Monday 29 August 2016

चित्रकला आणि कलरब्लाइंड रवींद्रनाथ टागोर

'People often ask me about meaning of my pictures, I remian silent, as my pictures are
It is for them to express and not to explain.'

'I have nothing to say about my pictures, I do not know what I have done or wanted to say.'
- Rabindranath Tagore 



रवींद्रनाथ टागोर (ठाकुर) यांना कवी, कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून ओळखले जाते. पण ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे चित्रकारही होते. मी त्यांच्या चित्रांचे एक पुस्तक लायब्ररीत बघतले आणि त्यातली त्यांची चित्रे मला अतिशय आवडली मग त्यांच्या चित्रकलेबद्धल जाणून घ्यावेसे वाटले. २०१३ मध्ये मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट मध्ये टागोरांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले होते. त्याच्या चित्रांचे वैशिष्ट्य असे कि ती खूप काळ लक्षात राहतात. माझ्या मनात ती अधून मधून रेंगाळतात आणि त्यांच्यामागे काय आहे हे जाणून घ्यावेसे वाटते. म्हणून हा खटाटोप करत आहे. त्या चित्रातली गूढ माणसं, विचित्र आकार आणि विलक्षण रंग आणि रेषा यांचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपद्व्याप.

एखाद्या कोकिळ पक्ष्याचे चे आर्त ओरडणे रंगवायचे झाले तर ते कसे रंगवायचे? जेव्हा पोटात भीतीचा गोळा येतो आणि नक्की भीती कश्याची वाटते तेही कळत नाही तेव्हा चित्रात ते कसे दिसेल? जेव्हा एखाद्या माणसाचा फोटो काढला जातो तेव्हा तो चांगले कपडे घालून, केस विंचरून (कदाचित थोडी पावडर फासूनही) फोटोला बसतो. जसाच्या तसा येतो फोटो. पण त्या माणसाच्या आतल्या पिचलेल्या, खचलेल्या, खस्ता खाल्लेल्या, अपमान गिळून, ओढग्रस्त, नकारात्मक अनुभवाने भरलेल्या, कंटाळलेल्या, घाबरलेल्या, कधीकधी रागावणारऱ्या, तर कधी हसणाऱ्या, तर कधी नशीबाला दोष देणाऱ्या 'त्या आतल्या' माणसाचे काय? तो कुठे आहे? फोटोत तर तो कुठेच नसतो. अश्या माणसाचा खराखुरा फोटो, अगदी आत आरपार पाहून काढलेला, मिळेल कधी, असे त्याचे काढलेले खरेखुरे चित्र मिळेल?  कुठून आणायचे रंग आणि आकार मग हे व्यक्त करण्यासाठी? हे रंग मनाच्या तळगाभाऱ्यातले हवेत. पोटात पडलेल्या खोल खळग्यातले हवेत.
त्यासाठी दृष्टी बदलावी लागेल. डोळ्यांचीही आणि मनाचीही. रवींद्रनाथ टागोर यांची चित्र थेट अशी आहेत. माणूस साधासुधा नाही. महामानव.

त्यांनी १५७३ रंगचित्र आणि रेखाचित्र काढली.
त्यांच्या चित्रांकडे बघून अनेकदा असं वाटतं कि या माणसाला जे दिसतं त्यापलीकडे जाऊन, सापडलेलं असं काहीतरी सांगायचं आहे. त्यांच्या चित्रातले रंग तर एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती देतात. आपल्याला  सहजासहजी असे रंग आपल्याला पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या संवेदना काहीतरी खोल जाणीव करतात. का वापरत ते असे रंग? त्यांच्या चित्रांच्या रंगामागे, आकारांमागे कोणते सौंदर्यशास्त्र दडलेले आहे?

त्यांच्या चित्रातील या विचित्र रंगांचे कारण हे आहे रवींद्रनाथांना उतारवयात आलेला रंगांधळेपणा (protanopic-Red-green color blindness, in which the wavelengths of light that we see as the colour red are lost to the eye, and there is confusion between red and green in perception. It is not an illness, just a genetically inherited condition. There is no ‘cure’ for it.). त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी चित्रे काढायला सुरुवात केली. सुरवातीला लिहिताना सहज पेनाने केलेला चाळा म्हणून ते डूडल चित्रे काढीत. हळूहळू त्यात रंग भरणे चालू झाले तसे त्यांनी पेपर, रंग घेऊन त्यावर आपल्या अभिव्यक्तीला मुक्त वाट करून दिली. मुळात कवी, आणि खरं तर असे म्हटले जाते कि 'सगळ्या प्रकारची कला काव्याकडे वळते'. त्याउलट या कवीचे काव्यच चित्र निर्माण करत गेले. काव्य आणि चित्र यात फरकच उरला नाही. त्यांची चित्रकला अतिशय उच्च दर्जाची असली तरी ते स्वतः त्याबाबतीत असंतुष्टच होते. कारण ते स्वतःच्या या अविष्काराला मोजक्या तंत्रशुद्ध, चित्रकलेत मान्यता पावलेल्या अश्या नियमांच्या भिंगातून बघत होते. काही काळानंतर त्यांना स्वतःची चित्रकला इतर चित्रकलेच्या दृष्टीने कमी दर्जाची वाटू लागली. आपल्याला तांत्रिकदृष्ट्या चित्र या वयात शिकणे शक्य नाही आणि चित्रकलेची ती(बहुदा त्यांना अपेक्षित असलेली ) पायरी गाठणे शक्य नाही असे त्यांनी मनाकडे घेतले आणि चित्रकला सोडूनही दिली. पण खरंतर  त्यांची न शिकता काढलेली चित्र खूपच श्रेष्ठ आहेत. खुद्द व्ही. एस. गायतोंडेना विचारले गेले होते कि या काळात भारतात श्रेष्ठ चित्रकार कोण आहे? त्यावर व्ही. एस. गायतोंडेनी रवींद्रनाथ टागोरांचे नाव घेतले होते.  


