Friday 25 November 2016

तेरावं

बाबा गेले
तेरावं झालं
दुःखाचं जेवण
पचून गेलं

श्राद्धाला काढायची
आणि प्रसंगी यायची
ती आठवण नंतर
यायची आणि जायची

काळ गेला वेळ गेली
अनेक वर्ष आणि श्राद्ध लोटली
पोरं बाबा झाली
बाबा झाली

दबक्या पावलांनी पुन्हा एकदा
काळ आला, वेळही आली
डोळ्यादेखत पस्तिशीतली
पोर गेली

जिला काऊचा घास भरवला
त्याचा त्याला
परत दिला
शेवटी तो उसनाच !

तेरावा दिवस यायचा तो आला
पुन्हा तेच तीळ, सात दर्भ
आणि तोच
जेवणाचा प्रसंग

या वेळी मात्र दुःख
ताट भरून आलं होतं
तांब्या,भांडं, वाटी पेल्यात
अश्रूंचं तळं झालं होतं

मग कसासाच गिळला घास
दाटल्या गळ्यात अडकला
विद्युतदाहिनीचा जाळ
पुन्हा डोळ्यांपुढे भडकला

जाणवून सत्य वितळलं मन
आधी मरावा बाप
मग पोरं 
हेच बरं.

-विवेकानंद सामंत, पूणे , २०-१०-२०१६.

No comments:

Post a Comment