Friday 3 June 2016

धयकालो: मालवणी दशावतारी नाटक

दशावतारी नाटकातील भटजी , दासी , गणपती आणि संकासूर , (courtesy & copyright Marathi Vishwakosh)

बाबल्या … पडान घे! …… पडान घे!

बाबलो धयकाल्यात काम करता. सातेरीदेवीचो सप्तो चालू झालोहा. आज रात्री नाटक आसा. बाबलो नाटकात संकासुराचा काम करता, पण तेका आज संकासुराचा काम करुचा नाय. नाटकाचे सूत्रधार आबा सगळ्यांका भूमिका वाटून देतत. नेहमीसारख्या बाबल्याक संकासुराची भूमिका मिळता. पण बाबल्याचो चेहरो पडलंलो. बाकीचे कलाकार ताँड रंगवूक बसतत. बाबलो आपलो थैसरच.
'ओ आबा, मिया काय म्हणतय…'
'काय्येक म्हणा नको. जावन तोंडाक रंग लाव जा, टायम होउक इलो हा'  आबा आराडले. 
''आबा, मी संकासूर व्होवचय नाय आज'
'काय? मग संकासुराचा काम कोण तुजो बापूस करतलो?'
…… 
……
नाटक सुरु होवन खूप टायम झाल्ललो हा. बघुक आया,बाया बापड्यांची ही गर्दी झाल्लली आसा. संकासुराचो वध करुक विष्णूचा काम करणारो सुनलो छाती पुढे काढीत, कऱ्हा करून इलो. आणि संकासुराच्या पाठसून नाचाक लागलो, धीनिन्नाव-तिग्गीन्नाव धीनिन्नाव-तिग्गीन्नाव अश्या पखवाजाच्या आवाजार दोघंय फेर धरान यकामेकाकडे रागान बघुक लागले. बराच वेळ असा चलला. तरी संकासूर विष्णूक गावाक तयार नाय. तो आपलो नाचताहा. शेवटी विष्णू झाल्लल्या सूनल्यान बाबल्याक हावभाव करून तेच्या मरण्याबाबतीत इचार्ल्यान. तरी बाबलो काय दाद देवक तयार नाय. मग विष्णून आव आणून म्हटल्यान  'अरे चांडाळा! खूप झाले तुझे खेळ! आता मारायला तयार हो!' आणि गदा बाबल्यार मारल्यान, पण बाबल्यान गदा लागल्याचो अभिनय केल्यान पण थैसरच उभो. विष्णून गदेर गदा हाणल्यान पण बाबलो आपलो थैसरच्या थैसरच. विष्णू झाल्लल्या सुनल्यान हळू आवाजात बाबल्याक म्हटल्यान 'बाबल्या, अरे तुझी पडाची ऍक्टिंग रवली मा रे ! मेल्या काय नवटाक घेवन ईलस काय रे? '
पण बाबलो काय पडाक तयार नाय. मग पेटी वाजवणाऱ्या आबांनी पेटीयेचो सूर भसाडो करून वाढवल्यानी आणि पखवाजवाल्याक इशारो केल्यार तोय धीनिन्नाव तिग्गीन्नाव जोरातच वाजवूक लागलो. आबा (हळू आवाजातच पण) आराडले 'मेल्या, बाबल्या अरे पडान घे! …… पडान घे!'
बाबल्यान आबांकडे बघुक नाय. विष्णूकडेच रागान बघित अभिनय करीत असल्यासारखो म्हणालो 'मी नाय पडान घेवचंय!' नाय पडान घेवचंय! माजी बायल इलीहा नाटक बघुक, सासऱ्याक घेवन. सासरो बघताहा थैसून , मी…  पडान…  घेवचंय…  नाय'
'अरे मेल्या दिसणहस नाय तू……  घे पडान '
शेवटी पखवाज वाजवणारो झीलगो इतक्या जोरान धीनिन्नाव तिग्गीन्नाव वाजवूक लागलो कि पखवाज फुटात कि काय असा वाटूक लागला. पेटयेचो सूर वेडोवाकडो जावक लागलो. आबांनी वरचो सूर लावल्यानी. विष्णून गधा सोडून हातांचो जोर लावून बाबल्याक खाली पाडल्यान आणि संकासूर एकदाचो मरान पडलो.
अशी हि मालवणी दशावतारी नाटकासंबधी घडलेली एक मजेशीर गोष्ट. 