सगळ्यात वेगळी आहेत त्यांची व्यक्तिचित्र (portraits) आणि  निसर्गचित्रं (landscapes). सगळ्या श्रेष्ठ कलाकृती सारख्याच पातळीवर असतात आणि एकातून दुसऱ्याची आठवण करून देणाऱ्या असतात. टागोरांचे एखादे व्यक्तीचित्र किंवा गडद निसर्गचित्र कधीतरी मनात खोल रुतून बसलेली एखादी संगीताची धून समोर आणते, तर कधी एखाद्या कवितेची ओळ, किंवा ग्रेसची संध्याकाळ.





स्वतःच्या चित्रकलेबद्धल ते म्हणतात, 'Words are too conscious; lines are not. Ideas have their form and color, which wait for their incarnation in pictorial art. Just now painting has become a mania with me. My morning began with songs and poems; now, in the evening of my life, my mind is filled with forms and colors.'

त्यांच्या चित्रकलेवर Ernst Ludwig Kirchner याच्या वूडकट प्रिंटींगचा तसेच 'मलागान कार्विंग', 'हैदा' ( sculptural tradition among the Haida Indigenous Nation from the northwest coast of the North America) , आणि स्क्रीमशौ (scrimshaw is scrollwork, engravings, and carvings done in bone or ivory)  या  कलाप्रकारांचा प्रभाव होता.   
त्यांच्या चित्रकलेबद्धल केतकी डायसन या लेखिकेने 'रोंगेर रबिन्द्रनाथ'(Ronger Rabindranath/ Rabindranather Sahitye o Chitrakalay Ronger Byabahar) या पुस्तकात अभ्यासपूर्ण  लेखन केले आहे. हे पुस्तक मला कुठेही  मिळाले नाही. खूप शोधले. जर मला ते मिळाले तर ते वाचण्यासाठी बंगाली शिकण्याचीही  माझी तयारी आहे. 

There's ultimate mystery at the heart of great art!
'Beauty that can all too easily vanish if we seek to understand it too easily and too quickly'. 

घर थकलेले संन्यासी

घर. म्हणजे नक्की काय? आजवरच्या आयुष्यात आपण कुठे कुठे राहिलो? मी विचार केला, समजत असल्यापासून आजवर जवळपास चौदा वेगवेगळ्या ठिकाणच्या घरात मी राहिले. राहिले म्हणजे दोन चार दिवस नव्हे, तर खरंखुरं वास्तव्य करून, अनेक महिने, अनेक वर्षं. इतक्या घरांना भेटून सुद्धा 'घर' म्हणजे नक्की काय ते मला सांगता येत नाही. 

पण एक अनुभव मात्र आला. घर ही मोठी विलक्षण चीज आहे. आमच्या गावचं घर, किमान दोनशे वर्षं तरी जुनं होतं. लहानपणी खूप राहिले होते तिथे. त्यावेळी अनेक लोकं राहायची तिथे. पण हळूहळू लोकं पांगली. काहींनी आपली स्वतंत्र घरे आजूबाजूला बांधली. माणसेही कमी कमी होत गेली. शेवटी घरात राहणाऱ्या माणसांची संख्या झाली 'एक'. ती होती माझी आजी. शेवटी तीही गेली. आणि घरानेही संन्यास घेतला.  ते ढासळू लागलं. वासे कोरम झाले. भिंतींना चिरा गेल्या. पूर्वी घर होतं  ऐसपैस, अनेक खोल्यांचं. देवखोली आणि तिला लागून असलेली प्रशस्त आयताकृती जागा, जिला 'मधला लोटा' म्हणत. प्रत्येक खोलीला एक वैशिष्ट्यपूर्ण नाव , 'पुढला लोटा', 'मधला लोटा', 'वाणशी' अशी विचित्र नावं. 

या मधल्या लोट्याला लागून जीना, जीन्याच्या बाहेरील भिंतीवरील खालच्या कोपऱ्यात नागोबाचे चित्र. हा चित्रातला पिवळा नागोबा घराएवढ्याच वर्षांचा झाला असावा. पण घर रिकामं झालं आणि नागोबाच्या सोबतीला उरले फक्त कवडसे. फुटक्या नळ्यातून पाझरणारे. आणि उंदरांनी पोखरलेल्या भुसभुशीत जमिनीतून उगवलेल्या वेली. 


