Monday 30 January 2017

उर्मिला पवार यांचं 'आयदान'


काही वर्षांपासुन हे पुस्तक वाचायचे मनात होते. शेवटी ते लायब्ररीतून आणून नुकतेच वाचून संपवले. या पुस्तकाविषयी काय लिहावे? खूप खरं-खुरं, अगदी मनाला भिडणारं, बेधडक, जराही आव न आणता केलेलं आत्मकथन. मराठीत 'मेम्वार' (Memoir) या साहित्य प्रकारात मोडणारे लेखन फार नाही. आत्मकथन म्हणजे आत्मचरित्र नव्हे. आत्मचरित्रात अनेकदा अनुभवांबद्धलचे रिफ्लेक्शन नसते. आपल्या अनुभवांना पुन्हा एकदा जगल्यासारखे ते लिहिले जात नाही कारण संपूर्ण जीवनाच्या पटात त्या विशिष्ट अनुभवाचे स्थान दिसेनासे होऊ शकते. या उलट Memoir मध्ये छोट्या कालखंडाबद्धलचे आयुष्य मांडले गेले असल्याने तिथे या अनुभवांचे विस्तृतपणे आकलन लेखकाला करता येते. अर्थात हे पूर्णतः माझं मत आहे. फार तुलना किंवा फरक करण्याएवढी मेम्वार किंवा autobiographies  मीही वाचल्या नाहीत. पण उर्मिला पवार यांचं हे छोटेखानी 'आयदान' मला खूप आवडलं. त्यात खूप मोकळेढाकळेपणा आहे, तो आवडला. 

जीवन अनंत आहे. अनंत! तुम्ही त्या जीवनाचा किती आणि कश्या प्रकारे अनुभव घेऊ शकता? 'अनंत' हा शब्दही जीवनाला पुरणारा नाही. अथांग, अमर्याद! काय वाट्टेल ते म्हणा पण तुम्ही जीवनाच्या अनंत रचना एका फुटकळ, अतिशय मर्यादित आणि अतिशय थोड्या काळाच्या आयुष्यात कधीही अनुभवू शकत नाही. मग ही जीवनाची रूपं तुम्हाला कशी दिसतील? जीवनाचा अवाका (अतिशय थोडा : वन झिलीएन्थ ड्रॉप इन ओशन) तुम्हाला थोडाफार का होईना कसा बघता येईल? हे फक्त पुस्तकंच करू शकतात. चांगली पुस्तकं. या पुस्तकाच्या कोलायडोस्कोपला डोळा लावावा. ते तुम्हाला जीवनाच्या अनंत स्थिती दाखवील. पण पुस्तकही तसं हवं, अनेक डायमेन्शन्सचं... , ज्यातून लेखकापेक्षा कितीतरी वरच्या पातळीवर असतो तो जीवनानुभव... आणि लेखक फक्त तिथे माध्यम असतो व्यक्त करणारा म्हणून फक्त. अशा लेखनातून लेखक दिसत नाही..तर  जीवनाचं रूप दिसतं. त्या लेखनाशी तुम्ही एकरूप होऊ शकता आणि असं लेखन तुम्हाला जीवनाची तुम्ही न बघितलेली रूपं दाखवू शकतं. असं लेखन करणं मुळीच सोपं नाही. भल्याभल्याना ते जमलेलं नाही. असं लेखन आणि अशी पुस्तकंच तुम्ही न जगलेल्या जीवनाचं दर्शन तुम्हाला देऊ शकतात. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' सारखी पुस्तकं. 

