Tuesday 1 March 2016

मॅन्स सर्च फॉर मीनिंग


'मॅन्स सर्च फॉर मीनिंग' हे व्हिक्टर फ्रेन्केल यांचे पुस्तक वाचून काय वाटले ते सांगायला अजून बराच काळ जावा लागेल.  व्हिक्टर फ्रेन्केल हे युरोपातील दोन्ही महायुद्धांच्या काळात एका ज्यू कुटुंबात जन्मलेले.
वर्ल्ड वॉर, हॉलोकॉस्ट या विषयांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेलीत. ती सर्वच अतिशय सुन्न करणारी असतीलच (मी काही ती वाचली नाहीत). या भयानक वातावरणाचे साक्षीदार आणि त्यांच्या तोंडून त्यांच्या अनुभवांचं कथन वाचणं हा भयंकर त्रस्त करणारा प्रकार आहे म्हणून मी फारसं  त्याच्या वाट्याला कधी गेले नाही. पण एका सायकॉलॉजी संबंधित लेखामध्ये मी व्हिक्टर फ्रेन्केल यांच्याबद्धल आणि त्यांच्या लेखानाबद्धल वाचलं. ते स्वतः मानसोपचार तज्ञ होते आणि १९४२ पासून ते १९४५ चा काळ  त्यांना नाझी कॉनसंट्रेशन कॅम्पमध्ये (ऑशविट्झ) घालवावा लागला. त्यानी तिथे आलेल्या अनुभवांचे चित्रण त्यात केले आहे. पण हे नुस्तं प्रसंगानुरूप अनुभवांचं चित्रण नाही, त्यानी इतक्या अलिप्तपणे (ऑब्जेक्टीव्हली) हे वर्णन केले आहे कि आपणाला ते अतिशय दाहक असूनही त्याची झळ बसत नाही. जीवनाच्या कठोरतेचे, भयाणतेचे प्रत्ययकारी विश्लेषण आपल्यासमोर ते मांडतात. आणि त्यांच्या लेखनात विदारकता नसून एक विलक्षण सकारात्मकता जाणवत राहते.

पहिल्या भागात ते आपल्या ऑशविट्झ कॉनसंट्रेशन कॅम्पमधील अनुभवांचे विश्लेषण करतात. दुसरया भागात त्यानी आपल्या 'लोगोथेरपी' या मनोविश्लेषणात्मक सिद्धांताबद्धल लिहिले आहे.

 कॉनसंट्रेशन कॅम्पमधले अनुभव अतिशय विलक्षण परिणामकारक आहेत. आणि त्यापेक्षाही त्यांनी त्या अनुभवांना एका तिऱ्हाईताच्या नजरेने बघून त्यांचे केलेले विश्लेषण विचार करायला लावणारे आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब (बायको, आई-वडील , भाऊ) या हॉलोकॉस्ट मध्ये वाचले नाहीत. डीपोर्टेशन दरम्यान त्यांना व त्यांच्या बायकोला त्यांच्या इतर कुटुंबापासून वेगळे करून ऑशविट्झ येथे नेण्यात आले. तिथे ते आल्या नंतरच्या प्रसंगांचं जे वर्णन करतात ते सामान्य माणसांच्या आणि त्याच्या सामन्यात सामान्य असणारया विवंचना यांच्या पलीकडचे आहे. आपला मेंदू क्षणभर विचार करणेच बंद करेल इतके ते धक्कादायक आहे. 
त्यांना स्वतःलाही  तो धक्का बसला होता.

कॅम्पमधील जीवनादरम्यानच्या तिथल्या रहिवाश्यांच्या मानसिकतेचे मानसशास्त्रीय अनुषंगाने त्यांनी तीन भाग केले आहेत. एक: कैद्याच्या जीवनातील तिथला सर्वात सुरवातीचा काळ , तो जेव्हा कॅम्प मध्ये दाखल होतो तेव्हा त्याच्यावर काय गुदरते. त्याची कशी अवस्था होते.   दोन: मध्यकाळ , त्याचा सर्व स्वीकारून(किंवा काहिंच्या बाबतीत सर्व नाकारून) तिथला जगण्याचा काळ   तीन : त्याची (जर तो शेवटपर्यंत टिकला असेल तर ) सुटका आणि त्यानंतरचा काळ.