माझा भाऊ या कोसळणाऱ्या घराला पाहायला गेला असताना त्याने काढलेला हा वरचा फोटो, पण हा फोटो नाही, आहे एक चित्र, एका जिवंत घराचे. या रिकाम्या पोकळीत आहेत शांत, स्तब्ध उभ्या असलेल्या भिंती, आतल्या एका खोलीचं बंद दार, न दिसणारा जिना, कोपऱ्यातला धूसर झालेला नागोबा. ही पोकळी, हा चार भिंतीत गोठलेला अवकाश आता कधीच डोळ्यासमोर परत दिसणार नाही असेच हा फोटो पहिला तेव्हा वाटले होते. 

जुने घर शेवटी पडले. J.C.B आला. त्याचे पार्थिव बाजूला करून त्या जागी आता एक छोटेसे घर उभे आहे. या नवीन घरात आहे एक देवखोली आणि त्याला लागून असलेला हाच, एवढ्याच आकाराचा मधला लोटा. एवढेच सोपे सुटसुटीत घर. पूर्वी होते माणसांचे घर आता झाले आहे देवांचे घर. त्या घराच्या वर्धापनदिनी आम्ही सर्वजण गेलो होतो. बाजूला आमचे स्वतंत्र घर आहे, तिथे मी रात्री झोपले पण झोप आली नाही.  दुसऱ्या रात्री या नवीन घरात झोपले. आणि काय कोणास ठाऊक पण जेव्हा डोळे मिटले तेव्हा असा भास झाला की आपण जुन्या घरातच झोपलोय. त्याच भिंती,तीच जमीन जिच्यावर वर्षानुवर्षे डोकं टेकलं. चार भिंतीतली तीच पोकळी. तीच स्पेस जी पूर्वी होती. काहीच बदलले नाहीये. हे तर तेच घर आहे. दृश्य भिंतीनी की अदृश्य भिंतीनी बनलेले घर. त्या जागेतला कण अन कण तोच. भिंती कोसळू शकतात पण त्यातलं जिवंतपण कोसळू शकत नाही. आणि बिनघोर झोप लागली.  

या अनुभवावरून घर म्हणजे काय ते समजले नाही पण एवढे मात्र समजले ते म्हणजे घर ही एक मोठी विलक्षण चीज आहे.

Tuesday 9 August 2016

काली


 'काली' ही जी. ए. कुलकर्णी यांची कथा आहे. 'सांजशकुन' या त्यांच्या कथासंग्रहातली. फक्त तीन पानांची आहे. पण त्यांच्या अनेक कथांतील अतिशय परिपूर्ण अश्या काही कथा आहेत त्यापैकी ती एक वाटते. 

एक माणूस एका गावातील कालीच्या देवळात येतो. खुप लांबचा प्रवास करून. गाडीने. पण एका ठिकाणापाशी दारातच उभ्या असलेल्या त्याला कुणीतरी गाडीतून ढकलून देते. तो धडपडतच तोल सावरत चालत्या गाडीतूनच उतरवला जातो. तो गाडीतून कुठे चालला होता? गाडी कुठे चालली होती? कोण जाणे. 

पण उतरवून दिल्यावर मात्र तो म्हणतो, 'मी काही पुढे जाणारच नव्हतो. मला येथेच उतरायचे होते. मग गाडी नीटपणे थांबवायला काय झाले होते?' अर्थात हा राग तो स्वतःलाच सांगतो.

कोण आहे हा माणूस? जो ढकलून दिल्यावर तोल सावरत उतरतो एकदाचा, म्हणतो की मला इथेच उतरायचे होते.  पण मग तो तसे गाडीवानाला सांगतो का? की गाडी थांबेलच असा त्याचा अंदाज असतो? बहुतेक गाडी इथे येईपर्यंत त्याच्या मनाची खात्रीच नसावी कि आपण इथे उतरावे की नाही. तो निर्णय घ्यावा की नाही? निर्णय. चॉईस. तो घेण्याचे स्वातंत्र्य त्याला फक्त तोपर्यंतच होते जोपर्यंत तो गाडीच्या दारापाशी उभा होता. गाडी थांबेपर्यंत नक्की करणार नव्हता तो हा निर्णय. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते का त्याला पण? नव्हते. त्याच्या निर्णय घेण्याआधी तिसऱ्याच कुणीतरी त्याला गाडीबाहेर ढकलून दिले. कुणी? तर अश्या कुणीतरी ज्याच्यावर या माणसाचा कंट्रोल नव्हता. निर्णय कुणी घेतला मग? कुणीही नाही. 
जे काही अभावितपणे  घडलं त्यावरची या माणसाची प्रतिक्रिया म्हणजे 'मला इथेच उतरायचं होतं'. त्याला त्याची नियती कळली होती आणि बहुदा हेही कळलं होतं की आपण फक्त मनात ठरवायचं. प्रत्यक्षात निर्णय घेणं आपल्या हातात नाही. याच जीवनाची सवय लागली होती त्याला. 

जे घडेल त्यावर आपला कंट्रोल नाही हे मान्य आहे त्याला. पण कुरकुर करणे सोडेल का तो? कुरकुर करणे आणि निषेध व्यक्त करणेच त्याच्या हातात असल्याने त्याने तो व्यक्त केला.त्याच्या मनातील अफाट पसरल्या केवळ आणि केवळ त्याच्या विश्वातला(आणि त्या विश्वाचा) तो नायक. त्याला वाटते आपलेच विश्व  खरे. मग आपल्याला उतरताना थोडे अदबीने, मृदूभावाने उतरवले पाहिजे गाडीतून. पण हे त्याचे वाटणे. त्याच्यापुरतेच. त्याच्याबाहेरील विश्वात तो एक कस्पट. म्हणून ढकलून दिले गाडीतून. निषेध गाडीतून ढकलल्याचा नाही. निषेध आपल्या मनातील विश्व खोटे ठरल्याच्या आलेल्या प्रत्ययाचा. 