दशावतारी नाटक असते तरी कसे?

मालवणी दशावतार नाटक म्हणजे एक अजब प्रकार आहे. लोककलेचा हा प्रकार तळकोकणात आजही टिकून आहे. शेकडो वर्षांपासून फक्त लोकाश्रयाने जगत आलेली हि कला  मालवणी माणसाला अद्याप भुरळ घालून आहे. टी.व्ही. इंटरनेट च्या आजच्या जमान्यातही गावात मात्र गर्दी करून गावातली माणसं रात्री जागून हमखास दशावतारी नाटकं बघतात. (या कलेला असेच उत्तरोत्तर प्रोत्साहन मिळावे, आणि हि कला अशीच टिकून राहावी अशी मनापासूनची इच्छा)

माझं बालपण कोकणात गेलं(वयाची १४ वर्ष) पण दशावतारी नाटकाची ओळख काही झाली नाही. इतकी सुंदर कला जवळून त्या काळात बघता आली नाही याचे आज वैषम्य वाटत राहते. अलीकडे मी कोकणात गेले असताना हे नाटक बघण्याचा योग आला. आणि इतक्या छान प्रकाराचा आस्वाद आपण आधी कधीच घेतला नाही म्हणून चूटपुट वाटली. तर हे दशावतारी नाटक असते तरी कसे?

दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार. त्या अवतारांच्या अनुषंगाने रचलेल्या काल्पनिक कथा नाट्यरुपात रंगवून केलेले त्याचे सादरीकरण म्हणजेच दशावतारी नाटक.

दशावतारी नाटक हे तळकोकणातील(सिंधुदुर्ग जिल्हा) गावातील  देव-देवता/ग्रामदेवतांच्या जत्रा/उत्सवाचा अविभाज्य घटक आहे.
तुळशीच्या लग्नानंतर साधारणपणे भातकापणीच्या हंगामात, दरवर्षी ठरविक तिथीला सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात कोणत्या न कोणत्या देवाचा उत्सव चालू होतो. या उत्सवाला मालवणीत 'सप्तो' असे म्हणतात. 'सप्तो' म्हणजे सप्ताह(जो काही ठिकाणी सात दिवस चालतो). हे उत्सव त्या त्या देवस्थानांचे ठरलेले वार्षिक उत्सव असतात. या उत्सवामध्ये जत्राही भरते. देवीची पूजा. गाऱ्हाणी/नवस, पालखी आणि सर्वात शेवटी (म्हणजे रात्री उशीरा) दशावतारी नाटक. हे देवळाच्या आवारातच केले जाते. देवळाच्या सभामंडपामध्ये किंवा देवळाच्या बाहेर छोटासा प्लॅटफॉर्म असतो/उभारला जातो. त्याची दिशा देवाकडे असते. दशावतारी कलाकार या स्टेजवर उभे राहून देवाकडे तोंड करून नाटक सादर करतात. जणू काही ते नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये देवळातला देवही एक आहे.  
आता हे नाटक म्हणजे काय भन्नाट प्रकार आहे ते सांगते.
या नाटकाला नैपथ्य नाही. मध्ये एक लाकडी बाक ठेवतात. त्याच्यावरच जो कोणी (विष्णू/ यम / नारद / सामान्य भक्त कुणीही )येईल त्याने बसायचे. हा बाक म्हणजेच सिंहासन/दगड/खुर्ची/पलंग/ नदीकाठ/ज्याप्रमाणे प्रसंग असेल त्याप्रमाणे त्याचे स्वरूप बदललेले समजायचे. 