एक: कैद्याच्या जीवनातील तिथला सर्वात सुरवातीचा काळ
फ्रेन्केल यांच्या अनुभव कथनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्या अनुभवाचे अनेक डायमेन्शन्स मध्ये (प्रतलामध्ये) चित्रण करतात. त्यानी हे पुस्तक का लिहिले तेही प्रस्तावनेत सांगितले आहे. त्यांना वाचकांना या पुस्तकातून सांगायचे होते कि जीवनाच्या कुठच्याही स्थितीमध्ये(अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत  सुद्धा) जीवनाला 'अर्थ' आहे. आणि याचे उदाहरण म्हणून कॅम्प मधल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीबद्धलच्या अनुभवांचा आधार त्यांनी घेतला आहे.  पुस्तकाला अमाप यश मिळाले त्याचे त्यांना काहीही वाटत नाही, उलट वैषम्य वाटते कि ज्याअर्थी हे पुस्तक इतक्या वेगाने वाचायला उचलले जात आहे त्यावरून या वाचणाऱ्या लोकांचे आयुष्य त्यांना  किती अर्थहीन वाटत असेल. लोकं यश आणि आनंद याच्या मागे धावत असतात, त्यासाठी उद्धेश बाळगतात, ध्येय रचतात. पण जेव्हा आनंद, यश हे अंतिम लक्ष्य (ध्येय, उद्देश) मानले जाते, त्याचा पाठपुरावा केला जातो तेव्हा ते साध्य होत नाही. जितके आपण त्याच्या मागे लागू तितके ते आपल्यापासून दूर पळत राहील. आनंद, यश हे अंतिम ध्येय नव्हेत तर जगण्याच्या क्रियेतील बाय-प्रोडक्ट आहेत. ते मिळवता येत नाहीत तर ते आपसूकच घडले पाहिजेत.
 जर आपल्याला आपले रोजचे आयुष्यच कष्टमय आणि बऱ्याचदा 'अर्थहीन' वाटते तर या कॅम्प मधल्या विदारक जीवनाच्या 'अर्थहीनतेचा' आपण विचारच करू शकत नाही. त्या 'अर्थहीन' वाटणाऱ्या  जीवनातूनही  'अर्थ' कसा शोधला जाऊ शकतो हे फ्रेन्केल दाखवतात.

जेव्हा कैदी पहिल्यांदा कॅम्प मध्ये येतो तेव्हा तो 'शॉक' मधेच असतो. राहतं घर, व्यवसाय, कुटुंब, सगळं मागे सोडून तो तिथे येतो (कश्यासाठी? बहुदा 'मृतं मरण' मरण्यासाठी, किंवा 'जिवंत मरण' जगण्यासाठी). फ्रेन्केल सांगतात कि जेव्हा ती कैद्यांची ट्रेन शेवटच्या स्टेशनवर थांबली तेव्हा 'ऑशविट्झ' हे नाव वाचून सर्वांच्या पायातील शक्ती निघून गेली. पुढे काय वाढून ठेवलेय याचा कुणालाही पत्ता नव्हता. त्यातही आल्या आल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना 'निवड' प्रकियेला सामोरे जावे लागले. शेवटी निसर्गात जी निवड प्रकिया चालते (बेस्ट फिट) तीच, (पण निसर्ग मानवासारखा 'अनफेअर' नाही). आपण कुठे जाणार , ज्यांची (त्यापैकी काही मित्र, सखे सोबतीही होते) आपल्या गटात निवड झाली नाही ते कुठे गेले त्यांचे काय झाले काही ठाऊक नाही. अश्या परिथितीत त्यांना स्वतःबरोबर आणलेले जे काही थोडेसे सामान (शेवटपर्यंत जपलेले) सोडून द्यावे लागले, फ्रेन्केलना आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीचे चीज: त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनाचे लिहिलेले पुस्तकाचे हस्तलिखित गमवावे लागले. इतकेच काय तर कपडेही.  म्हणजे एका पारड्यात आजवर ज्यासाठी जगलो, झटलो ते, इच्छा, स्वप्नं, मिळवलेले सर्वकाही, जोडलेली नाती, जीवनाचे संचित. तर दुसऱ्या पारड्यात फक्त नागडं अस्तित्व.