तो चालत गावात येतो. गाव ओसाड  पडलेले. कड्याच्या पायथ्याशी वसलेले. एका कड्याने आपला काळा फणा गावावर धरलेला. 'काळा फणा' की 'काळ फणा'?.  तो इथल्या स्मृती आठवत, कालीच्या देवळात येतो. गावातील घरे त्याच्या ओळखीची. पण आता तिथे कुणी नाही. हे गाव खरं की परत मनातलं? जुन्या आठवणीतलं? 

हा माणूस आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहे कि जिथून आठवणीत जिवंत असलेली पण आता ओसाड पडलेली घरं त्याला दिसत आहेत? ऊन तर कथा सुरु होते तेव्हापासून साथीला आहेच त्याच्या. कथेला सुरवात होते तेव्हा ऊन प्रखर असते. त्याच्या झळा जाणवत राहतात. ते ऊन आठवणींच्या ओसाड घरांच्या भिंती-छपरावरून निर्विकारपणे ओघळत असते. 

शेवटी जेव्हा तो पायऱ्या चढत कालीच्या मंदिरात पोहोचला तेव्हा ऊन 'थोडे मऊ' झाले होते. 

कालीची मूर्ती भव्य. दोन पुरुष उंच. सहा हातांची. चकचकीत काळ्या पाषाणाची. त्या माणसाने हि मूर्ती पूर्वी अनेकदा पहिली होती. पण तिच्या भेदक नजरेने त्याचा भीतीने थरकाप उडत असे. मूर्तीच्या उजव्या हातात खड्ग होते. काली म्हणजे संहारी. मृत्यूची देवता. या देवळात तो माणूस कश्यासाठी आला होता? त्याने ही मूर्ती पूर्वी अनेकदा बघितली होती, या गावात राहत असताना बघितलेली खरीखुरी, या गावच्या आठवणींमध्ये असेलली, आणि मनातही पाहिलेली. काली त्याने खुद्द बघितलेली आणि काली त्याच्या मनात व्यापून राहिलेली. 

तो देवळाच्या गाभाऱ्याचे वर्णन करतो. गाभारा म्हणजे गर्भगृह. त्यात असलेली कालीची मूर्ती. गर्भातला रक्तरंजित लाल प्रकाश तिच्या सर्वांगावर निथळत होता. गर्भगृहाची विशाल चौकट, पूर्णपणे मोकळी दिसत होती. म्हणजे गर्भगृहात येण्याला मज्जाव नाही. जाण्याला आहे बहुतेक. पण या माणसाला माहित होते कि मोकळ्या दिसणाऱ्या या गर्भगृहाच्या चौकटीत एक अत्यंत पारदर्शक अशी स्फटिकाची भिंत होती. अभेद्य, अदृश्य. त्याला तिचे अस्तिव उमगले होते. या स्फटिकातून आरपार जाण्याचा प्रयत्नही त्याने आधी केला होता, तो जवळजवळ पार झाला असताना ऐनवेळेला त्याला आपली बायको-मुलं आठवली, आणि स्फटिक पुन्हा अभेद्य शिलाखंडाप्रमाणे झाला होता. कोणीतरी ओढून फेकून दिल्याप्रमाणे तो फरशीवर येऊन आधळला होता. 

म्हणजे मागाचचे गाडीतून ढकलणारे इतर कुणीही नव्हते आणि त्यावेळी स्फटिकातून ओढून फेकून देणारेही इतर कोणीही नव्हते. 

जुने आठवून तो थोडा उदास झाला मग पुन्हा स्फटिकापाशी आला आणि कालीला उद्देशून म्हणाला 'देवी, या खेपेला मला स्वीकार. मोहात अपयश आल्याने होणारी यातनाही नको मला आणि यशस्वी झाल्यास क्षणिक तृप्ती देऊन नंतर अनंत असमाधान करणारे सुखही नको मला. मृत्यू अटळ आहे आणि तोच अढळ, निश्चल विश्वास ठेवण्याजोगा. पण एखाद्या मारेकऱ्याप्रमाणे येऊन मृत्यूने माझ्यापुढे प्रहार करावा ही घटना मला कमीपणाची वाटते. मीच मृत्यूपुढे येऊन उभा ठाकलो आणि सन्मानाने त्याच्या अधीन झालो असे एवढे तरी मानचिन्ह माझ्यापाशी राहू दे.'

आपल्या मनातल्या मनात उभारलेल्या विश्वातील त्या विश्वनायकाला मृत्यूचा चोरासारखा येऊन घातलेला घाला अपमानास्पद वाटणारच. कारण त्याच्या विश्वाचा तो हिरो आहे. नायक आहे. माझ्या मनातल्या विश्वातलेच घडावे हीच त्याची इच्छा. त्याविरुद्ध घडणे म्हणजे कमीपणाचे होणारच त्याच्यासाठी. त्यासाठी कालीला प्रार्थना करून तो स्फटिकात शिरतो. 

