. हे झाड जगातील सर्वात मोठे (विस्तार असलेले) झाड आहे. याचा विस्तार एवढा मोठा आहे की पाच हजार माणसं त्याच्या छायेखाली विश्रांती घेऊ शकतात. एकदा एक ब्रिटिश लेखक Brian Aldiss फेरीबोटने हुगळी नदीतून बोटॅनिकल गार्डन बघायला गेले होते, तेव्हा हे प्रचंड विस्ताराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले. थॉमस हक्सले या ब्रिटिश बायोलॉजिस्टने या झाडाबद्धल एका लेखात लिहून ठेवले आहे की हे झाड जग व्यापू शकतं. Brian Aldiss यांनीही हा लेख वाचला होता. या वटवृक्षाने आणि त्याच्या जग व्यापून टाकण्याविषयीच्या कल्पनेने ते एवढे प्रेरित झाले की त्यातून त्यांनी Hothouse नावाची वैज्ञानिक कादंबरी लिहिली.

तळीचा वड
तळीजवळचे हे झाड सुद्धा आपल्या फांद्यांचा अमाप विस्तार घेऊन उभे आहे, बहुतेक जग व्यापण्याची इच्छा घेऊनच. संस्कृतमध्ये वडाच्या झाडाला 'बहुपदा' म्हणतात. वडाच्या झाडाला भ्रमंतीत रस असावा. म्हणूनच आपले पारंब्यांसारखे पाय पुढे पुढे रोवून ते पुढे सरकत असते. थॉमस हक्सले यांची त्याची जग व्यापण्याची कल्पना खरंच विलक्षण आहे. जर त्याला असेच अडथळ्याविना पुढे पुढे जायला दिले तर हे झाड जग फिरायला निघाल्याप्रमाणे पावले पुढे टाकीत चालेल बहुतेक. तळीजवळचे हे झाड वर्षनुवर्षे धीरगंभीरपणे याच प्रतिक्षेत असावे. माणसाने उभारलेली शिल्पं, मंदिरे आजवर अनेक बघितली, पण हे निसर्गाने उभारलेले अवाढव्य जिवंत शिल्पच. त्यापुढे आपण खुजे होऊन उभे राहतो. पावसाळ्याच्या पाण्याने अधिकच गडद झालेल्या काळ्या फांद्या. काळोख पडत असल्याने या झाडाजवळ अधिक थांबून त्याला निवांतपणे  निरखता आले नाही. वड, पिंपळ ही भारतीय परंपरेतील धार्मिकतेशी जोडलेली झाडं. काहीशी गूढाने भारलेलीही. अश्या या भव्य झाडांची स्थानं लोकांच्या श्रद्धेची स्थानं आपोआप बनत जातात. हा तळीचा वडही त्याला अपवाद नाही.

'वडाची गाळी' इथला वड
या झाडाचा निरोप घेऊन आम्ही दुसऱ्या 'वडाच्या गाळी' कडे निघालो. 'गाळी/गाळवी' किंवा 'गाळू' म्हणजे शेत, या वडाच्या समोर पुढे दूरवर पसरलेले शेत आहे. म्हणूनच या जागेला 'वडाची गाळी' म्हणतात. तिथे जाताना मध्ये एक छोटीशी पाणंद लागते. या पाणंदीच्या रस्त्याला झाडीझुडपात पेंडकुळ, नांगरखडी यांची तांबडीलाल फुलं डोकावत होती. मधेच काही जंगली सातभाई पक्षी झाडीत कलकलाट करत होते. शेवटी आम्ही वडाच्या झाडापाशी आलो. हे वडाचे झाड मात्र दोन्ही बाजूने बघता आले. तळीचा वड फक्त एकाच बाजूने बघता येतो. कारण दुसऱ्या बाजूला दाट शेत, आणि चिखल होता. त्यामानाने 'वडाच्या गाळी' चा वड आणि त्याच्या आसपासचा परिसर, दोन्ही बाजूने झाडी किंवा शेत नसल्याने चांगला नजरेखालून घालता येतो. पण माणसाचे धार्मिक आक्रमण या झाडालाही चुकलेले नाही. या वडाच्या एका बाजूला तुळशी वृंदावन बांधलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यवस्थित बांधून काढलेली  छोटेशी पाण्याची डोणी आहे. या डोणीत गणपती विसर्जन करतात. पण एक खरंच चांगलं आहे की या झाडांना माणसांच्या धार्मिक भावभावनांत स्थान मिळाल्याने ही झाडे नष्ट होण्यापासून तरी वाचली आहेत.

'वडाची गाळी' येथील तुळशी वृंदावन 
संध्याकाळच्या वेळी, आणि पावसाच्या वातावरणाने या दोन्ही झाडाभोवतालचा अवकाश खूपच गहन वाटत होता. पारंब्यांचे  जडजंजाळ घेऊन बसलेले आहेत म्हणून या वृक्षांना  ध्यानस्थ बसलेले दाढीवाले ऋषी म्हणावे की त्यांच्या पारंब्या रोवून चाललेल्या फिरस्तीमुळे त्यांना भ्रमण करणारे संन्यासी म्हणावे कोण जाणे. त्यांच्या विस्तीर्ण पारंब्यामध्ये शांतता गोठून राहिल्यासारखी वाटत होती. दुर्दैवाने पावसामूळे एकही पक्षी मात्र मला या झाडांवर दिसला नाही. खरे तर वडाची भव्य झाडे म्हणजे पक्षांचे हक्काचे घर. पुन्हा केव्हातरी चकचकीत सकाळी, या झाडांचे काळोखी, शांत रूप पालटले दिसेल, तेव्हा अनेक पक्षी यांच्यावर बागडतही असतील.

कलकत्त्याचा 'ग्रेट बनियान ट्री' अजून बघितला नाही. पण तूर्तास या भव्य, धीरगंभीर झाडातला सर्वव्यापी अवकाश मात्र अनुभवता आला. एव्हाना खूपच अंधार झाला होता. त्यामुळे 'टाग्या' च्या मागून आम्ही घरची वाट धरली.