Tuesday 23 February 2016

भयाच्या मॅनिफेस्टेशन्सचा अजगर: १

 चिं. त्र्यं. खानोलकरांची 'अजगर' ही कादंबरी म्हणजे प्रत्यक्ष अजगरच. मी अजगर प्रत्यक्षात एकदाच बघितला होता, पाचवीत असताना एका प्राणीसंग्रहलयात. लहानपणी घराच्या आसपासच्या आवारात, छप्पराच्या कौलांत साप खुप बघितले पण अजगर तसा दुर्मिळच. माझ्या आजीने आमच्या गावच्या घराच्या गोठयात आलेले दोन अजगर पाहिले होते. ते जनावरांच्या वासाने मागच्या डोंगरातून गोठयात शिरले होते आणि ते शीळ घालित, शेवटी गावकऱ्यानी त्याना मारले. त्याच्याबद्धल तिने सांगितले तेव्हा अंगावर काटा आला होता.
जी. ए. कुलकर्णी यांच्या 'लक्ष्मी' या कथेतील अजगरच्या वर्णनाने देखील तोच अनुभव आला होता. आता  भर घालयला खानोलकर 'अजगर' घेऊन आले आणि लहानपणीच्या आठवणीतला सुप्त भयाचा अजगर जिवंत होऊन आ वासून उभा राहिला.

तसं खानोलकरांचं हे पुस्तक मी दहा वर्षांपूर्वी वाचलं होतं, तेव्हा मला ते त्यातल्या अत्यंत वेगळ्या लेखनासाठी आवडलं होतं पण त्यातल्या विशिष्ट भागातील वर्णनामुळे मला काही दिवस जेवण धड गेलं नव्हतं . साहजिकच तेव्हा माझं वाचन तेवढं प्रगल्भ नव्हतं. कदाचित वाचनासाठी लागणारी परिपक्व जाणीवही  नव्हती, त्यामागची नेणीव तर सोडाच. पण त्यावेळीही हे पुस्तक वेगळं वाटलं होतं.

आज हे पुस्तक माझ्या संग्रही आहे, आणि अनेकदा मी ते वाचलं आहे. त्यातल्या अनुभवाच्या आविष्काराने मला दरवेळी स्तिमित केलं आहे.
या कादंबरीतील प्रत्येक ओळीत गुदमरलेपणा भरून राहिला आहे. एखादा अदृश्य, प्रचंड अजगर सतत आपला विळखा यातल्या पात्रांच्या भोवती घालत आहे आणि ते बघत असताना आपल्याही मनातल्या भयाचा अदृश्य अजगर आपल्याभोवती देखील वेटोळी घालायला सुरवात करतो.
  
मनातल्या गोष्टी जेव्हा व्यक्त होऊ शकत नाहीत, दबून जातात किंवा दाबून टाकल्या जातात तेव्हा त्या मनातल्या मनात अक्राळ विक्राळ रूप धारण करतात. मनच अजगर बनू पाहते. हा अजगर जबडा वासतो फक्त गिळण्यासाठी.


अतृप्त इच्छा-वासना ,  अनाकलानीय भीती, ठार एकटेपणा आणि त्याची असणारी जाणीव , जीवनाबद्धाल वाटणारी विफलता, नियती, नीती अनीती आणि मन यांचा चालेलेला अहर्निश संघर्ष,  यांच्यापासून बनलेल्या या  अजगराच्या विळख्यापासून  सुटका करून घेण्याचा केविलावणा प्रयत्न करणारे या कादंबरीतील सगळे कुठच्यातरी फुटकळ आशेने जगत आहेत पण अजगरचा विळखा असा आहे की त्यांचे हाड न हाड काड काड मोडत आहे. बरगडयात श्वास गुदमरला आहे. मणक्याचे तुकडे तडातड मोडून पडत आहेत.  त्यातही तिरमिरीत उठून उरलेले तुकडे सांभाळत ही माणसं जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

मी काही एवढी पुस्तकं वाचली नाहीयेत आणि  मला त्याबद्धल बोलण्याचा अधिकार आहे असेही मी समजत नाहीये, पण मला वाटतं खानोलकारांसारखं  सगळ्या प्रकारच्या भयाच्या (मॅनिफेस्टेशन्स) रूपांनी  साकारलेलं  जीवनाचं हे विश्वरूपी दर्शन दाखवण्याचं धाडस मराठीत तरी कुणी केलं नसावं. 

हरिपंत, इंदू, पावसकर, पावसाकारीण , धारप, पांगळा, वेश्या, बाप , मोरे, भोळे आणि त्यांची बायको ही सर्व भयाची वेगवेगळी मॅनिफेस्टेशन्स घेऊन जगत आहेत, अतृप्त इच्छानी पोखरून निघत आहेत. जीवनावरचा ताबा सुटत जाणे, नॉस्टाल्जिया, जुन्या गेलेल्या दिवसांची सुखद आणि त्रस्त करणारी आठवण
पुढचा काळ अंताकडे अधिक प्रकर्षाने घेऊन जाणारा, त्याचे वाटणारे अनाकालनीय भय अशा अनेक रूपांनी जीवनाचा हा अवाढव्य अजगर त्यांना कवळू पाहतोय. यातून सुटका नाही याची जाणीवही त्यांना आहे, आणि भिरकावून देण्यासाठीही त्यांच्याकडे काहीही उरलेले नाही.