स्फटिकातून आरपार घेण्यावर त्याच्यात आणि कालीमध्ये अंतर उरतच नाही. जसा तो पुढे जाऊ लागतो तशी कालीची मूर्ती मागे मागे जात लहान होत जाताना तो बघतो. ती शेवटी एवढी लहान होते की तिच्या हातातले खड्ग त्याला शूद्र तुकड्यासारखे दिसायला लागते. आता त्या माणसात भयाचा अंश राहत नाही. समोरच्या भिंतीवर एक पूर्ण भिंत व्यापलेला आरसा असतो. त्या आरश्यात फक्त कालीचा रिकामा चबुतरा त्याला दिसतो. तो जोरजोरात हसतो म्हणतो 'या असल्या मृत्यूने माझ्या जीवाचा थरकाप झाला होता.  या मूर्तीची नजर मला भिववत होती. पण ते स्फटिकाबाहेर. तिथे त्या स्फटिकामुळे मूर्तीचे स्वरूप एवढे भव्य दिव्य झाले होते ज्याला मी घाबरत होतो. पण ही मूर्तीच एवढी टीचभर तर त्या मूर्तीच्या आधाराने जगणारा मृत्यू याहीपेक्षा शूद्र नव्हे तर काय ?' 

पण जेव्हा असे म्हणत, तो हातवारे करत जोरजोरात हसू लागला, खोलीतला प्रकाश त्याच्यावर पडत होता आणि त्याच्या बाजूच्या भिंतीवर देवीच्या दोन पुरुष एवढ्या आकाराची सावली  दिसत होती, तेच हातवारे करत. जेव्हा तो आरश्यापाशी आला तेव्हा पुन्हा त्याच्या मनात भय दाटले. कारण त्या आरश्यात त्याचे प्रतिबिंबच नव्हते. तरीही उसने अवसान आणून तो म्हणाला 'मृत्यू, मी तुज्यावर विजयच मिळवला आहे, मीच आपणहुन तुझ्याकडे आलो, तू माझे शरिर घेऊन गेलास. जे मला नकोच होते. आता हा जो मी उरलो आहे त्याच्यवर शस्त्राचा काही परिणाम होणार नाही. मी आता इथे उभा आहे आणि नंतर त्या रिकाम्या चबुतऱ्यावर उभा राहणार आहे'

सावली कोणाची? प्रतिबिंब कसले? आणि सावली असून प्रतिबिंब नसलेला माणूस तरी कसला? शरीरहीन माणसाला मन असते का? ही सावली कुणाची? मनाची? जी त्याचे हावभाव तसेच्या तसे दाखवत आहे. आणि प्रतिबिंब का बरे नष्ट झाले? की हे सर्व त्याच्या मनाचेच मनाने मनाशीच केलेले खेळ आहेत? आणि प्रतिबिंब न दाखवणारा आरसा तरी कसला?

जेव्हा त्याने मृत्यूला उद्देशून केलेले आपले बोलणे संपवले आणि समाधानाने डोळे मिटले त्याक्षणी त्याचे चाळे  पाहत आतापर्यंत उभ्या असलेल्या कालीच्या मूर्तीने हातातले  खड्ग उगारून त्याचा शिरस्छेद केला. धड फरफटत कोपऱ्यात नेले, आधीचे धड बाजूला करून ताजे धड त्या जागी ठेवले. आणि पुन्हा चबुतऱ्यावर आली. हातात खड्ग घेऊन निर्विकारपणे पाहत उभी राहिली. 

हेच आहे. 
माणूस. मनातला आणि खराखुरा. 
जगणे. मनातले आणि खरेखुरे. 
काली. मनातली आणि खरीखुरी. 
मृत्यू. मनातला आणि खराखुरा. 

आपल्याला  जगण्याचा खराखुरा अनुभव कधी येत नाही आणि आपल्याला खऱ्याखुऱ्या मृत्यूचा अनुभव कधी येत नाही. आपण जे जगतो ते मनात. खरंखुरं नाही. आपण जे मरतो ते मनात. खरा मृत्यू आपल्याला कधी दिसतच नाही. आपण आपल्या मनात. काली आपल्या मनात. सगळं जग आपल्या मनात. आपण कल्पिलेला मृत्यूही आपल्या मनात. 

मनात, 
आपण असे, आपण तसे,
काली तशी, 
जगणे असे,
आणि मृत्यू तसा,
फक्त 'अशी' आणि 'तशी' नसते 
ती वास्तविकता.

Sunday 7 August 2016

भुलेश्वर मंदिर


एका ऊंच टेकडीवर अनेक पडके किल्ल्याचे अवशेष बरोबर घेऊन भुलेश्वर मंदिर उभे आहे. टेकडीवरून दूरवर पसरलेले सपाट प्रदेश दिसतात. ही सह्याद्रीचीच छोटीशी रांग, याला 'सिंहगढ-भुलेश्वर रांग' असेही म्हणतात. या टेकडीवर हे मंदिर तेराव्या शतकात(first half मध्ये) देवगिरीच्या यादव राजवटीने बांधले.पुण्यापासून साधारण पंचेचाळीस कि.मी.  अंतरावर असलेल्या 'यावत' येथे ही टेकडी आहे.