जी. ए. म्हणतात त्याप्रमाणे  अजस्त्र जीवनरूपी श्वापदाने आपला कुठलातरी विलक्षण डोळा आपल्यावर रोखल्यासारखं हे जीवनाचं दर्शन. आतापर्यंत बाळगलेल्या सर्व शाश्वत मूल्यांची धूळधाण  करणारं, जीवनाविषयीच्या समज, समजुतीना ढवळून टाकणारं, सत्सदविवेकबुद्धीची प्रचंड उलथापालथ करणारं.

अनेक निवड प्रक्रियेनंतर जेव्हा त्यांना आंघोळीसाठी नेण्यात आलं तेव्हा शॉवर मधून खरोखरीच पाणीच पडताना बघून त्या परस्थितितलं जीवनाचं रौद्र, कारुण्य, बिभत्स असे सगळे भाव एकवटलेले ते रूप बघून ते असह्य झाल्याने लोकं त्याही प्रसंगात हसू लागली एकमेकांची चेष्टा करू लागली. आत्तापर्यंत घडलेल्या आणि पुढे येऊ घातलेल्या अनाकलनीय, भयाकारी नाट्यापासून मिळालेल्या या उसंतीच्या आणि तरीही त्रस्त मनस्थितीत त्यांना 'ह्युमर' चा (विनोदाचा)प्रत्यय आला. 'ह्युमर' बरोबर एक वेगळी अनुभूती त्यांना आली ती कुतूहल वाटण्याची (क्युरीऑसीटी)  आणि ही 'कोल्ड क्युरीऑसीटी' होती.
त्याचबरोबर 'असंवेदनशीलता', भावनेचा अभाव, स्वार्थ, औदासिन्य (वन कुड नॉट केअर लेस) अश्या अनेक मानसिक स्थिती अनुभवला येत होत्या. या विषयींचे अनेक प्रसंग फ्रेन्केल यांनी दिले आहेत. जे त्यानी स्वतः बाबत किंवा इतरांबाबत अनुभवले.

 दोन: मध्यकाळ

लोक सगळ्याला कसे तोंड देत होते(किंवा बळी पडत होते) ते फ्रेन्केल  या भागात सांगतात. मानसिकता अत्यंत 'प्रिमीटीव्ह' (मुलभूत) स्वरुपाची झाली होती ज्यात फक्त त्या कैद्याच्या इच्छा, आकांशा त्याच्या स्वप्नातच 'स्पष्टपणे' दिसू शकत होत्या. फ्रेन्केल सांगतात, त्या खडतर काळात, खडतर शाररीक श्रम आणि अत्यल्प आहार (कुपोषण) यात फक्त दोन तीन तास झोपेचेच काय ते त्यांच्या जगण्याचा आधार असत. त्यातही झोपेत पडणारी स्वप्नं. त्याचे महत्व अनन्यसाधारण होते. काय स्वप्न बघत लोक? तर ब्रेड, केक, सिगरेट्स, गरम आंघोळ, उबदार कपडे हेच. या सुखद स्वप्नांतून भयंकर वस्तूस्थतीला सामोरे जाणे म्हणजे काय याची कल्पनाच करणे अशक्य. त्यांचे अतिशय हृदयद्रावक वर्णन फ्रेन्केल करतात.