नाटकाला संहिता नाही. संवादही उत्स्फूर्त, तिथल्या तिथे म्हटलेले. दिग्दर्शक नाही. एक सूत्रधार असतो तो नाटकाच्या काही काळ आधी कुठच्या कथेवर नाटक करायचे ती कथा समजावून सांगतो. आणि कामं वाटून देतो. त्याप्रमाणे कलाकारांनी अभिनय, संवाद फेक स्वतःच ठरवून करायची आणि कथा उलघडत न्यायची. 
या कथा पौराणिक असतात. रामायण, महाभारत, आणि विष्णूपुराणातल्या. जी कथा सादर होते त्यात मूळ कथाबीज असते आणि बाकीचा कथेचा भाग काहीसा उत्फूर्तपणे कलाकारांकडूनच त्या भोवती गुंफला जातो. त्यामुळे नाटक कलाकारच पुढे नेतात. आणि असे हे नाटक रात्री १०-११ वाजता जे सुरु होते ते पहाटे तीन-चार वाजेपर्यंतही (कधी कधी त्या नंतरही) चालू शकते.  
मालवणी दशावतारी नाटकाला गावातील लोक 'धयकालो' असंही संबोधतात ते का तेही पुढे कळेलच. 

दशावतारी नाटकाचा इतिहास 

दशावतारी नाटकाचा उगम कसा आणि कुठून झाला हे सांगणे अवघड आहे. त्याचा इतिहास विखुरलेल्या स्वरूपात मिळतो. याबाबतीत बहुतेक मते वेगवेगळी असून, त्यांना फारसे पुरावे देखील नाहीत. 
मराठी विश्वकोशात नोंदल्याप्रमाणे १७व्या शतकातील रामदासांच्या दासबोध ग्रंथामध्ये  (‘देवशोधननाम’ या सहाव्या दशकातील आठव्या  समासामध्ये)   दशावतार नाटकाबद्धल  खालील उल्लेख आढळतो. 
खेळता नेटके दशावतारी
तेथे येती सुंदर नारी
नेत्र मोडिती कलाकुसरी
परी ते अवघे धटिंगण
त्यावरून १७ व्या शतकात दशावतारी नाटके होत असत असा निष्कर्ष जरी काढता आला तरी त्याला अन्य पुरावा नाही.  मात्र तेराव्या शतकाच्या आधीपासून अशा प्रकारचे खेळ प्रचलित आहेत असा उल्लेख ‘ज्ञानेश्वरी’त आहे. ('लोकगंगा' या पुस्तकात याचा उल्लेख आहे)

इ. स. १७२८ मध्ये शामजी नाईक काळे यांनी दशावताराचा पहिला प्रयोग राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे महाकालीच्या मंदिरामध्ये केला होता. याची नोंद चिं. कृ. दीक्षित यांनी 'आडीवऱ्याची महाकाली' या आपल्या पुस्तकात केला आहे. त्यांनी कर्नाटकातून हा नाट्यप्रकार इथे आणला असे त्यांचे म्हणणे  आहे. तर पु. गो. काणेकर आपल्या 'नाट्यस्मृती' या पुस्तकात म्हणतात कि काळे यांनी दशावतारची कला कोकणातूनच आडीवऱ्याला नेली. वि . कृ. जोशी यांनी या दोन्ही मतांना धरून ती कला कोकणातून जन्मली तरीही कर्नाटकातील कलेच्या मार्गाने आली आहे असे म्हटले आहे. 
कनार्टकात जो नाट्यप्रकार आहे त्याला 'यक्षगान' म्हणतात. भागवतपुराणातल्या कथांवर हा नाट्यप्रकार आहे. दशावतारी नाटक, यक्षगान जवळजवळ भासत असले तरी त्यांत फारसे साम्य नाही.
दशावतारी नाटकात संशोधन करणारे डॉ . तुलसी बेहेरे यांनी यावर सखोल अभ्यास केला आहे. त्याच्या दाव्यानुसार दशावतार आणि यक्षगान मध्ये खुपच फरक आहे. यक्षगानात मुख्य भर नृत्य गायनावर असतो. तर दशावतारी नाटकात उत्स्फूर्त संवादफेक रांगडा अभिनय, यावरच भर आहे. यक्षगानामध्ये सगळ्या दहा अवताराचे presentation होत नाही. दशावतारी नाटकात ते होते/किंवा ते अवतार गाण्याच्या स्वरुपात सूत्रधार सांगतो. 
कोकणातील दशावतारी नाटकाचा सर्वात जुना उल्लेख सुमारे आठशे वर्षांपूर्वीचा मानतात. लोकगंगा या पुस्तकात लिहिले आहे कि सिंधुदुर्गात प्रथम दशावतारी नाटक केशव गोरे यांनी वालावल येथे (ता. कुडाळ, सिंधुदुर्ग) नारायणाच्या देवळात सादर केले. केशव भटजी कडून दशवताराचा पेटारा वालावलकर यांनी स्वीकारला. आज वालावलकरांची तेरावी पिढी दशावतार नाटक सादर करीत आहे. याचबरोबर  आजगावकर,कलिंगण, मोचेमाडकर, पार्सेकर, खानोलकर, चेंदवणकर अश्या अनेक नाटक कंपन्यानी दशावतार कला पिढ्यानपिढ्या जोपासली आहे. 
बाबी कलिंगण आणि बाबी नालंग हे दशावतार नाटकातील दोन नावाजलेले कलाकार.

दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये देवदास, देवदासी प्रथा होत्या त्यातून अनेक लोककला आणि शास्त्रीय कलानी जन्म घेतला. कोकण परिसरात देवाला वाहिलेल्या भावीणी असत. त्यांच्यापासून जन्मलेला देवळी समाज, पुरातन काळी मुख्यत्वाने दशावतारी नाटक हा व्यवसाय करी. पुढे इतर समाजातील लोकांनीही त्यात  पुढाकार घेतला. 
हिस्टरी ऑफ इन्डीयन थेटर भाग २ या मनोहर वारपांडे यांच्या पुस्तकात त्यांनी दशावतार नाटकाच्या उगमाबद्धल वेगळी माहिती दिली आहे. 
कोकणचा भाग पूर्वी गोमंतक म्हणून ओळखला जाई. त्या गोमंतकाच्या early folk theatre मध्ये 'जागर' म्हणून एक कला होती, ज्यात कृष्ण कथा रंगवल्या जात. पूर्वरंगात स्त्री वेशातील कलाकार कृष्णाची प्रतिमा  घेऊन नाचत असे. उत्तररंगात मडू (madu ) आणि कैताभ (kaitabha ) तोंडावर भयंकर मुखवटे घालून येत आणि त्यांचा संहार मत्स्य रूपातील विष्णू/कृष्ण करे. भरताच्या नाट्यशास्त्रात युध्द/ संहारा समयी विष्णू/कृष्ण यांच्या अभिव्यक्तीच्या चार वृत्ती लिहिलेल्या आहेत. त्या वृत्तिंचे दर्शन जागर मध्ये होत असे.
गोमंतकाच्या याच early folk theatre मध्ये दशावताराचे बीज आहे. त्या दशावतार चे 'दशावतार काला' , 'गोपाळकाला' आणि 'गौळणकाला' असे भाग होते . काला म्हणजे प्रसाद. गोपगोपी श्रीकृष्णाला म्हणतात 'अमुच्या शिदोऱ्या एकत्र करोनी , काला वाटसी तू चक्रपाणी'
दशावतार नाटक पण एकप्रकारचा कालाच असते. नाट्य, अभिनय, संगीत, गायन यांचा एकत्रित मिलाप त्यात होतो. 