मंदिराचे नाव भुलेश्वर पण या मंदिराला यवतेश्वर असे स्थानिक नावही आहे. भुलेश्वर हे शंकराचे मंदिर आहे, भुलेश्वर म्हणजे भोलेश्वर असावे का? या भुलेश्वर नावावरून एक लोककथा देखील आहे, पण ती तितकीशी रंजक नाही, भुलेश्वर या नावावरून ती रचलेली वाटते. ती अशी आहे की देवी पार्वतीचा शिवाशी वाद होतो  त्यामुळे क्रोधीत होऊन शिवशंकर इथे या टेकडीवर येऊन ध्यानस्थ बसतो. पार्वती ग्रामीण पोशाख करून तिथे येते आणि शिवासमोर नृत्य करते. त्या नृत्याने मोहित होऊन शिवशंकर आपला क्रोध विसरतो. आणि पार्वतीसमवेत परत कैलास पर्वतावर परततो. त्याच्या या मोहित होण्यामुळे ('भुल'ण्यामूळे) या जागेचे नाव म्हणे भुलेश्वर पडले. शिवपार्वतीची अशी कुठली पुराणिक कथा खरोखरच अस्तित्वात आहे का ते बघायला हवे.

मंदिर बाहेरून एखादा किल्ला असावा तसे वाटते. १३ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या परिसरावर त्या काळात यादवांचा अंमल होता, त्यानंतर मुस्लिम राजवट आणि त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली हा प्रदेश होता, त्यामुळे इथे किल्ल्याचे बुरुज, कमानी  आणि इतर भग्न अवशेष दिसतात. 'दौलत मंगल' या नावाने हा किल्ला ओळखला जातो. यातील काही अवशेषांवर मुस्लिम स्थापत्यशैलीची छाप दिसते, तर काही ठिकाणी सोळाव्या-सतराव्या शतकांतील मराठेशाहीच्या बांधकामाची छाप दिसते. या किल्ल्याला प्रवेशद्वार आहे जिथून मंदिरापर्यंत पोचता येते, तसेच हे मंदिर नंतरच्या काळात किल्ल्याच्या इतर इमारतीतच समाविष्ट केले गेले असावे, कारण मंदिरालाच जोडून, दगडी रचना, नगारखाना इ. वास्तू बांधलेल्या आहेत. या मंदिराचे प्रमुख विशेष म्हणजे त्याची अतिशय वेगळ्या प्रकारची रचना. याला 'प्राकारा' (prakara) असे म्हणतात. 'प्राकार' (किंवा प्राकारा) ही एक भिंत असते जी संपूर्ण मंदिराला वेढून बांधलेली असते, एखाद्या कंपाऊंडसारखी. तिच्या बाह्यभागावर फारशी शिल्पकला, सुशोभीकरण केलेले नसते. फक्त वरती गोपुरं(towered gates) असू शकतात. 'प्राकारा' हे द्रविड मंदिरशैलीचे वैशिष्ट्य आहे. तसेच जैन मंदिरातही ती वापरली जाते. 'प्राकारा ' या भिंतीच्या आत खरे मंदिर असते. या 'प्राकारा 'ची रचना मुख्य मंदिराचे संरक्षण करण्यासाठी केलेली असते. अशाप्रकारची शैली १३ व्या शतकात प्रचलित होती. बहुदा या काळात वाढलेल्या परकीय आक्रमणामूळेच अश्या पद्धतीचा अवलंब मंदिरशैलीत केला गेला असावा. १३ वे शतक हा मध्ययुगीन यादवकाळ. या काळात देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रातील अनेक प्रदेशांवर राज्य होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात यादवकालीन मंदिरे सापडतात. यातील काही महत्वाची मंदिरे आहेत सिन्नर (नाशिक) येथील गोंदेश्वर, औंढा नागनाग येथील नागनाथेश्वर मंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, लोणारचे दैत्य सुदान मंदिर, तसेच यवत येथील हे भुलेश्वर मंदिर.

हे शिवमंदिर असल्याने येथील शिल्पांवर शैव प्रतिमा(iconography) आढळतात. मंदिराला वेढलेल्या 'प्राकारा' ह्या  भिंतीला आतल्या बाजूने अनेक देवकुलिका (देवतांसाठी असलेली खोरणे(cells) आहेत. ही रचना चौसष्ट  योगिनींच्या मंदिरासारखी वाटते. सोमनाथपूर(बेलूर) येथील चन्नकेशव नावाचे होयसळ मंदिरही अश्या प्रकारच्या रचनेचे आहे. त्या मंदिरच्या सभोवतालच्या 'प्राकारा' भिंतीच्या आतल्या बाजूने चौसष्ट cells आहेत. नंतरच्या काळात (१२ व्या - १३ व्या शतकात) या अशाप्रकारच्या प्राकारा भिंतीचा अवलंब आतले मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असावा. चन्नकेशव मंदिर तर वैष्णव मंदिर आहे, तिथे अश्या भिंतीमधल्या चौसष्ट cells चा(चौसष्ट योगिनींच्या  रचनेसारखा) वापर का केला असावा हे एक कोडेच आहे. यावरून समजते की 'प्राकार' ही यादव आणि इतर दक्खनी मंदिराची नेहमीची रचना नसून, तिचा अवलंब बाहेरील रचनाशैलीवरून केला आहे.

भुलेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे, मंदिराची रचना सर्वप्रथम नंदीमंडप, त्यानंतर मंडप(सभामंडप), अंतराळ आणि शेवटी गर्भगृह अशी आहे. नंदीमंडपात नंदीची गर्भगृहाकडे तोंड करून असलेली अवाढव्य मूर्ती आहे. अंतराळ हा एक छोटासा भाग (passage)असतो जो मंडप(सभामंडप) आणि गर्भगृहाला जोडतो. या मंदिरातील अंतराळ आणि गर्भगृहामध्ये दरवाजा नाही, अंतराळालाच दरवाजा आहे आणि त्यावर अतिशय सुंदर शिल्पं, सुशोभीकरण केलेलं आहे. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांवर कीर्तिमुख आहेत. आणि त्यावरची हंसाची सुंदर रचना केलेली शिल्पपट्टी आहे. गर्भगृहात शंकरची पिंडी आहे.

नंदीमंडपातील नंदी

मंदिराच्या 'प्राकारा' भिंतीला आतल्याबाजूने असलेले खांब(pillar), मंदिराच्या मंडपाच्या खांबांसारखेच आहेत, फक्त मंडपांच्या खांबांवर  नागशीर्षक(फणाधारी नाग) आहेत, आणि प्राकाराच्या खांबांवर कीचकशिल्पं आहेत. 'कीचक' नावाचा शिल्प नमूना (motif) मंदिरांच्या खांबांवर वापरला जातो. खांब जिथे छपराला जोडला जातो, त्या ठिकाणी हात वर टेकवून आधार देत असल्यासारखी, 'भारवाहक' या अर्थाने,त्याची प्रतिमा बहुदा वापरली जाते.
भारवाहक किचक
मंदिरातील देवीदेवतांची बहुतेक शिल्पं 'त्रिभंगा' या अवस्थेत(posture मध्ये) आहेत. ही उभं राहण्याच्या निरनिराळ्या अवस्थातील एक अवस्था आहे. ज्यामध्ये शरीर तीन ठिकाणी वेगवेगळ्या कोनांतून वाकलेलं असतं त्याला 'त्रिभंगा' अवस्था म्हणतात. ह्या अवस्था नृत्यकलेतील, नृत्याच्या पावित्र्याशी निगडित आहेत. मंदिर शिवाचे असल्याने देव देवता शिवाशी निगडित अश्या आहेत. त्यातील काही महत्वाची शिल्पं आहेत मातृकांची (mother deities).

मातृका : गणेशी, माहेश्वरी , ब्राह्मणि
या मातृकांची उपासना प्राचीन काळापासून चालत आली आहे, त्यातील अनेक मातृकांची शिल्पं तीन-तीन च्या गटाने मंदिराच्या भिंतींच्या वरच्या भागांवर कोरलेली आहेत. या मातृका आहेत, माहेश्वरी, ब्रह्माणी, कौमारी, वैष्णवी, चामुंडा, इंद्राणी(ऐंद्री(aindri), शची), वराही. यांना सप्तमातृका म्हणतात, या  मातृकांमध्ये नरसिंही, महिषासुरमर्दिनी यांचाही कधीकधी समावेश होतो. तसेच या मातृकांबरोबर गणपती किंवा कार्तिकेय (स्कंद) यांचीही मूर्ती असते. भुलेश्वर येथील मातृकांच्या मूर्तींमध्ये गणेशी(विनायकी) ही एक अत्यंत वेगळी मूर्ती आहे. ही गणेशासारखी दिसणारी परंतु स्त्रीमूर्ती आहे. खरेतर सप्त किंवा अष्टमातृकांमध्ये गणेशीचा उल्लेख होत नाही. वैनायकी/गजाननी नावाची एक देवता (गज मुख आणि गणपतीसारखीच दिसणारी) चौसष्ट योगिनींपैकी एक आहे. तिची मूर्ती या मंदिरात का आहे ते मात्र कळत नाही. ह्या मंदिराचा तांत्रिक संप्रदायाशी तसा संबंध होता की नाही ते इतर इतर काही पुरावे नसल्याने सांगता येणार नाही. शैव पंथाशी निगडित काही इतर शिल्पं मात्र सापडतात, जश्या भैरव आणि चामुंडा यांच्या मूर्ती.

मंदिरातील अलंकरण केलेल्या शिल्पांबरोबरच रामायण आणि महाभारतातील प्रसंग देखील शिल्पात कोरलेले आढळतात. 
रामायण, महाभारतातील प्रसंग
मंदिराची शिखरं नंतरच्या काळात (१३व्या शतकानंतर)बांधलेली वाटतात. शिखरांवर असलेल्या शिल्पांत सिंह, मकर यांची अतिशय वेगळ्या शैलीतील  शिल्पं आहेत. तसेच प्राकाराच्या बाहेरील भिंतीच्या टोकावरची (गोपुरांवरची) शिल्पे अतिशय वेगळ्याच शैलीची (आणि आधुनिकही) वाटतात. 