I shall never forget how I was roused one night by the groans of a fellow prisoner who threw himself about in his sleep, obviously having a horrible nightmare. Since I had always been especially sorry for people who suffered from fearful dreams or deliria, I wanted to wake the poor man. Suddenly I drew back the hand which was ready to shake him, frightened at the thing I was about to do. At that moment I became intensely conscious of the fact that no dream, no matter how horrible, could be as bad as the reality of the camp which surrounded us, and to which I was about to recall him.

झोप आणि अन्नाचे कॅम्पच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व ते सांगतात.

How unavoidable were the thoughts about food and favorite dishes which forced themselves into consciousness of the prisoner, whenever he had a  moment to spare. Even the strongest of us, was longing for the time when he would have fairly good food again. not for the sake of good food, but for the sake of knowing that the sub-human existence which made us unable to think of anything other than food, would at last cease.
Those who have not gone through a similar experience can hardly conceive of the soul destroying mental conflict and clashes of willpower which a famished man experiences.

भरल्या पोटाचे कुठलेही चोचले तिथे शक्य नव्हते, याबद्धल ते लिहितात:

Undernourishment, besides being the cause of the general preoccupation with food, probably also explained the fact that the sexual urge was generally absent, as opposed to all other strictly male establishments, such as army barracks, there was little sexual perversion.

अत्यंत मजबूत मानसिकता असलेल्या लोकांचाही असा भावनिक तोल ढळत असे , लोकं हळूहळू फक्त आपल्या जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या  गोष्टींपूरताच कसा विचार करीत आणि त्या व्यतिरिक्त सर्व इतर घडणाऱ्या गोष्टींबद्धल कसे अलिप्त (देणेघेणे नसल्यासारखे) राहत तेही फ्रेन्केल सांगतात.

 Spirituality
कल्चरल हायबरनेशन जरी असले तरी स्पिरीट्युअल फ्रिडम (आध्यात्मिक उन्नती) ला वाव होता. फ्रेन्केल म्हणतात : Sensitive people who were used to a rich intellectual life may have suffered much pain but the damage to their inner selves were less. They were able to retreat from their terrible surroundings to a life of inner riches and spiritual freedom. Only in this way, one can explain the apparent paradox that some prisoners of less hardly makeup often seem to survive camp life better than did those of robust nature.

how Art and memories of beloved can save in traumatic situations
फ्रेन्केल आपल्या बायकोची प्रतिमा मनात जागवून त्यात मग्न होवून क्रूर वस्तुस्थिती विसरण्याचा प्रयत्न करीत. आणि त्यातून शांतता मिळणारऱ्या अनुभवाबाबत ते लिहितात:
I understood how a man who has nothing left in the world still may know bliss, be it only for a brief moment, in the contemplation of his beloved. In a position of utter desolation, when man not not express himself in a positive action, when his only achievement may consist in enduring his suffering, in such a position, Man can through loving contemplation of image he carries of his beloved achieve fulfillment.

'कला' कशी जगण्याचे बळ देऊ शकते त्याबद्धल ते लिहितात.
As the inner life of the prisoner tended to become more intense, he also experienced the beauty of art and nature as never before. If someone has seen our faces on journey from Auschwitz to Bavarian camp as we beheld the mountains of Salzberg, with their summits glowing in sunset, through a little barred windows of prison carriages. He would have never believed that those were the faces of men who had given up all hope of life and liberty.
एकदा सुर्यास्त पाहून एका कैद्याने म्हटले 'आयुष्य किती सुंदर आहे!'
कॅम्प च्या जीवनात कुठूनतरी येणारे व्हायोलीन चे संगीत, कुणाच्यातरी कविता यांनी तिथल्या जीवनाची  भयानकता थोडीफार सुसह्य केली होती.