नाटक घडते कसे?
[दशावतारी नाटकाचा देवळाच्या समोरचा रंगमंच, वर कलाकार , खाली बसलेले प्रेक्षक, बाजूला दिसणारे वडाचे झाड आणि त्याखाली डाराडूर झोपलेल्या आजी ]
दशवतारी नाटक म्हणजे नुसते 'आख्यान' नव्हे तर देवतेच्या उत्सवाशी ते घट्ट बांधलेले आहे. दशावतारी नाटक सुरु होण्यापूर्वी ग्रामदेवतेची पूजा, गाऱ्हाणी, नवस, पालखी संपन्न होते. त्यानंतर नांदी/धुमाळी गणेशपूजन, शारदास्तवन. आडदशावतारातील संकासुराची कथा , दशवतारांचे दर्शन, आख्यान , दहीकाला, समराधना. असा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे दशावतार नाटक. कालांतराने यातले  दशवतारांचे दर्शन, समराधना हे भाग गाळले गेले. 'दहीकाला' म्हणजे खरा दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम, हा पहाटे नाटकाच्या उत्तरंगात होतो. पण गावातले बहुतेक दहीकाल्याला कुणी थांबत नाहीत. दहीकाला कृष्ण, गौळण इ. करतात, हंडी मानकरी कलाकाराकडून फोडली जाते. पण बहुतांशी लोकांना दशावतारी नाटक म्हणजे फक्त आख्यान एवढेच माहित असते. बहुदा बरेचजण नाटक पाहता पाहता झोपेने गारद होतात. 

देवळाच्या आवारातच चार कोपऱ्यात चार मेढी उभारतात. त्यावर ताडपत्रीचे छप्पर. प्रकाशासाठी पूर्वी खांबाच्या आडोशाला दोन दिवे, कंदील, पेट्रोमॅक्स बत्ती वापरायचे , आता विजेचे दिवे लावतात.


सुरवात  
दशावतारी नाटकात जे कलाकार असतात, ते जिथे उत्सवाचे निमंत्रण असेल तिथे आपला दशावताराचा पेटारा घेऊन दाखल होतात. त्याच्या या पेटाऱ्यात रंगभूषा, वेशभूषा यांचे सामान असते. तसेच गणपती, रावण, यक्ष, संकासूर यांचे मुखवटे देखील असतात. या पेटाऱ्याचे महत्व दशावतारी नाटकात अनन्यसाधारण आहे. नाटक सुरु होण्याआधी त्याच्या पुढे समई पेटवून ठेवली जाते. मुखवटे वापरण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. नाटक कंपनी उत्सवाच्या वेळी गावोगावी पेटारा घेऊन देवस्थानात नाटक सादर करते. त्याची वार्षिक बिदागी त्यांना देवस्थानतर्फे/गावकऱ्यांकडून दिली जाते.

स्वतःची वेशभूषा ते स्वतःच करतात आणि तेही अगदी फटाफट १५ मिनिटात. कलाकारात सहसा स्त्रिया नसतात. पुरुषच स्त्री भूमिका करतात. पण त्यांच्याकडे स्त्रीसुलभ हावभाव करण्याची कोणती नजाकत असते कोण जाणे. ते अतिशय ग्रेसफुल वाटतात. स्टेजवर मधोमध रिकामे बाकडे आणि एका कोपऱ्यात तबला / पखवाज , पायपेटी , झांज घेऊन २-३ माणसे. पायपेटी वाजवणारा बहुतेक चांगला गाणं म्हणू शकणारा असतो. तो सूत्रधारही असतो. कलाकार रंगून तयार असतात. 
[रमा आणि वैष्णव यांच्यामधला संवाद, यातली रमा एकदम स्लीम-ट्रिम आहे आणि तिच्यात स्त्रीसुलभ ग्रेसहि आहे. कमाल त्या कुठचेही प्रशिक्षण न घेता फक्त निरीक्षण आणि अनुभवातून  शिकणाऱ्या , स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषाची, फक्त आवाज सोडला तर तो साधारणपणे स्त्रीच वाटत होता] 