या पुस्तकाला अनेक डायमेंशन्स आहेत. म्हणूनच हे पुस्तक जीवनदर्शी आहे, केवळ दलित, स्त्रियांची दुःखं, अपरिमित गरिबी यांच्यावरचं नुसतं भाष्य नाही, अन्यायाविरुद्धचा तळतळाट नाही, सोसलेल्या दुःखाचा सोस नाही, फक्त शांत, mature narration आहे. मी स्वतः खेड्यात आयुष्याची पंधरा वर्षं वाढले. आम्हाला जातीयवाद इ. चा काही प्रश्न नव्हता, आणि बऱ्यापैकी सुखवस्तू कुटुंबात मी वाढले पण तरीही ग्रामीण जीवनाशी, आजच्या शहरातल्या रस्त्याकडेला ओघळलेल्या झोपडपट्ट्या, वस्त्यांतून दिसणारं एकदम डोळ्यात बोट घालणारं गरिबीचं विदारक दृश्य गावात कधी नजरेस पडणार नाही. पण ग्रामीण भागात एक प्रकारची जी गरिबी आहे. जे सुख-चैन-अभावी जीवन आहे, ते मी फार जवळून पाहिलं आहे. ते मला 'लागलं' ही आहे. त्यामुळे या पुस्तकातून काहीतरी अतिशय वेगळं, भयंकर विदारक काही वाचतेय असं मला वाटलं नाही. अर्थात लेखिकेने ते तसे 'सेनसेशनल', उगीचच सनसनाटी अजिबातच लिहिलेलं नाही. गरिबी आणि 'स्त्री' यांची दुःखं कुठल्याही समाजाला लागू आहेत. आणि सर्वात महत्वाचं या पुस्तकांचं हेच यश आहे की यातली बरंचसं जीवन आपणही पाहिलं, अनुभवलं आहे, ते आपणही जगलो आहोत असं पुस्तक वाचताना वाटतं. त्याचबरोबर आपण न अनुवभलेली पराकोटीची दुःखं, आयुष्याने लचके तोडून असहनीय केलेलं जीवनही आपण लेखिकेच्या बरोबर अनुभवतो. 'आयदान' ची सुरवात छोट्या छोट्या गोष्टींनी होते, हलक्याफुलक्या, काही नामुष्कीच्या, काही अतिशय , काही आनंदाच्या, समाधानाच्या , मजेशीर, या सर्वांचा पट शेवटी शेवटी इतका भेदक होत जातो की शेवटच्या पानांनंतर आपण उर्मिला पवार यांच्या मनातून जीवनाच्या खोल तळाशी दडलेल्या अनंत स्थिती पाहू लागतो नकळत. शेवटच्या पानांतील अनेक चळवळींबाबतची खंत, आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगांचा स्वीकार हे लेखिकेच्या या कथनातील अत्त्युच्च शिखर.
 Memoir मधील अनुभवकथनात 'सत्य'(Truth) ही गोष्ट पडताळून (proofs वैगेरेवरून) पाहण्याची नाही तर त्यातले सत्य तुम्हालाही भिडते , कुठेतरी खोल जाणवते ही यावर ते अवलंबून आहे. एक memoir किती सत्य असते हे त्याच्या वाचनाने तुम्हाला काय वाटले, त्या वाचनातून, वाचलेल्या शब्दांतून तुम्ही काय अनुभवले यातून तुमच्यापुरते ठरवता येऊ शकते. त्या दृष्टीने मला हे आत्मकथन अतिशय सखोल सत्याला भिडणारे वाटले. जातीयतेच्या संघर्षाला लेखिकेला लहानपणापासून तोंड द्यावे लागले आणि त्याबद्धलचे काही प्रसंग तिने लिहिले आहेत. पण कुठेही कटुता नाही. विखार नाही. दलित आणि त्यातून स्त्री म्हणजे अजूनही विदारक असा लिहिण्याचा थिम असला तरीही कुठेही रोष, शेरेबाजी नाही. जे ती जगली ते तिने खोलवर अनुभवले आणि त्यातून जे वर आले ते तिने मांडले जे अतिशय निर्मोह , अतिशय पारदर्शी जीवनाचे अंतरंग आहेत.. त्यामुळेच जातीयता, स्त्रीवाद, यांच्याबद्धल भाष्य असूनही हे पुस्तक त्यांच्या खूप पुढे जाते. त्याची पातळी अनुभवलेखनामध्ये खूप वरची ठरली आहे. महेश एलकुंचवार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की जर अनुभव घेणारा अनुभवापेक्षा स्वतःला मोठा समजू लागला तर ते अनुभवकथन (लेखन) फसते. असे लेखन universal होऊ शकत नाही कारण लेखक मध्ये 'मी' 'मी' करून लुडबुडत असल्याने तो अनुभव  वाचकाला कधीच घेता येत नाही. उर्मिला पवारांचं लेखन म्हणजे 'मी पहा कशी, एवढं सोसलं, एवढं भोगलं असं साळसूदपणे केलेलं लेखन तर नाहीच! पण त्याहीपुढे काही लोक जाणूनबुजून 'मी हे भोगलं पण मी हे सांगत नाही कारण माझ्यासाठी ते काही एवढं मोठं नाही' असा जो खोट्या humbleness चा आव आणतात, त्याचा लवलेशही त्यांच्या लेखनाला नाही.  