Humor for Soul preservation
जगण्यासाठी 'हसणं', नाच-गाणं किती महत्वाचं आहे त्याचे उदाहरण फ्रेन्केल यांनी दिले आहे. शेवटच्या काळात (अर्थात तो शेवटचा काळ आहे हे कुणाला माहित नव्हते) मुख्य म्हणून नेमलेले काही कैदी
 गप्पा, गाणी, निरुपद्रवी चेष्टा मस्करी करण्यासाठी दिवसाच्या कठोर मेहनतीनंतर जमत. इतर कैदी अगदी अंगात त्राण नसले आणि पाय ओढत असले तरी ते बघायला जीवाची पराकाष्टा करीत, काहीवेळेला तर त्यांना त्यासाठी आपले अपुरे जेवणही सोडावे लागत असे. आता याला काय म्हणावं?


Value of human life and human dignity

फ्रेन्केल सांगतात कि शाररीक श्रमांपेक्षा मानसिक जखम अत्यंत असहनीय असत. त्याचा  प्रत्ययकारी अनुभव त्यानी सांगितला आहे. एकदा ते प्रतिकूल वातावरणात नेहमीचं खडतर शाररीक काम करीत होते, तेव्हा श्रम असह्य होवून ते थांबले, आपल्याला कुणी थांबलेलं बघून मारेल म्हणून त्यांनी आजूबाजूला पाहिले तर तेव्हाच नेमका गार्ड त्यांच्याकडे बघत होता. आता आपली धडगत नाही असे त्यांना वाटले पण त्या गार्डने काहीच न बोलता त्यांच्यावर फक्त लहानसा दगड भिरकावला तेव्हा त्यांना वाटले कि आपण माणूस नाही, हे गार्डस आपल्याला माणूस समजतच नाही, एखाद्या जनावराला हाकवावे त्या प्रमाणे आपल्याला वागणूक आहे.
काहीच चूक नसताना जेव्हा विनाकारण शिक्षा भोगावी लागते तेव्हा होणाऱ्या शाररिक यातनांपेक्षा मानसिक यातना अधिक असतात.
तिथल्या अनेक लोकांना (जे उपयोगाचे नव्हते अथवा आजाराला बळी पडले होते) त्यांना नष्ट केले जाई. कैद्यांना फक्त नंबर होता, नाव नव्हते. आणि गुरांपेक्षाही वाईट अवस्थेत त्यांना ठेवले जाई , जगण्याचा अधिकारच नव्हता. त्याबद्धल फ्रेन्केल लिहितात:

How very little value was placed on human life in camp. One literally became a number,deal or alive : that was unimportant. The 'LIFE' of that number was irreverent 


Need for personal space, Solitude
फ्रेन्केल म्हणतात 'कळपाचे जीवन' (गुरांचे असते तसे) हेच तिथल्या जीवनाचे स्वरूप. या कळपानेच वाचता येई . जेव्हा कुठेही नेण्यात येई तेव्हा कळपाच्या मध्यभागी गपचूप उभे राहून गार्ड पासून जीव वाचवता येई त्यामुळे सगळ्यांनाच ती मधली जागा हवी असे. पण कधी कधी हे असा कळपातील जीवन असह्य होई आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी जीव कासावीस होई.

या विलक्षण अनुभवातून जाताना, जीवन-मरणाच्या पुसट रेषेवर चालताना देखील फ्रेन्केल यांच्या मते जगण्यात अर्थ होता. मिनिट-मिनिटाला हताश करणाऱ्या अनेक अनुभवातून जाउन सुद्धा त्यानी जगण्याबद्धलची श्रद्धा गमावली नाही. उलट त्यांच्या जगण्याला एक नवं परिमाण मिळालं. ते Randomness (यादृच्छिकता) आणि नशीब यालाही मानतात. कितीही झाले तरी कधीही gas चेम्बर्स मध्ये रवानगी होवून आयुष्याचा शेवट होण्याची टांगती तलवार प्रत्येकाच्या मनावर होती. भविष्य पुसून टाकल्याप्रमाणे याला काही शेवट, अंत आहे कि नाही या बद्धलची विफलताही होती. पण या सर्वातही आयुष्य कुठल्याही क्षणी अर्थपूर्ण आहे असेच त्यांचे मत झाले कारण त्याचा वारंवार प्रत्यय त्यांना कॅम्प मधल्या खडतर जीवनात आला. ते म्हणतात :
Everything can be taken from a man but one thing; the last of the human freedoms — to choose one's attitude in any given set of circumstances, to choose one's own way.