हि कादंबरी फक्त नव्वद पानांची आहे, पण तिच्यात एवढा ऐवज भरला आहे कि त्याचे आकलन करणे आणि त्याबद्धल काही लिहिणे शेकडो पानांनीही पुरे व्हायचे नाही. त्यामुळे मी आधी त्याच्या पात्रांचे आकलन करणार आहे. खरंतर हि पात्रं सुटी नाहीत, एकमेकात गुंतलेली आहेत. परंतु त्यांच्याशी एकेकट्याने बोलून काही हाती लागते का ते मला बघायचे आहे.

सर्वात मोठा आवाका असलेले पात्रं म्हणजे हरिपंत चौघुले. जे सुरवातीपासून शेवटपर्यंत अनामिक भीतीने पछाडलेले आहेत. इतके कि त्यांचे त्यांनाच ठावूक नाही.

भय हे मानवी मनाचे मुख्य टेक्शर (पोत) आहे.मुलभूत भावना आणि प्रेरणा (त्या नक्की कोणत्या हाही खरं तर माझ्या दृष्टीने अभ्यासाचा भाग आहे, मला त्याचे पूर्ण आकलन झालेलं नाही.) यांच्यावर जेव्हा भयाचे, अतृप्तीचे आवरण चढते तेव्हा त्या विचित्र आणि अनाकलनीय रुप धारण करतात. त्यांचे मूळ स्वरूप पार बदलून जाते. इतके कि ते कित्येकदा माणसाला विचित्र, विक्षिप्त वागायला भाग पाडते. या कादंबरीतील हरिपंत चौगुले हे असेच एक. त्यांच्यासाठी भयाचे कारण बनले आहे त्यांना वाटणारं त्याचं शेणामेणाचं आयुष्य, इतकं कि जरासा धक्का लागून ते कोसळेल.

आधीच पत्नीच्या मृत्युनंतर, त्यांना जाणवणारं त्याचं 'अकारण' (ऐमलेस) आयुष्य आता 'पेन्शनीत निघाल्यामुळे' (म्हणजेच ते निवृत्त झाल्याने) अधिकच काळवंडून गेले आहे. ऑफिसमधली त्यांची खुर्ची ही आयुष्यातल्या स्वतःच्या ओळखीची (सिग्निफ़िकन्सची ) त्यांची महत्वाची खुण, तीही आता जाणार, या भावानेने दडपून जावून ते मोरेला त्यावर जबरदस्तीने बसायला लावतात. त्या खुर्चीचे मोल त्यांना एवढे  असते कि आपल्यानंतर कुणी दुसरे त्यात बसण्यापूर्वी त्या खुर्चीची पत घालवून टाकावी असा ते विचार करतात. नाहीतरी माणसाची 'ओळख'(आयडेंटीटी) काय असते जीवनात? तर तो कुणाचातरी बॉस असणे, नोकर असणे, पती असणे, पत्नी असणे, आई, वडील , मुलगी, मुलगा, भाऊ , काका , मामा, इंजिनीअर, डॉक्टर, शिक्षक, बेकार, वेठ्बिगार, चोर, साधू असलंच काहीतरी असणे, हे लेबल स्वतःला लावून घ्यावं लागतंच. कुणीही त्यापासून सुटलं नाहिये. तर अश्या एका 'ओळखी'तून हरीपंत मुक्त झालेत पण त्यांना त्याबाबत विषण्णता आहे. खुर्ची म्हणजे अधिकार, ओळख , राज्यपद, त्यांच्या भाषेत कुणालाही 'डिसमिस' करण्याची ताकद. ती गमावून बसल्याने ते सैरभैर होतात. त्या अधिकार गमावलेल्या भावनेची बसणारी झळ कमी करण्यासाठी म्हणूनच कि काय ते मोरेला त्या खुर्चीवर बसायला जबरदस्ती करतात. पण मोरेही त्यांच्यासारखाच दुसरा 'शेणामेणाचा' माणूस. तोही त्याच मनातल्या भीतींनी दडपलेला. त्याच्या या आंतरिक भयाच्या रूपांतून त्या खुर्चीवर निर्माण होतं भयाचं केसाळ काळं  श्वापद. हरिपंतानाही ते दिसतं आणी मोरेलाही. ते मोरेचा ताबा घेतं. आणि मोरेच्या वागण्यातून हरिपंतांच्या मनाचाही ताबा घेतं. त्या पातळीवर दोघेही अतिवास्तवाच्या (सरेलिस्टीक) विळख्यात आवळले जातात. किंबहुना ते दोघे नव्हेत तर आपण त्या अतिवास्तवाच्या पातळीवर त्यांची भीती अनुभवतो. ते भयाचे श्वापद आपलीही पकड घेते.

हरीपंतांना नक्की कसली भीती वाटते ते सांगणे फार कठिण आहे पण अनुभवणे सोपे आहे. आपल्यालाही अश्याप्रकारची भीती अनेकदा जाणवली आहे, तिला नाव नाही देता येणार पण तिचे अस्तित्व जाणवत राहते.








No comments:

Post a Comment