'आयदान' हा शब्द किती सुंदर आहे, आणि तेवढ्याच सुंदर असतात बांबूच्या पट्ट्यांनी विणलेल्या सुपल्या, रोवळ्या. त्यावरची वीण इतकी कलात्मक की पाहत राहावं. घट्ट, एकमेकात गुंतलेली, अतिशय सूक्ष्म छिद्र असलेली. लहानपणी या सुपल्या, रोवळ्या, डाळी (चटई), कणगी आमच्या गावच्या घरी बघितली आहेत. या पुस्तकावरच्या चित्रात स्त्रीचा चेहराच बांबूच्या पट्ट्यांनी  विणलेलं 'आयदान' झाला आहे. हे 'आयदान' म्हणजेच जीवन नव्हे का? लेखिकेच्या बाबतीतही तर हे 'आयदान' तिच्या आयुष्याचाच पोत आहे. पण हा पोत खरा सर्वांच्याच जीवनाचा नाही का? या जीवनाच्या एकमेकात गुंतलेल्या पट्ट्यांमधलं साम्य आपल्याला जेव्हा लेखिकेच्या लेखनात जाणवतं तेव्हा आपण या पुस्तकात हरवून जातो. त्यामुळे मला हे पुस्तक फक्त दलितवादी, स्त्रीवादी असं न वाटता जीवनवादी अधिक वाटतं. लेखिका पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदात म्हणते 'माझ्या आयुष्याचं हे 'आयदान' त्याची वीण वाचणाऱ्याला काय देणार आहे? फार फार तर त्याला त्याच्या जगण्याची आठवण करून देईल, किंवा एखाद्याला ते फेकून द्यावंसंही वाटेल. पण इथल्या प्रत्येक व्यक्तीचं जगणं हे एक सामाजिक वास्तव आहे एवढ्या दृष्टीनं माझ्याही जगण्याकडे त्याने पाहावं ही अपेक्षा आहे'

त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. ती नुसती मराठी नाही तर रत्नागिरी-चिपळूण कडची-, सिंधुदुर्गाची अश्या अनेक बोलीभाषांनी आंजारली गोंजारलेली ती भाषा आहे. अतिशय वेढून टाकणारा ऎसपैसपणा त्या भाषेत आहे. किती वेगवेगळे चपखल बसणारे ग्रामीण भाषेतील शब्द, बोलीभाषेतील शब्द, यांचा सढळ हस्ते या पुस्तकात वापर झाला आहे. माझे बालपण कोकणात (सिंधुदुर्ग येथे) येथे गेले. त्यामुळे मला हे सर्व लेखन वाचताना खूपच मजा आली. 

या पुस्तकाविषयीखूप वाटलं. असं वाटायला लावणारं हे पुस्तक. 

'आई' या शब्दामागच्या भावना जाणून घेण्यासाठी लेखिका आपल्या आईला विचारतात. त्यांची आई अशिक्षित (लोकार्थाने जग न पाहिलेली) . पण ती सांगते 'आई होनं म्हणजे सती जानं बाय सती... !!'  


आयुष्य कसंही येवो, ते निर्लेप मनानं स्वीकारण्याची हिंमत मात्र मला माझ्या जगण्यानं दिली आहे.
  

No comments:

Post a Comment