पूर्वरंग
 
दशावतारी नाटकाची सुरवात धुमाळीने होते. पखवाज वाजवणारा जोरजोरात वाजवतो. त्यानंतर मंगलाचरण सुरु होते आणि पूर्वरंग सुरु होतो. 
पूर्वरंग: यात सगळे कलाकार येऊन उभे राहतात. मध्ये सूत्रधार.  मग गणपती येतो, रीध्धी सिद्धी त्याच्या दोन्ही बाजूला असतात. कधी कधी कलाकार माणसं कमी असली तर गणपती एकटाच येतो. गणपती नमन झाल्यावर सरस्वती स्तवन होते. त्यानंतर प्रवेशाचा इशारा देणारा लंगार सुरु होतो. (frantic music: प्रवेश सूचक संगीत). 
सूत्रधार एकेकाचे नाव पुकारतो त्याप्रमाणे कलाकार रंगमंचावर येतात. एक एक जण  येतो. त्याचे येणे म्हणजे जबरदस्त. येताना १५-२० फुटावरूनच तो आवेश घेऊन येतो आणि हे बघायला मिळते कारण रंगमंच तसा उघडाच. लोकांतूनच आवेशाने धावत कलाकार रंगमंचावर येतो. आपला पात्रपरिचय स्वतः स्वगतातून करतो.
प्रसंग सादर करताना नसलेल्या गोष्टी कलाकारांना फक्त अभिनयातून दाखवायच्या असतात. उदा. आग/लागलेला वणवा , नदी, घनदाट जंगल , राजमहाल, युद्ध भूमी , आकाश असे बरेच काही. 
एक मात्र आहे. दशावतार हा प्रकार कोकणातला असला आणि तिथली बोलीभाषा मालवणी असली तरी नाटकातील संवादांची भाषा शुद्ध मराठी असते. पण मधुन मधून वेगळा बाज आणण्यासाठी एखादा प्रसंग (बहुतेकदा भक्त/सर्वसामन्य माणूस असलेला) मालवणीतून सादर केला जातो. लोकांना हे खूप आवडते. या अस्सल मालवणी प्रसंगांना लोक भरभरून दाद देतात, शिट्ट्याबिट्ट्या मारतात. कधीकधी एखाद्या कलाकाराला कोणी गावकरी बक्षीस देतो ते मधेच प्रसंग चालू असतानाच थांबवून सूत्रधार जाहीर करतो. हे फारच मजेशीर आहे.  

आडदशावतार : पूर्वरंगातील संकासुराची गोष्ट आणि त्यानंतरचे दशावतारांचे दर्शन म्हणजे आडदशावतार.

संकासुर
आडदशावताराची सुरवात मत्स्यावतार या  गोष्टीने होते. यात संकासूर नावाचा राक्षस ब्रम्हदेवाकडून वेदांची चोरी करतो आणि विष्णू त्याचा संहार करतो. संकासूर काळे कपडे घालतो. आणि लाल जीभ लावतो. तो सुत्राधाराबरोबर मजेशीर संवाद पण करतो कारण तो दैत्य पण आहे आणि विदुषक पण. बाकीचे  सगळे अवतार सूत्रधाराच्या गाण्यातून सांगितले जातात. कूर्म, वराह यांची सोंगे कधीकधी दाखवली जातात. त्यानंतरचा नरसिंह अवतार दाखवतात. कारण तो लोकप्रिय आहे. वामन, परशुराम यांचे उल्लेख करतात. राम/ कृष्ण यांचे अवतार दाखवतात. आणि उत्तररंगात त्यावर आधारलेली एखादी  कथा दाखवली जाते. कधीकधी हि कथा विष्णूपुराणातीलही असू शकते. 

उत्तररंग/आख्यान

हे एखाद्या पौराणीक कथेचे आख्यान असते. उदा. मी पहिलेल्या नाटकात 'वैष्णव या विष्णूभक्ताच्या भक्तीची कथा सांगितली होती. या भागात युद्धे होतात. पखवाज, पेटी, झांज यांचा कल्लोळ होतो. शेवटी जो दानव असतो त्याचा संहार होतो आणि सुखांत होतो.

नाटकाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला (प्रसाद )वाटला जातो
राक्षस विशेष असतात. त्यांच्या रौद्र, भयानक वेशभूषा, अक्राळ-विक्राळ हसणे आणि आवेशात धावत येणेही  बघण्यासारखे.
युद्ध हा प्रकारहि बघण्यासारखा असतो. ते एक प्रकारचे नृत्यच असते त्याला लंगार नृत्य म्हणतात. त्यात प्रतीद्वंद्वी एकमेकांकडे आवेशाने पाहत, फेर धरून गोल गोल  फिरत राहतात. दैत्याच्या पायात घुंघरू बांधलेले असतात. त्यामुळे त्यांच्या या युद्धनृत्याला एक प्रकारचा ठेका मिळतो. युद्धाच्या वेळी सूत्रधार धुमाळी किंवा केरवा ठेक्यामध्ये गाणी, पारंपरिक गीतरचना घेऊन, त्यावर त्या तालाचा साज चढवतो. युद्धासाठी खोट्या बनवलेल्या गदा, तलवारी यांचा वापर करतात. शेवटी दैत्य धारतीर्थी पडला कि नाट्याचा शेवट होतो. 