मरणे देखील अर्थपूर्ण असू शकते, अत्यंत निरर्थक मरणात देखील आपण आपली dignity सांभाळू शकतो आणि शांतपणे त्याला सामोरे जाऊ शकतो याचे विलक्षण अनुभव त्यांनी सांगितले आहेत.  
एका स्त्री बद्धल ते लिहितात जीचे आयुष्य  लवकरच संपणार होते. तिने त्यांना सांगितले कि समोरचे झाड तिचे मित्र आहे आणि तिचा त्याच्याशी रोज संवाद चालतो. मरणाची कल्पना असून देखील ती त्याबद्धल त्रस्त नव्हती. जीवनाबद्धलची एक प्रकारची खोल समज तिला मिळाली होती.  शेवट क्रूर आहे, आपली सुटका नाही फक्त शाश्वत दुःखच आहे ज्याचा अंत , म्हणजे स्वतःचाच अंत असे ठाऊक असणारी (जरी फार थोडी असली तरी) माणसे होती जी आपला ब्रेड चा तुकडा दुसऱ्याला देत, रोग्यांना दिलासेचे शब्द देत. अश्या अनेक अनुभवातून फ्रेन्केल गेले.

असे अनेक अनुभव या पुस्तकातून मुळातून वाचण्यासारखे आहेत. फ्रेन्केल यांच्या शब्दात इतकं सगळं होवून कुठेही द्वेषाची भावना नाही. ते म्हणतात. फक्त दोनच वंश (रेसेस) आहेत :  सभ्य आणि असभ्य
त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत ज्यात कळते कि जर्मन लोकांत अनेक चांगले होते आणि ज्यू लोकांत असे अनेक होते कि ते आपल्या समधर्मियांशी जर्मनांपेक्षा क्रूरतेने वागले.

एकदा एका वार्ताहर स्त्री ने फ्रेन्केल यांना प्रश्न विचारला होता कि 'तुम्ही जर्मन मध्ये पुस्तक का लिहिले, ती हिटलर ची भाषा आहे. ' त्यावर फ्रेन्केल म्हणाले : 'तुम्ही तुमच्या जेवणघरात चाकू/सूऱ्या कश्या काय वापरू शकता हे माहित असून सुद्धा कि त्याने कत्तल केली जाते?'

तीन : सुटका आणि त्यानंतरचा काळ.

हा काळ वाटावा तेवढा सुखी नव्हता उलट ज्यास्त त्रस्त करणारा होता, कारण कॅम्प मध्ये खडतर आयुष्यात कैद्यांकडे आशा होती कि आपण इथून सुटून आपल्या कुटुंबाकडे परत जाऊ शकू. काहींच्या बाबतीती ती शक्यता पूर्णपणे नाश पावली होती.
फ्रेन्केल लिहीतात :
"Freedom" we repeated to ourselves, and yet we could not grasp it.We had said this word so often that it had lost its meaning.
We had literally lost the ability to feel pleased and had to relearn it slowly.
depersonalize म्हणजे कुठल्याही बाबतीत वैयक्तिक रित्या काहीही न वाटणे. 'हे माझ्यासाठी नाही' ची भावना वाटणे. हा  हि त्या मुक्त झालेल्यांचा अनुभव होता. पण शरीर मनापेक्षा लवकर संकोच सोडते. जेव्हा फ्रेन्केल यांना खऱ्या अर्थाने फ्रिडम चा अनुभव आला तो पूर्ण भाग अतिशय वाचनीय आहे.
त्यांनी लोकांच्या स्वभावातील बदल इत्यादीबद्धल देखील लिहिले आहे. ते म्हणतात :
During this phase, people with natures of a more primitive kind could not escape the influences of brutality which had surrounded them in the camp life. Now being free, they thought , they could use their freedom "licentiously and ruthlessly". Oppressors instead of Oppressed, instigators,being unjust and justified their behavior by their own experiences.

पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजे  फ्रेन्केल यांनी आपल्या अभ्यासावरून व आलेल्या थेट अनुभवातून बनवलेले तत्त्वज्ञान आहे. हि 'लोगोथेरपी' आजपर्यंत अनेकांना  निराशेच्या खोल गर्तेतून काढण्यासाठी, आत्महत्तेपासून परावृत्त करून जीवनावरचा विश्वास दृढ करण्यासाठी उपयोगी पडली आहे. त्याचे महत्वाचे अंग म्हणजे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला (मग ती कितीही अर्थहीन वाटेल, कितीही hopeless वाटेल ) अर्थ आहे असे मानाणे, त्याचे साक्षीदार म्हणून स्वतः ला जबाबदार मानणे. तेव्हाच त्यातून 'अर्थ' हाती लागेल व त्यातून बाहेर पडण्याचे बळ येइल. 'लोगो' म्हणजे (ग्रीक ) "meaning", अर्थ. याबद्धल बरच विवेचन फ्रेन्केल यांनी अनेक उदाहरणांसह या भागात केलं आहे ते मुळातून वाचाण्यासारखं आहे. 


या पुस्तकातले अनुभव नुसते वाचून सुन्न होऊन, विसरून जाण्यासारखे नाहीत तर ते वेळोवेळी मनात धगधगत ठेवून आपण 'जीवनासाठी' काय करतोय असा विचार करायला लावणारे आहेत. फ्रेन्केलनीही त्यांच्या अनुभवांचं चित्रण करताना म्हटलं आहे कि वेळ अशी होती कि जीवना कडून आपल्या काय अपेक्षा आहेत, आपण काय अपेक्षा करू शकतो यापेक्षा महत्वाचं होतं कि जीवनाच्या 'आपल्याकडून' काय अपेक्षा आहेत?'
आपण नेहमी जीवनाकडेच मागत असतो. नाही मिळालं त्याबाबत रडत-भेकत असतो. कुढत असतो. पण कधी हा विचार केला आहे का कि जीवन आपल्याकडून काय मागतं?


जीवनाचा हा थेट अनुभव आणि त्यातून मिळू शकणारं ज्ञान. जे कुठलंही पुस्तक वाचून (हे आत्ताचं सुद्धा) मिळणार नाही. मग काय मिळतं या पुस्तकातून? हेच की या त्यांच्या अनुभवातून काही ज्ञान मिळणार जरी नसलं तरी स्वतःच्या जीवनातून( जे काही आपलं फुटकळ किंवा अवाढव्य, बरं किंवा वाईट, उत्साही किंवा कंटाळवाणं, सुंदर किवा भयंकर असं आपल्या जीवनाचं स्वरूप आहे) ते ज्ञान नक्कीच 'स्वतःचं  असं, स्वतःपुरतं मिळू शकतं. तो अर्थ आपणाला आपल्या 'कश्याही' परिस्थितीतल्या आयुष्यातून मिळू शकतो. इथे मला पु. लं. नी त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला लिहिलेल्या पत्रातील वाक्य पुसटसं आठवतं , 'जीवनाला अर्थ नसेल/ नसतो पण तो अर्थ आपण द्यायचा असतो'.  अर्थहीनतेतही 'अर्थ' मिळू शकतो.

जीवन आपल्याकडून हेच मागत असतं : आपल्याला कळलेला त्याचा अर्थ.

No comments:

Post a Comment