मंदिरात सामावलेली सृष्टी आणि काही जिवंत शिल्पं
कीर्तिमुख
'कीर्तीमुख' हे बहुतेक शिव मंदिरांवर सापडणारे शिल्पं अतिशय वेगळे आहे. कीर्तीमुख म्हणजे 'face of fame'. कीर्तीमुखाची गोष्टही फारच रंजक आहे. एकदा एक अतिशय बलाढ्य दैत्य राक्षस इतकी अंदाधुंदी माजवतो की देवही घाबरतात. शेवटी त्या राक्षसापासून सुटकारा मिळावा यासाठी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ते शंकराकडे जातात. शंकर त्या राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी एक दैत्य राक्षस निर्माण करतो. हा राक्षस जे दिसेल त्याला खाऊ शकणारा असतो. आणि सतत फक्त खाणे(गिळंकृत करणे) हेच त्याचे काम असते. त्या अंदाधुंदी माजवणाऱ्या राक्षसापुढे शंकर हा नवीन राक्षस सोडतो. तेव्हा अंदाधुंदी माजवणारा राक्षस शंकराला शरण येतो आणि या सतत खाणाऱ्या राक्षसापासून वाचवण्याची विनंती शंकराला करतो. शंकर प्रसन्न होऊन त्याला जीवनदान देतो. आता नवीन निर्माण झालेला सतत काहीतरी खाऊ पाहणारा राक्षस मात्र आता मी कुणाला खाऊ असे शंकराला विचारतो. तेव्हा शंकर त्याला सांगतो की तू स्वतःलाच खा. त्यावर आज्ञेचं पालन करून तो शेपटीपासून स्वतःलाच खाऊ लागतो आणि शेवटी फक्त त्याचे मुख शिल्लक राहते. तेव्हा शंकर त्याच्या आज्ञाधारकतेवर प्रसन्न होतो आणि त्याला वर देतो. शंकर त्याला सांगतो की आजपासून तुझे नाव 'कीर्तिमुख' असेल आणि माझ्या प्रत्येक रहिवासाच्या ठिकाणी, मंदिरांवर तुझे वास्तव्य असेल. या कीर्तीमुखाची अशी कहाणी आहे. या कहाणीमागे 'स्वतःचा स्वतःच नाश करणे म्हणजेच स्वतःचा अहंकार (ego) / अहं याचा स्वतःच नाश करणे असा मतितार्थही असू शकतो. 'Medieval Temples of Dakhan' या Henry Cousen यांच्या पुस्तकात दिलेली कीर्तीमुखाची गोष्ट थोड़ी वेगळी आहे. ती अशी की जालंधर नावाचा राक्षस पार्वतीवर लुब्ध होऊन तिला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करू लागला. तेव्हा शिवाने आपल्या त्रितियनेत्रातून एक असा भयंकर राक्षस निर्माण केला ज्याने शिवाकडे  काहीतरी गिळंकृत करण्यासाठी देण्याची मागणी केली, त्यावर शिवाने त्याला स्वतःलाच गिळंकृत करण्याची आज्ञा केली, जिचे पालन करून त्याने स्वतःला मुखापर्यंत खाऊन टाकले. या आज्ञापालनावर प्रसन्न होऊन शिवाने त्याला 'कीर्तीमुख' ही पदवी दिली. या कीर्तीमुखाचे शिल्पं शंकराच्या मंदिराच्या मुख्य द्वारावर, शिखरांवर असतात. तसेच सुशोभीकरणाच्या शिल्पपट्ट्यातही असतात. 

या शिल्पाशिवाय हंस, मकर, हत्ती, उंट , सिंह अश्या प्राण्यांची शिल्पंही मंदिरात आहेत. आतल्या भिंतींवर जी उंटांची शिल्पं आहेत, तशी शिल्पं महाराष्ट्रातील इतर मंदिरात क्वचितच सापडतात. या शिल्पांचे सौन्दर्य अतुलनीय आहेच पण काही जिवंत शिल्पंही मंदिराचा भाग झाली आहेत. ही शिल्पं आहेत आजूबाजूच्या झाडांची, प्राण्या-पक्षांची जे या मंदिराचे रहिवासी आहेत. त्यातले एक आहे 'चार झाडांचे एक झाड'. हे आहे पिंपळाचे झाड, झाडाभोवती पार बांधलेला आहे, या झाडाचे वैशिष्टय आहे हे की या झाडाच्या बरोबरच कडुनिंबाचे ('निम') झाड, वेलीसारखे दिसणारे  दुसरे आणि तिसरे आणखी छोटे झाड अशी चार झाडे एकत्रितपणे एकमेकांत दाटपणे मिसळून गेली आहेत. तशीच आहेत मंदिराच्या बाजूची गुलमोहर, चिंच, कडुनिंब अशी अनेक झाडं. मंदिरांवरची आणखी जिवंत शिल्पं म्हणजे तिथे राहणारे पोपट, रखवालदाराचा रुबाबदार कुत्रा आणि मंदिरात डोळे मिटून ध्यान करीत बसलेले मांजर.

निसर्गाच्या कुशीत राहून, निसर्गालाच कडेवर घेऊन झाडे, पाने , फुले, पशु, पक्षी यांच्या सानिध्यात उभे असलेले हे मंदिर परत परत भेट द्यावे असे आहे. 


मंदिराजवळची जिवंत शिल्पं
(सर्व फोटोग्राफी सौजन्य : मधुमिता कुळकर्णी)