मी पाहिलेल्या नाटकात विष्णूच्या भक्ताची वैष्णवाची गोष्ट होती. त्या कथेत यक्ष, विष्णू, वैष्णव, रमा, जटायू, यम,रमाचे आईवडील आणी नारद अशी पात्रं होती. 
नाटकात रमेच्या पतीचा प्राण , वैष्णवाला नारदाच्या सांगण्यावरून यम घेऊन जातो. रमा दुखःविव्हल होते. पुढे नारद विष्णूकडे वैष्णवाच्या प्राणासाठी गाऱ्हाणे घालतो आणि जटायूकरवी विष्णू त्याचे प्राण परत मिळवतो अशी ढोबळमानाने कथा आहे.
अनेकदा नाटकादरम्यान मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. त्यातले जर रंगमंचावर घडणारे असतील तर ते खरं आहे कि नाटकात चालू आहे याचा सुगावा चतुर कलाकार तुम्हाला लागू देणार नाहीत. मी बघितलेल्या नाटकादरम्यान एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. रंगमंचावर विष्णू आणि जटायू हे दोघे, वैष्णवाच्या मृत्यूमुळे दुखःविव्हल झालेल्या रमाबद्धल बोलत होते आणि  दुखःविव्हल झालेली रमा (म्हणजे तिचे काम करणारा पुरुष)  यमाबरोबर दूरच्या टपरीत चहा घेत होता.
ह्या नाट्यप्रकरात असलेला रांगडेपणा, ungroomed , unsophisticated , rawness अन्य कुठेही सापडणार नाही. 
असा हा भन्नाट नाट्यप्रकार एकदातरी नक्कीच पहावा तो या unsophisticated, थेट, आणि raw अनुभवासाठी. ४-५ तास न पेंगता बघण्याची तयारी मात्र पाहिजे!
[डावीकडे यक्ष जो रमावर भाळून तिला पळवण्यास आला आहे. छोटा वैष्णव (मध्ये) तिला वाचवण्यासाठी आला आहे. उजवीकडे रमा]
 नेटके दशावतारी,
तेथे येती सुंदर नारी
नेत्र मोडिती कलाकुसरी,
परी ते अवघे धटिंगण’
(दासबोध ६-८-११) - See more at: http://www.loksatta.com/lokprabha/travel-special-33-1073239/#vuukle_div
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील शामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात (सिंधुदूर्ग) प्रसिद्धी पावला व नमन-खेळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले. - See more at: http://www.pudhari.com/news/kokan/16784.html#sthash.QV86UvAS.dpuf
[यमाला विष्णूविरुद्ध भडकावणारा नारद आणि यम (बाकड्यावर बसलेला)]
[विष्णू आणि जटायू , डावीकडे बसलेले सूत्रधार आणि पखवाजवाला]
[विष्णू आणि जटायू यांच्यातील संभाषण, हा जटायू प्रवेश करताना १५-२० फुटांवरून धावतच आला होता ]

राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील शामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात (सिंधुदूर्ग) प्रसिद्धी पावला व नमन-खेळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात होऊ लागले. - See more at: http://www.pudhari.com/news/kokan/16784.html#sthash.QV86UvAS.dpuf



संदर्भसूची :
१. मराठी विश्वकोश: यावर दशावतारी नाटकाचे फार सुंदर जुने फोटोज बघायला मिळतील.
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand7/index.php/23-2015-01-14-05-21-30/13138-2016-01-27-06-17-44?showall=&limitstart=

२. 'लोकगंगा' : सदानंद राणे
३. History of Indian Theatre, Volume 2 By Manohar Laxman Varapande

No comments:

Post a Comment